Thursday 17 December 2020

(पुन्हा एकदा) शून्यातून संसार...

कोरोना आणि त्या मुळे निर्माण झालेली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. स्थलांतरित मजूर आणि त्यांचे होणारे हाल, ह्याच्या संदर्भात वर्तमानपत्रातून आपण रोज बातम्या वाचल्याच आहेत.ह्या मजुरांचा नाईलाज म्हणून ते गावी परत गेले. तिथे गेल्यावर घरच्यांनी त्यांचं स्वागत केलं का आणि केल तर कस केलं ह्या बद्दल खूप काही माहिती मिळाली नाही. पण ३५ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक असं जोडपं आल, जे घरची आणि गावाकडच्या लोकांची खूप आठवण आली म्हणून नाशिक सोडून उत्तर प्रदेशला गेले. गावी गेल्यावरचे त्यांचे अनुभव फारच गंमतशीर होते.

१९८८-८९ ची घटना आहे. माझी मुलगी लहान होती आणि संस्थेचं काम नव्यानं सुरु झालं होतं. माझी खूप धावपळ होत होती. घरात मदतीला म्हणून एक मदतनीस आणायची ठरलं. त्या दिवसांत आधाराश्रमात गरीब, निराधार मुली व महिलांना आधार देऊन, त्यांची रहाण्याची सोय केली जायची. त्या वेळी नाना उपाध्ये आणि सुधाताई फडके हे दोघं आश्रमाच बहुतांशी काम बघायचे. (दोघे आमच्या चांगल्या परिचयाचे होते. अगदी घरच्या सारखे संबंध होते) त्यानी शोभाला आमच्या घरी पाठवून दिलं. १८-१९ वर्षांची शोभा चुणचुणीत होती. सर्व कामांमध्ये उत्साहानी मदत करायची. माझ्या लेकीसोबत तर तिची चांगलीच गट्टी जमली होती. बघता बघता शोभा आमच्या घरातील एक सदस्य बनली. मी पण नकळत तिच्यावर खूप अवलंबून राहू  लागले. माझ्याकडे येऊन तिला चारेक वर्ष झाली असतील. एक दिवस अचानक ती लाजत लाजत म्हणाली, "ताई, मला लग्न करावस वाटतंय.मला वाटतंय माझा पण नवरा असावा (भाऊ सारखा, समजूतदार). आमचं घर असेल, मुलं असतील. ताई, होईल का ग माझं लग्न? कोण माझ्यासाठी स्थळ बघेल, कोण माझ्यासाठी बोलणी करेल. माझा बाप असं वागला नसता तर, आज माझी आई जिवंत असती." नकळत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. 'ताई मी तुला आई म्हणू का?' असं विचारत लहान मुलासारखी माझ्या मांडीवर डोकं ठेऊन रडायला लागली. बराच वेळ ती रडत होती आणि मी तिला थोपटत होते. जेंव्हा ती शांत झाली तेंव्हा आमच्यातलं नातं बदललेलं होतं. मला एक २२ वर्षाची मुलगी मिळाली होती. प्रेमळ, जीव लावणारी आणि नातं जपणारी. आम्ही पुढाकार घेऊन, आश्रमातील लोकांच्या मदतीने तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं.

शोभाच ते वाक्य 'तर माझी आई जिवंत असती' मला अस्वस्थ करत होतं. शोभाच्या आयुष्यात काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी सुधाताईना विचारायचं ठरवलं. कारण समजल्यावर त्या माहिती सांगायला तयार झाल्या. शोभाचा भूतकाळ ऐकून मन सुन्न झालं. तिच्यासाठी फार वाईट वाटलं. 'शोभा ६-७ वर्षांची असतांना तिच्या वडिलांनी शोभाच्या आईचा चाकूने भोसकून खून केला. ह्या साठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कोणीच नातेवाईक शोभाचा स्वीकार करायला तयार होईनात म्हणून तिला संस्थेत दाखल केलं. तुरुंगात असतांना शोभाचे वडील पण मेले. ना कोणी तिचा स्वीकार केला ना कोणी तिला कधी संस्थेत भेटायला आल. आता तर शोभा अगदीच एकटी झाली. सगळ्यानाच ती नकोशी होती. माझ्याकडे येईपर्यंत ती अशीच एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत शिफ्ट केली जात होती.

सुधाताई आणि उपाध्ये काकांनी पुढाकार घेऊन शोभा साठी दोन स्थळ बघितली. लग्नानंतर नाशिक सोडावं लागेल ह्या भीतीने तिने संगमनेरच्या स्थळाला नकार दिला. दुसर स्थळ होतं रामशरणचं. रामशरण यु पी कडील भैया होता. कामासाठी नाशिक मध्ये आला होता. भाड्याच्या गाड्यावर दारोदार भाजीपाला विकायचा. कमाई बरी होती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि आश्रमातील कर्मचारी, संस्थेतील मुलं व आमचा काही मित्र परिवाराच्या साक्षीने शोभा आणि रामशरण चा विवाह संपन्न झाला. दोघांचा संसार आनंदात सुरु झाला. अधून मधून दोघं भेटायला यायचे. पहिल्या तीन वर्षात शोभला दोन मुलं झाली, मोठी मुलगी आणि नंतरचा मुलगा. मुलगा, कालीचरण, सहा महिन्याचा असेल. एक दिवस दोघं मुलांना घेऊन भेटायला आले होते, तेंव्हा रामशरण नी ते गावी जात असल्याचं सांगितलं. तो म्हणाला," माताजी हम शोभा और बच्चोको लेकर गाव जा रहे है. यहा का सब बेचके जा रहे है. मांका बहोत बार फोन आये. कालीचरणको देखनेका उनका बहुत मन करता है. हम भी २० सालसे यही पर है. हमेभी गावकी, खेतोंकी बहुत याद आती है. अब कब मिलना होगा पता नाही. तुम लोगोंकी बहुत याद आएगी."

मुलांच्या हातात खाऊ, शोभाला साडी आणि रामशरण कडे थोडे पैसे देऊन पाठवणी केली. दोघंही अशिक्षित असल्यामुळे पुढे काही त्यांची खबरबात कळलीच नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, 'नो न्यू इज गुड न्यूज'.

शोभाला जाऊन चार महिने पण झाले नव्हते. एक दिवस पहाटे साडे चार वाजता दारावरील बेल वाजली. दार उघडलं तर समोर शोभा आणि रामशरण, हातात सामान आणि दोन्ही मुलांना घेऊन उभे. मी काही विचारायच्या आत शोभा गळ्यात पडून रडायला लागली. मला बघून रामशरणच्या पण चेहेरयावरील ताण कमी झाला. सगळ्यांना भूक लागली होती आणि प्रवासानी दमले पण होते. थोडाफार खाऊन सगळे झोपले.

उठल्यावर शोभा लगबगीने कामाला लागली. सकाळची सगळी काम आवरून झाल्यावर गावी काय झालं ते तिने सविस्तर सांगितलं.

"आई, इथून आम्ही गावी पोहोचलो. आम्हाला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. सासूबाईंना रामचरण आणि नातवंड भेटल्यामुळे त्या खुश होत्या. मला भाषेची थोडी अडचण होत होती. पण हळू हळू त्यांना माझं आणि मला त्यांचं म्हणणं समजू लागलं होतं. पहिले दोन महिने मजेत गेले. सगळ्यांनी आमचे आणि मुलांचे खूप लाड केले. लवकरच रामचरण त्यांच्या भावा बरोबर शेतात जाऊ लागले. रामशरणनी  मी नाही म्हणत असतांना इथून नेलेले सर्व पैसे वडिलांच्या कडे देऊन टाकले. त्यामुळे ते पण खुश होते. आम्हाला जाऊन तीन महिने झाले. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर सासूबाईनी विषय काढला. 'आपको आके बहोत दिन हो गये. वापस जाना है ना? कबकी टिकट निकालनेको बोले?'

हे ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. रामशरणनी आईला विचारलं,"अम्मा, कहा जाये? हम तो वहाका सब बेचके गाव आये है. आप लोगोंके साथ रेहेने. बच्चे यही इस्कुलमें पधेंगे. वहा नासिकमें अब हमारा कुछभी नही है."

"तुम आनेसे पहले हमसे पूछा क्या, आये क्या करके. यहा हम आपको, आपके परिवारको क्यों सम्हाले? मुफ्तकी रोटी कोन और क्यू खिलावेगा?"

"मुफ्तकी काहे. शोभा घरके काममे हात बटावे है, हम खेतोमे काम करत है. और पूछना क्या है? घर हमारा, गाव हमारा, जमीन हमारी, आप सब हमारे. मन हुंवा हम आ गये."

"तुम यहा नही रेह सकते. जल्दीसे अपना सामान उठावो और निकलो."

"हम भी देखते है हमें कौन निकालता है."

आणि मग काय त्या रात्रीनंतर सगळं चित्रच पालटल. रोज वाद आणि भांडणं व्हायला लागली. घरात कोणी कशाला हात लाऊ देईना. आम्ही जमिनीत हिस्सा मागणार अशी त्यांना भीती वाटत होती. रोज दिवसातून चार चार वेळा सासू विचारायची,'कधी जाताय, केंव्हा जाणार?'

रामशरणनी एक दिवस वडिलांकडून 'दिलेले पैसे परत मागितले.' तो म्हणाला," मैने आपको दिये थे वो पैसे मुझे दे दो. मै, मेरे परिवारको लेकर चला जाऊंगा. मेरे पास जो भी था वो मैने आपको दे दिया. अब मेरे पास कुच्छभी नही है."

हे ऐकल्यावर सासरे खूप संतापले. आम्हाला खूप शिव्या दिल्या. रामशरण ला मारायला धावले. घरातील वातावरण अजूनच बिघडलं. आम्हाला पोटभर जेवण पण देणं बंद केलं. उपाशीपोटी मुलं रडत झोपायची. मी रामशरणला म्हणाले, 'आपण नाशिकला आईकडे जाऊया. ती आपल्याला मदत करेल.'

ट्रेनची तिकीट काढायला पण पैसे नव्हते. मुलांची अवस्था बघवत नव्हती. मला काय करावं कळेना. मला आई तुझी फार आठवण आली. त्या दिवशी मी खूप रडले. तू कालीचरणला दिलेली चौघडी काढायला बेग उघडली आणि माझी परतीच्या प्रवासाची सोय झाली. मला तू लग्नात दिलेले चांदीचे पैंजण दिसले. मी लागलीच रामशरणला ते दिले. त्यांनी त्या पैशातून तिकीट काढली. म्हणून आम्ही तुझ्या कडे सुखरूप येऊ शकलो. (जेंव्हा सासूला समजलं कि माझ्या कडे चांदीचे पैंजण आहेत तेंव्हा तिने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं. अजून मी काय लपवलं आहे हे पाहण्या साठी बेगेतून सामान बाहेर काढलं. जेंव्हा काहीच मिळालं नाही तेंव्हा चिडून तिने माझी एक साडी फाडली. एवढंच नाही तर दोन चांगल्या साड्या स्वताच्या कपाटात ठेऊन दिल्या.) माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाहीये. तिथले शेवटचे दिवस आठवले तरी अंगावर काटायेतो.

आई, आता आम्ही तुझ्याकडे आलोय. रामशरण म्हणतोय आपण आपला भाजी विकायचा धंदा सुरु करू. त्याला जोडीला फळ पण ठेऊ. आई तू आम्हाला थोडी मदत करशील का?"

२-४ दिवस ते सगळे माझ्या कडे राहिले.मी त्यांना आर्थिक मदत करायची ठरवलं. रामशरणच्या आधीच्या ओळखी होत्याच. त्याला काम सुरु करायला आणि भाड्याची खोली मिळवायला वेळ लागला नाही.

 दोघांनी दोन लेकरांसह शून्यातून संसार सुरु केला. रामशरणनी खूप मेहनत केली. शोभानी पण चांगली साथ दिली. (गावाकडून कामानिमित्त आलेल्या लोकांना ती जेवणाचे डबे द्यायला लागली. पुढे राहत्या घराच्या शेजारची खोली घेऊन ह्या लोकांना पोटभाडेकरू म्हणून ठेऊन चार पैसे कमवायला लागली. रहात घर विकत घेतलं, (कर्ज काढून.) मला शेवट भेटली त्याला पण १५ वर्षं झाली. तेंव्हा तिची मुलं शिकत होती. तीन खोल्यांचं घर त्यांच्या नावावर होतं. दोघं मजेत संसार करत होते.

2 comments:

  1. किती छान ताई , तुमच्या मदतीने शोभा चा संसार परत सुरळीत चालू झाला ,भारी....

    ReplyDelete