Wednesday 11 November 2020

पट्ट्याची भाषा आणि ताकत

एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये एक बाई आली. साधारण ३२-३५ वय असेल. शिडशिडीत बांधा. ९ वारी साडी नेसलेली, तिच्या डोक्यावर एक रिकामी टोपली होती. तिच्या सांगण्यावरून समजलं कि ती  दारोदार जाऊन फळ विकायची, मुख्यता केळी. ऑफिसमध्ये आल्यावर डोक्यावरची रिकामी टोपली खाली ठेवली आणि खाली बसत म्हणाली," ताई, मला मदत करा. मी विधवा आहे. मला एक १४ वर्षांची मुलगी आहे. आम्ही दोघी एका झोपडीवजा घरात रहातो. घरखर्च भागवण्यासाठी मला काम करावंच लागतं. मी फळ विकायला बाहेर जाते, तेंव्हा ती घरात एकटीच असते. आमच्या घराच्या जवळ राहणारा एक माणूस घरी येऊन तिला त्रास देतो. दारावर थाप मारतो, जोरजोरात हाका मारतो. ती खूप घाबरून जाते. ताई, तुम्ही प्लीज काहीतरी करा. मला आणि माझ्या मुलीला वाचवा!"

आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि,'तिला आम्ही मदत नाही करू शकणार. तिने पोलिसांची मदत घ्यायला हवी. हे काम पोलिसांच आहे'.

त्यावर 'पोलीस काहीच मदत करत नाहीत. मी साहेबांना भेटून आले' असं तिनं सांगितलं.

झालं! कुसुमताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ५ जणी तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. संध्याकाळचे ५-५.३० वाजले होते. साहेब चौकीत होते. आम्ही आमची ओळख करून दिली आणि त्या महिलेची अडचण थोडक्यात सांगितली.

पोलीस इन्स्पेक्टरला काय घडलं असेल हे लक्षात यायला एक क्षण पण लागला नाही. त्यांचं ते रोजचच काम होतं. आम्हीच नवखे होतो. आमचं योग्य पद्धतीने (बसायला खुर्ची आणि पाणी) स्वागत करून त्यांनी त्या बाईची हजेरी घ्यायला सुरुवात केली."बाई, हा कोण माणूस? तो तुला कस ओळखतो? तुमची आधीची काही ओळख, काही व्यवहार, काही संबंध आहे का? असं आपल्याकडे कोणी कोणाला त्रास देत नाही. काय असेल ते खरं खरं सांग."

केलीवाल्या बाईनी तिची त्या माणसाशी काहीच ओळख नाही असे निक्षून सांगितल्यावर साहेबांनी प्रश्न विचारायची पद्धत बदलली. त्यांनी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि हवालदाराला सांगितलं,'माझा पट्टा आण. खूप दिवसापासून त्याला पोलिश करायचं होतं. राहून गेलं.'

हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती बाई इन्स्पेक्टरच्या पाया पडून,' साहेब माझं चुकलं. मला आता आठवलं, माझी मंजू ५ वर्षांची होती तेंव्हा सोमनाथ मला भेटला होता. त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणि माझा धनी मेला होता. आमच्या कडे बघणारं, कमावणार कोणी नव्हतं आणि त्याला भाकर खाऊ घालणारं! आम्ही संगती रहायला लागलो. ७-८ वर्षं छान मजेत गेली. ६-८ महिन्यांपासून तो दारू पिऊ लागला आणि सगळी घडी विस्कटली. मी त्याला घरातून हाकलून दिला. तेंव्हा पासून तो आम्हाला त्रास देतोय.'  

"म्हणजे, तुला आणि तुझ्या मुलीला तो आधार देत होता, तुम्हाला दोन वेळेचं खाऊ घालत होता, तेंव्हा तो तुझ्या घरी आलेला तुला चालत होता. आणि आता तुझे बरे दिवस आले आहेत आणि दारूच्या आहारी जातोय म्हणून तू त्याच्या बद्दल खोटी तक्रार नोंदवायला आली आहेस? तो नक्की काय त्रास देतो? देतो का नाही देत हे तू ह्या संस्थेतल्या बायकांना खरं काय ते सांग."

" तो फुकटची भाकर खायला येतो ते मला चालणार नाही. मी एकटी तरी कोणा कोणाला आणि कशी पुरी पडणार? त्यांनी चार कष्ट करावेत, चार पैसे कमवावेत. मग तो आला तरी चालेल."

"पण त्याचावर हि वेळ कशामुळे आली? तो काय काम करत होता? ते काम कशामुळे सुटलं?"

ह्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळण्यासाठी ती उठत, आम्हाला उद्देशून म्हणाली," ताई, तुमचे आणि साहेबांचे लई उपकार झाले. तुमच्या सारख्या मोठ्या लोकांनी वेळ काढून माझं म्हणणं ऐकून घेतलत. लई उपकार साहेब." असं म्हणत ती चौकीच्या बाहेर जाणार तोच इन्स्पेक्टर साहेबांनी फक्त 'उत्तर' एव्हडाच शब्द उच्चारला आणि ती मटकन खालीच बसली. त्यांच्या आवाजात झालेला बदल, आवाजातील जरबच अशी होती कि तीच काय आमची पण खुर्चीतून उठायची हिम्मत झाली नसती.

"साहेब, सोमनाथ गवंडी काम करायचा. चांगला रोज कमवत होता. आम्हाला वाटलं आमच्या दोघांच्या कमाईत, त्यात थोडं कर्ज काढून आपल्या मालकीचं एक झोपडी घेता येईल. त्याच्या मालकाकडून आणि दोन मित्रांकडून त्यांनी उसने पैसे आणले. आमचा किमतीचा अंदाज चुकला. त्यांनी व्याजानी पैसे आणले. त्याची परतफेड आम्ही करू शकलो नाही. कर्जाचे हप्ते वसूल करायला माणस घरी यायला लागली. त्याला धमक्या द्यायला लागली. तो घाबरून पळून गेला. काय करावं मला काही समजले नाही. रोज दारी घेणेकरी येत होते, शिव्या देत होते, अचकट विचकट बोलत होते. त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला सुचला. मी ती झोपडी विकली, सगळ्यांची देणी फेडली आणि ती वस्ती सोडून मुलीला घेऊन दुसरी कडे राहायला लागले. त्याचा काही पत्ताच नाही. तो जिवंत आहे कि नाही काही कळायला मार्ग नाही. तो एक वर्षभरानंतर आला. तो पण खूप दारू पिऊन. त्याला कशाचीच शुद्ध नव्हती. तो जबरदस्ती घरात शिरत होतं, मी आरडा ओरडा केला. शेजारी आले आणि त्यांनी त्याला मारून हाकलून दिलं. मी त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही कारण मला तो माझ्या घरात अश्या अवस्थेत नको होता."      

तिच्या डोळ्यात पाणी आल. ती विनंती करत म्हणाली," साहेब, ताई, सोमनाथ वाईट नाहीये. तुम्ही त्याला समजून सांगा. तो तुमचं ऐकेल."

सोमनाथला बोलावून, त्याला समजणाऱ्या भाषेत त्याला सांगायची, समजवायची जबाबदारी साहेबांनी घेतली. त्यांनी दोघांमध्ये समझोता करून दिला.

एक दिवस केळीवाली, सोमनाथला घेऊन ऑफिस मध्ये भेटायला येऊन गेले.

आम्ही सगळे अवाक! ही बाई आपल्याशी खोटं का बर बोलली असेल? तिने आपल्याला अर्धवट माहिती का सांगितली? असं करण्यामागे तिचा काय हेतू असेल? पण जशी वर्षं उलटत गेली, आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो कि तक्रार नोंदवायला आलेली व्यक्ती क़्वचितच पूर्ण खरं बोलते. ते पूर्ण खोटं पण नसतं. ते अर्धसत्य असत.

पट्टा घेरे जरा, ह्यातून त्या बाईला काय समजलं? त्याचा अर्थ काय? त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेले नसते तर माझ्या ज्ञानात भर पडली नसती. पोलिसांची लोकांकडून खरं वदवून घेण्याची कला भारी होती. मला पट्ट्याची भाषा आणि ताकत, नाहीतर कशी कळली असती?

6 comments:

  1. very interesting police lokanna kadachit anubhavachi bhasha jast yet aste 😃

    ReplyDelete
  2. वेगळाच अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद, आमच्यासारख्यांना असे अनुभव येण शक्यच नाही, अनेक प्रकारचे लोक वेगवेगळं आयुष्य जगत असतात, काहींचं समतोल तर काहींचं विदारक, पण जगतात... चुकचुकत का होईना धडपडत का होईना जगतात.
    त्यातून त्यांना चांगल्या लोकांची मदत मिळाली तर जरा सावरू शकतात.

    ReplyDelete
  3. वेगळा अनुभव,

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Difficult to identify and trust people.Thank u ma'am for sharing this unique experience.

    ReplyDelete