Wednesday 4 November 2020

आर्थिक स्वावलंबनाने महिला सक्षमीकरण होतं का?

 मला बरेच दिवस अशी खात्री होती कि आर्थिक स्वावलंबन हा एक महिला सक्षमीकरण साधण्याचा हुकमी मार्ग आहे. बाई कमवायला लागली कि तिला कुटुंबात समाजात प्रतिष्ठा व स्थान प्राप्त होतं. तिच्या विचारांना व मतांना महत्व प्राप्त होतं. तिच्या भावनांची घरातले कदर करतील. पण हा माझा भ्रम होता.

आमच्या उद्योगकेंद्रात तीन कंपन्यांमधून काम यायचं. व्ही.आंय.पी, जी.पी.इलेक्ट्रॉनिक, आणि फीनोतेक्स! सगळ्या मिळून ७० बायका काम करायच्या. सर्वजणी वेळेवर यायच्या. सकाळी ९ वाजता काम सुरु करायचो. दुपारी १ वाजता जेवणाची सुट्टी आणि संद्याकाळी ६ वाजता दिवस संपायचा. अर्जंट मटेरियल द्यायचं असलं तरच उशिरापर्यंत महिला थांबायच्या. बहुतेक महिला सिडको परिसरातील असल्याने ज्यांना हवं त्या जेवणाच्या सुट्टीत घरी जायच्या. व्ही.आय.पी. विभागात काम करणारी सीमा पण रोज जेवणाच्या सुट्टीत घरी जायची व घरून वेळेवर यायची.

संस्थेत काम करणाऱ्या महिलांसाठी काही गोष्टी आम्ही करायचो. त्यांना ई.एस.आय.सी. ह्या शासकीय योजनेचा लाभ मिळावून देण्यासाठी त्यांच्या नावाची त्या कार्यालयात नोंद केली. ह्या योजनेमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या. वर्षभर लागणारं धान्य भरण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करत होतो. त्यांचे बचत गट सुरु केले होते. ह्या गटांच्या माद्यमातून त्या त्यांच्या कौटुंबिक गरजेप्रमाणे कर्ज काढत व ते सुलभ हपत्यात फेडत होत्या. ह्यातून त्यांना आर्थिक व्यवहार व बँकेच्या व्यवहाराची चांगली माहिती झाली होती. एकूण संस्थेत येऊ लागल्या पासून त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.

रोजच्या सारखी त्या दिवशी दुपारी ३.३०  वाजता टी ब्रेंक झाला. अचानक व्ही. आय.पी विभागातून आरडा ओरडा ऐकू आला. जाऊन पाहिल तर समजलं सीमा चक्कर येऊन पडली आहे. थोड्या वेळानी ती शुद्धीत आल्यावर तिला दोघींसोबत घरी पाठवलं. तिची पाठवणी केल्यावर सीमा आणि तिच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. त्या विभागातील मंदाताईनी दिलेली माहिती चक्राऊन टाकणारी आणि राग आणणारी होती. सीमाच्या घरात एकूण ७ माणस! ती, तिचा नवरा, त्यांची ४ मुलं तिची सासू व नणंद. खाणारी सात तोंड आणि कमावणारी हि एकटी. घर म्हणजे १०*१५ ची खोली! घरातली सगळी काम ती एकटीच करायची. पहाटे ४-४.३० ला उठून, रात्रीची भांडी घासायची. सगळ्यांसाठी चहा नास्ता करायचा. सगळ्यांसाठी दुपारचंजेवण बनवायचं, केरवारे करून, धुणं धुऊन धावत उद्योगकेंद्र गाठायची. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी जायची. काही जेवण उरलं असेल तर खायची. नाहीतर भांडी घासून पाणी पिऊन कामावर यायची. इतकी स्वार्थी आणि नालायक माणस असू शकतात? माझा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या व्यक्ती मुळे घर चालत, त्यांना दोन वेळा पोटभर जेवण मिळत, त्या बाई साठी चार घास वगळावेत, तिला घरातल्या कामात मदत करावी असं घरातील एकालाही वाटू नये? माझ्या जीवाचा संताप होत होता. तिचं नशीब म्हणून सोडून देणं मला मान्य नव्हतं! माझ्यातील सत्सत्विवेकबुद्धी मला शांत बसू देत नव्हती. ऑफिसचं काम संपवून मी मंदाताई बरोबर तिच्या घरी गेले. घरातील दृश्य तर आणखीन संताप आणणारं होतं. नवरोजी शेषशाही भगवान झाले होते, सासू व नणंद गप्पा मारत होत्या, मुलं खेळत होती आणि सीमा, नुकताच संपलेल्या चहाचे कप धुवून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. मला दारात पाहिल्यावर तिने माझं स्वागत केलं आणि नवऱ्याला नीट उठून बसण्यासाठी खुणावलं. तो नाईलाजान उठून बसला. सीमाच्या तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मोर्चा सरळ तिच्या नवऱ्याच्या दिशेने वळवला.

"आपण शंकरराव ना? नमस्कार. मी हेमा पटवर्धन."

"काय ताई? मी ओळखतो तुम्हाला. खरं सांगायचं तर निम्मं सिडको तुम्हाला ओळखतं. तुम्ही सीमा सारख्या महिलांना काम देता, त्यांनी खूप लोकांची मदत होते. ताई तुम्ही उभ्या का? बसाना."

असं म्हणत त्यांनी पलंगावर जागा करून दिली.

"शंकरराव, तुम्ही सध्या काय काम करता? म्हणजे नोकरी कुठे करता?"

"मी सध्या घरीच आहे."

"कधीपासून?"

"वर्ष होऊन गेलं. ताई काही कामच मिळत नाही. म्हणून घरीच बसलोय."

"आणि तुमची आई आणि बहीण? त्यापण काही करत नाहीत का? घरीच असतात का?".

"हो"

"म्हणजे तुमच्या घरात कमावणारी एकच व्यक्ती आहे. सीमा! आणि तिची तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला सर्वाना ऐयत खायला मिळतंय पण तिला काही होतंय का, तिची तब्येत ठीक आहे ना, ह्याची काळजी  करण्याची तुम्हाला गरज वाटत नाहि. आज ती कामावर असतांना चक्कर येऊन पडली. त्याला जबाबदार कोण? तर तुम्ही सगळे! तिच्या जवळची माणस! तुम्हाला तिच्या जीवाची काळजी नाही. ती जिवंत आहे का मेली ह्याची तरी खबर घ्याल कि नाही? अरे!  तिच्या मुळे तुम्हाला ऐतं बसून खायला प्यायला मिळतंय न? जी बाई आपल्यासाठी एव्हडी राबते तिच्यासाठी दोन घास वगळण्या इतकीपण माणुसकी तुमच्यात शिल्लक नाही का? मला मान्य आहे कि हा तुमचा घरचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल 'तुमचा काय संबंध? तुम्ही ह्याचात मध्ये पडू नका.' पण मला हे मान्य नाही. मी मध्ये बोलायला नको. पण काय करू? तुम्हा सर्वांची लाज वाटते आणि चीड येते. काम करायची इच्छा असणार्याला काम मिळतच. ८ दिवसानंतर पुन्हा येते भेटायला. सीमा विश्रांती घे. बर वाटलं कि ये."

दुसर्या दिवशी, 'आता मी बरी आहे म्हणत सीमा कामावर रुजू झाली. तिच्या घरच्या लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडण्याची मला अजिबात आशा नव्हती. ऑफिसच्या जवळ रहाणार्या जाधवबाईना सांगून तिच्या दुपारच्या जेवणाची, एक महिन्यासाठीची सोय केली. ह्या सगळ्यामुळे सीमाच्या तब्येतीत फरक दिसू लागला.

हे सगळं झाल्यामुळे उद्योग्केंद्रातील बायका टेन्शनमध्ये! त्या मला सांगत होत्या,"ताई जरा सांभाळा. सीमाचा नवरा खूप डेंजर माणूस आहे. तुम्ही बसनी येता. त्यांनी वाटेत तुम्हाला काही केलं तर? नाहीतर तुम्ही ८-१० दिवस नका येऊ. आम्ही घेऊ सांभाळून.'

त्यांना माझ्या बद्दल वाटणाऱ्या भावना मी समजू शकत होते पण शंकररावला घाबरण्याच काही कारण नाही हे माझ म्हणणं त्यांना पटत नव्हतं आणि त्यांचं मला. शेवटी असं ठरलं कि सायंकाळी दोघीजणी माझ्या सोबत बस स्टेन्ड पर्यंत येतील. असं जवळ जवळ चार आठवडे चाललं. एक दिवस अचानक एका गल्लीतून शंकरराव,"ताई, ताई" अश्या हाका मारत सायकल चालवत आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. ते जवळ आले, सायकल बाजूला लावली आणि रस्त्यात माझ्या पाया पडले. मी व माझ्या सोबतच्या दोघी आश्चर्यचकित झालो. काय बोलावं आणि काय करावं क्षणभर काही सुचेना. भानावर येऊन म्हणाले,"शंकरराव, उठा! हे आता काय नवीन नाटक? असा तमाशा करू नका. आपण रस्त्यात आहोत ह्याचं भान ठेवा."

स्वतःला सावरत, शंकरराव उठून उभे राहिला. त्यांनी पिशवीतून एक पेढ्याचा बॉक्स काढला. तो माझ्या हातावर ठेवत म्हणाले," ताई, त्या दिवशी तुम्ही येऊन गेलात. आम्हाला खूप बोललात. मी त्यावर विचार केला. मला तुमचं म्हणणं पटलं. मी काम शोधायला लागलो आणि आईला अनो ताईला घरातल्या कामात मदत करायला पण सांगितलं. ताई, मला नोकरी मिळाली. वाचमनची नोकरी आहे. आज पहिला पगार झाला. अजून घरी पण गेलो नाही. आधी तुम्हाला पेढे देण्यासाठी थांबलो होतो."

आपल्या कुठल्या वागण्याचा आणि बोलण्याचा कोणाला कसा उपयोग होईल काही सांगता येत नाही. त्या दिवशी आपण सीमा च्या घरातील लोकांना बोललो ते बरंच झालं, माझा मन तरी शांत झालं. पण त्या दिवशी आपण थोडं जास्तच  बोललो असं एक क्षण वाटलं खरं. पण उपाशी राहणं काय असत हे मी २-३ वेळा अनुभवलंय.

आमच्या सहामाही परीक्षा चालू होत्या. ११-१ भूमितीचा पेपर होता. परीक्षेचा अभ्यास म्हणून धड नाश्ता केला नव्हता आणि २ पर्यंत जेवायला घरी पोहोचू म्हणून टिफिन घेतला नव्हता. १२.३० च्या सुमारास announcement झाली. 'शहरात दंगल झाली आहे. जे विद्यार्थी बसनी प्रवास करणार असतील किंवा लांब रहात असतील त्यांना घरी पोहोचवायची व्यवस्था शाळा करेल.' मला शाळेत बाईनी थांबवून ठेवलं. शाळेपासून घर ५.५० किमी दूर होतं. त्या दिवशी सगळीकडेच नुसता गोंधळ होता. आम्हाला घरी सोडायला संद्याकाळी ६ वाजता पोलीस व्हान आली. सर्वाना सोडून झाल्यावर माझा नंबर आला. मी रात्री ८.३० वाजता घरी पोहोचले. भुकेनी जीव कासावीस झालं होता.

बाकीच्या दोन्ही घटना कोलेज मधल्या. एफ.वाय. ला असतांना नाव-निर्माण आंदोलन झालं होतं. त्यात अडकलो होतो. आणि दुसरी घटना त्याच वर्षी जयप्रकाश नारायण याचं भाषण ऐकायला गेले होते, तेंव्हा. स्वप्नात विचार केला नसेल एव्हडी गर्दी जमली होती, त्यांचं भाषण ऐकायला. भाषण संपल्यावर घरी जायला वाहन मिले ना. शेवटी निघालो चालत. उपाशी-तापाशी, दमलेलो, ५ किमी चालून घरी पोहोचलो. त्या प्रसंगांपासून मनात उपाशी राहण्याची भीती आहे आणि उपाशी ठेवण्याची चीड आहे.

2 comments:

  1. अतिशय उद्बोधक लेख. मानवी वर्तनातील वैगुण्य दूर करण्यासाठी कधी कधी कठोर शब्दप्रयोग अपरिहार्य असतो. ताई, तुम्ही केले ते योग्यच होते. अंतिमतः त्याचा अपेक्षित परिणाम मिळाला.

    ReplyDelete
  2. You have been a messenger of God for several ladies Hema Tai🌸

    ReplyDelete