Wednesday 18 November 2020

जगात खरच भूत असत का?

जगात भूतं असतात असं मला खूप दिवस वाटत होतं. आम्ही लहान असतांना आमच्या घरी माझ्या वडिलांचे मित्र, पाटणकर काका यायचे. ते पहिल्यांदा जेव्हा कोकणातून आले तेंव्हा काही दिवस आमच्या घरी होते. पाटणकर काका खूप भारी होते. रात्रीचं जेवण झालं कि ते रोज आम्हाला गोष्ट सांगायचे. त्यांच्या बहुतेक गोष्टी भुताच्या असायच्या. मी तेंव्हा ७ वीत होते. त्या गोष्टी ऐकायला भारी वाटायच्या आणि भीती पण खूप वाटायची. आम्ही त्यांना विचारायचो, 'काका, भूत कशी असतात? ती कुठे रहातात? ती कुठून येतात?'

  काका सांगायचे,'जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल आणि ती मिळायच्या आधीच ती व्यक्ती मेली कि तिचं भूत होतं.'

  आम्हाला ते खरं वाटायचं.आम्ही भावंडं एक-मेकांना भूत होण्याची भीती घालून काम करून घ्यायचो.

  जगात खरच भूत असत का? ह्या प्रश्नाच उत्तर मला 'असू शकेल' असं वाटायचं. अगदी कांताची केस आणि कांता माझ्या आयुष्यात येई पर्यंत.

  ८६-८७ मध्ये नाशिकला एस.पी ऑफिस होतं. आमच्या कडील केसेस संदर्भात आमची एस.पी साहेबां बरोबर नियमित पणे बैठका व्हायच्या. अशाच एका मीटिंगमध्ये चर्चे नंतर असं ठरलं कि 'हुंडाबळीसारख्या केस मध्ये जळीत महिलेची मृत्युपूर्व जबानी घेताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी (शक्य असेल तर) तिथे हजर रहावं. कुसुमताईनी होकार कळवला. दोन दिवसातच संध्याकाळी ७-७.१५ च्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलमधून दूरध्वनीवरून सांगितलं,'ताई, एक ९२% जळीत महिला दाखल झाली आहे. तिचा जबाब घ्यायचा आहे. कोणाला तरी पाठवा.'

  आमचं ऑफिस तर ५.३० वाजता बंद झालं होतं. घरात पाहुणे आले होते. कुसुमताई जाऊ शकत नव्हत्या. त्यांनी मला जायला सांगितलं. नाही म्हणायची खूप इत्छा होती, पण हिम्मत होत नव्हती. जायची पण हिम्मत नव्हती. दिवसा ऑफिसमध्ये बसून समझोते करणं, तक्रार ऐकून घेणं, नोंदवून घेणं वेगळ आणि रात्री ८ वाजता एक जळालेल्या महिलेचं स्टेटमेंट घेणं वेगळ. काहीही झालं तरी मलाच जावं लागणार होतं. अनिछेनीच, पण गेले.

  आयुष्यात पहिल्यांदा सिव्हील हॉस्पिटलमध्ये जात होते आणि ते पण जळीत वार्डात! ते पण ९२% जळालेल्या महिलेचा जबाब नोंदवायला. मला सगळ्याचच खूप दडपण आल होतं. सिव्हील मध्ये सगळे वाटच बघत होते. आम्ही लगेचच कामाला लागलो. माझ्याबरोबर एक डॉक्टर, जुदिशिअल magistrate, आणि एक पोलीस खात्यातली व्यक्ती होती. मुलीचे आईवडील आणि इतर नातेवाईकांना बाहेर जाण्यास विनंती केली. त्या वार्डात आम्ही गेलो. ८ जळीत पेशंट होते. कमी जास्त प्रमाणात भाजलेले. वेदनेनी कण्हत होते. त्या खोलीत एक विचित्र दर्प होता. त्यांनी मला मळमळ आणि चक्कर येऊ लागली. खूप निग्रहाने आणि हिंमतीने मी उभी होते. पहिल्या नोंदी झाल्या-नाव,वय, इत्यादी माहिती घेऊन झाली. कांताला प्रश्न विचारत होते आणि ती जुजबी उत्तरं  देत होती.

  तिथे उभ्या एका नर्सनी तिला सांगितलं,'कांता, ह्या ताई आल्या आहेत. त्या महिलांना न्याय मिळवून द्यायचं काम करतात. तुला त्यांना काही सांगायचं आहे का?'

  डॉक्टरच्या मते जबाब नोंदवायचं काम झालं होतं. पण हि नवी माहिती मिळाल्यावर कांताला काहीतरी सांगायचं होतं. तिच्यात एक वेगळच बळ आल होतं. तिच्यात अजिबात शक्ती नव्हती. तिने 'ताई' अशी हाक मारली ती आम्ही ऐकली. तिचा आवाज खूप बारीक होता. आम्ही सगळे तिचं म्हणणं ऐकायला पुढे वाकलो. तो पर्यंत मी कांताला पाहिलंच नव्हतं. तिचा पूर्ण शरीर एका जाळीने झाकलेल होतं. त्या जाळीवर एक पांढरी चादर होती. आम्ही वाकल्यावर मला जे दिसलं ते भयानक होतं. भरीताच वांग भाजल्यावर त्याची जशी साल निघते तसं कांताच्या शरीरावरच कातडं निघालं होतं. मला चक्कर आली आणि उलटी होईल असं वाटलं. डॉक्टरनी मला धरलं म्हणून बर झालं.

  कांतानी जे सांगितलं ते भयानक होतं. तिचं एक वर्षापूर्वी दशरथ बरोबर लग्न झालं होतं. कांता १२वि पर्यंत शिकलेली, दशरथ एका पायानी थोडा अधू आणि ८ वी पास होता, पण कांताच्या बापाची गरीब परिस्थिती म्हणून हे लग्न झालं. पहिल्या दिवसापासून दशरथनी कांताचा कधी बायको म्हणून स्वीकार केलाच नाही. मनात येईल तेंव्हा जवळ जायचं, बाकीच्या वेळेला अपमान करायचा आणि तुच्छ वागणूक द्यायचा. दशरथची स्वतःची शेती होती आणि कांताच्या वडिलां पेक्षा परिस्थिती चांगली होती. काही दिवसा पूर्वी त्याची संगीताशी ओळख झाली. स्थळ तोलामोलाचं. तिच्या वडीलांची ती एकुलती एक मुलगी. त्यातून ते हुंडा द्यायला तयार होते. संगीता शिकलेली नव्हती आणि दिसायला पण बरीच होती, पण त्यांनी दशरथला काही फरक पडत नव्हता. त्याला संगीता बरोबर लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याला कांता कडून फारकत हवी होती. तो कांता कडे फारकत मागत होता आणि ती द्यायला तयार नव्हती. आधीच आपलेपणा नाही त्यात हा नवीन प्रॉब्लेम. त्याची दिवसेंदिवस चीड-चीड वाढत होती. तो कांताला उपाशी ठेऊ लागला, मारहाण करू लागला. पण कांता फारकतीच्या कागदांवर सही करेना. त्या दिवशी, दोन मित्रां बरोबर दशरथ दारू प्यायला. दारू बऱ्यापैकी चढली होती. त्यांनी कांताला जेवण वाढायला सांगितलं. ती जेवणाचं ताट घेऊन आली आणि दशरथनी पुन्हा फारकतीचा विषय काढला. कांता नी नकार दिल्यावर त्याला खूप राग आला. त्यात एक मित्र म्हणाला,"साली काय माजली आहे. दशरथ, तुला उलटून बोलते? मी तर तिला तुडवलीच असती."

  आधीच दारू चढलेली, त्यात मित्रांच्या समोर अपमान झाला. दशरथनी मारणं कांता साठी नवीन नव्हतं. पण आज त्याचा अवतार भीतीदायक होता. अर्वाच्य शिव्या देत त्यांनी कोपर्यातली काठी उचलली आणि मारायला (बडवायला) सुरुवात केली. तो मारत होता आणि वेड लागल्या सारखं 'फारकत दे, फारकत दे,' म्हणत होता. मी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेंव्हा समजलं कि तिला खांबाला बांधलं आहे. तिच्यात बोलायचे पण त्राण नव्हते. तिला दुरून कोणाचा तरी आवाज आला. "अरे ही तर मरून गेली. आता काय करायचं?" तेवढ्यात अंगावर काही तरी गार शिंपडल्या सारखं वाटलं. वाटलं आपण स्टोव्ह मध्ये रौकेल भरतोय. वास येतोय. तेवढ्यात अंगाची लाही-लाही झाली. ताई, मला न्याय हवा आहे."

  कांताचा आवाज क्षीण होत होता. ती श्वास घेण्यासाठी तडफडत होती. डॉक्टरनी आम्हाला बाहेर जाण्यासाठी हाताने खुणावलं. मी इतकी सुन्न झाले होते कि पुढची १० मिनिटे काय झालं मला काही समजलंच नाही. डोळे उघडले तेंव्हा जवळ एक नर्स होती. तिच्या हातात पाणी होतं आणि ती विचारत होती,'ताई, कस वाटतंय? बऱ्या आहात का? थोडं पाणी घेता का?' मी त्यांना विचारलं,'कांता?' त्यांनी खुणावून सांगितलं,'ती गेली'. मला खूप वाईट वाटलं. माझा आणि तिचा काही संबंध नव्हता कि ओळख. पण मला खूप वाईट वाटलं. अगदी जवळचं कोणीतरी गेल्यासारखी मी खूप रडले.

  माझी अवस्था बघून पोलिसांनी मला घरी सोडलं. घरी सगळे वाटच बघत होते. काय पाहिलं काय ऐकलं हे कथन करताना मी माझ्या नकळत खूप रडले. मी पुढचे २-३ दिवस न धड झोपू शकले कि जेऊ शकले. दुसर्या दिवशी मी आदल्या दिवशी जे ऐकलं, पाहिलं ते लिहून स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात पाठवलं.(हे कुसुमताई च्या सांगण्यावरून).

  मनात एक विचार आला, आता कांताचं भूत होईल का? झालं तर ती त्याला चांगली अद्दल घडवेल. कांता आणि तिचं भूत जे करायचं ते करतील. पण आपण आपल्या बाजूनी जे शक्य आहे ते करून कांताला न्याय मिळवून द्यायला मदत करायची, असं मी ठरवलं. मला by this time, कळल होतं कि भूत वगेरे काही नसतं, पण कोणत्याही मार्गांनी दशरथला शिक्षा व्हावी हि तीव्र इत्छा होती. म्हणून बहुतेक विचारांत भुताचा आधार घेतला. (इतक्या नव-विवाहित मुली हुंडाबळी होतायत, सुखी संसाराची स्वप्नं बघत लग्न करून सासरी जातात आणि अतोनात छळ सहन करून माहेरी येतात, किंवा आत्महत्या करतात, त्यांची कधी भूतं झाल्याचे ऐकले नाही)

पुढे दशरथ विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वर्षभरात केस बोर्डावर आली, चालली आणि दशरथला जन्मठेप झाली.


6 comments:

  1. बापरे,
    हेमाताई खूपच विदारक आहे हे सर्व.
    तुम्ही पण ते अतिशय मोजक्या पण ज्वलंत पद्धतीने शब्दांची मांडणी केली आहे

    ReplyDelete
  2. Namaskar Tai,
    Read the whole incident & really felt very bad for Kanta.But very proud of you,our real motivation,Our Tai.I remembered Avahaan Marathi serial.& Ghost,the nonsense,story learnt in textbook.
    Nice writing,waiting for your next script.

    ReplyDelete
  3. मॅडम वास्तव किती भयाणक असते.... वाचून सुन्न झाले..

    ReplyDelete
  4. बाप रे,वाचून मन सुन्न झाले.

    ReplyDelete
  5. मला अजून भुतं असतील असं वाटतं कदाचित काही करू शकत नसतील

    ReplyDelete