Wednesday 2 August 2023

या प्रॉब्लेममधून 'सुटका' कशी होणार?

एक दिवस अचानक सकाळी अभयचा फोन आला. “काकू, तुझी थोडी मदत हवी आहे. मदत, सल्ला, मानसिक आधार, खरं म्हणजे हे सर्वच हवं आहे. मला अर्जंटली तुला भेटायचं आहे. कुठे येऊ?”

अभय, आमच्या शेजारच्या सरोजताई, यांचा मुलगा. अगदी बालवाडी पासून बघितलेला. कॉलेजच शिक्षण होईपर्यंत संपर्कात होता. पुढे नोकरी निमित्त सरोजताई आणि मोहनराव दिल्लीला शिफ्ट झाले आणि ह्या सगळ्यांचा संपर्क तुटल्यासारखा झाला. आज अचानक अभयचा फोन आला. छान पण वाटलं आणि थोडी काळजी पण! थोडी विचारपूस केल्यावर असं समजलं की, अभय सध्या नाशिकमधे आहे, आणि एका निवासी शाळेतील व्यवस्थापनाची त्याच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या शाळेत काम करणाऱ्या एका मावशींच्या घरी काहीतरी प्रोब्लेम झाला आहे. आणि त्यांना तातडीने मला भेटायचं आहे. ‘घरी प्रोब्लेम आहे’ ह्या माहितीवरून आधी वाटलं नवरा-बायको मधील भांडण असेल. “त्यांना महिला हक्क संरक्षण समितीच्या ऑफिस मधे दुपारी चारच्या सुमारास भेटायला घेऊन ये. आत्ता मला आधी बाल कल्याण समितीत जाण गरजेचं आहे.” असं सांगून फोन ठेवणार, तेवढ्यात अभय म्हणाला, “काकू, मावशींची संगीता १३-१४ वर्षांची आहे. आणि तिच्या संदर्भात मदत हवी आहे.” हे ऐकल्यावर मी त्यांला बाल गृहात (जेथे बाल कल्याण समिती नियमित पणे भेटते तेथे) भेटायला बोलावलं.

ठरल्या प्रमाणे अभय आला. पण त्याच्याबरोबर एक ३५-शीतला माणूस होता. अभयनी त्यांची ओळख करून दिली, “काकू, हे माधवराव. आमच्या कडे काम करणाऱ्या मंगल ताईचा नवरा. ह्यांच्या मुलीचा प्रोब्लेम आहे. तू प्लीज काहीतरी मार्ग सुचव. त्यांचंच काय आमची सगळ्यांची डोकी बंद पडली आहेत.”

माधव खाली मान घालून उभा होता. त्याच्या चेहेर्यावर टेन्शन दिसत होतं. त्याचा अवतर, सुजलेले डोळे, विस्कटलेले केस, ह्यावरून जाणवत होतं की रात्रभर हा झोपलेला नाहीये. माधवच्या चेहेर्यावर जी काळजी दिसत होती ती तो बोलायला लागल्यावर आणखीन तीव्रतेनी जाणवली. “काय प्रोब्लम आहे तो बसा आणि शांतपणे सांगा” मी असं सांगितल्यावर, माधव रडायला लागला. आता पर्यंत स्वतःच्या भावनांना कसं तरी त्याने कंट्रोल केलं होतं. “ताई, हे काय होऊन बसलं? हे कसं झालं? आमचं हसत-खेळत कुटुंब उद्वस्त झालं. ताई, माझ्या संगीताला वाचवा. ती खूप लहान आहे. तिला काय चाललाय ते समजत नाहीये. काय झालाय, कसं झालाय ते सांगता येत नाहीये. तिला पोटात दुखून होणार्या वेदना सहन होत नाहीयेत. आज पर्यंतच्या आयुष्यात आम्ही कधी कोणाचं वाईट चिंतील नाही. मग माझ्या संगीताच्या वाट्याला हे सगळं का?”

ह्यात मी काय आणि कशी मदत करू शकणार होते. त्यांनी मुलीला डॉक्टर कडे घेऊन जाण अपेक्षित आहे. अभय ह्यांना घेऊन माझ्या कडे का आला असेल? माझा प्रश्नार्थक चेहेरा बघून अभयच्या लक्षात आल की माधवराव जे सांगतायत आणि जसं सांगतायत त्यांनी काहीच अर्थबोध होत नाहीये. तो म्हणाला, “काकू, संगीताच्या पोटात खूप दुखत होतं म्हणून तिला दवाखान्यात तपासायला नेलं आहे. मंगल ताई तिच्या सोबत आहेत. पण मला जेवढं समजलंय त्यावरून असं जाणवतंय की त्यांना तुझ्या सल्ल्याची गरज.....”तेवढ्यात अभयचा फोन वाजला. “हलो मंगलताई. काय? काय सांगताय काय? हे कसं शक्य आहे? तुम्ही तिथेच थांबा. मी काकूला घेऊन लगेच येतो.”

मी हातातील काम संपवलं आणि अभयच्या गाडीतून आम्ही सगळे निघालो. लेडी डॉक्टर कुलकर्णी ह्यांच्या क्लिनिकला गेलो तर समजलं की त्यांनी संगीताला स्त्री रोग तज्ञाकडे घेऊन जाण्यास सांगितले म्हणून मंगलताई संगीताला डॉ. पाटील ह्यांच्या कडे घेऊन गेल्या आहेत. कुलकर्णी डॉक्टरांनी जे सांगितलं ते खूप विचित्र, गंभीर आणि मन सुन्न करणारं होतं. त्या म्हणाल्या, “मी संगीताला तपासलं. तिची पोट-दुखी अपचन किंवा इतर छोट्या-मोठ्या कारणांनी उद्भवलेली नाहीये. आय थिंक इट्स समथिंग सिरिअस. माझ्या कडे तिची treatment होऊ शकणार नाही.” त्यांनी माझ्या कडे बघत विचारलं,” madam, आपण संगीताच्या नातेवाईक आहात का? तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे.”

मी, माझी ओळख, बाल कल्याण समिती सदस्य अशी करून दिली आणि त्यांना खात्री दिली की माझ्या बाजूनी जी शक्य असेल ती मदत, सहकार्य मी करीन.

आम्ही पाटील डॉक्टरांकडे पोहोचलो तर बाहेरच्या बाकावर मंगलताई एकट्याच रडत बसल्या होत्या. मी शेजारी बसत, त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाले, “मंगलताई, सर्व ठीक होईल. काही काळजी करू नका.”

माझा आवाज ऐकून त्या माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन लहान मुलीसारख्या रडल्या. काल दुपारी संगीताला  राधाबाईंनी घरी आणून सोडलं तेंव्हापासून मंगलताईच्या आयुष्यात इतक्या अनपेक्षित गोष्टी घडल्या होत्या की त्याची विचार करायची ताकत संपून गेली होती. संगीताच्या तब्येती बद्दल डॉक्टरांचं मत, केलेल्या टेस्ट, हाती आलेला रिपोर्ट, झालेला खर्च, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यात आपल्या लेकीचं दुख कमी करू न शकण्यामुळे आलेली हतबलता. आणि आता पाटील डॉक्टरना वाटणारी शक्यता. सर्वाच खूप टेन्शन आल होतं. काल संगीताच्या शाळेतून तिच्या वर्ग शिक्षिकेचा फोन आला होता. त्या म्हणाल्या होत्या, ‘संगीताची तब्येत ठीक नाहीये. मंगलताई तुम्हाला मागील तीन महिन्यात खूप वेळा हा निरोप मी दिला. पण तुम्ही काही त्याची दाखल घेतली नाहीत. संगीता, एक चुणचुणीत, खेळकर आणि हुशार मुलगी आहे, सध्या ती कशातच सहभागी होत नाही. ना खेळाच्या तासाला सहभाग घेत, ना तिचं अभ्यासाकडे लक्ष आहे. वारंवार तब्येतीच्या, पोट दुखण्याची तक्रार करत असते. मी आज तिला राधाबाई सोबत घरी पाठवते आहे. तिला प्लीज डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरचा रिपोर्ट घेऊन तुम्ही स्वतः भेटायला या. तिची काळजी घ्या.’

मंगलताई थोड्या रीलेक्स झाल्या. आता त्यांना माझ्याकडून मदतीची काय अपेक्षा आहे असं विचारावं, असं माझ्या मनात आल. तेवढ्यात पाटील डॉक्टरनी आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. अभय आणि मंगलनी आग्रह केला म्हणून मी आत गेले. डॉक्टरनी बोलण्यापूर्वी सर्वाना बसायला सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी तुम्हाला संगीताच्या तब्येतीबद्दल सांगायला बोलावलं आहे. मी जे सांगणार आहे ते तुमच्यासाठी अनपेक्षित असणार आहे ह्याची मला कल्पना आहे. माझ्याकडे वेळ फार नाहीये. संगीता गरोदर आहे. सातवा महिना संपत आला आहे. तिची प्रकृती खूप नाजूक आहे. तिला ह्या वेदना सहन करण अशक्य आहे. ताबडतोब डिलिवरी करण गरजेचं आहे. मला तिच्या पालकांकडून त्या अर्थाची लेखी परवानगी हवी आहे. खरं म्हणजे तिचं वय बघता हि डिलिवरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये व्हायला हवी. पण आपल्याकडे वेळ नाहीये. मुलीचा जीव वाचवणे जास्त महत्वाचे आहे. प्लीज मुलीच्या पालकांनी ह्या फोर्मवर सही करा.”

पाटील डॉक्टर बोलायच्या थांबल्या. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही सगळे सुन्न झालो. हे कसं शक्य आहे? १३-१४ वर्षांची शाळेत शिकणारी मुलगी आणि गरोदर. कोणाचाच आपल्या कानांवर, जे ऐकलं त्याच्यावर  विस्वास बसत नव्हता. माधवरावांनी बधीर चेहेर्यानी फोर्मवर सही केली. डॉक्टर, संगीताची आणि बाळाची सुटका करायला घाईने आत गेल्या. ह्या सगळ्या अनपेक्षित बातमीने मंगलताई बेशुद्ध झाल्या. दवाखान्यातील नर्सच्या मदतीने त्या सावरल्या खर्या पण भ्रमिष्टासारखी बडबड करायला लागल्या. “माझी संगीता गरोदर? हे कसं शक्य आहे? हे कधी झालं? कसं झालं? तिने लग्न कधी केलं? का आम्हीच करून दिलं? हे सगळं काय चाललाय? कोणीतरी मला प्लीज सांगा ना की हे खरं नाहीये. ताई तुम्ही तरी सांगा. संगीताचे बाबा हे काय होऊन बसलं? आता पोरीला काय सांगायचं? तिच्या शाळेत, तिच्या बाईना काय सांगायचं? आपली संगीता तर शाळा आणि घर ह्याच्या व्यतिरिक्त कोणा मैत्रिणीकडे काय, कुठे कधीच गेली पण नाही. मग हे कधी आणि कसं झालं?”

त्यांना वाटणारी काळजी, त्यांना पडलेले प्रश्न, हे सगळं त्यांच्या जागी योग्यच होतं. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त संगिताच देऊ शकत होती. पण ती आता ना कोणाशी बोलायच्या ना कोणाला भेटायच्या परिस्थितीत होती. मंगलच्या मनात उलटे सुलटे विचार येत होते. तिला एक क्षणभर असं पण वाटलं की दिवसभर आपण कामानिम्मित्त शाळेत असतो. तिचे वडील माल पोहोचवायला टेम्पो घेऊन दोन-दोन दिवस बाहेरगावी जातात. आम्ही दोघं घरात नसताना कोणी आपल्या मुलीला फसवलं तर नसेल ना? ती आपल्याशी कधीच काहीच कसं बोलली नाही? विचार करून करून तिचा मेंदू फुटायची वेळ आली होती. माधवराव पूर्ण वेळ भकास चेहेर्यानी आपल्या बायकोला आधार देत, तिच्या खांद्यावर हात ठेऊन बसले होते. त्यांच्या मनातील विचारांच्या गोंधळाचा काही अंदाज येत नव्हता.

तासाभरानी पाटील डॉक्टरनी निरोप दिला की संगीता आणि बाळ सुखरूप आहेत. संगीता ह्या सगळ्यामुळे खूप दमली आहे. बाकीचे (सोपस्कार) फोर्मेलीतीस नंतर करू. संगीता बरी आहे. आजचा माझा दिवसपण खूप धावपळीचा गेला होता. शिवाय तिथे थांबून मी करण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणून मी तिथून निघाले. अभय मला घरी सोडायला आला. मी उतरताना तो म्हणाला, “काकू, थेंक्स. तुझ्यामुळे माझ्यासाठी गोष्टी खूप सोप्या झाल्या. तू आल्यामुळे त्या दोघांना आणि मला खूप आधार वाटला. आता पुढे कसं आणि काय करायचं. संगीताशी आणि तिच्या पालकांशी बोलायला उद्या येऊ शकशील का? तू येऊ शकलीस तर खूप बर होईल.  प्लीज जमवना.”

संगीताला ज्या दिवशी डिस्चार्ज मिळेल त्या दिवशी मी येण्याचं कबूल केलं. मी काय काम करते हे समजल्यावर  दुसर्या दिवशी सकाळीच मला पाटील डॉक्टरनी फोन करून बोलावून घेतलं. संगीताच्या केस मधे पुढे काय फोर्मेलीतीस कराव्या लागतील ह्या संदर्भात चर्चा करण्या साठी. आम्ही दोघींनी संगीताच्या पालकांना आणि अभयला पण त्या चर्चेत सहभागी करून घेतलं. त्यांना ह्या संदर्भातील कायदा, त्यांनी बाळाच्या संदर्भात घ्यावयाचा निर्णय, ज्या कारणांनी आणि परिस्थितीत संगीता गरोदर राहिली असावी ते बघता पोलिसांना ह्या संदर्भात रिपोर्टिंग करण्याची गरज, अश्या एक ना अनेक गोष्टींची कल्पना देण्याची आवश्यकता होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, संगिताच वय लक्षात घेता, बाळ आणि बाळाचा जन्म ह्याबद्दल संगीताशी बोलण्यात आमच्या सर्वान मधे एकवाक्यता असणं फार गरजेचं होतं.

सर्वप्रथम सर्वांनी एकमतानी ठरवलं की संगीताशी फक्त तिची आईच ह्यासंदर्भात बोलेल. त्याप्रमाणे तिने संगीताला दुसर्या दिवशी सांगितलं की, ‘तुझ्या पोटात एक गाठ झाली होती. त्याच्यामुळे तुझं पोट सारखं दुखत होतं. आता डॉक्टरनी ती गाठ काढून टाकली आहे. आता तुला बर वाटेल. महिन्या भरानी तू परत शाळेत जाऊ शकशील.’ संगीताला किती समजलं, किती पटलं, आम्हाला समजायला काही मार्ग नव्हता. पण तिने नंतर त्या संदर्भात कोणाला काहीच प्रश्न विचारला नाही.

संगीताला दवाखान्यातून घरी सोडण्यापूर्वी काही माहिती घेणं गरजेचं होतं. तसच त्या बाळाच्या संदर्भात निर्णय घेणं पण आवश्यक होतं. डिलिवरी नंतर पाच एक दिवसांनी मी संगीताला आणि तिच्या पालकांना भेटायला गेले. तेंव्हा असं समजलं की मे महिन्याच्या सुट्टीत संगीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. मामाच्या शेतात ती रोज तिच्या मामे भावंडांबरोबर जात होती. एक दिवस काही कारणांनी बाकीची मुलं घरी निघून आली आणि ती एकटीच बराच वेळ शेतात होती. जेवायची वेळ झाली तरी संगीता आली नाही म्हणून मामी बघायला गेली. संगीता एका झाडाखाली रडत बसली होती. केस विस्कटलेले, अंगातील कपडे चिखलानी माखलेले, हाता-पायाला, चेहेर्याला चिखल लागला होता. मामीनी ‘काय झालं? कसं झालं?’ विचारलं तर म्हणाली, ‘मला इथे नाही राहायचं. मला आईची आठवण येतीये. इथली माणस चांगली नाहीयेत.’

तेंव्हा मामीला वाटलं, संगीताला इकडे येऊन बरेच दिवस झाले आहेत म्हणून कंटाळली असेल. शिवाय मुलांमध्ये किरकोळ कारणांवरून होणारी भांडणं आणि तिच्या वयाची शेजारची स्नेहा पण बाहेरगावी गेली आहे. आता तिला खेळायला तिच्या वयाचं कोणी जोडीला पण नव्हतं. म्हणून मामा-मामीनी संगीताला नाशिकला पाठवून द्यायचं ठरवलं.

संगीतानी पण मामी म्हणाली तशाच अर्थाचं स्तेतमेंत दिलं. ती जे म्हणत होती की, ‘इथली माणस चांगली नाहीत’, ह्याचा असा संदर्भ असेल असं तेंव्हा कोणाच्या मनात पण आल नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली खरी, पण त्यांना पण ठाऊक होतं आणि आम्हाला पण समजत होतं की ह्यात पुढे काहीच होऊ शकणार नाही. ना ते आरोपी सापडतील, ना त्यांना शिक्षा होऊ शकेल!

अजून एक शंका मनात येत होती की संगीता सात महिन्याची गरोदर झाली तरी मंगलच्या लक्षात हि गोष्ट कशी आली नाही. त्याचं एक उत्तर असं होतं की शाळेतून घरी आल्यावर संगीता सैलसर गाऊन घालायची. त्या मुळे तिच्या शरीरात होणारे बदल मंगलताई च्या लक्षात आले नाहीत.

आता शेवटचा प्रश्न होता तो म्हणजे त्या बाळाचा! खरं म्हणजे ह्या सगळ्यात त्या बाळाचा काहीच दोष नव्हता. कोणाच्या तरी चुकीच्या वागण्याची शिक्षा ते आयुष्यभर भोगणार होतं. संगीताला तर त्याच्या अस्तित्वाची कल्पना पण नव्हती. मंगलला ते नजरेसमोर पण नको होतं. तिने एका वाक्यात तिच्या बाजूनी विषय संपवला, “ताई, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. तुम्ही त्याला मंदिरात ठेवा नाहीतर नदीत सोडा. त्या जीवाचं तुम्ही काहीपण करा. आमची संगीता ह्या सगळ्यातून सही सलामत सुटली हेच  आमच्यावर देवाचे खूप खूप उपकार.”

मागील चार पाच दिवसात भोवताली घडणाऱ्या सर्व घटनांचा त्रयस्त व्यक्ती प्रमाणे साक्षीदार असणार्या  माधवरावांना बाळाच्या संदर्भात काहीतरी मत होतं. ते म्हणाले, “ताई, मंगल म्हणतीये ते बरोबर आहे. ह्या बाळाचा आणि आमचा काही संबंध नाही. खरं म्हणजे संबंध असणं किंवा त्याचा विचार येणं पण आमच्यासाठी खूप क्लेशदायक आहे. पण कोणाच्या तरी चुकीच्या वागण्याची शिक्षा ह्या निष्पाप जीवानी आयुष्यभर का भोगायची? आम्ही सर्व विसरायचा प्रयत्न करून नव्यानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू. पण ह्या छोट्याशा जीवाचं काय? ह्या बाळाला कोणी पालक मिळू शकतील का? ते कसे शोधता येतील? तुम्ही त्यासाठी आम्हाला काही मदत करू शकाल का?”

मी होकारार्थी मान हलवली आणि त्यांना सांगितलं की, “संगीता नाबालिक आहे. तिच्या पालक ह्या नात्यांनी तुम्ही त्या बाळा वरील हक्क अर्ज करून सोडू शकता. अशी बालक दत्तक देण्यासाठी मुक्त घोषित करून त्यांच्या साठी योग्य पालक शोधता येतात.

जादू केल्यासारखं माधवरावांच्या चेहेर्यावर एक वेगळाच भाव दिसला, जणू काही त्यांच्या मनावरील एक मोठ्ठ ओझं उतरलं असावं. “ताई, तुमचे खूप खूप आभार! आम्हाला केलेल्या मदतीबद्दल, दिलेल्या मानसिक आधाराबद्दल! पण सर्वात जास्त मी तुमचा ऋणी राहीन ती तुम्ही आत्ता दिलेल्या माहिती बद्दल. ताई, तुम्हाला तर माहितीच आहे की मी टेम्पो चालवतो. माल पोहोचविण्यासाठी दोन दोन दिवस बाहेरगावी असतो. मी असंच एक दिवस माल पोहोच करून घरी येत होतो. रात्रीची वेळ होती. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. मला पुढे थोड्या अंतरावर एक गाडी दिसली. मनात हायसं झालं. त्या लोकांची सोबत होईल अश्या विचारांनी मी माझ्या गाडीचा वेग वाढवला. माझ्या गाडीचा वेग वाढला की ते पण वेग वाढवत होते. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आल की त्यांना मी खूप जवळ जायला नको आहे. एक ठराविक अंतर ठेऊन मी त्यांच्या सोबतीने प्रवास करत होतो. अचानक त्या गाडीतून एक गाठोडं पडलं. खरं म्हणजे ते पडलं नव्हतं तर गाडीतील लोकांनी फेकलं होतं. कुतुहला पोटी मी त्या गाठोड्यात काय आहे ते बघायला उतरलो. गाठोड्यात एक ८-१० दिवसाचं मृत अर्भक होतं. ते बघून मला इतका धक्का बसला की मी खूप वेळ तिथे त्याच्या कडे बघत बसलो. किती वेळ झाला असेल मला नाही सांगता येणार. मागून येणाऱ्या मोहन आणि संतोशनी मला सावरलं आणि घरी आणून सोडलं. त्या दिवसापासून आज पर्यंत माझी त्या रस्त्यावरून जाण्याची हिम्मत झाली नाही. त्या दिवसापासून मला एक प्रश्न भेडसावत होता, एखाद्या बाळाचा जन्म त्याच्या मातेला नको असलेल्या परिस्थितीत झाला तर त्याचं तिने काय करावं? ह्याचं उत्तर मला आज तुमच्या कडून मिळालं. ताई पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!”               

Sunday 9 July 2023

नाझिया

एप्रिल मधील दुपारची वेळ. भयानक उकाडा! रस्त्यावर एक चिटपाखरू दिसत नव्हतं. मनोहर त्याच्या रोजच्या सवयीने दुकानात येऊन बसला होता. त्याचं रेडीमेड गारमेंट्सचं दुकान होतं. त्याला ठाऊक होतं की एवढ्या उन्हात आपल्या दुकानात कोणी गिऱ्हाईक येणार नाही. पण धंद्याचा एक नियम असतो. कोणी येवो अगर न येवो, दुकानदारांनी त्याच्या वेळेला दुकान उघडायला पाहिये! हि त्याच्या आजोबा-पणजोबांपासून चालत आलेली शिस्त होती. त्याच्या दुकानात काम करणारा राजू ‘शेठ, आज मी दुपारी थोडा उशिरा येईन’ असं सांगून गेला होता. थोडक्यात काय? मनोहर दुकानात एकटा होता. नुकतच जेवण झालेलं, दुपारची वेळ, त्यात कुलरची गार हवा, त्याला सुस्ती यायला लागली. तेवढ्यात त्याला एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. ‘हे कसं शक्य आहे? आपल्याला बहुतेक भास होतोय’ असं वाटून त्याने डोळे मिटून घेतले. पण हळू-हळू तो आवाज जवळ येतोय असं त्याला जाणवलं. कुतूहलानी त्यांनी दुकानाच्या बाहेर येऊन पाहिलं. रस्त्यांनी एक भिकारी जोडपं जात होतं. बाई पांगली असल्याने व्हील चेअर मधे होती. अंगात फाटके, मळकट कपडे. केस विस्कटलेले. एकूण अवतारच होता. तिचा पांगुळगाडा एक माणूस ढकलत होता. कमरेला लुंगी आणि अंगात मळका, फाटका, भोकं पडलेला बनियन. एकूण त्यांच्या पेहेरावावरून त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात येत होती. त्यांच्या मागून अंदाजे एक ६-७ वर्षांशी मुलगी, अनवाणी, अंगभर काळा बुरखा घातलेली रडत चालली होती. तापलेल्या रस्त्यावरचे चटके तिला सहन होत नव्हते. ती रडत, केविलवाण्या विनवण्या करत त्यांच्या मागे फरफटत जात होती. हे बघून मनोहरनी त्या माणसाचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला, ‘ओ भैया, तुम्हारे पीछे ये लाडकी रोती हुई चल रही है. इतनी कडी धुपमे नंगे पाव चल नाही पा रही है. आप उसे उस औरतके पास बिठा क्यो नही लेते.’

मनोहरचा आवाज ऐकून तो माणूस दचकला, घाबरला आणि पांगुळगाडा जोरात ढकलत, जवळ जवळ धावतच गेला. त्या माणसाचं वागणं मनोहरला थोडं विचित्र वाटलं. पण तो दुकान सोडून त्याच्या मागे जाऊ पण शकणार नव्हता.

काही दिवसांनी मनोहरच्या दुकानासमोरून तेच जोडपं तसच जाताना त्याला दिसलं. आज दुकानात राजू असल्याने मनोहरने त्या जोडप्याचा पाठलाग करायचा ठरवला. स्कूटर काढून निघे पर्यंत ते जोडपं आणि ती मुलगी जवळच्या वस्तीत गायब झाले. शंभरहून अधिक घरं, ८-१० गल्ल्या असलेली दाट वस्ती. त्याचं नाव-गाव काही माहित नाही. त्यांच्या सारखी अजून बरीच कुटुंब असू शकतील तेंव्हा तिथे त्यांना शोधणं अवघड आहे, हे मनोहरच्या लक्ष्यात आल. मनोहर दुकानात परत आला. पण त्याला ते जोडपं, ती मुलगी, तिचं रडणं, त्यांचं तिच्याशी असंवेदनशील वागणं, सगळंच अस्वस्थ करत होतं.

पुन्हा काही दिवसांनी ते कुटुंब त्याच्या दुकानासमोरून जाताना त्याला दिसलं. आज हातातील सर्व काम सोडून तो त्यांच्या मागे पायीच निघाला. त्यांचा पाठलाग करत तो त्या वस्तीत पोहोचला. पण त्याला कळायच्या आत ते एका झोपडीत गायब झाले. मनोहरने आजूबाजूला चौकशी केल्यावर त्याला मिळालेली माहिती फारच विचित्र होती. तेथील काही लोकांनी सांगितलं, “ते जोडपं समोरच्या घरात रहाते. ते काय काम करतात कोणालाच माहित नाही. ही मुलगी त्यांची नसावी असं आम्हाला वाटतं. नाहीतर इतकं अमानुष पणे कोणी एवढ्याशा मुलीला कशी वागणूक देऊ शकेल? ६-७ महिन्यांपूर्वी हे लोक इथे आले. दिवसभर बाहेर असतात. रात्री-अपरात्री त्या मुलीचा रडण्याचा कधी किंचाळण्याचा आवाज येतो. बहुतेक वेळा ती एक तर घरात असते नाहीतर बुरख्यात असते. एकदाच तिला शेजारच्या काकूंनी बघितलं होतं. त्या सांगत होत्या, त्या मुलीच्या चेहेर्यावर कशानितरी मारल्यासारख्या जखमा होत्या.”

न रहावल्याने मनोहर म्हणाला, “अहो, तुमच्या समोर हे सगळं घडतंय आणि तुम्ही काहीच कसं केलं नाहीत? कमीत कमीत पोलिसांना तरी खबर करायला हवी होती. मला तर वाटतंय पोलिसात तक्रारच द्यायला हवी.”

त्यावर एक गृहस्थ म्हणाले, “आम्ही पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यांना चौकीत बोलावून घेतलं. त्या लुंगीवाल्या बाबानी पोलिसांना सांगितलं की, ‘नाझिया मनोरुग्ण आहे. ती कधीपण कोणाच्यापण अंगावर धावून जाते. आम्हाला पण तिची काळजी वाटते.’ त्या दिवशी पोलीस आमच्या वस्तीत आले. त्या झोपडीत बघितलं. त्या मुलीला एखाद्या जनावराला बांधावं तसं साखलिनी बांधून ठेवलं होतं. मी जे बघितलं ते पोलिसांना दिसलं की नाही ठाऊक नाही पण ती मुलगी ग्लानीत होती आणि तिच्या चेहेर्यावर जखमा होत्या. त्या दिवसानंतर पुढे काहीच झालं नाही. तिचं रडणं, किंचाळण अधून-मधून चालूच आहे.”

आपण त्या मुलीला काहीतरी मदत करूया ह्या विचारांनी मनोहर पोलीस स्टेशनला गेला. एका हवालदाराला ती मुलगी आणि तिच्या संदर्भातील तक्रार आठवत होती. त्यांनी मनोहर समोर साहेबांना येवून सांगितलं, ‘साहेब ती मुलगी वेडी आहे. त्या दिवशी मी पण होतो, त्यांच्या घरी गेलो तेंव्हा!”

ह्यावर चौकीतल्या वरिष्ठ साहेब म्हणाले, “हे असं असत. तुम्ही तक्रार द्यायला आलात पण सत्य काहीतरी वेगळच आहे. आमचं आहे लक्ष. आम्हाला काही वाटलं तर आम्ही एक्श्न घेऊ.” 

इथून काही मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर मनोहरने त्याच्या एका वकील मित्राला फोन करून त्याचा सल्ला घेतला. वकील मित्रांनी त्याला बाल कल्याण समिती ची मदत घेण्याचा सल्ला दिला.

आणि अश्या प्रकारे नाझिया ची केस आमच्या कडे आली.

बाल कल्याण समितीला, Juvenile Justice Act अंतर्गत, काही अधिकार बहाल केले आहेत. (हे अधिकार ५ सदस्यांच्या समितीला आहेत, वैयक्तिक एका सदस्याला त्याचा उपयोग करता येत नाही.) ह्याच अधिकाराचा वापर करून, मनोहरच्या तक्रारीच्या आधारे, आम्ही त्या पोलीस चौकीतील अधिकार्याला ह्या केस संदर्भात ती मुलगी आणि माहिती सादर करायला सांगितले. पोलिसांनी आमच्या आदेशाचे पालन करत नाझिया आणि तिच्या पालकांना (जे खरंच तिचे पालक आहेत का हे कागद पत्रांची सहानिषा करून ठरवायचं होतं) समिती समोर हजर केलं. नाझियाचा बुरखा काढला आणि समोर एक ६-७ वर्षांची, बारीकशी, घाबरलेली मुलगी दिसली. तिची अवस्था बघवत नव्हती. चेहेर्यावर आणि हाता पायांवर मारल्याच्या जखमा-काही जुन्या, काही ताज्या होत्या. अंगात फाटलेला, मळकट फ्रॉक, केस पिंजारलेले. डोक्याला कितीतरी दिवसात तेलाचा स्पर्श झाला नसावा. तिचा अवतार बघून तिला खूप दिवसात अंघोळ पण करायला मिळाली नसण्याची दाट शक्यता वाटत होती. तिने किलकिले डोळे करत चौफेर पाहिलं. सोबत आलेल्या त्या जोडप्यावर तिची नजर पडली. तिच्या चेहेर्यावर एका क्षणात भीती, वेदना, राग, तिरस्कार, असे विविध भाव दिसले आणि आम्हाला कोणाला काही कळायच्या आत ती धावत आमच्या कडे आली आणि घाबरून आमच्या खुर्चीच्या मागे लपली. तिला जवळ घेत, शांत करत आम्ही तिला सांगायचा प्रयत्न करत होतो की ‘तिला इथून कोणी कुठे पण घेऊन जाणार नाही. तिला कोणी त्रास देणार नाही.’ आम्ही तिला आश्वस्त करायचा प्रयत्न करत होतो. बहुतेक आमच्या प्रयत्नांना यश येत होतं. एखादं मुल ज्या विश्वासाने आपल्या आईकडे जाते त्याचप्रमाणे ती आम्हाला चिकटून बसली. थोड्या वेळानी तिला वाटलेली भीती कमी झाली. मग तिला संस्थेतील मावशी कडे सोपवून आम्ही आमच्या कामाला लागलो.

नाझिया सोबत आलेलं जोडपं एव्हाना खूप अस्वस्थ झालं होतं. ते सारख्या आमच्या विनवण्या करत होत की, “सर, म्याडम, नाझिया हमारी बच्ची है. उसको हमारे हवाले कर दो.”

त्यावर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, “नाझिया कशानी तरी खूप घाबरली आहे. तिच्या अंगावर जखमा आहेत. ती अशक्त पण वाटते आहे. तिच्यावर थोडे उपचार करायला सांगतो. तोवर तुम्ही तिचे पालक आहात हे सिद्ध करणारे कागदपत्रे घेऊन या. नाझिया तुमची मुलगी आहे हे सिद्ध झालं की तिला घेऊन जा.”

“म्याडम, इसमे सिद्ध करनेकी क्या बात है. वो हमारी बेटी है, हमारा खून है. हम आपको बता रहे है. इतना काफी नाही है क्या?”

“नाही. तेवढ पुरेसं नाहीये. तुम्ही तुमचं रेशनकार्ड- ज्यावर तिचं कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा आहे, तिचं नाव आहे. किंवा तिचा जन्माचा दाखला घेऊन या.”

“ये हम कहासे लाये. आप हमे बच्ची दे दो और बात खतम कर दो.”

अखेरीस त्यांनी मान्य केलं की योग्य कागद बघितल्याशिवाय, आमची खात्री पटल्या शिवाय नाझिया त्यांना मिळणार नाही. म्हणून ते गेले. त्या दिवशी बाकीची काम संपल्यावर आम्ही बराच वेळ विचार करत होतो-ते जोडपं खरंच ह्या मुलीचे पालक असतील का? ती एवढी कशामुळे आणि कोणाला घाबरली आहे? तिला कोणी आणि का इतकी मारहाण केली असेल? तिचं खरं नाव काय असेल? ते खरंच तिचे पालक असतील तर तिला त्यांच्या ताब्यात देताना काय काळजी घेतलेली मुलीच्या दृष्टीने बरी राहील?......

दुसर्या दिवशी बाल गृहातून निरोप आला की ते जोडपं आल आहे आणि ‘आमची मुलगी आम्हाला द्या’ असा हट्ट धरून बसले आहेत. त्यांच्या कडे अपेक्षेप्रमाणे कागदपत्रे नव्हती. ती असल्याशिवाय मुलगी ताब्यात मिळणर नाही. पण मुलीला भेटायचं असेल तर बाल कल्याण समितीच्या उपस्थितीत भेटता येईल. ते पण मुलीची इच्छा असेल तर. असा निरोप दिला.

त्यांनी संस्थेत येऊन नाझियाला भेटण्याचा प्रयत्न पण केला पण नाझिया त्यांच्या कडे जायला काय, त्यांच्या कडे बघायला किंवा त्यांच्या समोर यायला पण तयार नव्हती. सुरवातीला ती त्यांना बघितलं की घाबरून लपून बसायची. त्यांच्या प्रती तिला वाटणारी भीती, राग, तिरस्कार, हे सर्व तिच्या वागण्यातून जाणवत होतं. त्यामुळे आम्ही त्या जोडप्याची आणि नाझियाची भेट होऊ दिली नाही.

मग काय पुढील महिना दोन महिने ते दर दोन-तीन दिवसांनी येऊन आमची मुलगी द्या अशी विनंती करत राहिले, तर कधी दम दाटी करायचा प्रयत्न केला. आणि आम्ही त्यांच्या कडे कागद मागत राहिलो. हळू-हळू त्यांनी त्याचं म्हणणं बदललं. काही दिवसांनी त्या माणसानी सांगितलं, “वो हमारी बेटी नही है. वो मेरे भाईकी बेटी है.”

त्यावर भावाला घेऊन ये म्हणता क्षणी त्यांनी नवीन माहिती दिली. “भाई और भाभी अब इस दुनियामे नही रहे.”

ते कुठे आहेत? काय झालं? असे प्रश्न विचारल्यावर माहिती मिळाली की दोघंही रोड अक्सिडेंत मधे मेले. त्याचे डीटेल्स विचारले, त्यांच्या मृत्यूचा दाखला मागितला तर काही तरी उडवा उडवीची उत्तरं दिली. मग सांगितलं सिन्नरच्या घाटात झाला अक्सिडेंत. आम्ही हायवे पोलिसांमार्फत चौकशी केली तर हि माहिती चुकीची आहे असे समजले. एका बाजूला ते जोडपं विविध मार्गांनी ती मुलगी ताब्यात मिळवायचा प्रयत्न करत होतं आणि दुसर्याबाजूला आम्ही तिचे खरे पालक शोधायच्या प्रयत्नात होतो.

प्रेम, काळजी, योग्य आहार आणि संरक्षण मिळाल्यामुळे नाझियाची तब्येत सुधारत होती. तिच्या कडून तिच्या आई-वडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवस तिच्या कडून समजलं की ती  शाळेत जात होती. पहिलीत होती. वर्ग शिक्षिकेच नाव- पाटील बाई होतं. शाळा एका टेकडीवर होती. घरी आई-बाबा, एक भाऊ आणि एक ताई होती. आता आम्हाला सर्वांनाच तिचे खरे पालक सापडण्याची आशा वाटायला लागली. पण हि शाळा नाशिकमधे आहे कुठे? कशी शोधायची? प्रत्येक जण आपापल्यापरीने ह्या वर्णनाची शाळा शोधत होता. एव्हाना विविध कारणांनी बाल कल्याण समितीत येणारे विविध संस्थेतले कार्यकर्ते पण मदतीला धावून आले. नाशिकमधे अशी शाळा सापडली नाही. सापडली असती तरी तिथे, नाझियाचं खरं नाव माहिती नसल्याने, माहिती मिळणं अवघड होतं. एकानी सुचवलं, ‘कल्याण, भिवंडी कडे अश्या शाळा आहेत. झेड पी ची किंवा नगरपालिकेची.’ तिथे पण कार्यकर्ते पाठवून शोध घेतला पण काही हाती लागलं नाही.

नाझियाला संस्थेत दाखल होऊन तीन महिने होत आले होते. तिच्या आई-वडिलांचा कुठून, काहीही पत्ता सापडत नव्हता. आम्हा समिती सदस्यांची इतर काम चालू होती. एक दिवस एका संस्थेतील कार्यकर्त्यांनी माता मेळाव्याचे आयोजन केले आणि त्या मातांशी बोलायला मला बोलावलं. मुलांची काळजी, त्याचं संगोपन, योग्य आहार-व्यायाम ह्याची गरज, अश्या अनेक मुलांच्या संदर्भातील विषयांवर माहिती दिली. त्या सोबतच मुलांच्या सुरक्षितते बद्दल बोलताना मी नाझियाच्या नावाचा उल्लेख न करता तिच्याबद्दल आणि अश्या घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती दिली. मी बोलत असताना जमलेल्या मातांमधून एक महिला रडायला लागली आणि ती उठून सरळ माझ्यापाशी आली आणि माझा हात घट्ट धरून आशेनी म्हणाली, “ताई, कुठे आहे ती मुलगी? तिचं नाव काय आहे? कशी दिसते? वय किती आहे? ताई, मी तिला भेटू शकते का? ती माझी सोनाली असेल. मला प्लीज एकदा तिला बघू द्या.”

कार्यकर्ते पटकन पुढे आले आणि तिला सावरत म्हणाले, “त्याचं काय आहे ताई, सुमनताई ची सोनाली ९-१० महिन्यांपासून गायब आहे. बाहेर गल्लीत इतर मुलांसोबत खेळत होती. थोड्या वेळानी सुमनताई तिला बोलवायला गेल्या तर सोनाली कुठे दिसे ना. त्यांनी शेजारी पाजारी तिला खूप शोधलं. आम्हाला कळवलं. आम्ही पण तिला खूप शोधलं. पोलीस स्टेशनला मिसिंग पण नोंदवली. पण काही उपयोग झाला नाही. आज तुम्ही त्या मुलीची माहिती दिलीत तर त्यांना वाटतंय त्यांची सोनालीच असेल. आईची वेडी आशा.”

आम्ही सुमनताईला दुसर्या दिवशी बाल गृहात लागणारी कागदपत्र घेऊन यायला सांगितलं. माझी पण वेडी आशाच असेल, सुमनताई खरंच सोनाली उर्फ नाझियाची आई असेल तर आई-मुलीच्या भेटीला आणखीन एक दिवसाचा विलंब नको.

आम्ही बोलावलं त्याच्या आधी तासभर सुमनताई संस्थेच्या कार्यालयात येऊन वाट बघत होत्या. थोड्या वेळानी सोनाली उर्फ नाझिया चे वडील बाकीच्या दोन्ही मुलांना घेऊन पोहोचले. आम्ही गेल्यावर नियमाप्रमाणे त्यांनी सादर केलेले कागदपत्र बघितली. जवळ जवळ आम्हा सर्वांची खात्री पटली होती की समोर बसलेलं जोडपं हेच नाझिया चे खरे आई-वडील आहेत. सोनालीला बोलावलं. ती कार्यालयात आली. आणि ज्या पद्धतीने सोनाली धावत सुमनताई कडे गेली आणि आई म्हणत तिच्या गळ्यात पडून, तिला घट्ट मिठी मारून रडली. आणि सोनालीला बघता क्षणी जो आनंद त्या कुटुंबाच्या चेहेर्यावर बघितला, त्यानंतर आम्हाला आणखीन पुराव्याची गरज नव्हती. बाकीच्या फोर्मेलीती पूर्ण केल्या आणि सोनालीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं.

सोनालीच्या पालकांचा शोध चालू होता तेंव्हा दुसरी कडे पोलीस त्यांचं काम करत होते. मिळालेली माहिती, मनोहरने दिलेली तक्रार ह्याच्या आधारे त्यांनी त्या जोडप्याविरुद्ध मुलीचं अपहरण केल्या बद्दल केस दाखल केली. पुढे ती केस कोर्टात चालली. वास्तविक बघता सोनालीच्या आई-वडिलांचा शोध लागला आणि सोनालीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिल्यावर बाल कल्याण समिती म्हणून आमची जबाबदारी संपत होती. पण मागील ३-४ महिन्यांच्या कालावधीत मनोहरचं कारणा-कारणांनी बाल कल्याण समितीत खूप वेळा येणं झालं. आम्हाला नाझिया उर्फ सोनालीच्या केस मधे पुढे काय झालं हे जाणून घ्यायची उत्सुकता होतीच आणि मनोहर पण दर खेपेला केस संदर्भातील नवीन घडामोडींची माहिती देत राहिला. त्याच्या कडूनच आम्हाला समजलं की केस कोर्टात सुनावणीला आली तेंव्हा मनोहर फिर्यादी ह्या नात्याने एकटा हजर होता. पण ते भिकारी जोडप्याला आधार द्यायला, मदत करायला २०-२५ माणस होती. एवढंच नाही तर त्यांच्या बाजूनी युक्तिवाद करायला एक चांगला क्रिमिनल लोयेर उपस्थित होता. हे ऐकल्यावर आम्ही पण गोंधळून गेलो. हि माणस होती तरी कोण? ते खरंच भिकारी होते का आणखीन काही? त्यांच्या मागे त्यांना आधार देणारे, मदत करणारे कोण होते? त्यांच्या मागे कोणाचं पाठबळ होतं? जितका विचार करत होतो तितका विचारांचा गोंधळ वाढत होता. खालच्या कोर्टात त्यांना शिक्षा झाली. त्यांनी उच्च न्यायालयात अपील केलं, इथपर्यंत माहिती आम्हाला मिळाली. पुढे काय झालं ते समजलं नाही.

पुनःपुन्हा सोनालीची ह्या सगळ्यातून सुखरूप सुटका झाली आणि ती होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मनोहर बद्दल खूप अभिमान आणि आदर वाटत होता आणि आहे. खरंच समाजात, आपल्या अवती भवती अश्या किती गोष्टी, घटना घडत असतात. आपण त्या बघतो, कधी वाईट वाटतं, कधी हळहळतो. पण पुढाकार घेऊन करत काहीच नाही. ना ते थांबवण्याचा प्रयत्न करत, ना कोणाच्या निदर्शनास आणून देत. पण जास्त लोकांनी मनोहरसारखं वागायचं ठरवलं, तर सोनालीसारख्या अनेक मुलांना आणि मोठ्या माणसांनाही न्याय मिळायला आणि नव्याने आयुष्य सुरु करायला मदत होईल यात काही शंका नाही. पण जास्त लोकांनी मनोहरसारखं वागायचं ठरवलं, तर सोनालीसारख्या अनेक मुलांना आणि मोठ्या माणसांनाही न्याय मिळायला आणि नव्याने आयुष्य सुरु करायला मदत होईल यात काही शंका नाही.

Thursday 22 June 2023

जसं पेराल तसं उगवेल

 २५ वीशी तील कविता, एक स्मार्ट, चुणचुणीत मुलगी ऑफिसमध्ये आली. जीन्सची पेन्ट आणि लूज शर्ट तिला छान दिसत होता. एरवी तिच्यातला आत्मविश्वास आज जाणवत नव्हता. ऑफिसच्या दाराशी जरा घुटमळत, आमचं लक्ष वेधायचा प्रयत्न करत उभी होती. किती वेळ अशी वाट बघत होती ठाऊक नाही, पण छायाचं लक्ष गेलं आणि तिने आत बोलवत विचारलं, “कविता, अशी दारात का उभी आहेस. ये ना आत ये. घरी सर्व ठीक आहे ना? नवर्याकडून काही निरोप? इथे ऑफिसमध्ये तर अजून काही फोन आला नाहीये. वाटलं परस्पर तुझ्याशी संपर्क साधून मिटवायचा प्रयत्न करत असेल एखादवेळेस. पण कविता, लिखापडी केल्याशिवाय परस्पर समझोता करून जाऊ नकोस.”

कविता ऑफिसमधे आली आणि टेबलापाशी घुटमळत उभी राहिली. तिच्या मनातील विचारांचा गोंधळ जाणवत होता. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण बहुदा सुरुवात कुठून करावी हे ठरत नव्हतं.

“ताई, दिपकचा फोन आला होता. तो खूप आजारी आहे. त्याचा आवाज पण खोल गेलेला, थकलेला वाटत होता. ताई, मला त्याची खूप काळजी वाटते आहे. मी त्याला बघायला जाऊन येते. जाण्यापूर्वी तुम्हाला भेटून, सांगून जावं, म्हणून आले. मागच्या २-३ वेळेला जी चूक (तुम्हाला न सांगता, कळवता गेले) केली ती माझ्या कडून परत व्हायला नको. ताई, मी तुम्हाला कसं सांगू? माझ्या मनात त्याच्यासाठी विचित्र भावना आहेत. तो खरंच एक चांगली व्यक्ती आहे. मला तो आवडतो. पण त्याच्या मैत्रिणी म्हणू की लफडी? हे कसं deal करावं हेच मला समजत नाहीये.” बोलता-बोलता कविताच्या डोळ्यात पाणी आल.

“कविता, तुला वाटणारी काळजी आम्ही समजू शकतो. पण तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय, एकदा कोणाकडून तरी, तुमचे नातेवाईक किंवा त्याचे मित्र ह्यांच्या कडून त्याला नेमकं काय झालाय हे विचारून घे. तुझ्या बरोबर कोणी येणार आहे का?”

ह्यावर तिने नकारार्थी मान हलवली.

“हे बघ कविता, तू आमच्या कडे तक्रार नोंदवून वर्ष होऊन गेलं. ह्या काळात आम्ही त्याला, ‘एकदा येऊन तुझी बाजू मांडून जा’ असं सांगायला पत्र पाठविली, फोन केले. पण तो काही आला नाही. आज येतो, उद्या येतो, असं सांगत राहिला. कधी आईला बर नाहीये, तर कधी कामावरून रजा मिळत नाहीये, अशी कारणे सांगून इथे येण्याचं टाळत राहिला. त्याच्या मनात नेमकं काय आहे ते समजायला हवं. आम्ही त्याला ‘ऑफिस मधे कधी येणार आहे?’, अशी चौकशी करायला फोन करतो. त्यावरून त्याला नेमकं किती बर नाहीये ह्याचा अंदाज येईल. त्याच्याशी फोनवर बोलणं होई पर्यंत तू इथेच थांब. जायची घाई करू नकोस.”

वर्षभरा पूर्वी कविता जेंव्हा तक्रार नोंदवायला आली होती तेंव्हाचा तिचा अवतार आणि आजचं तिचं रहाणीमान ह्यात खूप फरक पडला होता. आई-वडिलां बरोबर आलेली कविता. तिला कोणाचातरी, कशाचातरी खूप राग आला होता. तिच्या मनातील रागाची, अपमानाची भावना चेहेर्यावर दिसत होती. नेहेमी प्रमाणे तिला आणि तिच्या आई-वडिलांना बसायला सांगितलं. तिने चिडूनच आमच्या कडे पाहिलं आणि म्हणाली, “ओ म्याडम, मी काही बसायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला आले नाहीये. हे माझे आई-बाबा म्हणाले म्हणून मी आले आहे. आधी एकतर कुठेही आपल्या मुलीचं लग्न लाऊन द्यायचं. ना धड मुलाची, त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. ना त्याचं शिक्षण किंवा नोकरी बघितली. अरे कमीतकमी त्याची काही लफडी आहेत का? ह्याची तरी माहिती काढायला नको होती का? घाईत लग्न उरकलं आणि माझ्या आयुष्याचं वाट्टोळ केलं. आणि आता त्यातून काही मार्ग निघतोय का हे बघायला आणि आम्हाला मुलीची किती काळजी आहे हे दाखवायला तुमच्या कडे घेऊन आलेत.”

ह्यावर तिच्या वडिलांनी, “अग कविता बेटा, अग आम्ही तुझ्या .....”

“बाबा माझ्या भल्यासाठी केलत वगैरे नाटकं बंद करा. मला तुम्ही काही सांगू नका आणि समजावण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या आयुष्याचा झालाय तेवढा खेळ आणि तमाशा बास झालाय. तुमचा मान राखून मी ह्या ताई ला भेटायला आले आहे. त्यांनी काही केलं तर ठीक. नाहीतर मी हे सगळं माझ्या पद्धतीने सोडविन.”

कविताच्या समोर पाणी ठेवलं आणि तिला बसून हळू आवाजात बोलायची विनंती केली.

दोन घोट पाणी प्यायली, दोन मिनिटं डोळे बंद करून बसली. थोडी शांत झाली. शांत झाल्यावर तिचा अवतार, तिचं दिसणं बदललं. आम्हाला असं जाणवलं की कविता otherwise दिसायला स्मार्ट आहे. मगाच पेक्षा बर्याच शांतपणे आपलं म्हणणं तिने मांडल.

“ताई, सॉरी. ताई, माझं शिक्षण पूर्ण झालं, तेंव्हा मी जेमतेम २१ वर्षांची होते. कॉम्प्युटर मधे डिप्लोमा केला होता. आम्ही ग्रुप मधील सर्व मैत्रिणीनी दोन वर्ष नोकरी करायची, चार पैसे कमवायचे, धम्माल करायची, मज्जा करायची असं ठरवलं होतं. मी चांगल्या मार्कांनी पास झाले आहे हे ऐकून आई-बाबांना खूप आनंद झाला. त्या दिवशी आम्ही झक्कास पार्टी केली. नंतर दोन चार दिवस मजेत गेले. एक दिवस आईनी विचारलं, “कविता, तुझं शिक्षण झालं. आता पुढे काय करायचा विचार आहे?”

“मी आई पाशी मोकळेपणानी आम्हा मैत्रिणींचा प्लान सांगितला. तेंव्हा आई काही बोलली नाही. पण माझ्या मनातील विचार तिने बहुतेक झोपायच्या आधी बाबांना सांगितला. दुसर्या दिवशी सकाळी बाबांनी अचानक माझ्या लग्नाचा विषय आई समोर काढला. “मी काय म्हणतो सुमन, कविता आता मोठी झाली आहे. तिचं शिक्षण पण पूर्ण झालाय. तिच्या साठी योग्य स्थळ बघून यंदाच्या वर्षात तिचं लग्न उरकून टाकूया. म्हणजे टेन्शन नाही. माझ्या मामे बहिणीच्या (मंदाच्या) चुलत दिराचा मुलगा लग्नाचा आहे. माणस चांगलीच असतील. आता मामे बहिणीकडील स्थळ आहे म्हटल्यावर जास्त चौकशीची काही गरज वाटत नाही.”

ह्याला आईने पुस्ती जोडली, “आणि शिवाय नणंद बाईंच्या सासरकडील स्थळाची चौकशी केली तर त्यांना किती वाईट वाटेल? मी काय म्हणते, तुम्ही आज-उद्याकडे नणंद बाईना फोन करून बघता का?”

तेंव्हा मी माझा विरोध आणि निषेद नोंदवत म्हणाले, “आई-बाबा, मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. एखाद-दोन वर्ष नोकरी करते, थोडी मजा करते, मग तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करीन.”

ह्यावर बाबा विषय संपवत म्हणाले, “नोकरी, मजा, जे काही करायचं, ते लग्नानंतर करा. संपूर्ण आयुष्य पडलंय ते सगळं करायला. आयुष्यात सर्व गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बर्या असतात. आणि मला आता ह्या विषयावर अधिक चर्चा नको आहे.”

मी ह्या सर्वाला विरोध करायचा, लग्न टाळायचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्या दिवसानंतर आमच्या घरातील चक्र वेगानी फिरू लागली. स्थळाची चौकशी केली असं भासवल, पण ती अगदी जुजबी स्वरुपाची. म्हणजे केल्याचा दिखावा. कारण दीपकचं स्थळ निश्चित करतोय असं समजल्यावर आमच्या एका हितचिंतकांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं, “सुमनताई, मी असं ऐकलं की तुम्ही तुमच्या कविताचा विवाह मंदाताईच्या दीपकशी करताय. तसं स्थळ ठीक आहे. मुलगा पण ठीक आहे. पण त्याच्या मोठ्या भावाची चार महिन्या पूर्वी फारकत झाली आणि लागलीच त्याचं दुसरं लग्न पण करून टाकलं. कारण नीटसं कळल नाही. पण मला वाटलं की तुम्हाला माहिती असावं म्हणून फोन केला.”

मी तिथेच होते. फोन स्पीकर वर होता. त्यामुळे मी ते संभाषण ऐकलं होतं. पण त्यांनी आईला काहीच फरक पडत नव्हता.

आईने हि माहिती कोणालाच कळू दिली नाही. पण बहुदा बाबांना पण तिने काही सांगितलं नाही. आणि सांगितलं जरी असेल तरी त्यांना ते फार सिरिअस वाटलं नाही.

अशा रीतीने नोकरी करायची, मैत्रिणींबरोबर धम्माल करायची स्वप्नं रंगवणारी मी, परीक्षेचा निकाल लागल्यापासून वर्ष भरात कोण्या एका दीपकची बायको होऊन संसाराला लागले. घरात आम्ही ६ माणस! मी, दीपक,त्याचा मोठा भाऊ सुरेश, सुरेशदादाची बायको राधिका आणि त्याचे आई-वडील. जो तो आपापल्या कामात असायचा. कोणी कोणाच्या मधे बोलायचं नाही, असा घरचा नियम होता. जे काही सांगायचं, सुचवायचं ते सासूबाईंना. हे पण ठीक होतं. सासरे आणि सुरेश घरचं दुकान सांभाळायचे. दीपक त्याच्या ऑफिसला जायचा. घरात आम्ही तिघी जणी असायचो. पहिले जवळ जवळ ८ महिने मजेत गेले. माझी आणि राधिकाची पण बर्यापैकी दोस्ती झाली होती. एक दिवस असंच दुपारी दोघी गप्पा मारत असताना, का कोणास ठाऊक, मी तिला विचारलं, “राधिका, सुरेश दादाची पहिली फारकत झाली हे खरं आहे का? आमच्या लग्ना आधी कोणीतरी हि माहिती आम्हाला दिली होती. ते आठवलं म्हणून सहज विचारलं.” राधीकानी होकारार्थी मान हलवली. सहाजिकच माझा पुढचा प्रश्न ‘का’ होता. तिने क्षणभर माझ्या कडे बघितलं. बहुतेक स्वतःच्या मनाशी मला हे सांगावं की नाही हे ठरवत असावी. तिने माझा हात हातात घेतला आणि दबक्या आवाजात म्हणाली, “कविता मी जे तुला सांगणार आहे ते कोणाला सांगू नकोस. तुम्ही ऐकलत ते खरं आहे. तुझ्या सुरेश दादांची पहिली फारकत झाली आणि घाईघाईने माझ्याशी लग्न केलं. का ते नीटसं समजलं नाही. पण लोक म्हणत होते की त्यांना मुल बाळ होत नव्हतं, लग्नाला २ वर्षं उलटून गेली तरी! म्हणून फारकत घेतली. माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे, इकडची माणस चांगली आहेत, शिवाय ह्यांची देण्या घेण्याची काही पण अपेक्षा नव्हती. म्हणून आई-बाबांनी मला ह्या घरात दिली. आमच्या वयात जरा जास्त अंतर आहे, पण माणस चांगली आहेत. माझं लग्न झाल्यामुळे आई-बाबांच्या डोक्यावरचा थोडा बोजा कमी झाला. ह्यातच सगळं आल.” राधिकाच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत, विषय बदलत ती म्हणाली, “चला, आजचा दुपारचा चहा मी करते.” आणि ती उठून गेली.

मी विचार करत होते, ‘पण आमच्या लग्नात तर ह्या लोकांनी खूप मागितलं-सोनं, रोख पैसे, थाटामाटात लग्न आणि लग्नाचा सर्व खर्च.’ बहुतेक मोठ्या मुलाच्या लग्नातील सर्व कसर आमच्या लग्नात भरून काढली असेल.

राधिका आणि सुरेशच्या लग्नाला दोन वर्ष होत आली पण अजून चांगली बातमी येईना, म्हणून सासूबाई जरा अस्वस्थ होत होत्या. एक दिवस राधिकाला डॉक्टर कडे नेऊन तपासून आणलं. तिच्यात काही दोष नाही असं डॉक्टरने सांगितल्यावर वाट बघणं आल. तरी सासूबाईंना बर वाटावं म्हणून राधिका डॉक्टरकडे नियमित पणे तपासायला जात होती.

सणासुदीला दुकानात काम वाढल्या मुळे सुरेश दादा आणि सासरे यांना घरी यायला उशीर होऊ लागला. सुरेशदादाला कधी कधी रात्रीचे बारा वाजून जायला लागले. सणाचं निमित्त करून माझ्या आईनी, ‘कविताला चार दिवस माहेरी पाठवाल का?’ अशी विनंती केली. त्या रात्री दोन्ही मुलं आणि त्यांची आई ह्यांच्यात, मला माहेरी पाठविण्यावरून  बरीच चर्चा झाली. झोपायच्या आधी दिपकनी मला सांगितलं, ‘तू आठ दहा दिवस माहेरी गेलीस तरी चालेल, असं आईने सांगितले आहे.’

ठरल्याप्रमाणे मी माहेरी आले. आई-बाबा, मैत्रिणी सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. ८ दिवस कधी संपले कळलच नाही. उद्या परवा जावं लागणार. आणि जायची तर अजिबात इत्छा नव्हती. ‘ये दिल मांगे मोअर’ अशी माझी अवस्था होती. आणि काय आश्चर्य! रात्री १० च्या सुमारास दिपाकनी फोन करून कळवलं, “कविता, मला १५ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी बाहेरगावी जावं लागणार आहे. तर आई म्हणाली, तुला हवं असेल तर रहा अजून ८-१५ दिवस माहेरी. मी परत आलो की तुला घ्यायला येईन.” हे तर मला हवं होतं त्यापेक्षा पण भारी झालं. मी भराभर मैत्रीणीना फोन केले आणि पुढच्या १५ दिवसाचं टकाटक प्लानिंग केलं.

माहेरी येऊन दीड महिना होत आला. दीपक घ्यायला येईल म्हणून वाट बघत बसले. पण त्याचा काही निरोप आला नाही. अशी किती दिवस वाट बघायची? मला पण आता माझ्या घराची, माझ्या माणसांची आठवण येऊ लागली. एक दिवस आई-बाबांना सांगून, मी सासरी एकटीने जायचं ठरवलं. मीच ‘कळवू नका’ असं आई-बाबांना बजावलं होतं. मला घरी सगळ्यांना surprise द्यायचं होतं.

मी सासरी पोहोचले आणि बेल वाजवल्यावर दिपकनी दार उघडलं. मला अचानक आलेली बघून तो चांगलाच गोंधळला. आणि त्याला घरात बघून त्याच्या पेक्षा जास्त मी! घरात येऊन चपला काढत मी त्याला विचारलं, “अरे दीपक तू गावाला गेला होतास ना? ट्रेनिंगसाठी? आणि तिथून तू मला न्यायला येणार होतास? मग अचानक प्लान का बदललास? घरात सगळे ठीक आहेत ना? आणि हे काय? घरात कोणीच दिसत नाहीये. कुठे गेलेत सगळे?”

“अग कविता, किती प्रश्न विचारतेस? इथे सर्व मजेत आहोत. आई आणि राधिका बाहेर गेल्यात. येतीलच एवढ्यात. बाबा आणि सुरेश, दुकानात. आणि मी तुझ्या समोर उभा आहे. दिसतोय ना?” त्यांनी चेष्टेनी विचारलं.

माझ्या पाठोपाठच राधिका आणि सासूबाई आल्या. घरात येता येता त्या दीपकला उद्देशून म्हणाल्या, ‘काम झालं असं वाटतंय. लवकरच सगळं ठीक होईल.’

मी आश्चर्यानी विचारलं, “कसलं काम? आणि काय ठीक होईल?”

“वारसाच”. आणि मग सावरत म्हणाल्या, “अग, दुकान, घर ह्याला वारस. प्रोपर्तीला नाव लावायचं!”

तो विषय तिथेच राहिला. आमचं रुटीन सुरु झालं. मधेच राधिकाला खूप त्रास व्हायला लागला. डॉक्टर कडे जाऊन आल्यावर असं समजलं, राधीका प्रेग्नंट आहे. ह्या बातमीने घरात सगळ्यांना खूप आनंद झाला, जास्त करून सासूबाईंना! राधीकाचे डोहाळे, तिची काळजी, ह्या सगळ्यामुळे माझ घरातील काम खूप वाढलं. ह्या सगळ्या गोंधळात दीपक जास्त वेळ घरा बाहेर रहातोय हे माझ्या लक्षात आल नाही. हळू हळू त्याचं उशिरा येणं, मित्रांबरोबर बाहेर जाणं, पार्ट्या वाढत गेलं. मी घरातल्या कामानी इतकी दमून जात होते की कधी एकदा दिवस संपतोय असं व्हायचं.

असंच एक दिवस दीपक बाहेर गेला आणि त्याचा फोन वाजला. तो कधीच फोन विसरत नाही. कोणाचा तरी महत्वाचा असेल, असं वाटून मी तो घेतला. मी काही बोलणार त्याच्या आधी समोरून एका महिलेचा लाडिक आवाज आला, “दिपू डार्लिंग! तू असं का करतोस? दोन दिवस झाले, ना तू भेटलास ना तुझा फोन आला.....

फोन चालू होता. ती व्यक्ती समोरून काहीतरी लाडिक आवाजात बोलत होती. मी फोन कडे वेड्यासारखी बघत होते. समोर स्क्रीनवर मोना असं नाव दिसत होतं. कोण ही मोना? तिचा दीपकशी काय संबंध? दिपाकनी कधीच कोणा मैत्रिणीचा त्याच्या बोलण्यात उल्लेख केला नव्हता. पंकज आणि सागरच्या (जे त्याचे दूरचे नातेवाईक आहेत) व्यतिरिक्त मला त्याचे कोणी मित्र माहिती नव्हते. तर मैत्रिणींचा तर प्रश्नच नाही. त्यांच्यात मैत्रीचं नातं होतं का अजून काही? मला हे कधीच कसं जाणवलं नाही? हे असं केंव्हा पासून चालू असेल? एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत होते. दीपकच्या प्रती राग, अविश्वास, अपमानित झाल्याची, फसवणूक झाल्याची भावना ह्या सर्वांचा मनात इतका गोंधळ होता की दीपक खोलीत आलेला मला समजलंच नाही. त्यांनी रागानेच माझ्या हातातून फोन घेत विचारलं, “तू माझ्या फोनला हात का लावलास? तुला एवढ पण समजत नाही की कोणाच्या पर्सनल गोष्टीना हात लाऊ नये. नोंसेन्स.”

तो गुश्यातच निघाला. मी त्याला विचारलं, “दीपक, हि मोना कोण? तिचा आणि तुझा काय संबंध?”

ह्यावर मला काही समजायच्या आत त्यांनी माझ मनगट घट्ट पकडलं आणि दरडावत म्हणाला, “कविता, बायको आहेस बायकोच्या मर्यादेत रहा. मालकीण व्हायचा विचार पण करू नकोस. हे प्रश्न आम्हाला आमच्या आईनी कधी विचारले नाहीत. तर तू कोण? लायकीत राहायचं.” आणि तो तरातरा निघून गेला.

माझ्यासाठी हे सगळं इतकं अनपेक्षित होतं की घरातील सर्व माणस आमच्या खोलीत उभी आहेत हे हि मला जाणवलं नाही. “कविता, पुरुषांशी बरोबरी करू नकोस. तो तुला काही कमी पडू देत नाहीयेना, तेवढ बघ. बाकी तो कुठे जातो, कुणाला भेटतो ह्याच्याशी तुझा काही संबंध नाही. झोप आता.” सासूबाईंच्या शब्दांनी मी भानावर आले. त्या रात्री मी खूप रडले.

आधी वाटलं आईला सांगावं. पण काय आणि कसं? तिचा विश्वास बसेल का? जवळ जवळ वर्ष झालय आमच्या लग्नाला. इतके दिवसात कशाची तक्रार नाही आणि आज अचानक मी हे असं सांगितलं तर? आणि मी हे सगळं सिद्ध तरी कसं करणार होते. दीपकने एव्हाना त्याच्या फोन बुक मधून तिचं नाव डिलीट केलं असेल किंवा मोनाच्या जागी अजून काही लिहिलं असेल. ह्या विचाराने मी गोंधळून गेले आणि सध्या काही न करण्याचा निर्णय घेतला. मी पुन्हा ह्याची वाच्यता कोणाशी केली नाही पण माझ्या पद्धतीने माहिती मिळवत होते. जी माहिती मिळत होती ती फार काही चांगली नव्हती. मोना डार्लिंग एकटी नव्हती. हे कळल्यावर दीपकच्या आणि माझ्या नात्यात अंतर पडू लागलं.

एक दिवस राधिका सोबत रुटीन चेकउप साठी मी गेले. लेडी डॉक्टरनी, “सर्व नॉर्मल आहे. तब्येतीची काळजी घ्या. पहिलीच वेळ आहे...”वगैरे नेहेमीचा सल्ला दिला.

मी सहज, उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं, “डॉक्टर, एखाद्या कपलला मुल होत नसेल तर त्यासाठी काही वेगळी treatment घ्यावी लागते का? तुमच्या कडे ती मिळू शकते का?”

माझ्या ह्या प्रश्नानी राधिकाचा चेहेरा पडला. डॉक्टर काही म्हणणार त्या आधी ती घाईघाईने उठली, “कविता, घरी खूप काम आहे. आपल्याला निघायला हवं” म्हणत केबिन च्या बाहेर गेली.

दिवस जात होते. कविताच्या delivary ची तारीख जवळ येत होती. मी माझी रोजची कामं करत होते. पण त्या दिवसाच्या फोनच्या प्रसंगानंतर सगळ्याची घडी जणू विस्कटल्या सारखी झाली होती. राधिकाला मुलगा झाला. पण मला त्याचा फारसा आनंद झाला नाही. घरातील सर्व नात्यांमधे एक अंतर येत चाललं होतं. बाळाच बारसं ठरलं. बारश्याला खूप लोक आणि नातेवाईक आले. भेटायला, बघायला, कौतुक करायला! त्यात खूप जणांची पहिली रिअक्श्न होती, ‘किती दीपक सारखा दिसतोय’. एका काकुनी तर चेष्टेनी विचारलं पण, “मंदाताई, मुलगा सुरेशचा की दिपकचा?” ह्यावर सासूबाई पटकन म्हणाल्या, “सरोजताई, तुमचा स्वभाव काही बदलत नाही. मनात आल की बाई बोलून मोकळी. अहो माझा नातू आहे तो! सुरेश आणि राधिकाचा मुलगा!”

हे सगळं ऐकून माझं मन बधीर झालं. मनात येत होतं, सणाचं निमित्त करून मला माहेरी १० दिवसांसाठी पाठवलं. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ दिपकनी साधा फोन केला नाही की माझी चौकशी केली नाही. त्या दिवशी घरात शिरतानाचं सासूबाईनी उच्चारलेलं वाक्य. हे सगळं काय आहे? मला काही समजत नव्हतं. सर्व पाहुणे गेल्यावर मी सासूबाई आणि राधिकाला उद्देशून विचारलं, “हे खरं आहे का?” राधिका खाली मान घालून उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. सुरेशदादा गप्प उभे होते. सासूबाईनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी मला एक थोबाडीत मारली आणि हाताला धरून घराबाहेर काढलं. दीपक आणि सासरे बघत होते, पण काही बोलले नाही. आणि त्या दिवशी मी माहेरी आले. आई-बाबांना सर्व सांगितलं आणि ते तुमच्या कडे घेऊन आले. आता ताई तुम्हीच सांगा मी ह्या माणसा सोबत कशी राहू?”

मागील एका वर्षात, कविता ४-५ वेळा तरी सासरी जाऊन आली. हि माहिती आम्हाला तिच्या बोलण्यातून समजली होती. ह्या पलीकडे अजून किती वेळा ती गेली होती ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही तिला खूप वेळा समजावून सांगितलं, ‘तुमचं भांडण, तुमच्यातील गैरसमज मिटला असेल तर आम्हाला तसं सांग म्हणजे आम्ही केस बंद करतो. आणि केसपेपरवर लिहितो- दोघांमध्ये परस्पर समझोता झाला आहे.’ ह्याला ती तयार नव्हती. तिला सगळं लेखी करून हवं होतं.

दर खेपेला जाऊन आली की तिची सासरच्या लोकांबद्दल एक वेगळी तक्रार असायची. कधी म्हणायची सासरे जीवे मारण्याची धमकी देतात, तर कधी तक्रार करायची घरातले सगळे तिला ‘निघ’ म्हणतात, घरा बाहेर काढतात. कधी म्हणायची माझ्या नवर्याला माझी गरज आहे. पण तिचा असाही आग्रह होता की सुयश हा दिपाकचा मुलगा नाहीये हे त्यांनी सिद्ध करावं. तिला नेमकं काय हवं होतं? तिची अपेक्षा काय होती? ह्याचा आम्हाला पण अंदाज येत नव्हता.

त्या दिवशी दिपकचा फोन आला. पण बोलणं नीट कळत नव्हतं. कविता थांबायला तयार नव्हती. “ताई मी जाऊन येते. दीपकला समक्ष भेटल्याशिवाय, बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही.” पुढे २०-२५ दिवस कविताची काही खबरबात नाही. आम्हाला पण ह्याची सवय व्हायला लागली होती.

नंतर एक दिवस दीपक आला. अचानक. ना फोन. ना येण्याची खबर. तोंडावर मास्क होता. चेहेरा थकलेला. आवाज खोल गेलेला. त्याच्या हालचालीतून असं जाणवत होतं की त्याला बर वाटत नसावं. समोरच्या खुर्चीत बसत त्यांनी धापा टाकत बोलायला सुरुवात केली.

“ताई मी दीपक. कवितानी माझ्या बद्दल काय सांगितलाय मला ठाऊक नाही. पण मला तिची गरज आहे. मला तिने परत यायला हवं आहे. ती मनात येईल तेंव्हा येते आणि तिच्या मनाला वाटेल तितके दिवस रहाते. आली की ती बरी आणि आमची रूम बरी. सारखा हातात मोबाईल. त्या मोबाईल वर काहीतरी उपलोड करत असते. स्वतापुरता  स्वैपाक करते. कधी तिचा मूड असेल तर माझा पण नंबर लावते. घरातील सगळे तिच्या वागण्याला कंटाळले आहेत. तिला नेमकं काय हवय तेच समजत नाहीये. ती अशी का वागते? आता महिन्याभरापूर्वी मला बर वाटत नाहीये कळवायला फोन केला तर दुसर्या दिवशी madam हजर. ‘येऊ नकोस’ असं बजावलं होतं, तरी आली. ती आली की तिचा माझ्या आई-वडिलांशी वाद होतो. ती काहीतरी असं बोलते की माझे बाबा चिडतात. राग अनावर झाला की ते हात उचलतात. मुळात त्यांचा स्वभाव तापट आहे.” बोलता-बोलता त्याला (ढास लागली) खोकला येत होता.

तो पुढे काही सांगणार तेवढ्यात “दीपक तू कधी आलास आणि कसा आलास? मोटर-सायकलवरून? असा तू बेजबाबदारपणे कसं वागू शकतोस. मी उद्या तिकडे येणार आहे असं सांगितलं होतं ना?” असं विचारात कविता ऑफिसमधे आली.

कविताला बघून आमच्या सर्वांच्याच चेहेर्यावर आश्चर्य बघून ती पटकन म्हणाली, “ताई, दीपक इकडे आलाय असा मला फोन आला होता?” कोणी केला हे विचारणं व्यर्थ होतं. आम्ही तिला बाहेर थांबायला सांगून दीपक कडून पुढील माहिती घेण्यास सुरुवात केली.

“दीपक, कविताच वागणं पहिल्यापासून असंच आहे का तुमच्या आयुष्यात असं काही घडलं ज्या मुळे ती अशी , म्हणजे तुम्ही म्हणालात तशी वागू लागली आहे? कविताच असं म्हणणं आहे की तुमची अफेअर्स आहेत. आणि तिला हे जेंव्हा समजलं आणि तिने तुम्हाला त्याबद्दल विचारलं तेंव्हा तुम्ही सर्व फार विचित्र पणे रीअक्त  झालात. हे खरं आहे का? आणि बाय द वे हि ‘मोना’ कोण आहे?”

“हे पहा ताई, माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचा कोणालाच अधिकार नाहीये. तुम्हाला नाही आणि तिला तर नाहीच नाही.”

तेवढ्यात दीपकला कोणाचा तरी फोन आला आणि तो घाईघाईने बाहेर गेला. तो बाहेर गेलेला बघून कवितानी आत येऊन सांगितलं, “ताई मी आज पण समझोता करून नांदायला जायला तयार आहे. त्याच्या आई-वडिलांना इथे बोलवून घ्या आणि त्यांना मान्य करायला लावा की त्यांचा मुलगा आणि त्याचं वागणं चुकलं. आणि दिपकनी दोनच गोष्टी लिहून द्याव्यात, ‘इथून पुढे तो इतर बायकांशी संबंध ठेवणार नाही आणि राधिकाच्या मुलाशी त्याच काही नातं नाही.’

दीपक आत आला. त्याचा चेहेरा दमल्यासारखा दिसत होता. त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतून घोटभर पाणी प्यायल आणि डोळे मिटून बसून राहिला. ‘दीपक, बर वाटतंय का? तुम्हाला इतकं बर वाटत नव्हतं तर आज इथे कशाला आलात? इतके दिवस तुमची बाजू ऐकायला थांबलो तर अजून काही दिवस थांबलो असतो.’ त्यांनी हातानेच ठीक आहे असं सांगितलं.

बँकेतील काम उरकून तेवढ्यात ऑफिस मधील संगीता आली. दीपकची अवस्था बघून ती पटकन म्हणाली,” ह्यांना काय झालाय? आता तर बाहेर कोणाशीतरी हसून बोलत होते आणि सांगत होते, “तू काही टेन्शन घेऊ नको. मी इथे सर्व बरोबर मेनेज करतो.”

हे ऐकून दिपकचा चेहेरा बघण्यासारखा झाला. तो तावातावाने उठला आणि बाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ कविता पण गेली. त्याला खरंच बर वाटत नाहीये का तो नाटक करतोय. का तो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळतोय, हे ठरवणं अवघड होतं.

थोड्यावेळानी बाहेरून जोरजोरात भांडण्याचा आवाज आला. बाहेर दीपकच्या मागे बाइकवर बसून जायचा प्रयत्न कविता करत होती. आणि दीपक हे होऊ देत नव्हता. कविताला ढकलून दीपक निघून गेला. कविता आत आली. तिच्या मागे तिचे आई-वडील आले. ती शांतपणे समोर बसत म्हणाली, “ताई, माझ्या लक्षात आलाय, हि माणस सुधरणार नाहीत, बदलणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात एका बाईची, तिच्या भावनांची काही किंमत नाही. तिला दोन वेळा गिळायला मिळालं, चार दागिने दिले, गरजेपेक्षा जास्त कपडा दिला की आणखीन तिच्यासाठी काही करण्याची गरज नाही. तिने ह्याच उपकारांच्या ओझ्याखाली आयुष्यभर त्यांची सेवा करावी, त्यांची नाटकं बघत,सहन करावीत हि त्यांची आणि समाजाची अपेक्षा आहे. मला कळून चुकलाय हा माझा प्रोब्लेम आहे. मी तो माझ्या पद्धतीने सोडविन. ताई, तुम्ही मला हिम्मत दिलीत. वेळोवेळी माझं म्हणणं ऐकून घेतलत, त्याबद्दल मी तुमची ऋणी राहीन. इथून पुढे कधी मदत लागली तर कराल ना? माझी केस बंद नका करू. कधी काय होईल हे मला पण माहित नाहीये.”

असं सांगून ती आमच्या ऑफिसमधून गेली. पुढे महिन्याभरानी तिच्या आईकडून समजलं की कविता, त्या दिवशी दीपकच्या पाठोपाठ सासरी गेली. १५ दिवस राहिली. कालपरवा ती बेग घेऊन पुन्हा कुठे तरी गेली आहे. आम्ही तिला ‘कुठे जातेस? कधी येणार? असं विचारणं बंद केलं आहे. तुम्हाला तिची खुशाली समजली तर प्लीज कळवाल का? अशी विनंती केली.

ह्यानंतर साधारण तीन महिन्यानी एक दिवस दिपकचा अचानक फोन आला, “ताई, मला तुमची मदत हवी आहे. मला कविताच वागणं समजत नाहीये. तक्रार करावी असं ती वागत नाहीये पण ती जे वागते आहे त्याचा मला त्रास होतोय. तीन महिने छान मजेत राहिली. कसला तरी हिशोब करत होती. काल अचानक कपाटातील तिचे दागिने आणि काही रोख घेऊन ती गेली. कुठे माहिती नाही. पोलीस स्टेशनला खबर करायला गेलो तर समजलं की ती जातानाच पोलीस स्टेशनमधे, सोबत घेतलेल्या वस्तूंची नोंद करून, माहेरी जात आहे असं सांगून गेली आहे. पोलिसांनी सांगितलं, ‘अहो ती तिच्या वस्तू घेऊन गेली आहे. त्याची नोंद घेता येईल. तक्रार नाही.’

काल तिचा फोन आला होता. म्हणाली, “काळजी करू नकोस. मी ८ दिवसात परत येईन. आई-वडिलांनी मला घातलेलं सोनं आणि लग्नात केलेला खर्च परत करायला हवा, असं मला वाटतं. आपल्या सुखी संसाराची स्वप्न बघत त्यांनी, त्यांना न परवडणारा हा खर्च केला होता. आपल्या लग्नाचं काय झालाय आणि चाललाय हे तुला चांगलच माहित आहे.”  मी तिला विचारलं, “कविता, तू असं का वागतेस? तू कुठे जातेस?”

तर म्हणाली, “माझ्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करायची कोणालाच परवानगी नाही. अगदी तुला पण नाही. काळजी करू नकोस. मी माझी वेळ झाली की परत येईन.”

दिपक फोन ठेवण्यापूर्वी एक वाक्य म्हणाला, ‘ताई, कविता अशी नव्हती. ती अशी का वागते आहे मला काही समजत नाहीये. तिचा बाहेर कोणी मित्र नाही ह्याची मला खात्री आहे. कधी कधी तिचं वागणं बघून मनात वाटतं, ती कशाचा तरी बदला तर घेत नसेल ना? पण कशाचा आणि का?’

‘जसं पेराल तसं उगवेल’ हे दीपकच्या बाबतीत घडत होतं!