Wednesday 25 November 2020

बचत तो बस एक बहाना है!

महिला हक्क संरक्षण समितिनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले. सगळेच गरजेचे होते. त्यातील एक होता बचत गट! बचत गट सुरु करण्यापूर्वी आम्ही बचत खात ह्या नावानी काम करत होतो. त्या विभागाची जबाबदारी औटेबाई बघत होत्या.

बचत खात्यात गरीब, कष्टकरी कुटुंबातल्या महिला त्यांना जमेल तशी बचत करायच्या. २ रुपये रोज,२५/- रुपये आठवडा, १००/- रुपये महिना अशी जिला जशी जमेल तशी ती बचत करायची.तिला गरज पडेल तेंव्हा ह्या बचतीवर कर्ज घ्यायची, कर्जाचे हप्ते नियमित पणे परत पण करायची.ह्या सर्व पैश्यांचा हिशोब ठेवणं बरंच जिकिरीच तर होतंच, पण रोजचं कलेक्शन करणं अवघड होत होतं. दोन वर्षं सातत्यानी हे चालवल्याने महिलांना बचतीची सवय लागली खरी, पण आमच्या असं लक्षात आल कि ह्यांनी महिलांना बँकेचे व्यवहार समजत नाहीयेत आणि त्यांची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढत नाहीये. 'एकीच्या बळाची ताकत' त्यांच्या लक्षात येत नाहीये. ह्यातूनच १२-१५ महिलांचा बचत गट सुरु करण्याचा विचार पक्का झाला. (२००० च्या सुरुवातीला संस्थेचे एकूण ४५ गट कार्यरत होते.) बचत गटाची रचना निश्चित केली. एका गटात कमीत कमी १०-१२ महिला असाव्यात. व जास्तीतजास्त २० ची संख्या असावी. ह्या महिलांमधुनच तिघींची गट प्रमुख म्हणून निवड करतील. गटाच्या नावांनी बँकेत खात उघडून, त्याचे सर्व व्यवहार गटप्रमुख बघतील. बचतीची रक्कम जमा करणे, त्याचा हिशोब ठेवणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे, दर महिन्याला सभासदांची मीटिंग घेऊन त्यांना गटाचे हिशोब सांगणे, कर्जासाठी आलेल्या अर्जांवर सर्वानुमते निर्णय घेणे, व्याजाचा दर ठरविणे, कर्ज वसूल करणे आणि सर्वात महत्वाचे गटासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे. हि व अशी गटाशी संबंधित सर्व काम गटातील महिला व गट प्रमुखांवर सोपविली. त्यांना गरज भासेल तिथे संस्थेची मदत त्यांनी घ्यावी असे ठरले. बघता-बघता बचत गट व गटातील महिला सक्षम झाल्या. अडी-अडचणीत एक-मेकीना साथ देऊ लागल्या, गरज पडली तर सर्व जणी पिडीतेला आधार देऊ लागल्या. ह्या सक्षम महिलांचा एक अनुभव (किस्सा) शेअर करते.

नाशिकमध्ये गंजमाळ भागाच्या परिसरात जास्त करून कष्टकरी लोकांची वस्ती आहे (होती). छोटी-छोटी घरं! त्यातील काही नशीबवान लोकांच्या घराच्या पक्क्या भिंती होत्या. बहुतांशी घरांना लाकडी फळ्यांच्या भिंती होत्या. घरात हौसेनी, काटकसर करून जमवलेल्या काही वस्तू. मोल-मजुरी करणारा पुरुष वर्ग. कष्ट करून, छोटी मोठी काम करून चार पैसे कमवून संसाराला हात-भार लाऊ पाहणाऱ्या महिला. महिला मुलांना शिकविण्यासाठी धडपड करत होत्या. मोजक्या नशीबवान बायकांना त्यांच्या नवऱ्याची साथ मिळायची. पण बहुतेक घरांमध्ये आर्थिक ओढाताण, पुरुषांना असलेली व्यसनं( त्यात प्रामुख्यांनी दारू, जुगार, मटका आणि बायांची लफडी ) व त्यावर होणारा आणि न परवडणारा खर्च, ह्यामुळे नवरा-बायको मधे खूप भांडणं व्हायची. शाब्दिक बाचा-बाची, शिवीगाळ हे तर नित्याचच होतं पण अधून मधून मारहाण पण व्हायची. त्या वस्तीतल्या आमच्या गटात सुरेखा होती. तिचा नवरा फारसं कमवायचा नाही, रोज दारू प्यायचा आणि दारूसाठी पैसे कमी पडले कि सुरेखाला मारहाण करून तिच्याकडून पैसे हिसकून घ्यायचा. सुरेखा आणि सुरेशचा हा तमाशा रोजचाच होता. काही लोक बिचारी सुरेखा असं म्हणायचे आणि त्यांचं भांडण ऐकून न ऐकल्यासारखं वागायचे. तर काही लोक तिची बाजू घेऊन सुरेशला समजवायला जायचे, तर हा बहाद्दर तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि आलेल्या लोकांना आया-बहिणीवरून शिव्या द्यायचा. सुरेखानी २-३ वेळा नवर्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार पण दिली. पण घरेलू मामला आहे, नवरा-बायकोचं भांडण आहे, असं म्हणत पोलिसांनी त्याला समज दिली, सुरेखाला समजून सांगितलं आणि घरी पाठवून दिलं. मध्यंतरी एका साहेबांनी त्याला एक दिवस पोलीस चौकीत बसवून ठेवलं. त्या दिवसानंतर काही दिवस सगळं शांत होतं. पोलीस दखल घेतील, शेजारी तक्रार करतील, मुलं पण थोडी मोठी झाल्यामुळे ती पण थोडा प्रतिकार करतील, ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला कि मारहाण कमी झाली. म्हणजे मारण्याचं स्वरूप बदललं. ती कोणाला दाखवू शकणार नाही अश्या जागी इजा करायचा आणि 'पैसे दिले नाहीस तर घर पेटवून देईन' म्हणायचा नाहीतर ५ लिटरचा केरोसीनचा डब्बा घ्यायचा आणि आत्महत्येची धमकी द्यायाचा. (आपली बायको बचत गटातून कर्ज घेऊ शकते आणि ते फेडायला पैसे बाजूला टाकते, हे त्याला माहित होतं) 'आपलं लाकडी फळ्यांचं घर. नवर्यानी खरंच पेटवून घेतलं तर आपलं आणि इतरांचं खूप नुकसान होईल', असा विचार करून आणि माराला घाबरून सुरेखा त्याला पैसे देत होती. ह्याचा परिणाम तिच्या बचत गटातील व्यवहारावर झाला. कशीतरी बचतीची रक्कम ठरलेल्या तारखेला ती देउ शकायची. पण कर्जाचे हप्ते द्यायला टाळाटाळ करू लागली. गटाच्या मिटींगला पण गैरहजर राहू लागली. 'काही अडचण आहे का?  सर्व ठीक चाललं आहे ना?' असं विचारल्यावर उडवा-उडवीची उत्तर द्यायची. एक दिवस ती लंगडत मिटींगला आली. 'काय झालं?' विचारल्यावर ती रडायला लागली. तिने साडी व  परकर वर करून दाखवलं. तिच्या मांडीवर वळ होते, पट्ट्यांनी मारल्यासारखे! काही ठिकाणी सिगारेटचे चटके दिल्यासारख्या खुणा होत्या.

'काय झालं? कस झालं? कोणी केलं? हे असं कधीपासून चालू आहे? तू कधी कोणापाशी काहीच बोलली का नाहीस? आणि तू हे का सहन केलंस?' गटातील सर्व बायकांनी प्रश्नांचा भडीमार केला. तेंव्हा सुरेखानी तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सगळ्यांना सांगितलं. पैशांसाठी नवऱ्याकडून होणारा त्रास आणि आत्महत्येची त्यांनी वारंवार दिलेली धमकी. कसं गटातील हप्ते भरण्यासाठी वाचवलेले पैसे तो घेऊन जातो आणि म्हणून ती गटाचे हप्ते वेळेवर भरू शकत नाही. तिनी सगळ्यांना विनंती केली कि," माझा नवरा सुधरणार नाही. माझा आजपर्यंत जो हिशोब झाला असेल तो बघून काही शिल्लक रहात असेल तर मला द्या. मी हेच सांगायला आले होते. माझ्यामुळे तुमचं नुकसान नको."

गटप्रमुख काशीबाई म्हणाली," सुरेखा, तू बचत गट सोडणार नाहीस. तुझ्या प्रश्नावर आपण गट म्हणून उत्तर शोधू शकलो नाही तर आपल्याला गट चालवायचा अधिकार नाही. आपण सगळ्या मिळून तुझ्या नवऱ्याला अद्दल घडवू. तू त्याला पैसे देऊ नकोस. तो तमाशा करेल. त्यांनी तमाशा केला कि शालिनी, तुझ्या शेजारीच रहाते, आम्हाला निरोप देईल. पुढे काय करायचं ते तू आमच्यावर सोड."

काशीबाईच्या शब्दांनी सुरेखाला धीर आला. गटातील बायका आपल्याला ह्याच्यातून वाचवतील अशी खात्री तिला वाटू लागली. ती घरी गेल्यावर काशीबाईनी गटाची मीटिंग घेतली आणि काय करायचं, कस करायचं ह्याची रूपरेषा ठरवली.

संध्याकाळ झाली. अंधार पडला. अपेक्षे प्रमाणे सुरेश झिंगलेल्या अवस्थेत,सुरेखाला शिव्या देत घरी आला. आत आल्या आल्या त्यांनी दारूसाठी पैसे मागितले. ठरल्याप्रमाणे सुरेखानी नकार दिला. आता तो मारणार ह्या भीतीनी सुरेखा दाराच्या दिशेनी पळाली. त्यांनी तिला आत ढकललं, आणि मुश्कीलिनी तोल सावरत, तिला अर्वाच्य शिव्या देत तो केरोसिनचा डब्बा उचलायला गेला. 'आता मी स्वतःला पेटवून घेतो आणि आयुष्य संपवतो. तू तर माझ्या मरण्याची वाटच बघतीयेस ना? म्हणजे तू लफडी करायला मोकळी. पण मी तुला घेऊन मरणार. मला जगायचा कंटाळा आला आहे. साली, मनासारखी, शांतपणे दारू पेऊ देत नाहीस? आता बघतोच तुझ्याकडे' असं म्हणून तो तिला फटका मरणार, तेवढ्यात काशीबाई गटातील बायकांना घेऊन घरात शिरल्या. "अरे मुडद्या! तू कशाला टेन्शन घेतोस? ५ लिटर मध्ये तू पूर्ण जळणार नाहीस आणि तुझी आत्महत्येची इच्छा अपूर्ण राहील. आम्ही सर्वजणी ५-५ लिटर घेऊन आलोय. पण तुला इथे नाही, चौकात पेटवणार. तू तर मरून जाशील पण आमची आगीत उधवस्त झालेली घरं कोण बांधून देईल. तेंव्हा चला ग बायानो ह्याला चौकात घेऊन चला. आणि त्याला वाजत गाजत घेऊन जाऊ म्हणजे वस्तीतले बाकीचे सुरेश पण शहाणे होतील."

सर्व बायकांनी त्याला मारत-मारत चौकात आणलं. तिथे असलेल्या खांबाला त्याला बांधून ठेवलं. रात्री उशिरापर्यंत सुरेश तिथेच होता. त्याची नशा, हौस, गुर्मी सर्व जिरली. 'बायकोला आणि मुलांना त्रास देणार नाही, दारू पीऊन तमाशा करणार नाही, चार पैसे कमवीन आणि कुटुंबाची काळजी घेईन' अशी ग्वाही दिली तेंव्हा त्याला सोडलं. ह्यामुळे त्याच्यासकट वस्तीतले बरेच सुरेश बरेच दिवस शुद्धीत होते आणि नीट वागत होते.

बचतगटाची ताकद अशा अनेक केसेसमधून सातत्याने आमच्या समोर येते. त्यामुळेच आता बचतगट हे नाव बदलून सगळीकडे त्याला स्वयंसहाय्यता गट म्हंटल जातं. कारण इथे बायका एकमेकींसाठी उभ्या राहतात, बचत तो बस एक बहाना है!

3 comments:

  1. सुंदर, वाचून खूप छान वाटलं, नेहमी प्रमाणे छान शब्दात

    ReplyDelete