Tuesday 1 December 2020

उलथापालथ

२२-२३ वर्षांचा संतोष अभ्यासात फार काही हुशार नव्हता. पण कधी नापास पण नाही झाला. कळायला लागल्यापासून तो आजपर्यंत त्याला न आवडणारं काम करत होता. ते म्हणजे अभ्यास! पण आता त्याला ह्या सगळ्यातून मुक्ती मिळाली होती. तो graduate झाला होता. तो आयुष्यातील एक कठीण टप्पा पार करून मुक्त आयुष्याची स्वप्नं बघत होता. तो स्वप्नं बघण्याचा अधिकार त्याला देणारा कागद त्याच्या हातात होता. आज सर्व मित्रांनी एकमतानी ठरवलं कि आता नोकरी करायची, पैसे कमवायचे आणि काही वर्षं ऐश करायची. काही वर्षं स्वच्छंदी आयुष्य जगण्याची स्वप्नं रंगवत संतोष घरी आला. अपेक्षेप्रमाणे त्याचा निकाल ऐकून सगळ्यांना आनंद झाला. आईंनी त्याच्या आवडीचा दोन दिवस स्वैपाक केला. बघता-बघता महिना निघून गेला.

एक दिवस त्याला वडिलांनी विचारलं,"आता पुढे काय करायचं ठरवलाय?"

संतोषकडे ह्याचं उत्तर तयार होतं. तो दोन दिवसांपूर्वीच एका ऑफिसमध्ये मुलाखत देऊन आला होता आणि तिथे नोकरी मिळण्याची पक्की खात्री होती. त्यांनी तसं वडिलांना सांगितलं. अपेक्षेप्रमाणे संतोषला नोकरी मिळाली. पगार फार नव्हता, १५०००/- महिना! पण ठीक होतं . एकट्या जीवाला किती लागणार? वडिलांची सरकारी नोकरी आणि गावाकडे बागायती शेती! संतोषच्या पगारावर कोणाचं काहीच अवलंबून नव्हतं. सगळंसुरळीत चाललं होतं. दोन महिने मजेत गेले.

रात्रीची जेवणं झाल्यावर एक दिवस आईंनी अचानक विषय काढला. "संतोष, तुझं शिक्षण झालं, नोकरी लागली, आता तुझ्या लग्नाचा विचार करूया असं मला वाटतं. तुझ्या काही अपेक्षा असतील तर सांग. म्हणजे तुझ्या पसंतीची मुलगी शोधायला बर."

"लग्न! आणि माझं! एवढ्यात? आई,मला एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. काही दिवस नोकरी करतो, चार पैसे कमावतो, मजा करतो. जरा आरामात जगतो." त्यांनी लाडात येऊन आईला सांगितलं,' मा शादी तो बरबादी है, खो जाती आझादी है!'

पण त्याच्या आईला ह्यात काही गमतीचं वाटलं नाही. तिने सेरीअसली त्याला विचारलं,"लग्नाला नाही म्हणतोयस. बाहेरच्या बाहेर एखादी बघितली नाहीस ना? तसं असेल तर सांग."

संतोष साठी हा अप्रिय विषय असल्याने त्यांनी काहीच उत्तर किंवा प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या साठी तो विषय संपला होता पण त्याच्या आईसाठी तो एक काळजीचा विषय झाला. तिला का कोण जाणे पण असा संशय येत होता कि संतोषला कोणीतरी मुलगी भेटली आहे. तो तिच्या प्रेमात तर पडला नसेल ना? त्यांनी जितका लग्नाचा विषय टाळला तेव्हढी आईला खात्री वाटायला लागली. तिने तिच्या भावाची (अण्णा मामाची) मदत घ्यायची ठरवले.

एक दिवस संतोष जेंव्हा ऑफिसमधून घरी आला तेंव्हा अण्णा मामाला बघून त्याला आश्चर्य वाटलं." मामा, what a sweet surprise! आज अचानक कसं काय येणं केलंस?"

त्यावर मामा म्हणाला,' अरे तुझ्यासाठीच आलोय. ताईनी बोलावलं म्हणून आलो.'

"माझ्या साठी?"

"अरे गम्मत केली. ते जाऊ दे. तू सांग तुझं कसं चाललं आहे. नोकरी? मित्र मंडळी सगळं मजेत ना?"

तेंव्हा संतोषला कळल नाही कि त्याचा मामा खरंच त्याच्या साठीच आला होता. आणि त्याच्या येण्यानी संतोषच्या  आयुष्याची वाट लागणार होती.

त्या दिवसानंतर मामाचं येणं वाढलं. सासरी असणार्या मीनाताईचं पण येणं वाढलं. हि सर्व जवळची माणस अनपेक्षितपणे भेटायला येतात ह्याची संतोषला गम्मत वाटली पण कारण जाणून घ्यायची गरज वाटली नाही. त्याला कुठे ठाऊक होतं कि ह्यांच्या येण्यानी त्याच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार होती ते!

एक दिवस ऑफिसमधून संतोष घरी लवकर आला. घरी काही अनोळखी माणस, मामा आणि ताई आले होते. अनोळखी लोकांमध्ये एक १९-२० वर्षांची मुलगी होती. त्याला आलेला बघून आई थोडी गोंधळली. स्वतःला सावरत तिने ओळख करून दिली, 'हा आमचा संतोष. संतोष, हि अस्मिता आणि हे तिचे आई-वडील.' रिती प्रमाणे त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि तो स्वताच्या खोलीत निघून गेला. ह्या घटने नंतर काही दिवसांनी घरात गड-बड सुरु झाली. पत्रिकांचे नमुने, कापड खरेदी, सोनाराच्या दुकानाच्या चकरा असा सगळा घरातला माहोल बदलून गेला. घरात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण होतं. न राहावल्याने त्यांनी बहिणीला विचारलं, तेंव्हा त्याला कळल कि घरातली धावपळ, लगबग, उत्साह, ह्याच्या मागे तो होता. त्या दिवशी घरी आलेली अस्मिता आणि तिचे आईवडील हे लग्नाची बोलणी करायला आले होते. त्यांना माझं स्थळ पसंत होतं. आईंनी 'देण्या घेण्याच्या काहीच अपेक्षा नाहीत' असं सांगितल्यावर तर मुलीकडील लोकांनी तेव्हाच होकार दिला होता. अस्मिताच्या वडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यात अस्मिता धरून चार मुली. अस्मिता १२वी पर्यंत शिकलेली. शिकलेला, पदवीधर मुलगा, त्यात कमवता. शिवाय घरची श्रीमंती! ह्याच्या पेक्षा चांगलं स्थळ शोधून मिळालं नसतं.

"अरे संतोष आहेस कुठे? तुझं लग्न ठरलंय. तुला हवं म्हणून साधेपणानी करायच ठरलं आहे. दोन महिन्यानंतरचा मुहूर्त आहे. तू माझ्या कडे असं बघतोयस जसं तुला ह्यातलं काहीच ठाऊक नाहीये."

"अग ताई, मला खरंच कशाची काहीच कल्पना नाहीये. मला खरं म्हणजे इतक्यात लग्नच करायचं नाहीये. मी तसं आईशी बोललो पण होतो.घाई करू नकोस. वर्षं दोन वर्षांनी बघू, असं पण म्हणालो होतो. बाबा पण होते तेंव्हा. पण बाबांचा काही उपयोग नाही. त्याचं आईच्या आणि मामाच्या पुढे काहीच चालत नाही. मी आत्ताच्या आत्ता आईशी जाऊन बोलतो आणि तिला सांगतो मला सध्या लग्न करायचं नाहीये. हे सगळं थांबव."

तेंव्हा मीनाताई म्हणाली, "आता काही उपयोग नाही. तू पहिल्यापासून ज्या प्रकारे उडवा-उडवीची उत्तरं देत होतास त्यातून आईचा पक्का समज झाला आहे कि 'तुझं बाहेर लफडं आहे.' 'पर जातीची मुलगी ह्या घरात माझी सून म्हणून आलेली मला चालणार नाही.' हे तिचं पक्का मत आहे. म्हणून तर तिने मला आणि मामाला घाईने बोलावून घेतलं. स्थलं शोधायला! तिचा म्हणणं मामाला पण पटलंय. तेंव्हा मला नाही वाटत तुझी कोणी मदत करू शकेल. तू म्हणतोयस तर आईशी बोलून बघ. पण उपयोग होईल असं मला वाटत नाही."

संतोषनी आईशी बोलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आई आणि मामा आपल्याला बोहोल्यावर उभं केल्याशिवाय थांबणार नाहीत, ह्याची खात्री पटल्यावर संतोषनी घरातून पळून जायचं ठरवलं. दुसर्या दिवशी सकाळी तो नेहेमी प्रमाणे ऑफिसला जायला निघाला. आईंनी मोडता घातला. हे अपेक्षित होतं. संतोषनी ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देऊन येतो आणि गोड बातमी देऊन येतो असं सांगितल्यावर मामाला पटलं. आईंनी नाखुशिनीच जाऊ दिलं.

घरातून बाहेर पडल्यावर ऑफिसला न जाता संतोष त्याच्या मित्राकडे गेला. मित्र (अनिल) भाड्याच्या खोलीत रहात होता. संतोषचा प्रोब्लम ऐकल्यावर त्यांनी संतोषला आपल्या खोलीत ठेऊन घेतलं. लग्न टाळता येण्याची शक्यता कमीच होती पण मामाला किंवा बेस्ट म्हणजे मामीला पटवून बघावं. 'मामीचा तर मी खूप लाडका आहे. ती नक्की माझ्यासाठी घरात इतरांना समजावेल. अशा खात्रीने संतोशनी मामीला फोन केला. 'तिने पण बोलून बघते' असं आश्वासन दिलं.दोघांना वाटलं काही दिवसांचा प्रश्न आहे. ह्या गोष्टीला पण आठवडा होऊन गेला. मामीचा काही फोन नाही कि निरोप नाही. काय करावं काही सुचेना. घरात बसून कंटाळा आला. एक दिवस रात्रीचं जेवण झाल्यावर दोघं उशिरा बाहेर पडले. रात्रीचे १०.३० वाजले होते. सगळीकडे साम-सुम होतं. दोघं गप्पा मारत चालले होते. अचानक कोणीतरी संतोषला मागून पकडलं आणि काही कलायच्या आत मारायला सुरुवात केली. मामा एकी कडे शिव्या देत होता आणि वेड लागल्या सारखं मारत होता. मारत मारत तो संतोषला घरी घेऊन आला आणि संतोषला खोलीत कोंडलं. जाताना मामानी दटावलं, "परत काही मूर्खपणा करू नकोस. पळून जाण्याचा तर विचार पण मनात आणू नकोस. तू तुझ्या मामीला फोन केलास, त्याचदिवशी आम्ही ठरवलं कि 'आता थांबायचं नाही. सापडलास कि बार उडवून द्यायचा. पुढच्या २-३ दिवसातली तारीख निश्चित करतो.'

त्याची अवस्था बघून त्याच्या वडिलांना व लताला खूप वाईट वाटलं. पण आई आणि मामाच्या समोर बोलायची दोघांची हिम्मत नव्हती. झोपण्या आधी आई भेटायला आली. डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "अरे का असं वागतोस? आम्ही काय तुझे शत्रू आहोत का? तुझ्या भल्यासाठीच करतोय ना सगळं.? कुठली कोण जातीची ना पातीची मुलगी घरात आणायला निघाला होतास. तिने काय संसार केला असता का? मिर्या वाटल्या अस्त्यान आपल्या डोक्यावर. माहितीतली, जातीच्या मुलीसंग लग्न झालेलं बर. त्यात गरिबा घरची, चार इयत्ता कमी शिकलेली असली तर जास्त बर. खाली मान घालून निमुटपणे ऐकेल सगळं. खूप दुखतय का रे?" आईच्या डोळ्यात पाणी आल.

संतोषनी आईचा गैरसमज दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण काही उपयोग झालं नाही.

मरण्या आधी माणूस जगण्याची केविलवाणी धडपड करतो तसा संतोष करू पहात होता. घरात निजानीज झाल्यावर त्यांनी परत पळून जायचा प्रयत्न केला. पकडला गेला. मामानी बेदम मारलं. पुढचे दोन दिवस तो उठूच शकला नाही. तिसर्या दिवशी सकाळी घरातल्या घरात लग्नाचे विधी उरकले. स्वतःच्या लग्नात संतोष, वडील आणि मामा, ह्यांच्या आधारानी उभा होता. सगळंच चमत्कारिक होतं. पण अस्मिताच्या आई-वडिलांनी विचारल्यावर 'तब्येत ठीक नाही आहे. पोट बिघडलं आहे.' अशी उडवा उडवीची उत्तर दिलं. अश्या प्रकारे आणि अश्या परिस्थितीत संतोषचं लग्न झालं.

ह्या घटनेला ६-८ महिने झाले असतील. एक दिवस अस्मिता, महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात तक्रार नोंदवायला आली. तिची थोडक्यात तक्रार होती," ताई, माझं लग्न झाल्या पासून माझ्या नवर्यानी मला बायको सारखी वागणूक दिलीच नाही. तो घरी थांबत नाही कि चार शब्द माझ्याशी बोलत नाही. आजपर्यंत जवळ येणं तर लांबच, मला हात सुद्धा लावला नाही. माझ्या हातचं पाणी पण प्यायले नाहीत. ताई, माझा नवरा घरीच येत नाही. मला सासू-सासर्यान कडे सोडून माझा नवरा कामाच्या गावी निघून गेला आहे. मला काळात नाहीये मी काय करू? ते असं का वागतात?"

"माझे सासू-सासरे चांगले आहेत. खूप प्रेमळ आहेत. घरी खायला प्यायला मुबलक आहे. कशाची कमतरता नाही. पण आपलानवराच घरात नसेल तर ह्या गोष्टींचा काय उपयोग?"

"लग्न कस ठरलं? लग्न संतोषच्या मर्जीनी झालं होतं ना? का त्याचा विरोध होता, लग्नाला?"

असं विचारल्यावर उत्तमराव (अस्मिताचे वडील) म्हणाले, "ताई, खरं सांगायचं तर आम्हाला काही कल्पना नाही. समोरून स्थळ सांगून आल, ते पण इतकं भारी. आम्ही फारशी चौकशीच केली नाही. लग्नाच्या आधी एकदाच संतोषला, ते सुधा निसटत पाहिलं. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हा. त्यानंतर बघितला तो बोहोल्यावर त्या लोकांनी उभा केला तेंव्हाच!"

"बोहोल्यावर उभा केला म्हणजे?"

"त्या दिवशी त्याच्या मामानी आणि वडिलांनी त्याला दोन्ही बाजूनी आधार देत बोहोल्यावर उभं केलं आणि वरमाला घालायला पण मदत केली. आम्ही विचारलं तर त्याच्या आईंनी उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यामुळे नेमकं कारण मला पण नीट सांगता येणार नाही."

संतोषला जेंव्हा ऑफिसमध्ये बोलावलं तेंव्हा त्याने त्याची बाजू मांडली. त्याला जेंव्हा विचारलं, 'आता पुढे काय करायचं? ह्या सगळ्यात अस्मिताचा काय दोष? तिला ह्या सगळ्याची का बर शिक्षा?"

ह्यावर संतोष म्हणाला," ह्यात अस्मिता आणि तिच्या आई-वडिलांची काहीच चूक नाही. अस्मिता चांगली मुलगी आहे. तिच्या आयुष्याचं असं वाट्टोळ व्हायला नको होतं.माझ्या बाजूनी मी तिला त्रास होईल असं वागलो नाही. मी तिला हात पण लावला नाही. मला तिच्या साठी खूप वाईट वाटतं. पण ह्याचा अर्थ मी तिच्या सोबत संसार करीन असं समजू नका. आणखीन एक गोष्टं. मी तिला एक नवा पैसा पण नुकसानभरपाई म्हणून देणार नाही. तिच्या आयुष्याचं नुकसान माझ्या मुळे झालेलं नाही. हि माझ्या आईची हौस होती. तिच्या कडून नुकसान भरून घ्या आणि अस्मिताला मिळालं तर माझा पण नंबर लावून बघा. मिळाले तर तुमच्या संस्थेला देणगी देईन!"

मला परत बोलावू नका, मी येणार नाही, असं निक्षून सांगून संतोष त्या दिवशी निघून गेला तो परत आलाच नाही. संतोषच्या आईला आणि मामाला बोलावलं. त्यांच्या हातून झालेली चूक त्यांना कळली होती आणि मान्य पण होती. संतोषनी आपल्याशी आयुष्यासाठी नातं तोडलं ह्याची खंत आई आणि मामाला जाणवत होती. ह्याची जाणीव त्या दोघांच्या बोलण्यातून होत होती. अस्मिता अडून बसली होती. मला नुकसानभरपाई द्या, फारकत करून द्या, नाहीतर मी फसवणूकीची केस करीन. आईंनी अस्मिताला एक मोठी रक्कम दिली. खूप फोन करून विनंत्या केल्यावर संतोष फारकतीच्या कागदांवर सही करायला तयार झाला. ज्या दिवशी बोहोल्यावर चढला त्या दिवशी संतोशनी फारकतीच्या कागदांवर सही केली! समजुतीने फारकत घेण्यासाठीचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला. सहा महिन्यांनी पक्की फारकत झाली. आईचा हट्ट आणि गैरसमज सगळ्यांनाच खूप महाग पडला. अस्मिता आणि संतोषच्या आयुष्याचं न भरून निघणारं नुकसान झालं.

2 comments:

  1. समर्थ रामदास स्वामी बोहोल्यावरून पळून गेले ते संतोषला साधले नाही.समर्थांच्याआईला हट्टापायी आर्थिक फटका बसला नाही परंतु पुत्र वियोग आयुष्य भर सोसावा लागला भावाच्या मदतीने साम दंड चा वापर अमानुषपणे केला.दाम भरावे लागले

    ReplyDelete
  2. One should not force their children for marriage

    ReplyDelete