Tuesday 6 October 2020

शालिनी

शालिनी मला भेटली तेंव्हा २० वर्षांची होती. बारीक, मध्यम बांधा, सावळी आणि स्मार्ट अशी शालिनी १२ वी पर्यंत शिकलेली होती. वडिलांची दिंडोरी जवळ थोडीफार शेती होती. आई, वडील, २ भाऊ आणि ती स्वतः असं कुटुंब. शेतीच्या उत्पन्नात सर्व कुटुंब सुखानी जगात होते. शालिनीला १२ वी नंतर पुढे शिकवायच नाही, हे आई-वडिलांचं ठरलेलं होतं. वेळ घालवायला तिने २ वर्षाचा शिवण क्लास लावला. क्लासचं एक वर्षं जेमतेम झालं असेल आणि शालिनीला शेजारच्या गावातून लग्नासाठी मागणी आली. 'अजून तर महिन्या भारापुर्वीच तिला २० व वर्षं लागलाय. एवढी घाई कशाला करायची? शिवणाच्या क्लासची २ वर्षांची फी भरली आहे. अजून जवळ-जवळ एक वर्षं बाकी आहे. तो क्लास पूर्ण होऊ दे मग लग्नाचं बघू.' असं घरातील सगळ्यांचच मत होतं. पण दोन दिवसांत परत निरोप आला. त्यांना दोन महिन्यात लग्न उरकायचं होतं. स्थळ चांगलं होतं. मुलगा डॉक्टर होता. सरकारी दवाखान्यात नोकरीला होता. घरची शेती होती. मोठं घर होतं. त्याच्या पेक्षा मोठ्या दोन बहिणीचं लग्न झालं होतं. धाकटा भाऊ शिकत होता. मुलाची आई झेड.पी. च्या शाळेत शिक्षिका होती. शोधून पण असं स्थळ मिळालं नसतं. काय करावं? इतकं चांगलं चालून आलेल्या स्थळाला नकार देणं म्हणजे मूर्खपणाचंच ठरेल. बऱ्याच विचारा अंती, शालिनीच्या वडिलांनी होकार कळवला.

'देण्या-घेण्या ची बोलणी करायला कधी भेटायचं? साखरपुडा आधी करायचा का? कधी करूया?' असे विविध प्रश्न घेऊन माधवराव (शालिनीचे वडील) शंकररावांना (नवर्या मुलाचे वडील) भेटायला गेले. शंकररावांनी त्यांचं आगत-स्वागत केलं. 'अहो, कसलं देणं-घेणं आणि कसला साखरपुडा? सगळे विधी लग्नातच उरकूया. मुलगा शिकलेला आहे, कमावता आहे, देवाच्या कृपेनी आमच्या कडे गरजेपेक्षा जास्तच आहे. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. लग्नात फक्त मुलगी आणि नारळ द्या. लग्न साधेपणानी करू. तुमची २०-२५ माणस आमच्या कडची पण तेव्हढीच असतील. तुमच्या लोकांचे मन-पान तुम्ही सांभाळा आमचे नातेवाईक आम्ही सांभाळू!' असं म्हणत १० मिनिटात लग्नाची बोलणी उरकली. माधवरावांचा तर स्वतःच्या कानावर आणि नशिबावर विश्वासच बसत नव्हता. दोन महिन्या नंतरची तारीख ठरली. पंचक्रोशीतल स्थळ, समजूतदार आणि साधी माणस, त्यांना पैशाचा लोभ नाही. गावात शेजारी-पाजारी चौकशी केली तर सगळीकडून त्यांच्याबद्दल चांगलंच कानावर आल. शालिनी किती नशीबवान आहे असं सर्वाना वाटलं. आईंनी तर 'शालिनी, तू नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी पुण्य्याच काम केलं अशील म्हणून इतकं चांगलं स्थळ मिळालं.' असं म्हणत मागच्या जन्माला पण क्रेडीट देऊन टाकलं!

ठरल्याप्रमाणे लग्न साधेपणानी पार पडलं. (ह्या सगळ्या प्रकारात ना शालिनीच मत विचारलं किंवा नवर्या मुलाचं! मुलगातर डॉक्टर होता, कमवता होता पण लग्नाच्या निर्णयात मुलांना विचारायची गरज नाही. आमच्यात तशी पद्धत नाही, असं विधान केलं कि संपलं!) शालिनीची  वाजत-गाजत सासरी पाठवणी झाली. आठवड्याभरात पहिल्या मुळाला शालिनी माहेरी आली. ती थोडी गप्प-गप्पच होती. आईंनी (शांताबाईनी ) काळजीने विचारले,'काय ग सगळं ठीक ना? घरातले सगले कशे आहेत? सासू-सासरे सगळ्यांचा स्वभाव कसा आहे? आणि महत्वाचं, डॉक्टर काय म्हणतायत?'

शालिनीने तुटक उत्तर दिलं,'कोणी काही म्हणत नाहीये. सगळे मजेत. ह्यांचा स्वभाव माहित नाही. त्या घरी गेल्यापासून मला ते भेटले नाहीत कि बोलले नाहीत. खरं सांगायचं तर मला ते दिसलेच नाहीत.'

शांताबाई शालीनिकडे बघतच राहिली . त्यांना क्षणभर काय बोलावं काही सुचेना. त्यांच्या मनात एक भीती घर करू लागली. 'जावई असं का वागत असतील. नवीन लग्न झालं आहे आणि तो माझ्या मुलीच्या जवळ पण आला नाही. किंबहुना तिला टाळतोय कि काय असं वाटतंय. काही काळजीच कारण तर नसेल ना?' तिने मनात आलेले निगेटिव विचार बाजूला सारत शालिनीला विचारलं,'अग, लग्न घर आहे. घरात माणस, पाहुणे असतील. असं जवळ येणं, बर दिसत नाही असं विचार केला असेल, जावयांनी.'

शालिनी तुटकपणे 'असेल' असं म्हणाली आणि निघून गेली. पुढे दोन दिवसांच्या मुक्कामात तिने सासर, सासरची माणस, जावई, त्यांचं वागणं हे सर्व विषय टाळले. दोन दिवसांनी सासरहून घ्यायला कोणीच आल नाही. हे तिला आणि तिच्या आईला खटकलं, पण वडिलांनी 'जावईबापू गडबडीत असतील. रजा मिळाली नसेल' अशी कारण सांगून वेळ मरून नेली. शांताबाईनी पाठवणीची तयारी केली आणि माधवराव मुलीला सासरी सोडून आले.

८-१० दिवसांत दुसऱ्या मुळच्या निमित्ताने शालिनी माहेरी आली. ह्या वेळेस ती आधीपेक्षा पण गप्प होती. ती धड कोणाशी बोलत नव्हती कि जेवत नव्हती. तिची तब्येत पण खराब झाली होती. चेहेरा निस्तेज झाला होता, वजन उतरलं होतं. तिला कशात काहीच इंटरेस्ट नव्हता. दोन दिवसांनी सासरी जायची वेळ झाली. ह्या खेपेला पण कोणी घ्यायला आला नाही. वडील कर्तव्य म्हणून 'मी सोडायला जातो 'म्हणाले. ह्या वेळेस शांताबाई हिम्मत करून म्हणाल्या," काहीतरी चुकतंय. पंधरा दिवसांत मुलीचं आयुष्य पार बदलून गेलं. मला तर शालीनिकडे बघवत नाहीये. काय अवस्था झाली आहे तिची? कुठेतरी काहीतरी चुकतंय. बिनसलय. काय ते कळत नाहीये. ते जो पर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली पोर त्या घरात कशी पाठवायची?"

त्या दिवशी रात्रीची जेवणं झाल्यावर माधवराव आणि शांताबाई त्यांच्या मुलीला घेऊन बसले. माधवरावांनी विचारलं," शालिनी, सासरी काही त्रास आहे का? कोणी काही तुला बोललं का? तू सासरी खुश नाहीयेस हे जाणवतंय. पण नेमकं काय झालाय हे तू बोलल्या शिवाय आम्हाला कस कळेल? तू बोल. सांग काहीतरी."

शालिनी आपली गप्प बसलेली. आई-वडिलांनी तिला बोलतं करायचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशीची शालीनीची पाठवणी दोन दिवस पुढे ढकलली. २४ तास उलटले. शालिनी काहीच बोलेना. शेवटी शांताबाईनी त्यांचं हुकमी पान वापरायचं ठरवलं. 'इमोशनल ब्लाकमैल'. त्यांनी सकाळी उठल्यापासून सगळ्यांशी बोलणं बंद केलं. नाश्ता, जेवण बंद. त्याचा उपयोग झाला. शालीनिनी त्यांचापाशी लग्न झाल्यापासून काय-काय घडलं ते सांगितलं. 'लग्न करून शालिनी सासरी गेली. पहिले ३ दिवस घरात खूप पाहुणे होते. घरातील बायका एकीकडे आणि पुरुष दुसऱ्या खोलीत झोपत होते. चौथ्या दिवसापासून सचिनने (तिच्या नवऱ्याने) रात्रीची ड्युटी मागून घेतली. दिवसा मित्र, झोप आणि रात्री हॉस्पिटल. मला ह्या वागण्याचा त्रास होत होता. पण घरात बाकी कोणालाच हे चुकीचं आहे असं वाटत नव्हतं. मी सांगणार तरी कुणाला होते. तुम्ही इतक्या उत्साहानी माझं लग्न लावलंत. तुम्ही माझ्या सुखी संसाराची स्वप्नं पाहिली आहेत. ह्याचं हे असं वागणं कळल असत तर तुम्हाला काय वाटलं असत?

मागच्या आठवड्यात मी गेले तेंव्हा सासूबाईंना मी हे सगळं सांगितलं. त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मी ह्यांच्या वडिलांशी पण बोलले. तेंव्हा ते म्हणाले, 'जे झालं त्यातून सावरायला त्याला थोडा वेळ लागेलच. सचिन मनाचा खूप हळवा आहे. सर्व काही ठीक होईल. थोडा धीर धर आणि त्याला समजून घे.' मला ह्याचा अर्थ कळला नाही. मी इकडे येण्या आधी ह्यांना विचारलं,'नेमका काय प्रोब्लम आहे? तुम्हाला मी आवडत नाही का? तुमच्या इत्छेविरुद्ध लग्न झालं आहे का? काय असेल ते मला खरं-खरं सांगा. माझ्यापासून काही लपवू नका.' माझ्या ह्या बोलण्यानी ते आश्वस्त झाले. त्यांनी माझा हात हातात धरला आणि त्यांच्या मनातल्या भावना भरा-भर बोलू लागले.' शालिनी, मला माफ कर. माझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्याची बरबादी झाली आहे. आमच्या हॉस्पिटल मध्ये सुवर्णा (नर्स) काम करते. आमची चार वर्षांपासूनची ओळख आहे. आमचं प्रेम आहे, एक-मेकांवर. आम्ही मंदिरात माळा घालून लग्न केलं. चार महिन्यां पूर्वी माझ्या आई-वडिलांना ते कुठून तरी समजलं. त्यावरून घरात खूप भांडणं झाली. घरात सुवर्णाचा कोणीच स्वीकार करायला तयार नव्हतं. वडील म्हणाले प्रकरण हाताबाहेर जाण्या आधी सचिन साठी चांगली मुलगी बघून लग्न उरकून टाकू. मुलगी कमी शिकलेली असली तरी चालेल, घरची परिस्थिती बेताची असली तरी चालेल. एकदा का लग्न झालं कि मग सगळं ठीक होईल. घरात माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं. कोणी माझ्याशी चार वाक्य बोलत नव्हते. तुझी माहिती घेऊन वडील जेव्हा घरी आले तेंव्हा मी लग्नाला विरोध केला होता. मी घरातल्यांना कल्पना दिली होती कि ह्या सर्व भानगडीत तुझं आयुष्य बरबाद होईल. माझं  कोणी काहीच ऐकलं नाही. उलट मला घरात कोंडून ठेवलं. मी काहीतरी करेन किंवा तुझ्या वडिलांना भेटून खर्या परिस्थितीचा अंदाज देईन ह्या भीतीने वडिलांनी आपलं लग्न साधेपणानी आणि घाईत उरकलं.

तू एक चांगली मुलगी आहेस. माझ्या आई-वडिलांच्या मूर्खपणाचा बळी झाली आहेस. मला तुझं आयुष्य आणखीन खराब करायचं नव्हतं. म्हणून मी तुझ्या पासून लांब रहात होतो.'

हे बोलायचे थांबले. मला समजत नव्हतं कि आपण हसावं कि रडावं? त्यांच्यावर चिडावं कि त्यांचे आभार मानावेत. आई मला सांग ना, नशिबानी माझ्याशी हा क्रूर खेळ खेळला आहे, ह्याचा दोष कुणाला देऊ? मी सासरी जाऊन पण काही साध्य होणार नाही आणि न गेल्यानी कोणाला फरक पडणार नाही. आई-बाबा आता तुम्हीच सांगा मी काय करू'? शालिनीच्या डोळ्यात पाणी होतं पण चेहेऱ्यावर काही भाव नव्हता!

दुसऱ्या दिवशी माधवराव, शंकररावांना भेटायला गेले. शंकरराव बोलले चांगलं, पण त्यांनी कोणत्याही प्रकारे काही मदत करण्यात असमर्थता दर्शविली. त्यांनी मन मोठं करून सांगितलं कि,'हे शालीनिचच घर आहे. ती आमच्या घरची सून आहे. तिला तुम्ही केव्हाही पाठवून द्या. तिचं इथे स्वागतच आहे.'

शंकररावान साठी विषय संपला होता. पण हि माधव्ररावांसाठी चिंतेची बाब होती. घरी आल्यावर सगळ्यांनी बसून शालिनीला त्या घरी परत पाठवायची नाही हे एकमतानी ठरवलं.

माधवरावांना महिला हक्क संरक्षण समितीच्या कामाची माहिती होती. त्यांनी ८-१० दिवसांनी समितीच्या ऑफिस मध्ये रीतसर तक्रार नोंदवली. आम्ही आमच्या नियमानुसार डॉक्टर सचिन ह्यांना कार्यालयात बोलावलं. त्यांनी भेटायला येण्याचं कबूल केल्याप्रमाणे ते ८ दिवसांत येऊन भेटून गेले. त्यांनी त्यांची बाजू मांडली. त्यांनी शालीनीवर अन्याय झाल्याचंपण कबूल केलं. 'ह्या सगळ्याबद्दल शालिनीला नुकसान भरपाई द्या आणि विषय संपवा (कारण माधवरावांना तेच हवं होतं) असं सुचवलं. त्या दिवशी डॉक्टरांनी 'विचार करून कळवतो' असं सांगितलं आणि नंतर आमच्याशी सर्व संपर्क थांबवला. ना भेटायला आले, ना आमच्या पत्राला लेखी उत्तर दिलं, नाही कोणाकडून निरोप पाठवला. शेवटी कोर्टात जाऊन न्याय मागायचं ठरलं.

शालीनिनी खावटीसाठी कोर्टात अर्ज केला. कोर्टाच्या कामाला वेळ लागतोच. त्याच प्रमाणे शालीनीची केस पण हळू-हळू पुढे सरकत होती. पहिली नोटीस, मग त्याच्या कडून नोटीसला उत्तर. मग त्याच्या उत्तरातील काही मजकूर आपल्याला मान्य नाही म्हणून परत नोटीस. हाच खेळ वर्षभर चालला. वर्षं सव्वा वर्षांनी केस बोर्डावर आली.(म्हणजे कोर्टातली पहिली तारीख मिळाली). त्यानंतर कधी त्याचा वकील गैरहजर तर कधी हिचा वकील गैरहजर. कधी डॉक्टरचा रजेचा अर्ज! सर्व हजर असले तर साहेब रजेवर.असं करत-करत साधारण अडीच वर्षांनी (केस दाखल केल्या दिवसापासून) साक्षी पुरावे, जाब-जबाब ह्याला सुरुवात झाली. अखेरीस शालिनीच्या साक्षी साठी एक तारीख ठरली. तारखेच्या आधी दोन दिवस वकिलांनी शालिनीला बोलवून घेतलं आणि एक कागद वाचायला दिला. त्यात लिहिलेला मजकूर वाचून शालिनीला काहीच अर्थबोध होईना. त्यावर वकिलांनी शांतपणे सांगितलं,'उद्या कोर्टात साक्षीच्या वेळेस तुला हे बोलायचं आहे.'

'अहो, वकीलसाहेब! असं काहीच घडलं नाही. माझा नवरा बाहेरख्याली नव्हता. लग्ना आधी त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. त्याला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. आई-वडिलांच्या दबावाखाली त्याने लग्न केलं. त्यांनी मला कधी उपाशी ठेवलं नाही आणि मारहाण पण केली नाही'.

'अहो शालिनीताई, कोर्टात न्याय हवा असेल तर थोडा खोटं बोलावं लागतं. माधवराव, समजवा तुमच्या मुलीला.'

अपेक्षे प्रमाणे आई-वडिलांनी शालिनीला खूप समजावलं. 'त्यांनी तुझ्या आयुष्याचं वाट्टोळ केलं आहे. त्यांना अद्दल घडवायची आणि न्याय मिळवायची हि शेवटची संधी आहे. ती वाया घालवू नकोस.'

दुसऱ्या दिवशी कोर्तच कामकाज सुरु झालं. आज सर्व जण हजर होते. म्हणजे केस चालणार. आश्चर्य म्हणजे पहिला पुकारा शालिनीच्या केसचा झाला. शालिनी साक्ष द्यायला सांगितलेल्या जागी उभी राहिली. तिच्या वकिलांनी बोलायला सुरुवात केली. कालच्या कागदावर लिहिलेल्या बाबी तो कोर्टात मांडत होता. अधून मधून डॉक्टरचा वकील त्यातील काही मुद्दे अमान्य असल्याचे त्याच्या हावभावातून निदर्शनास आणत होता. शालिनीचा वकील तिला काही प्रश्न विचारत होता. तिचं त्याकडे लक्षच नव्हतं. शालीनिनी कोर्टात बसलेल्या लोकांकडे पाहिलं. समोर खाली मान घालून बसलेला डॉक्टर तिला दिसला. त्या क्षणी तिच्या लक्षात आल कि तिचं ह्या माणसाशी काहीच भांडण नाहीये. तिला त्याचा कडून एकच आश्वासन हवं होतं,' जो पर्यंत शालिनी स्वतःच्या पायावर उभी रहात नाही, काही कमवत नाही, तोपर्यंत त्याने तिला खावटी द्यावी.'

जज साहेबांनी 'तुम्हाला हे मान्य आहे का?' असा प्रश्न विचारला, ज्यांनी ती भानावर आली.

तिने हात जोडून तिचं म्हणणं मांडण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर तिनी मांडलेले मुद्दे ऐकून सगळेच अवाक झाले. ती म्हणाली," साहेब, हे वकील साहेब म्हणतात तसं काहीपण झालं नाहीये. ह्या माणसाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. आई-वडिलांच्या दबावाला बळी पडून तो लग्नाला तयार झाला. ह्या नात्याचा त्यांनी कधीपण गैरफायदा घेतला नाही. तो बाहेरख्याली नाही. त्याचं एका मुलीवर प्रेम आहे. मला अशा परिस्थितीत त्याच्या सोबत राहण्याची इच्छा नाही. माझी, कोर्टाला एकच विनंती आहे. मी माझ्या वडिलांवर अवलंबून राहू इच्छित नाही. मी स्वताचा खर्च स्वतः भागवू शकत नाही तोपर्यंत त्यांनी मला खावटी द्यावी. मी चार पैसे कमवायला लागले कि खावटी बंद करायचा स्वतः अर्ज करीन."

शालिनीच्या केसचा साहेबांनी दोन दिवसांत निकाल दिला. तिला खावटी मंजूर झाली. महत्वाचं म्हणजे पुढे दीड वर्षात शालिनीला नोकरी मिळाली. तिने खावटी बंद करायचा अर्ज कोर्टात दिला.

9 comments:

  1. अतिशय छान लेख लिहिला आहे, समाज विचारधारा बदलत असतो, त्याचा फार कमी लोकांना अंदाज असतो.एका चुकीच्या किंवा "लोक काय म्हणतील" ह्या विचारातून मुक्त व्हायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. खूप छान लेख. शालिनीची कथा अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे

    ReplyDelete
  3. खुप छान लेख..शालिनी व तिचा नवरा दोघांचा प्रमाणिकपणा भावला.श्रुति

    ReplyDelete
  4. दुर्दैवी शालिनीची कथा योग्य शब्दात वास्तवाशी धरून मांडली तर आहेच पण हेमाताई सारख्यांचे मार्गदर्शन झाल्यामुळे solution सुद्धा योग्य निघाले हे विशेष

    ReplyDelete
  5. शालिनीला न्याय मिळाला हे फारच छान झालं परंतु हे पचवणं तिला अवघड गेलं असेल तुम्ही अशा सर्वाना न्याय मिळवून देता हे खरंच खूप मोठं कार्य आहे तुमच्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  6. शालिनीला न्याय मिळाला हे फारच छान झालं परंतु हे पचवणं तिला अवघड गेलं असेल तुम्ही अशा सर्वाना न्याय मिळवून देता हे खरंच खूप मोठं कार्य आहे तुमच्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  7. शालिनीला न्याय मिळाला हे फारच छान झालं परंतु हे पचवणं तिला अवघड गेलं असेल तुम्ही अशा सर्वाना न्याय मिळवून देता हे खरंच खूप मोठं कार्य आहे तुमच्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  8. शालिनीला न्याय मिळाला हे फारच छान झालं परंतु हे पचवणं तिला अवघड गेलं असेल तुम्ही अशा सर्वाना न्याय मिळवून देता हे खरंच खूप मोठं कार्य आहे तुमच्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  9. शालिनीला न्याय मिळाला हे फारच छान झालं परंतु हे पचवणं तिला अवघड गेलं असेल तुम्ही अशा सर्वाना न्याय मिळवून देता हे खरंच खूप मोठं कार्य आहे तुमच्या कार्याला सलाम

    ReplyDelete