Tuesday 8 September 2020

लग्नाची बैठक

महिला हक्क संरक्षण समितीचं काम करताना अनुभवातून खूप शिकले, समाजाबद्दल त्यातील मान्यता आणि रूढी ह्या बद्दल. मानापमानाच्या कल्पना, लग्नाच्या बैठका, बस्ता बांधणे, देणे घेणे, अश्या अनेक गोष्टी! मी ज्या घरात लहानाची मोठी झाले(माझ्या माहेरी) आणि लग्न करून ज्या घरी आले(माझ्या सासरी) त्या दोन्ही घरात ह्या बद्दल कधी कुठल्याच प्रकारे काही ऐकायला मिळालं नसतं. लग्नाची बैठक म्हणजे काय असं विचारल्यावर ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्यांनी पाहिलं. खर म्हणजे त्यांच्या चेहेर्यावरचा भाव अविश्वासाचा होता, कारण अश्या बैठकी शिवाय माझं लग्न कस झालं हा त्यांना पडलेला प्रश्न. माझ्या आयुष्यात हा विषय आला तो आर्या आणि अश्विन मुळे.

एक दिवस दोन तरुण मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, ऑफिसमधे आले. बराच वेळ दारातच घुटमळत उभे होते. ऑफिसमधील थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यातील मुलगा हिम्मत करून पुढे आला आणि म्हणाला," आम्हाला अध्यक्षांना भेटायचं आहे."

"अध्यक्ष आज येणार नाहीत. तुझं काय काम आहे ते आम्हाला सांग. बघूया, आम्ही तुला काही मदत करू शकतो का ते" असं म्हणत मी त्याला माझ्या समोरील रिकाम्या खुर्चीत बसायला खुणावलं. खुर्चीत बसतांना त्यांनी त्याच्या सोबत आलेल्या मुलीला येऊन बसायला खुणावलं. दोघं बसल्यावर मुलांनी बोलण्यास सुरुवात केली.

"ताई, मी अश्विन आणि हि आर्या! आम्ही जुन्या नाशकात रहातो. आमची घरं शेजारी शेजारी आहेत. आर्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकते आणि मी फायनल इयरला आहे. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. ताई, आम्हाला मदत करा."

मी विचार केला, ज्या अर्थी मुलं संस्थेची मदत मागतायत त्या अर्थी एक तर त्यांच्या लग्नाला घरातून विरोध तरी असेल किंवा त्यांच वय बघता त्यांनी घरी विचारलंच नसेल. अश्या वेळेस काही गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं असत. कायद्याच्या परिभाषेत ते सज्ञान आहेत का? मुलाचं वय २१ पूर्ण आणि मुलीचं वय १८ पूर्ण आहे का? मग पुढचे प्रश्न. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक इ. त्याबद्दलचे मी त्यांना काही प्रश्न विचारले:

घरी आईवडिलांशी किंवा घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीशी ह्या बाबतीत बोलायचा प्रयत्न केला आहे का? त्यांचा ह्या लग्नाला विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं कि तुम्हाला वाटतंय?

तुम्ही लग्न केल्यावर राहणार कुठे, खाणार का? उत्पन्नाचं काही साधन आहे का?

एकमेका व्यतिरिक्त तुम्हाला इतर लोकांची गरज भासेल-बोलायला,शेयर करायला, अडचणीत मदत मागायला. आपल्या लक्ष्यात येत नाही पण आपण खूप लोकांवर अवलंबून असतो. दोघांनीच जगणं सोपं नाहीये. तुम्ही ह्याचा विचार केला आहे ना?

माझ्या प्रश्नांना उत्तर म्हणून अश्विन बाहेर गेला आणि एका पन्नाशीतल्या गृहस्थाना घेऊन आला.

"ताई, हे आर्याचे मामा आहेत. त्यांचा सपोर्ट आहे आम्हाला. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तुमच्या कडे आलो. ते मंदिरात आमचं लग्न लाऊन देणार आहेत. व नंतर सुरतला त्यांच्या मित्राकडे राहायची सोय करणार आहेत."

मामा एक खुर्ची घेऊन अश्विनच्या शेजारी बसले. त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीतून आर्या आणि अश्विनचा जन्माचा दाखला काढला. मुलं कायद्यांनी सज्ञान आहेत हे त्यावरून निश्चित झालं. मामा म्हणाले,"ताई, आता काय सांगायचं? दोन्ही कुटुंबांची गेल्या २५ वर्षांची ओळख आहे. ह्या दोन्ही मुलांचे वडील एकाच कंपनीत गेली अनेक वर्षं एकत्र काम करतात. दोन्ही कुटुंबाचा खूप घरोबा आहे. मुलं एकत्र खेळली वाढली. आता वयात आल्यावर प्रेमात पडली. मीच त्यांना सांगितलं आधी शिक्षण पूर्ण करा, चार पैसे कमवायची अक्कल येऊ दे मग बघू लग्नाचं! घाई काय आहे?

मुलानीपण माझं ऐकलं. पण कुठून कोणास ठाऊक, आर्याच्या आईला कुठूनतरी ह्यांच्या प्रेमप्रकरणा बद्दल कळल. मग काय तिने घरात गोंधळ घातला. आर्याला विचारून ती खरं काय ते सांगत नाही हे लक्षात आल्यावर तिने तिचा पवित्रा बदलला. तिने हे शैक्षणिक वर्षं संपल कि आर्याच लग्न उरकायचं ठरवलं. तिने मला विश्वासात घेऊन सांगितलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग होत नाहीये. ताई, तिचा ह्या लग्नाला का विरोध आहे हेच कळत नाहीये. अश्विन पुढच्या वर्षी इंजिनिअर होईल. माझ्या इतक्या ओळखी आहेत. त्याला कुठेही काम मिळेल. २०-२५ वर्षांची ओळख आहे, आमची जात एक आहे. मला तर विरोध करण्यासाठी एक पण पटेल असं कारण दिसत नाहीये. मी मुलांना सर्व मदत करायला तयार आहे. मी सर्व तयारी केली आहे. फक्त लग्न तुमच्या सल्ल्यांनी आणि मदतीनी व्हावं असं मला वाटतं. मुलांना त्रास होणार नाही असं काहीतरी करा."

आमच्या परिचयातल्या वकिलांच्या सल्ल्याने आर्या आणि अश्विनच लग्न, मामांच्या उपस्थितीत मंदिरात लागल. कोर्टात लग्नाची नोंदणी केली. ह्या सगळ्याची पोलीस स्टेशनला नोंद केली (कारण तरुण मुलगा आणि मुलगी घरातून गायब झाले कि त्यांचे पालक सर्वप्रथम त्यांची मिसिंग कम्प्लेंट नोंदवतात. आज ना उद्या हि मुलं पोलिसांना सापडतात आणि मग ते त्यांना पालकांच्या ताब्यात देतात.) आणि मामांच्या मदतीने नवदाम्पत्य सूरतसाठी रवाना झालं.

ह्या गोष्टीला दिडेक महिना झाला असेल. रोजच्या केसेसच्या गडबडीत आम्ही आर्या,अश्विन आणि त्यांचं लग्न विसरलो होतो. एक दिवस अचानक आर्याच्या मामांचा कळवायला फोन आला कि 'मुलं एका आठवड्या पूर्वीच नाशिकला आली आहेत. दोघं आपापल्या घरी आहेत. आता दोघांचे आईवडील त्यांच्या लग्नाला मान्यता द्यायला तयार आहेत. पण दोन्ही कुटुंबांच म्हणणं आहे कि समाजाच्या रिती रिवाजाप्रमाणे, देवा धर्माच्या साक्षीने हे लग्न व्हावं.'

मी विचारलं 'मुलं नवरा-बायको सारखे एकत्र राहून आलेत आणि आता हे लग्नाचं काय मधेच. पण एक गोष्ट चांगली आहे घरातील सगळ्यांना हे लग्न मान्य आहे. का...."

मामानी मला मधेच थांबवलं. 'ताई, अश्विनच्या वडिलांना रीतसर लग्नाची बोलणी करायची आहेत. देणं-घेणं, मान-पान, हुंडा किती देणार? बस्ता कुठे बांधायचा? असं सगळं ठरवायचं आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजता आमच्या घरी बैठक आहे. ताई, तुम्ही प्लीज या. नाहीतर काहीतरी राडा होईल. मी तुम्हाला घ्यायला येतो.'

मी काही बोलायच्या आत त्यांनी फोन बंद केला. (त्या काळी फक्त लेंन्डलाईन फोन होते. माझ्या कडे मामांचा नंबर नव्हता.) मला अक्षरशः घाम फुटला! लग्नाची बोलणी करायला मी जाणार? ३२-३३ वर्षांची मी, माझं कोण ऐकणार. मी आज पर्यंत कधी असा कार्यक्रम बघितलेला नाही, अनुभवलेला नाही. मी तिथे जाऊन काय बोलणार? मला काही सुचेना. घशाला कोरड पडत होती. ते सगळ टाळण्यासाठी काही कारण पण सुचत नव्हतं. मी एरवी पेक्षा खूप जास्त पाणी पीत आहे आणि अस्वस्थ आहे हे शांताबाईंच्या (ऑफिसमधील मदतनीस) लक्षात आल. तिने हळू आवाजात विचारलं, 'ताई, काय होतय?' मी तिला थोडक्यात ५.३० वाजता येणाऱ्या संकटाची कल्पना दिली. तिने माझ्या सोबत येण्याची तयारी दर्शविली. त्या दिवशी मला तिचा खूप आधार वाटला.

ठरल्या प्रमाणे मामा आले आणि आम्ही सो काल्ड लग्नाची बोलणी करायला गेलो. आर्याची आई आणि मामा यांचं खूप काहीतरी म्हणणं होतं. आतल्या खोलीत नेऊन ते मला पुनःपुन्हा एक गोष्ट सांगत होते, 'ताई, काहीही झालं तरी हुंडा देऊ असं कबूल करू नका. मुलांनी आधीच लग्न केलंय. आता कशाचा हुंडा?' मी काही बोलणार तेवढ्यात पुढच्या खोलीतून कोणीतरी बोलवायला आला. 'ताई, बाहेर सगळे जमलेत. तुम्हाला बोलावलं आहे.'

बैठक बसली होती त्या खोलीत जाऊन पाहिलं आणि माझं टेन्शन अजूनच वाढलं. तिथे बहुतेक सगळे (बायका आणि पुरुष) माझ्यापेक्षा वयाने २०-२५ वर्षांनी तरी मोठे होते. धोतर-टोपी-सदरा घातलेले पुरुष आणि नऊवारी साड्या नेसलेल्या बायका! सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा जणूकाही विचारत होत्या, हि पोर हा प्रश्न सोडवणार?

मी सगळ्याचं म्हणणं आधी ऐकून घेतलं. त्यामुळे मला विचार करायला थोडा अवधी मिळाला. सर्व लग्नाची बोलणी हुंड्याच्या पाशी येऊन अडकली होती. मुलाचे वडील म्हणत होते कि, 'आर्याच्या वडिलांनी १५०००/- रुपये हुंड्यासाठी बाजूला ठेवले आहेत. (हि घटना १९८७-८८ सालची आहे).ते त्यांनी आम्हाला द्यावेत. मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं होतं कि 'मुलांनी पळून जाऊन लग्न केलंय, तर आता देण्या-घेण्याचा विषय येतोच कुठे?'

मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वजण माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. मी जो निर्णय देईन तो सर्वाना मान्य असणार होता. त्या क्षणाला मला अचानक स्वतःबद्दल खात्री वाटायला लागली. कशानीतरी माझा आत्मविश्वास वाढला. शिक्षणामुळे असेल, मी करत असलेल्या कामामुळे असेल, त्यांनी मला दिलेल्या महत्वामुळे असेल. मी थोडा विचार केला. मुलांसाठी हे लग्न होणं गरजेचं होतं.(त्याला मान्यता मिळणं). हुंड्याची प्रथा मला स्वतःला मान्य नव्हती. पण माझा अनुभव मला शिकवत होता कि कधी कधी पैशांनी नाती घट्ट होतात आणि टिकतात. आर्याच्या वडिलांकडे १५०००/- रुपये तिच्यासाठी ठेवलेले होते. जे नंतर तिलाच मिळतील ह्याची खात्री नव्हती. सर्व बाजूनी विचार करून मी सांगितलं,

"अश्विनचे वडील जे म्हणतात ते मला पटतंय. आर्याच्या वडिलांनी तिच्यासाठी बाजूला ठेवलेले १५०००/- रुपये द्यावेत." मी क्षणभर सर्वांच्या प्रतिक्रिया बघायला थांबले. मुलाकडील लोकात आनंदाचे वातावरण तर मुलीकडील लोकांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मामानी तर, 'ताई पण....' असं म्हणायला सुरुवात केली होती. मी त्यांचं बोलणं मधेच तोडत विचारलं, "मग हे सर्वाना मान्य आहे?"

मुलाकडून एका सुरात होकार आला. सगळे उठून जायला लागले. मी सर्वाना बसायची विनंती केली.

"थोडं सांगायचं राहून गेलं. पैसे द्यायचे ठरले आहेत, पण हे पैसे आर्या आणि अश्विन च्या नावाने १० वर्षांसाठी बँकेत डीपोझीट करा."

अचानक खोलीतलं वातावरण बदललं, मला जाणवलं. काही काळ कोणीच काहीच बोलेना. मी जे काही सांगितलं त्याचा अर्थ लक्षात यायला बहुतेक वेळ लागला असेल. कोणी काहीच बोलत नाही म्हणून मी निघायची तयारी केली. मुलीच्या आईवडील व मामा ह्यांचा निरोप घ्यायला वळले. माझ्या बोलण्याचा अर्थ मामांच्या लक्षात आला होता. त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि 'आम्हाला मान्य आहे ' असं मोठ्याने म्हणाले.आता अश्विनच्या वडिलांची वेळ होती. सगळे त्यांच्या उत्तराची वाट बघतायत हे त्यांना जाणवलं. नाईलाजाने त्यांनी पण दुजोरा दिला. सर्व जमलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खोलीतील वातावरण आता आनंदी झालं. आता लग्नाची तारीख, जागा, इतर देणी-घेणी,नवरदेवा साठीचे कपडे, नवरीचा शालू, अश्या अनेक मुद्यांवर एकदम चर्चा सुरु झाली. आर्या आणि अश्विननी माझे आभार मानले. 'लग्नाला मला न विसरता बोलवा' आणि मुलांच्या नावानी केलेली एफ.डी.आर. मला ऑफिस मधे आणून दाखवा, असं सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघाले.

दोन दिवसांनी मुलीचे मामा आणि मुलाचे वडील मला लग्नाचं आमंत्रण द्यायला आणि पैसे बँकेत ठेवल्याची पावती दाखवायला आले. लग्न ठरल्या प्रमाणे पार पडलं. आर्या आणि अश्विन आशीर्वाद घ्यायला ऑफिसमध्ये येऊन गेले.

माझ्या आयुष्यातील पहिली आणि (बहुदा) शेवटची लग्नाची बैठक मला समृद्ध करून गेली.

7 comments:

  1. ताई खुप छान लिहिलंय.

    ReplyDelete
  2. 👌khup sunder anubhav kathan. Sarvana yogya sae margdarshak tharnare.

    ReplyDelete
  3. 👌khup sunder anubhav kathan. Sarvana yogya sae margdarshak tharnare.

    ReplyDelete
  4. Commendable,bold and very practical decision at such a young age. It must have enriched you.

    ReplyDelete
  5. 🙏खूप छान माहिती आहे👌👌👌👍

    ReplyDelete
  6. Hema, very fine, the experience you have written.

    ReplyDelete
  7. Excellent experience shared by u madam

    ReplyDelete