Thursday 17 December 2020

(पुन्हा एकदा) शून्यातून संसार...

कोरोना आणि त्या मुळे निर्माण झालेली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. स्थलांतरित मजूर आणि त्यांचे होणारे हाल, ह्याच्या संदर्भात वर्तमानपत्रातून आपण रोज बातम्या वाचल्याच आहेत.ह्या मजुरांचा नाईलाज म्हणून ते गावी परत गेले. तिथे गेल्यावर घरच्यांनी त्यांचं स्वागत केलं का आणि केल तर कस केलं ह्या बद्दल खूप काही माहिती मिळाली नाही. पण ३५ वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक असं जोडपं आल, जे घरची आणि गावाकडच्या लोकांची खूप आठवण आली म्हणून नाशिक सोडून उत्तर प्रदेशला गेले. गावी गेल्यावरचे त्यांचे अनुभव फारच गंमतशीर होते.

१९८८-८९ ची घटना आहे. माझी मुलगी लहान होती आणि संस्थेचं काम नव्यानं सुरु झालं होतं. माझी खूप धावपळ होत होती. घरात मदतीला म्हणून एक मदतनीस आणायची ठरलं. त्या दिवसांत आधाराश्रमात गरीब, निराधार मुली व महिलांना आधार देऊन, त्यांची रहाण्याची सोय केली जायची. त्या वेळी नाना उपाध्ये आणि सुधाताई फडके हे दोघं आश्रमाच बहुतांशी काम बघायचे. (दोघे आमच्या चांगल्या परिचयाचे होते. अगदी घरच्या सारखे संबंध होते) त्यानी शोभाला आमच्या घरी पाठवून दिलं. १८-१९ वर्षांची शोभा चुणचुणीत होती. सर्व कामांमध्ये उत्साहानी मदत करायची. माझ्या लेकीसोबत तर तिची चांगलीच गट्टी जमली होती. बघता बघता शोभा आमच्या घरातील एक सदस्य बनली. मी पण नकळत तिच्यावर खूप अवलंबून राहू  लागले. माझ्याकडे येऊन तिला चारेक वर्ष झाली असतील. एक दिवस अचानक ती लाजत लाजत म्हणाली, "ताई, मला लग्न करावस वाटतंय.मला वाटतंय माझा पण नवरा असावा (भाऊ सारखा, समजूतदार). आमचं घर असेल, मुलं असतील. ताई, होईल का ग माझं लग्न? कोण माझ्यासाठी स्थळ बघेल, कोण माझ्यासाठी बोलणी करेल. माझा बाप असं वागला नसता तर, आज माझी आई जिवंत असती." नकळत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. 'ताई मी तुला आई म्हणू का?' असं विचारत लहान मुलासारखी माझ्या मांडीवर डोकं ठेऊन रडायला लागली. बराच वेळ ती रडत होती आणि मी तिला थोपटत होते. जेंव्हा ती शांत झाली तेंव्हा आमच्यातलं नातं बदललेलं होतं. मला एक २२ वर्षाची मुलगी मिळाली होती. प्रेमळ, जीव लावणारी आणि नातं जपणारी. आम्ही पुढाकार घेऊन, आश्रमातील लोकांच्या मदतीने तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं.

शोभाच ते वाक्य 'तर माझी आई जिवंत असती' मला अस्वस्थ करत होतं. शोभाच्या आयुष्यात काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी सुधाताईना विचारायचं ठरवलं. कारण समजल्यावर त्या माहिती सांगायला तयार झाल्या. शोभाचा भूतकाळ ऐकून मन सुन्न झालं. तिच्यासाठी फार वाईट वाटलं. 'शोभा ६-७ वर्षांची असतांना तिच्या वडिलांनी शोभाच्या आईचा चाकूने भोसकून खून केला. ह्या साठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कोणीच नातेवाईक शोभाचा स्वीकार करायला तयार होईनात म्हणून तिला संस्थेत दाखल केलं. तुरुंगात असतांना शोभाचे वडील पण मेले. ना कोणी तिचा स्वीकार केला ना कोणी तिला कधी संस्थेत भेटायला आल. आता तर शोभा अगदीच एकटी झाली. सगळ्यानाच ती नकोशी होती. माझ्याकडे येईपर्यंत ती अशीच एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत शिफ्ट केली जात होती.

सुधाताई आणि उपाध्ये काकांनी पुढाकार घेऊन शोभा साठी दोन स्थळ बघितली. लग्नानंतर नाशिक सोडावं लागेल ह्या भीतीने तिने संगमनेरच्या स्थळाला नकार दिला. दुसर स्थळ होतं रामशरणचं. रामशरण यु पी कडील भैया होता. कामासाठी नाशिक मध्ये आला होता. भाड्याच्या गाड्यावर दारोदार भाजीपाला विकायचा. कमाई बरी होती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि आश्रमातील कर्मचारी, संस्थेतील मुलं व आमचा काही मित्र परिवाराच्या साक्षीने शोभा आणि रामशरण चा विवाह संपन्न झाला. दोघांचा संसार आनंदात सुरु झाला. अधून मधून दोघं भेटायला यायचे. पहिल्या तीन वर्षात शोभला दोन मुलं झाली, मोठी मुलगी आणि नंतरचा मुलगा. मुलगा, कालीचरण, सहा महिन्याचा असेल. एक दिवस दोघं मुलांना घेऊन भेटायला आले होते, तेंव्हा रामशरण नी ते गावी जात असल्याचं सांगितलं. तो म्हणाला," माताजी हम शोभा और बच्चोको लेकर गाव जा रहे है. यहा का सब बेचके जा रहे है. मांका बहोत बार फोन आये. कालीचरणको देखनेका उनका बहुत मन करता है. हम भी २० सालसे यही पर है. हमेभी गावकी, खेतोंकी बहुत याद आती है. अब कब मिलना होगा पता नाही. तुम लोगोंकी बहुत याद आएगी."

मुलांच्या हातात खाऊ, शोभाला साडी आणि रामशरण कडे थोडे पैसे देऊन पाठवणी केली. दोघंही अशिक्षित असल्यामुळे पुढे काही त्यांची खबरबात कळलीच नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, 'नो न्यू इज गुड न्यूज'.

शोभाला जाऊन चार महिने पण झाले नव्हते. एक दिवस पहाटे साडे चार वाजता दारावरील बेल वाजली. दार उघडलं तर समोर शोभा आणि रामशरण, हातात सामान आणि दोन्ही मुलांना घेऊन उभे. मी काही विचारायच्या आत शोभा गळ्यात पडून रडायला लागली. मला बघून रामशरणच्या पण चेहेरयावरील ताण कमी झाला. सगळ्यांना भूक लागली होती आणि प्रवासानी दमले पण होते. थोडाफार खाऊन सगळे झोपले.

उठल्यावर शोभा लगबगीने कामाला लागली. सकाळची सगळी काम आवरून झाल्यावर गावी काय झालं ते तिने सविस्तर सांगितलं.

"आई, इथून आम्ही गावी पोहोचलो. आम्हाला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. सासूबाईंना रामचरण आणि नातवंड भेटल्यामुळे त्या खुश होत्या. मला भाषेची थोडी अडचण होत होती. पण हळू हळू त्यांना माझं आणि मला त्यांचं म्हणणं समजू लागलं होतं. पहिले दोन महिने मजेत गेले. सगळ्यांनी आमचे आणि मुलांचे खूप लाड केले. लवकरच रामचरण त्यांच्या भावा बरोबर शेतात जाऊ लागले. रामशरणनी  मी नाही म्हणत असतांना इथून नेलेले सर्व पैसे वडिलांच्या कडे देऊन टाकले. त्यामुळे ते पण खुश होते. आम्हाला जाऊन तीन महिने झाले. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर सासूबाईनी विषय काढला. 'आपको आके बहोत दिन हो गये. वापस जाना है ना? कबकी टिकट निकालनेको बोले?'

हे ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. रामशरणनी आईला विचारलं,"अम्मा, कहा जाये? हम तो वहाका सब बेचके गाव आये है. आप लोगोंके साथ रेहेने. बच्चे यही इस्कुलमें पधेंगे. वहा नासिकमें अब हमारा कुछभी नही है."

"तुम आनेसे पहले हमसे पूछा क्या, आये क्या करके. यहा हम आपको, आपके परिवारको क्यों सम्हाले? मुफ्तकी रोटी कोन और क्यू खिलावेगा?"

"मुफ्तकी काहे. शोभा घरके काममे हात बटावे है, हम खेतोमे काम करत है. और पूछना क्या है? घर हमारा, गाव हमारा, जमीन हमारी, आप सब हमारे. मन हुंवा हम आ गये."

"तुम यहा नही रेह सकते. जल्दीसे अपना सामान उठावो और निकलो."

"हम भी देखते है हमें कौन निकालता है."

आणि मग काय त्या रात्रीनंतर सगळं चित्रच पालटल. रोज वाद आणि भांडणं व्हायला लागली. घरात कोणी कशाला हात लाऊ देईना. आम्ही जमिनीत हिस्सा मागणार अशी त्यांना भीती वाटत होती. रोज दिवसातून चार चार वेळा सासू विचारायची,'कधी जाताय, केंव्हा जाणार?'

रामशरणनी एक दिवस वडिलांकडून 'दिलेले पैसे परत मागितले.' तो म्हणाला," मैने आपको दिये थे वो पैसे मुझे दे दो. मै, मेरे परिवारको लेकर चला जाऊंगा. मेरे पास जो भी था वो मैने आपको दे दिया. अब मेरे पास कुच्छभी नही है."

हे ऐकल्यावर सासरे खूप संतापले. आम्हाला खूप शिव्या दिल्या. रामशरण ला मारायला धावले. घरातील वातावरण अजूनच बिघडलं. आम्हाला पोटभर जेवण पण देणं बंद केलं. उपाशीपोटी मुलं रडत झोपायची. मी रामशरणला म्हणाले, 'आपण नाशिकला आईकडे जाऊया. ती आपल्याला मदत करेल.'

ट्रेनची तिकीट काढायला पण पैसे नव्हते. मुलांची अवस्था बघवत नव्हती. मला काय करावं कळेना. मला आई तुझी फार आठवण आली. त्या दिवशी मी खूप रडले. तू कालीचरणला दिलेली चौघडी काढायला बेग उघडली आणि माझी परतीच्या प्रवासाची सोय झाली. मला तू लग्नात दिलेले चांदीचे पैंजण दिसले. मी लागलीच रामशरणला ते दिले. त्यांनी त्या पैशातून तिकीट काढली. म्हणून आम्ही तुझ्या कडे सुखरूप येऊ शकलो. (जेंव्हा सासूला समजलं कि माझ्या कडे चांदीचे पैंजण आहेत तेंव्हा तिने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं. अजून मी काय लपवलं आहे हे पाहण्या साठी बेगेतून सामान बाहेर काढलं. जेंव्हा काहीच मिळालं नाही तेंव्हा चिडून तिने माझी एक साडी फाडली. एवढंच नाही तर दोन चांगल्या साड्या स्वताच्या कपाटात ठेऊन दिल्या.) माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाहीये. तिथले शेवटचे दिवस आठवले तरी अंगावर काटायेतो.

आई, आता आम्ही तुझ्याकडे आलोय. रामशरण म्हणतोय आपण आपला भाजी विकायचा धंदा सुरु करू. त्याला जोडीला फळ पण ठेऊ. आई तू आम्हाला थोडी मदत करशील का?"

२-४ दिवस ते सगळे माझ्या कडे राहिले.मी त्यांना आर्थिक मदत करायची ठरवलं. रामशरणच्या आधीच्या ओळखी होत्याच. त्याला काम सुरु करायला आणि भाड्याची खोली मिळवायला वेळ लागला नाही.

 दोघांनी दोन लेकरांसह शून्यातून संसार सुरु केला. रामशरणनी खूप मेहनत केली. शोभानी पण चांगली साथ दिली. (गावाकडून कामानिमित्त आलेल्या लोकांना ती जेवणाचे डबे द्यायला लागली. पुढे राहत्या घराच्या शेजारची खोली घेऊन ह्या लोकांना पोटभाडेकरू म्हणून ठेऊन चार पैसे कमवायला लागली. रहात घर विकत घेतलं, (कर्ज काढून.) मला शेवट भेटली त्याला पण १५ वर्षं झाली. तेंव्हा तिची मुलं शिकत होती. तीन खोल्यांचं घर त्यांच्या नावावर होतं. दोघं मजेत संसार करत होते.

Tuesday 1 December 2020

उलथापालथ

२२-२३ वर्षांचा संतोष अभ्यासात फार काही हुशार नव्हता. पण कधी नापास पण नाही झाला. कळायला लागल्यापासून तो आजपर्यंत त्याला न आवडणारं काम करत होता. ते म्हणजे अभ्यास! पण आता त्याला ह्या सगळ्यातून मुक्ती मिळाली होती. तो graduate झाला होता. तो आयुष्यातील एक कठीण टप्पा पार करून मुक्त आयुष्याची स्वप्नं बघत होता. तो स्वप्नं बघण्याचा अधिकार त्याला देणारा कागद त्याच्या हातात होता. आज सर्व मित्रांनी एकमतानी ठरवलं कि आता नोकरी करायची, पैसे कमवायचे आणि काही वर्षं ऐश करायची. काही वर्षं स्वच्छंदी आयुष्य जगण्याची स्वप्नं रंगवत संतोष घरी आला. अपेक्षेप्रमाणे त्याचा निकाल ऐकून सगळ्यांना आनंद झाला. आईंनी त्याच्या आवडीचा दोन दिवस स्वैपाक केला. बघता-बघता महिना निघून गेला.

एक दिवस त्याला वडिलांनी विचारलं,"आता पुढे काय करायचं ठरवलाय?"

संतोषकडे ह्याचं उत्तर तयार होतं. तो दोन दिवसांपूर्वीच एका ऑफिसमध्ये मुलाखत देऊन आला होता आणि तिथे नोकरी मिळण्याची पक्की खात्री होती. त्यांनी तसं वडिलांना सांगितलं. अपेक्षेप्रमाणे संतोषला नोकरी मिळाली. पगार फार नव्हता, १५०००/- महिना! पण ठीक होतं . एकट्या जीवाला किती लागणार? वडिलांची सरकारी नोकरी आणि गावाकडे बागायती शेती! संतोषच्या पगारावर कोणाचं काहीच अवलंबून नव्हतं. सगळंसुरळीत चाललं होतं. दोन महिने मजेत गेले.

रात्रीची जेवणं झाल्यावर एक दिवस आईंनी अचानक विषय काढला. "संतोष, तुझं शिक्षण झालं, नोकरी लागली, आता तुझ्या लग्नाचा विचार करूया असं मला वाटतं. तुझ्या काही अपेक्षा असतील तर सांग. म्हणजे तुझ्या पसंतीची मुलगी शोधायला बर."

"लग्न! आणि माझं! एवढ्यात? आई,मला एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. काही दिवस नोकरी करतो, चार पैसे कमावतो, मजा करतो. जरा आरामात जगतो." त्यांनी लाडात येऊन आईला सांगितलं,' मा शादी तो बरबादी है, खो जाती आझादी है!'

पण त्याच्या आईला ह्यात काही गमतीचं वाटलं नाही. तिने सेरीअसली त्याला विचारलं,"लग्नाला नाही म्हणतोयस. बाहेरच्या बाहेर एखादी बघितली नाहीस ना? तसं असेल तर सांग."

संतोष साठी हा अप्रिय विषय असल्याने त्यांनी काहीच उत्तर किंवा प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या साठी तो विषय संपला होता पण त्याच्या आईसाठी तो एक काळजीचा विषय झाला. तिला का कोण जाणे पण असा संशय येत होता कि संतोषला कोणीतरी मुलगी भेटली आहे. तो तिच्या प्रेमात तर पडला नसेल ना? त्यांनी जितका लग्नाचा विषय टाळला तेव्हढी आईला खात्री वाटायला लागली. तिने तिच्या भावाची (अण्णा मामाची) मदत घ्यायची ठरवले.

एक दिवस संतोष जेंव्हा ऑफिसमधून घरी आला तेंव्हा अण्णा मामाला बघून त्याला आश्चर्य वाटलं." मामा, what a sweet surprise! आज अचानक कसं काय येणं केलंस?"

त्यावर मामा म्हणाला,' अरे तुझ्यासाठीच आलोय. ताईनी बोलावलं म्हणून आलो.'

"माझ्या साठी?"

"अरे गम्मत केली. ते जाऊ दे. तू सांग तुझं कसं चाललं आहे. नोकरी? मित्र मंडळी सगळं मजेत ना?"

तेंव्हा संतोषला कळल नाही कि त्याचा मामा खरंच त्याच्या साठीच आला होता. आणि त्याच्या येण्यानी संतोषच्या  आयुष्याची वाट लागणार होती.

त्या दिवसानंतर मामाचं येणं वाढलं. सासरी असणार्या मीनाताईचं पण येणं वाढलं. हि सर्व जवळची माणस अनपेक्षितपणे भेटायला येतात ह्याची संतोषला गम्मत वाटली पण कारण जाणून घ्यायची गरज वाटली नाही. त्याला कुठे ठाऊक होतं कि ह्यांच्या येण्यानी त्याच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार होती ते!

एक दिवस ऑफिसमधून संतोष घरी लवकर आला. घरी काही अनोळखी माणस, मामा आणि ताई आले होते. अनोळखी लोकांमध्ये एक १९-२० वर्षांची मुलगी होती. त्याला आलेला बघून आई थोडी गोंधळली. स्वतःला सावरत तिने ओळख करून दिली, 'हा आमचा संतोष. संतोष, हि अस्मिता आणि हे तिचे आई-वडील.' रिती प्रमाणे त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि तो स्वताच्या खोलीत निघून गेला. ह्या घटने नंतर काही दिवसांनी घरात गड-बड सुरु झाली. पत्रिकांचे नमुने, कापड खरेदी, सोनाराच्या दुकानाच्या चकरा असा सगळा घरातला माहोल बदलून गेला. घरात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण होतं. न राहावल्याने त्यांनी बहिणीला विचारलं, तेंव्हा त्याला कळल कि घरातली धावपळ, लगबग, उत्साह, ह्याच्या मागे तो होता. त्या दिवशी घरी आलेली अस्मिता आणि तिचे आईवडील हे लग्नाची बोलणी करायला आले होते. त्यांना माझं स्थळ पसंत होतं. आईंनी 'देण्या घेण्याच्या काहीच अपेक्षा नाहीत' असं सांगितल्यावर तर मुलीकडील लोकांनी तेव्हाच होकार दिला होता. अस्मिताच्या वडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यात अस्मिता धरून चार मुली. अस्मिता १२वी पर्यंत शिकलेली. शिकलेला, पदवीधर मुलगा, त्यात कमवता. शिवाय घरची श्रीमंती! ह्याच्या पेक्षा चांगलं स्थळ शोधून मिळालं नसतं.

"अरे संतोष आहेस कुठे? तुझं लग्न ठरलंय. तुला हवं म्हणून साधेपणानी करायच ठरलं आहे. दोन महिन्यानंतरचा मुहूर्त आहे. तू माझ्या कडे असं बघतोयस जसं तुला ह्यातलं काहीच ठाऊक नाहीये."

"अग ताई, मला खरंच कशाची काहीच कल्पना नाहीये. मला खरं म्हणजे इतक्यात लग्नच करायचं नाहीये. मी तसं आईशी बोललो पण होतो.घाई करू नकोस. वर्षं दोन वर्षांनी बघू, असं पण म्हणालो होतो. बाबा पण होते तेंव्हा. पण बाबांचा काही उपयोग नाही. त्याचं आईच्या आणि मामाच्या पुढे काहीच चालत नाही. मी आत्ताच्या आत्ता आईशी जाऊन बोलतो आणि तिला सांगतो मला सध्या लग्न करायचं नाहीये. हे सगळं थांबव."

तेंव्हा मीनाताई म्हणाली, "आता काही उपयोग नाही. तू पहिल्यापासून ज्या प्रकारे उडवा-उडवीची उत्तरं देत होतास त्यातून आईचा पक्का समज झाला आहे कि 'तुझं बाहेर लफडं आहे.' 'पर जातीची मुलगी ह्या घरात माझी सून म्हणून आलेली मला चालणार नाही.' हे तिचं पक्का मत आहे. म्हणून तर तिने मला आणि मामाला घाईने बोलावून घेतलं. स्थलं शोधायला! तिचा म्हणणं मामाला पण पटलंय. तेंव्हा मला नाही वाटत तुझी कोणी मदत करू शकेल. तू म्हणतोयस तर आईशी बोलून बघ. पण उपयोग होईल असं मला वाटत नाही."

संतोषनी आईशी बोलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आई आणि मामा आपल्याला बोहोल्यावर उभं केल्याशिवाय थांबणार नाहीत, ह्याची खात्री पटल्यावर संतोषनी घरातून पळून जायचं ठरवलं. दुसर्या दिवशी सकाळी तो नेहेमी प्रमाणे ऑफिसला जायला निघाला. आईंनी मोडता घातला. हे अपेक्षित होतं. संतोषनी ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देऊन येतो आणि गोड बातमी देऊन येतो असं सांगितल्यावर मामाला पटलं. आईंनी नाखुशिनीच जाऊ दिलं.

घरातून बाहेर पडल्यावर ऑफिसला न जाता संतोष त्याच्या मित्राकडे गेला. मित्र (अनिल) भाड्याच्या खोलीत रहात होता. संतोषचा प्रोब्लम ऐकल्यावर त्यांनी संतोषला आपल्या खोलीत ठेऊन घेतलं. लग्न टाळता येण्याची शक्यता कमीच होती पण मामाला किंवा बेस्ट म्हणजे मामीला पटवून बघावं. 'मामीचा तर मी खूप लाडका आहे. ती नक्की माझ्यासाठी घरात इतरांना समजावेल. अशा खात्रीने संतोशनी मामीला फोन केला. 'तिने पण बोलून बघते' असं आश्वासन दिलं.दोघांना वाटलं काही दिवसांचा प्रश्न आहे. ह्या गोष्टीला पण आठवडा होऊन गेला. मामीचा काही फोन नाही कि निरोप नाही. काय करावं काही सुचेना. घरात बसून कंटाळा आला. एक दिवस रात्रीचं जेवण झाल्यावर दोघं उशिरा बाहेर पडले. रात्रीचे १०.३० वाजले होते. सगळीकडे साम-सुम होतं. दोघं गप्पा मारत चालले होते. अचानक कोणीतरी संतोषला मागून पकडलं आणि काही कलायच्या आत मारायला सुरुवात केली. मामा एकी कडे शिव्या देत होता आणि वेड लागल्या सारखं मारत होता. मारत मारत तो संतोषला घरी घेऊन आला आणि संतोषला खोलीत कोंडलं. जाताना मामानी दटावलं, "परत काही मूर्खपणा करू नकोस. पळून जाण्याचा तर विचार पण मनात आणू नकोस. तू तुझ्या मामीला फोन केलास, त्याचदिवशी आम्ही ठरवलं कि 'आता थांबायचं नाही. सापडलास कि बार उडवून द्यायचा. पुढच्या २-३ दिवसातली तारीख निश्चित करतो.'

त्याची अवस्था बघून त्याच्या वडिलांना व लताला खूप वाईट वाटलं. पण आई आणि मामाच्या समोर बोलायची दोघांची हिम्मत नव्हती. झोपण्या आधी आई भेटायला आली. डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "अरे का असं वागतोस? आम्ही काय तुझे शत्रू आहोत का? तुझ्या भल्यासाठीच करतोय ना सगळं.? कुठली कोण जातीची ना पातीची मुलगी घरात आणायला निघाला होतास. तिने काय संसार केला असता का? मिर्या वाटल्या अस्त्यान आपल्या डोक्यावर. माहितीतली, जातीच्या मुलीसंग लग्न झालेलं बर. त्यात गरिबा घरची, चार इयत्ता कमी शिकलेली असली तर जास्त बर. खाली मान घालून निमुटपणे ऐकेल सगळं. खूप दुखतय का रे?" आईच्या डोळ्यात पाणी आल.

संतोषनी आईचा गैरसमज दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण काही उपयोग झालं नाही.

मरण्या आधी माणूस जगण्याची केविलवाणी धडपड करतो तसा संतोष करू पहात होता. घरात निजानीज झाल्यावर त्यांनी परत पळून जायचा प्रयत्न केला. पकडला गेला. मामानी बेदम मारलं. पुढचे दोन दिवस तो उठूच शकला नाही. तिसर्या दिवशी सकाळी घरातल्या घरात लग्नाचे विधी उरकले. स्वतःच्या लग्नात संतोष, वडील आणि मामा, ह्यांच्या आधारानी उभा होता. सगळंच चमत्कारिक होतं. पण अस्मिताच्या आई-वडिलांनी विचारल्यावर 'तब्येत ठीक नाही आहे. पोट बिघडलं आहे.' अशी उडवा उडवीची उत्तर दिलं. अश्या प्रकारे आणि अश्या परिस्थितीत संतोषचं लग्न झालं.

ह्या घटनेला ६-८ महिने झाले असतील. एक दिवस अस्मिता, महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात तक्रार नोंदवायला आली. तिची थोडक्यात तक्रार होती," ताई, माझं लग्न झाल्या पासून माझ्या नवर्यानी मला बायको सारखी वागणूक दिलीच नाही. तो घरी थांबत नाही कि चार शब्द माझ्याशी बोलत नाही. आजपर्यंत जवळ येणं तर लांबच, मला हात सुद्धा लावला नाही. माझ्या हातचं पाणी पण प्यायले नाहीत. ताई, माझा नवरा घरीच येत नाही. मला सासू-सासर्यान कडे सोडून माझा नवरा कामाच्या गावी निघून गेला आहे. मला काळात नाहीये मी काय करू? ते असं का वागतात?"

"माझे सासू-सासरे चांगले आहेत. खूप प्रेमळ आहेत. घरी खायला प्यायला मुबलक आहे. कशाची कमतरता नाही. पण आपलानवराच घरात नसेल तर ह्या गोष्टींचा काय उपयोग?"

"लग्न कस ठरलं? लग्न संतोषच्या मर्जीनी झालं होतं ना? का त्याचा विरोध होता, लग्नाला?"

असं विचारल्यावर उत्तमराव (अस्मिताचे वडील) म्हणाले, "ताई, खरं सांगायचं तर आम्हाला काही कल्पना नाही. समोरून स्थळ सांगून आल, ते पण इतकं भारी. आम्ही फारशी चौकशीच केली नाही. लग्नाच्या आधी एकदाच संतोषला, ते सुधा निसटत पाहिलं. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हा. त्यानंतर बघितला तो बोहोल्यावर त्या लोकांनी उभा केला तेंव्हाच!"

"बोहोल्यावर उभा केला म्हणजे?"

"त्या दिवशी त्याच्या मामानी आणि वडिलांनी त्याला दोन्ही बाजूनी आधार देत बोहोल्यावर उभं केलं आणि वरमाला घालायला पण मदत केली. आम्ही विचारलं तर त्याच्या आईंनी उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यामुळे नेमकं कारण मला पण नीट सांगता येणार नाही."

संतोषला जेंव्हा ऑफिसमध्ये बोलावलं तेंव्हा त्याने त्याची बाजू मांडली. त्याला जेंव्हा विचारलं, 'आता पुढे काय करायचं? ह्या सगळ्यात अस्मिताचा काय दोष? तिला ह्या सगळ्याची का बर शिक्षा?"

ह्यावर संतोष म्हणाला," ह्यात अस्मिता आणि तिच्या आई-वडिलांची काहीच चूक नाही. अस्मिता चांगली मुलगी आहे. तिच्या आयुष्याचं असं वाट्टोळ व्हायला नको होतं.माझ्या बाजूनी मी तिला त्रास होईल असं वागलो नाही. मी तिला हात पण लावला नाही. मला तिच्या साठी खूप वाईट वाटतं. पण ह्याचा अर्थ मी तिच्या सोबत संसार करीन असं समजू नका. आणखीन एक गोष्टं. मी तिला एक नवा पैसा पण नुकसानभरपाई म्हणून देणार नाही. तिच्या आयुष्याचं नुकसान माझ्या मुळे झालेलं नाही. हि माझ्या आईची हौस होती. तिच्या कडून नुकसान भरून घ्या आणि अस्मिताला मिळालं तर माझा पण नंबर लावून बघा. मिळाले तर तुमच्या संस्थेला देणगी देईन!"

मला परत बोलावू नका, मी येणार नाही, असं निक्षून सांगून संतोष त्या दिवशी निघून गेला तो परत आलाच नाही. संतोषच्या आईला आणि मामाला बोलावलं. त्यांच्या हातून झालेली चूक त्यांना कळली होती आणि मान्य पण होती. संतोषनी आपल्याशी आयुष्यासाठी नातं तोडलं ह्याची खंत आई आणि मामाला जाणवत होती. ह्याची जाणीव त्या दोघांच्या बोलण्यातून होत होती. अस्मिता अडून बसली होती. मला नुकसानभरपाई द्या, फारकत करून द्या, नाहीतर मी फसवणूकीची केस करीन. आईंनी अस्मिताला एक मोठी रक्कम दिली. खूप फोन करून विनंत्या केल्यावर संतोष फारकतीच्या कागदांवर सही करायला तयार झाला. ज्या दिवशी बोहोल्यावर चढला त्या दिवशी संतोशनी फारकतीच्या कागदांवर सही केली! समजुतीने फारकत घेण्यासाठीचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला. सहा महिन्यांनी पक्की फारकत झाली. आईचा हट्ट आणि गैरसमज सगळ्यांनाच खूप महाग पडला. अस्मिता आणि संतोषच्या आयुष्याचं न भरून निघणारं नुकसान झालं.

Wednesday 25 November 2020

बचत तो बस एक बहाना है!

महिला हक्क संरक्षण समितिनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले. सगळेच गरजेचे होते. त्यातील एक होता बचत गट! बचत गट सुरु करण्यापूर्वी आम्ही बचत खात ह्या नावानी काम करत होतो. त्या विभागाची जबाबदारी औटेबाई बघत होत्या.

बचत खात्यात गरीब, कष्टकरी कुटुंबातल्या महिला त्यांना जमेल तशी बचत करायच्या. २ रुपये रोज,२५/- रुपये आठवडा, १००/- रुपये महिना अशी जिला जशी जमेल तशी ती बचत करायची.तिला गरज पडेल तेंव्हा ह्या बचतीवर कर्ज घ्यायची, कर्जाचे हप्ते नियमित पणे परत पण करायची.ह्या सर्व पैश्यांचा हिशोब ठेवणं बरंच जिकिरीच तर होतंच, पण रोजचं कलेक्शन करणं अवघड होत होतं. दोन वर्षं सातत्यानी हे चालवल्याने महिलांना बचतीची सवय लागली खरी, पण आमच्या असं लक्षात आल कि ह्यांनी महिलांना बँकेचे व्यवहार समजत नाहीयेत आणि त्यांची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढत नाहीये. 'एकीच्या बळाची ताकत' त्यांच्या लक्षात येत नाहीये. ह्यातूनच १२-१५ महिलांचा बचत गट सुरु करण्याचा विचार पक्का झाला. (२००० च्या सुरुवातीला संस्थेचे एकूण ४५ गट कार्यरत होते.) बचत गटाची रचना निश्चित केली. एका गटात कमीत कमी १०-१२ महिला असाव्यात. व जास्तीतजास्त २० ची संख्या असावी. ह्या महिलांमधुनच तिघींची गट प्रमुख म्हणून निवड करतील. गटाच्या नावांनी बँकेत खात उघडून, त्याचे सर्व व्यवहार गटप्रमुख बघतील. बचतीची रक्कम जमा करणे, त्याचा हिशोब ठेवणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे, दर महिन्याला सभासदांची मीटिंग घेऊन त्यांना गटाचे हिशोब सांगणे, कर्जासाठी आलेल्या अर्जांवर सर्वानुमते निर्णय घेणे, व्याजाचा दर ठरविणे, कर्ज वसूल करणे आणि सर्वात महत्वाचे गटासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे. हि व अशी गटाशी संबंधित सर्व काम गटातील महिला व गट प्रमुखांवर सोपविली. त्यांना गरज भासेल तिथे संस्थेची मदत त्यांनी घ्यावी असे ठरले. बघता-बघता बचत गट व गटातील महिला सक्षम झाल्या. अडी-अडचणीत एक-मेकीना साथ देऊ लागल्या, गरज पडली तर सर्व जणी पिडीतेला आधार देऊ लागल्या. ह्या सक्षम महिलांचा एक अनुभव (किस्सा) शेअर करते.

नाशिकमध्ये गंजमाळ भागाच्या परिसरात जास्त करून कष्टकरी लोकांची वस्ती आहे (होती). छोटी-छोटी घरं! त्यातील काही नशीबवान लोकांच्या घराच्या पक्क्या भिंती होत्या. बहुतांशी घरांना लाकडी फळ्यांच्या भिंती होत्या. घरात हौसेनी, काटकसर करून जमवलेल्या काही वस्तू. मोल-मजुरी करणारा पुरुष वर्ग. कष्ट करून, छोटी मोठी काम करून चार पैसे कमवून संसाराला हात-भार लाऊ पाहणाऱ्या महिला. महिला मुलांना शिकविण्यासाठी धडपड करत होत्या. मोजक्या नशीबवान बायकांना त्यांच्या नवऱ्याची साथ मिळायची. पण बहुतेक घरांमध्ये आर्थिक ओढाताण, पुरुषांना असलेली व्यसनं( त्यात प्रामुख्यांनी दारू, जुगार, मटका आणि बायांची लफडी ) व त्यावर होणारा आणि न परवडणारा खर्च, ह्यामुळे नवरा-बायको मधे खूप भांडणं व्हायची. शाब्दिक बाचा-बाची, शिवीगाळ हे तर नित्याचच होतं पण अधून मधून मारहाण पण व्हायची. त्या वस्तीतल्या आमच्या गटात सुरेखा होती. तिचा नवरा फारसं कमवायचा नाही, रोज दारू प्यायचा आणि दारूसाठी पैसे कमी पडले कि सुरेखाला मारहाण करून तिच्याकडून पैसे हिसकून घ्यायचा. सुरेखा आणि सुरेशचा हा तमाशा रोजचाच होता. काही लोक बिचारी सुरेखा असं म्हणायचे आणि त्यांचं भांडण ऐकून न ऐकल्यासारखं वागायचे. तर काही लोक तिची बाजू घेऊन सुरेशला समजवायला जायचे, तर हा बहाद्दर तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि आलेल्या लोकांना आया-बहिणीवरून शिव्या द्यायचा. सुरेखानी २-३ वेळा नवर्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार पण दिली. पण घरेलू मामला आहे, नवरा-बायकोचं भांडण आहे, असं म्हणत पोलिसांनी त्याला समज दिली, सुरेखाला समजून सांगितलं आणि घरी पाठवून दिलं. मध्यंतरी एका साहेबांनी त्याला एक दिवस पोलीस चौकीत बसवून ठेवलं. त्या दिवसानंतर काही दिवस सगळं शांत होतं. पोलीस दखल घेतील, शेजारी तक्रार करतील, मुलं पण थोडी मोठी झाल्यामुळे ती पण थोडा प्रतिकार करतील, ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला कि मारहाण कमी झाली. म्हणजे मारण्याचं स्वरूप बदललं. ती कोणाला दाखवू शकणार नाही अश्या जागी इजा करायचा आणि 'पैसे दिले नाहीस तर घर पेटवून देईन' म्हणायचा नाहीतर ५ लिटरचा केरोसीनचा डब्बा घ्यायचा आणि आत्महत्येची धमकी द्यायाचा. (आपली बायको बचत गटातून कर्ज घेऊ शकते आणि ते फेडायला पैसे बाजूला टाकते, हे त्याला माहित होतं) 'आपलं लाकडी फळ्यांचं घर. नवर्यानी खरंच पेटवून घेतलं तर आपलं आणि इतरांचं खूप नुकसान होईल', असा विचार करून आणि माराला घाबरून सुरेखा त्याला पैसे देत होती. ह्याचा परिणाम तिच्या बचत गटातील व्यवहारावर झाला. कशीतरी बचतीची रक्कम ठरलेल्या तारखेला ती देउ शकायची. पण कर्जाचे हप्ते द्यायला टाळाटाळ करू लागली. गटाच्या मिटींगला पण गैरहजर राहू लागली. 'काही अडचण आहे का?  सर्व ठीक चाललं आहे ना?' असं विचारल्यावर उडवा-उडवीची उत्तर द्यायची. एक दिवस ती लंगडत मिटींगला आली. 'काय झालं?' विचारल्यावर ती रडायला लागली. तिने साडी व  परकर वर करून दाखवलं. तिच्या मांडीवर वळ होते, पट्ट्यांनी मारल्यासारखे! काही ठिकाणी सिगारेटचे चटके दिल्यासारख्या खुणा होत्या.

'काय झालं? कस झालं? कोणी केलं? हे असं कधीपासून चालू आहे? तू कधी कोणापाशी काहीच बोलली का नाहीस? आणि तू हे का सहन केलंस?' गटातील सर्व बायकांनी प्रश्नांचा भडीमार केला. तेंव्हा सुरेखानी तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सगळ्यांना सांगितलं. पैशांसाठी नवऱ्याकडून होणारा त्रास आणि आत्महत्येची त्यांनी वारंवार दिलेली धमकी. कसं गटातील हप्ते भरण्यासाठी वाचवलेले पैसे तो घेऊन जातो आणि म्हणून ती गटाचे हप्ते वेळेवर भरू शकत नाही. तिनी सगळ्यांना विनंती केली कि," माझा नवरा सुधरणार नाही. माझा आजपर्यंत जो हिशोब झाला असेल तो बघून काही शिल्लक रहात असेल तर मला द्या. मी हेच सांगायला आले होते. माझ्यामुळे तुमचं नुकसान नको."

गटप्रमुख काशीबाई म्हणाली," सुरेखा, तू बचत गट सोडणार नाहीस. तुझ्या प्रश्नावर आपण गट म्हणून उत्तर शोधू शकलो नाही तर आपल्याला गट चालवायचा अधिकार नाही. आपण सगळ्या मिळून तुझ्या नवऱ्याला अद्दल घडवू. तू त्याला पैसे देऊ नकोस. तो तमाशा करेल. त्यांनी तमाशा केला कि शालिनी, तुझ्या शेजारीच रहाते, आम्हाला निरोप देईल. पुढे काय करायचं ते तू आमच्यावर सोड."

काशीबाईच्या शब्दांनी सुरेखाला धीर आला. गटातील बायका आपल्याला ह्याच्यातून वाचवतील अशी खात्री तिला वाटू लागली. ती घरी गेल्यावर काशीबाईनी गटाची मीटिंग घेतली आणि काय करायचं, कस करायचं ह्याची रूपरेषा ठरवली.

संध्याकाळ झाली. अंधार पडला. अपेक्षे प्रमाणे सुरेश झिंगलेल्या अवस्थेत,सुरेखाला शिव्या देत घरी आला. आत आल्या आल्या त्यांनी दारूसाठी पैसे मागितले. ठरल्याप्रमाणे सुरेखानी नकार दिला. आता तो मारणार ह्या भीतीनी सुरेखा दाराच्या दिशेनी पळाली. त्यांनी तिला आत ढकललं, आणि मुश्कीलिनी तोल सावरत, तिला अर्वाच्य शिव्या देत तो केरोसिनचा डब्बा उचलायला गेला. 'आता मी स्वतःला पेटवून घेतो आणि आयुष्य संपवतो. तू तर माझ्या मरण्याची वाटच बघतीयेस ना? म्हणजे तू लफडी करायला मोकळी. पण मी तुला घेऊन मरणार. मला जगायचा कंटाळा आला आहे. साली, मनासारखी, शांतपणे दारू पेऊ देत नाहीस? आता बघतोच तुझ्याकडे' असं म्हणून तो तिला फटका मरणार, तेवढ्यात काशीबाई गटातील बायकांना घेऊन घरात शिरल्या. "अरे मुडद्या! तू कशाला टेन्शन घेतोस? ५ लिटर मध्ये तू पूर्ण जळणार नाहीस आणि तुझी आत्महत्येची इच्छा अपूर्ण राहील. आम्ही सर्वजणी ५-५ लिटर घेऊन आलोय. पण तुला इथे नाही, चौकात पेटवणार. तू तर मरून जाशील पण आमची आगीत उधवस्त झालेली घरं कोण बांधून देईल. तेंव्हा चला ग बायानो ह्याला चौकात घेऊन चला. आणि त्याला वाजत गाजत घेऊन जाऊ म्हणजे वस्तीतले बाकीचे सुरेश पण शहाणे होतील."

सर्व बायकांनी त्याला मारत-मारत चौकात आणलं. तिथे असलेल्या खांबाला त्याला बांधून ठेवलं. रात्री उशिरापर्यंत सुरेश तिथेच होता. त्याची नशा, हौस, गुर्मी सर्व जिरली. 'बायकोला आणि मुलांना त्रास देणार नाही, दारू पीऊन तमाशा करणार नाही, चार पैसे कमवीन आणि कुटुंबाची काळजी घेईन' अशी ग्वाही दिली तेंव्हा त्याला सोडलं. ह्यामुळे त्याच्यासकट वस्तीतले बरेच सुरेश बरेच दिवस शुद्धीत होते आणि नीट वागत होते.

बचतगटाची ताकद अशा अनेक केसेसमधून सातत्याने आमच्या समोर येते. त्यामुळेच आता बचतगट हे नाव बदलून सगळीकडे त्याला स्वयंसहाय्यता गट म्हंटल जातं. कारण इथे बायका एकमेकींसाठी उभ्या राहतात, बचत तो बस एक बहाना है!

Wednesday 18 November 2020

जगात खरच भूत असत का?

जगात भूतं असतात असं मला खूप दिवस वाटत होतं. आम्ही लहान असतांना आमच्या घरी माझ्या वडिलांचे मित्र, पाटणकर काका यायचे. ते पहिल्यांदा जेव्हा कोकणातून आले तेंव्हा काही दिवस आमच्या घरी होते. पाटणकर काका खूप भारी होते. रात्रीचं जेवण झालं कि ते रोज आम्हाला गोष्ट सांगायचे. त्यांच्या बहुतेक गोष्टी भुताच्या असायच्या. मी तेंव्हा ७ वीत होते. त्या गोष्टी ऐकायला भारी वाटायच्या आणि भीती पण खूप वाटायची. आम्ही त्यांना विचारायचो, 'काका, भूत कशी असतात? ती कुठे रहातात? ती कुठून येतात?'

  काका सांगायचे,'जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल आणि ती मिळायच्या आधीच ती व्यक्ती मेली कि तिचं भूत होतं.'

  आम्हाला ते खरं वाटायचं.आम्ही भावंडं एक-मेकांना भूत होण्याची भीती घालून काम करून घ्यायचो.

  जगात खरच भूत असत का? ह्या प्रश्नाच उत्तर मला 'असू शकेल' असं वाटायचं. अगदी कांताची केस आणि कांता माझ्या आयुष्यात येई पर्यंत.

  ८६-८७ मध्ये नाशिकला एस.पी ऑफिस होतं. आमच्या कडील केसेस संदर्भात आमची एस.पी साहेबां बरोबर नियमित पणे बैठका व्हायच्या. अशाच एका मीटिंगमध्ये चर्चे नंतर असं ठरलं कि 'हुंडाबळीसारख्या केस मध्ये जळीत महिलेची मृत्युपूर्व जबानी घेताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी (शक्य असेल तर) तिथे हजर रहावं. कुसुमताईनी होकार कळवला. दोन दिवसातच संध्याकाळी ७-७.१५ च्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलमधून दूरध्वनीवरून सांगितलं,'ताई, एक ९२% जळीत महिला दाखल झाली आहे. तिचा जबाब घ्यायचा आहे. कोणाला तरी पाठवा.'

  आमचं ऑफिस तर ५.३० वाजता बंद झालं होतं. घरात पाहुणे आले होते. कुसुमताई जाऊ शकत नव्हत्या. त्यांनी मला जायला सांगितलं. नाही म्हणायची खूप इत्छा होती, पण हिम्मत होत नव्हती. जायची पण हिम्मत नव्हती. दिवसा ऑफिसमध्ये बसून समझोते करणं, तक्रार ऐकून घेणं, नोंदवून घेणं वेगळ आणि रात्री ८ वाजता एक जळालेल्या महिलेचं स्टेटमेंट घेणं वेगळ. काहीही झालं तरी मलाच जावं लागणार होतं. अनिछेनीच, पण गेले.

  आयुष्यात पहिल्यांदा सिव्हील हॉस्पिटलमध्ये जात होते आणि ते पण जळीत वार्डात! ते पण ९२% जळालेल्या महिलेचा जबाब नोंदवायला. मला सगळ्याचच खूप दडपण आल होतं. सिव्हील मध्ये सगळे वाटच बघत होते. आम्ही लगेचच कामाला लागलो. माझ्याबरोबर एक डॉक्टर, जुदिशिअल magistrate, आणि एक पोलीस खात्यातली व्यक्ती होती. मुलीचे आईवडील आणि इतर नातेवाईकांना बाहेर जाण्यास विनंती केली. त्या वार्डात आम्ही गेलो. ८ जळीत पेशंट होते. कमी जास्त प्रमाणात भाजलेले. वेदनेनी कण्हत होते. त्या खोलीत एक विचित्र दर्प होता. त्यांनी मला मळमळ आणि चक्कर येऊ लागली. खूप निग्रहाने आणि हिंमतीने मी उभी होते. पहिल्या नोंदी झाल्या-नाव,वय, इत्यादी माहिती घेऊन झाली. कांताला प्रश्न विचारत होते आणि ती जुजबी उत्तरं  देत होती.

  तिथे उभ्या एका नर्सनी तिला सांगितलं,'कांता, ह्या ताई आल्या आहेत. त्या महिलांना न्याय मिळवून द्यायचं काम करतात. तुला त्यांना काही सांगायचं आहे का?'

  डॉक्टरच्या मते जबाब नोंदवायचं काम झालं होतं. पण हि नवी माहिती मिळाल्यावर कांताला काहीतरी सांगायचं होतं. तिच्यात एक वेगळच बळ आल होतं. तिच्यात अजिबात शक्ती नव्हती. तिने 'ताई' अशी हाक मारली ती आम्ही ऐकली. तिचा आवाज खूप बारीक होता. आम्ही सगळे तिचं म्हणणं ऐकायला पुढे वाकलो. तो पर्यंत मी कांताला पाहिलंच नव्हतं. तिचा पूर्ण शरीर एका जाळीने झाकलेल होतं. त्या जाळीवर एक पांढरी चादर होती. आम्ही वाकल्यावर मला जे दिसलं ते भयानक होतं. भरीताच वांग भाजल्यावर त्याची जशी साल निघते तसं कांताच्या शरीरावरच कातडं निघालं होतं. मला चक्कर आली आणि उलटी होईल असं वाटलं. डॉक्टरनी मला धरलं म्हणून बर झालं.

  कांतानी जे सांगितलं ते भयानक होतं. तिचं एक वर्षापूर्वी दशरथ बरोबर लग्न झालं होतं. कांता १२वि पर्यंत शिकलेली, दशरथ एका पायानी थोडा अधू आणि ८ वी पास होता, पण कांताच्या बापाची गरीब परिस्थिती म्हणून हे लग्न झालं. पहिल्या दिवसापासून दशरथनी कांताचा कधी बायको म्हणून स्वीकार केलाच नाही. मनात येईल तेंव्हा जवळ जायचं, बाकीच्या वेळेला अपमान करायचा आणि तुच्छ वागणूक द्यायचा. दशरथची स्वतःची शेती होती आणि कांताच्या वडिलां पेक्षा परिस्थिती चांगली होती. काही दिवसा पूर्वी त्याची संगीताशी ओळख झाली. स्थळ तोलामोलाचं. तिच्या वडीलांची ती एकुलती एक मुलगी. त्यातून ते हुंडा द्यायला तयार होते. संगीता शिकलेली नव्हती आणि दिसायला पण बरीच होती, पण त्यांनी दशरथला काही फरक पडत नव्हता. त्याला संगीता बरोबर लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याला कांता कडून फारकत हवी होती. तो कांता कडे फारकत मागत होता आणि ती द्यायला तयार नव्हती. आधीच आपलेपणा नाही त्यात हा नवीन प्रॉब्लेम. त्याची दिवसेंदिवस चीड-चीड वाढत होती. तो कांताला उपाशी ठेऊ लागला, मारहाण करू लागला. पण कांता फारकतीच्या कागदांवर सही करेना. त्या दिवशी, दोन मित्रां बरोबर दशरथ दारू प्यायला. दारू बऱ्यापैकी चढली होती. त्यांनी कांताला जेवण वाढायला सांगितलं. ती जेवणाचं ताट घेऊन आली आणि दशरथनी पुन्हा फारकतीचा विषय काढला. कांता नी नकार दिल्यावर त्याला खूप राग आला. त्यात एक मित्र म्हणाला,"साली काय माजली आहे. दशरथ, तुला उलटून बोलते? मी तर तिला तुडवलीच असती."

  आधीच दारू चढलेली, त्यात मित्रांच्या समोर अपमान झाला. दशरथनी मारणं कांता साठी नवीन नव्हतं. पण आज त्याचा अवतार भीतीदायक होता. अर्वाच्य शिव्या देत त्यांनी कोपर्यातली काठी उचलली आणि मारायला (बडवायला) सुरुवात केली. तो मारत होता आणि वेड लागल्या सारखं 'फारकत दे, फारकत दे,' म्हणत होता. मी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेंव्हा समजलं कि तिला खांबाला बांधलं आहे. तिच्यात बोलायचे पण त्राण नव्हते. तिला दुरून कोणाचा तरी आवाज आला. "अरे ही तर मरून गेली. आता काय करायचं?" तेवढ्यात अंगावर काही तरी गार शिंपडल्या सारखं वाटलं. वाटलं आपण स्टोव्ह मध्ये रौकेल भरतोय. वास येतोय. तेवढ्यात अंगाची लाही-लाही झाली. ताई, मला न्याय हवा आहे."

  कांताचा आवाज क्षीण होत होता. ती श्वास घेण्यासाठी तडफडत होती. डॉक्टरनी आम्हाला बाहेर जाण्यासाठी हाताने खुणावलं. मी इतकी सुन्न झाले होते कि पुढची १० मिनिटे काय झालं मला काही समजलंच नाही. डोळे उघडले तेंव्हा जवळ एक नर्स होती. तिच्या हातात पाणी होतं आणि ती विचारत होती,'ताई, कस वाटतंय? बऱ्या आहात का? थोडं पाणी घेता का?' मी त्यांना विचारलं,'कांता?' त्यांनी खुणावून सांगितलं,'ती गेली'. मला खूप वाईट वाटलं. माझा आणि तिचा काही संबंध नव्हता कि ओळख. पण मला खूप वाईट वाटलं. अगदी जवळचं कोणीतरी गेल्यासारखी मी खूप रडले.

  माझी अवस्था बघून पोलिसांनी मला घरी सोडलं. घरी सगळे वाटच बघत होते. काय पाहिलं काय ऐकलं हे कथन करताना मी माझ्या नकळत खूप रडले. मी पुढचे २-३ दिवस न धड झोपू शकले कि जेऊ शकले. दुसर्या दिवशी मी आदल्या दिवशी जे ऐकलं, पाहिलं ते लिहून स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात पाठवलं.(हे कुसुमताई च्या सांगण्यावरून).

  मनात एक विचार आला, आता कांताचं भूत होईल का? झालं तर ती त्याला चांगली अद्दल घडवेल. कांता आणि तिचं भूत जे करायचं ते करतील. पण आपण आपल्या बाजूनी जे शक्य आहे ते करून कांताला न्याय मिळवून द्यायला मदत करायची, असं मी ठरवलं. मला by this time, कळल होतं कि भूत वगेरे काही नसतं, पण कोणत्याही मार्गांनी दशरथला शिक्षा व्हावी हि तीव्र इत्छा होती. म्हणून बहुतेक विचारांत भुताचा आधार घेतला. (इतक्या नव-विवाहित मुली हुंडाबळी होतायत, सुखी संसाराची स्वप्नं बघत लग्न करून सासरी जातात आणि अतोनात छळ सहन करून माहेरी येतात, किंवा आत्महत्या करतात, त्यांची कधी भूतं झाल्याचे ऐकले नाही)

पुढे दशरथ विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वर्षभरात केस बोर्डावर आली, चालली आणि दशरथला जन्मठेप झाली.


Wednesday 11 November 2020

पट्ट्याची भाषा आणि ताकत

एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये एक बाई आली. साधारण ३२-३५ वय असेल. शिडशिडीत बांधा. ९ वारी साडी नेसलेली, तिच्या डोक्यावर एक रिकामी टोपली होती. तिच्या सांगण्यावरून समजलं कि ती  दारोदार जाऊन फळ विकायची, मुख्यता केळी. ऑफिसमध्ये आल्यावर डोक्यावरची रिकामी टोपली खाली ठेवली आणि खाली बसत म्हणाली," ताई, मला मदत करा. मी विधवा आहे. मला एक १४ वर्षांची मुलगी आहे. आम्ही दोघी एका झोपडीवजा घरात रहातो. घरखर्च भागवण्यासाठी मला काम करावंच लागतं. मी फळ विकायला बाहेर जाते, तेंव्हा ती घरात एकटीच असते. आमच्या घराच्या जवळ राहणारा एक माणूस घरी येऊन तिला त्रास देतो. दारावर थाप मारतो, जोरजोरात हाका मारतो. ती खूप घाबरून जाते. ताई, तुम्ही प्लीज काहीतरी करा. मला आणि माझ्या मुलीला वाचवा!"

आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि,'तिला आम्ही मदत नाही करू शकणार. तिने पोलिसांची मदत घ्यायला हवी. हे काम पोलिसांच आहे'.

त्यावर 'पोलीस काहीच मदत करत नाहीत. मी साहेबांना भेटून आले' असं तिनं सांगितलं.

झालं! कुसुमताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ५ जणी तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. संध्याकाळचे ५-५.३० वाजले होते. साहेब चौकीत होते. आम्ही आमची ओळख करून दिली आणि त्या महिलेची अडचण थोडक्यात सांगितली.

पोलीस इन्स्पेक्टरला काय घडलं असेल हे लक्षात यायला एक क्षण पण लागला नाही. त्यांचं ते रोजचच काम होतं. आम्हीच नवखे होतो. आमचं योग्य पद्धतीने (बसायला खुर्ची आणि पाणी) स्वागत करून त्यांनी त्या बाईची हजेरी घ्यायला सुरुवात केली."बाई, हा कोण माणूस? तो तुला कस ओळखतो? तुमची आधीची काही ओळख, काही व्यवहार, काही संबंध आहे का? असं आपल्याकडे कोणी कोणाला त्रास देत नाही. काय असेल ते खरं खरं सांग."

केलीवाल्या बाईनी तिची त्या माणसाशी काहीच ओळख नाही असे निक्षून सांगितल्यावर साहेबांनी प्रश्न विचारायची पद्धत बदलली. त्यांनी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि हवालदाराला सांगितलं,'माझा पट्टा आण. खूप दिवसापासून त्याला पोलिश करायचं होतं. राहून गेलं.'

हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती बाई इन्स्पेक्टरच्या पाया पडून,' साहेब माझं चुकलं. मला आता आठवलं, माझी मंजू ५ वर्षांची होती तेंव्हा सोमनाथ मला भेटला होता. त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणि माझा धनी मेला होता. आमच्या कडे बघणारं, कमावणार कोणी नव्हतं आणि त्याला भाकर खाऊ घालणारं! आम्ही संगती रहायला लागलो. ७-८ वर्षं छान मजेत गेली. ६-८ महिन्यांपासून तो दारू पिऊ लागला आणि सगळी घडी विस्कटली. मी त्याला घरातून हाकलून दिला. तेंव्हा पासून तो आम्हाला त्रास देतोय.'  

"म्हणजे, तुला आणि तुझ्या मुलीला तो आधार देत होता, तुम्हाला दोन वेळेचं खाऊ घालत होता, तेंव्हा तो तुझ्या घरी आलेला तुला चालत होता. आणि आता तुझे बरे दिवस आले आहेत आणि दारूच्या आहारी जातोय म्हणून तू त्याच्या बद्दल खोटी तक्रार नोंदवायला आली आहेस? तो नक्की काय त्रास देतो? देतो का नाही देत हे तू ह्या संस्थेतल्या बायकांना खरं काय ते सांग."

" तो फुकटची भाकर खायला येतो ते मला चालणार नाही. मी एकटी तरी कोणा कोणाला आणि कशी पुरी पडणार? त्यांनी चार कष्ट करावेत, चार पैसे कमवावेत. मग तो आला तरी चालेल."

"पण त्याचावर हि वेळ कशामुळे आली? तो काय काम करत होता? ते काम कशामुळे सुटलं?"

ह्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळण्यासाठी ती उठत, आम्हाला उद्देशून म्हणाली," ताई, तुमचे आणि साहेबांचे लई उपकार झाले. तुमच्या सारख्या मोठ्या लोकांनी वेळ काढून माझं म्हणणं ऐकून घेतलत. लई उपकार साहेब." असं म्हणत ती चौकीच्या बाहेर जाणार तोच इन्स्पेक्टर साहेबांनी फक्त 'उत्तर' एव्हडाच शब्द उच्चारला आणि ती मटकन खालीच बसली. त्यांच्या आवाजात झालेला बदल, आवाजातील जरबच अशी होती कि तीच काय आमची पण खुर्चीतून उठायची हिम्मत झाली नसती.

"साहेब, सोमनाथ गवंडी काम करायचा. चांगला रोज कमवत होता. आम्हाला वाटलं आमच्या दोघांच्या कमाईत, त्यात थोडं कर्ज काढून आपल्या मालकीचं एक झोपडी घेता येईल. त्याच्या मालकाकडून आणि दोन मित्रांकडून त्यांनी उसने पैसे आणले. आमचा किमतीचा अंदाज चुकला. त्यांनी व्याजानी पैसे आणले. त्याची परतफेड आम्ही करू शकलो नाही. कर्जाचे हप्ते वसूल करायला माणस घरी यायला लागली. त्याला धमक्या द्यायला लागली. तो घाबरून पळून गेला. काय करावं मला काही समजले नाही. रोज दारी घेणेकरी येत होते, शिव्या देत होते, अचकट विचकट बोलत होते. त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला सुचला. मी ती झोपडी विकली, सगळ्यांची देणी फेडली आणि ती वस्ती सोडून मुलीला घेऊन दुसरी कडे राहायला लागले. त्याचा काही पत्ताच नाही. तो जिवंत आहे कि नाही काही कळायला मार्ग नाही. तो एक वर्षभरानंतर आला. तो पण खूप दारू पिऊन. त्याला कशाचीच शुद्ध नव्हती. तो जबरदस्ती घरात शिरत होतं, मी आरडा ओरडा केला. शेजारी आले आणि त्यांनी त्याला मारून हाकलून दिलं. मी त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही कारण मला तो माझ्या घरात अश्या अवस्थेत नको होता."      

तिच्या डोळ्यात पाणी आल. ती विनंती करत म्हणाली," साहेब, ताई, सोमनाथ वाईट नाहीये. तुम्ही त्याला समजून सांगा. तो तुमचं ऐकेल."

सोमनाथला बोलावून, त्याला समजणाऱ्या भाषेत त्याला सांगायची, समजवायची जबाबदारी साहेबांनी घेतली. त्यांनी दोघांमध्ये समझोता करून दिला.

एक दिवस केळीवाली, सोमनाथला घेऊन ऑफिस मध्ये भेटायला येऊन गेले.

आम्ही सगळे अवाक! ही बाई आपल्याशी खोटं का बर बोलली असेल? तिने आपल्याला अर्धवट माहिती का सांगितली? असं करण्यामागे तिचा काय हेतू असेल? पण जशी वर्षं उलटत गेली, आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो कि तक्रार नोंदवायला आलेली व्यक्ती क़्वचितच पूर्ण खरं बोलते. ते पूर्ण खोटं पण नसतं. ते अर्धसत्य असत.

पट्टा घेरे जरा, ह्यातून त्या बाईला काय समजलं? त्याचा अर्थ काय? त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेले नसते तर माझ्या ज्ञानात भर पडली नसती. पोलिसांची लोकांकडून खरं वदवून घेण्याची कला भारी होती. मला पट्ट्याची भाषा आणि ताकत, नाहीतर कशी कळली असती?

Wednesday 4 November 2020

आर्थिक स्वावलंबनाने महिला सक्षमीकरण होतं का?

 मला बरेच दिवस अशी खात्री होती कि आर्थिक स्वावलंबन हा एक महिला सक्षमीकरण साधण्याचा हुकमी मार्ग आहे. बाई कमवायला लागली कि तिला कुटुंबात समाजात प्रतिष्ठा व स्थान प्राप्त होतं. तिच्या विचारांना व मतांना महत्व प्राप्त होतं. तिच्या भावनांची घरातले कदर करतील. पण हा माझा भ्रम होता.

आमच्या उद्योगकेंद्रात तीन कंपन्यांमधून काम यायचं. व्ही.आंय.पी, जी.पी.इलेक्ट्रॉनिक, आणि फीनोतेक्स! सगळ्या मिळून ७० बायका काम करायच्या. सर्वजणी वेळेवर यायच्या. सकाळी ९ वाजता काम सुरु करायचो. दुपारी १ वाजता जेवणाची सुट्टी आणि संद्याकाळी ६ वाजता दिवस संपायचा. अर्जंट मटेरियल द्यायचं असलं तरच उशिरापर्यंत महिला थांबायच्या. बहुतेक महिला सिडको परिसरातील असल्याने ज्यांना हवं त्या जेवणाच्या सुट्टीत घरी जायच्या. व्ही.आय.पी. विभागात काम करणारी सीमा पण रोज जेवणाच्या सुट्टीत घरी जायची व घरून वेळेवर यायची.

संस्थेत काम करणाऱ्या महिलांसाठी काही गोष्टी आम्ही करायचो. त्यांना ई.एस.आय.सी. ह्या शासकीय योजनेचा लाभ मिळावून देण्यासाठी त्यांच्या नावाची त्या कार्यालयात नोंद केली. ह्या योजनेमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या. वर्षभर लागणारं धान्य भरण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करत होतो. त्यांचे बचत गट सुरु केले होते. ह्या गटांच्या माद्यमातून त्या त्यांच्या कौटुंबिक गरजेप्रमाणे कर्ज काढत व ते सुलभ हपत्यात फेडत होत्या. ह्यातून त्यांना आर्थिक व्यवहार व बँकेच्या व्यवहाराची चांगली माहिती झाली होती. एकूण संस्थेत येऊ लागल्या पासून त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.

रोजच्या सारखी त्या दिवशी दुपारी ३.३०  वाजता टी ब्रेंक झाला. अचानक व्ही. आय.पी विभागातून आरडा ओरडा ऐकू आला. जाऊन पाहिल तर समजलं सीमा चक्कर येऊन पडली आहे. थोड्या वेळानी ती शुद्धीत आल्यावर तिला दोघींसोबत घरी पाठवलं. तिची पाठवणी केल्यावर सीमा आणि तिच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. त्या विभागातील मंदाताईनी दिलेली माहिती चक्राऊन टाकणारी आणि राग आणणारी होती. सीमाच्या घरात एकूण ७ माणस! ती, तिचा नवरा, त्यांची ४ मुलं तिची सासू व नणंद. खाणारी सात तोंड आणि कमावणारी हि एकटी. घर म्हणजे १०*१५ ची खोली! घरातली सगळी काम ती एकटीच करायची. पहाटे ४-४.३० ला उठून, रात्रीची भांडी घासायची. सगळ्यांसाठी चहा नास्ता करायचा. सगळ्यांसाठी दुपारचंजेवण बनवायचं, केरवारे करून, धुणं धुऊन धावत उद्योगकेंद्र गाठायची. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी जायची. काही जेवण उरलं असेल तर खायची. नाहीतर भांडी घासून पाणी पिऊन कामावर यायची. इतकी स्वार्थी आणि नालायक माणस असू शकतात? माझा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या व्यक्ती मुळे घर चालत, त्यांना दोन वेळा पोटभर जेवण मिळत, त्या बाई साठी चार घास वगळावेत, तिला घरातल्या कामात मदत करावी असं घरातील एकालाही वाटू नये? माझ्या जीवाचा संताप होत होता. तिचं नशीब म्हणून सोडून देणं मला मान्य नव्हतं! माझ्यातील सत्सत्विवेकबुद्धी मला शांत बसू देत नव्हती. ऑफिसचं काम संपवून मी मंदाताई बरोबर तिच्या घरी गेले. घरातील दृश्य तर आणखीन संताप आणणारं होतं. नवरोजी शेषशाही भगवान झाले होते, सासू व नणंद गप्पा मारत होत्या, मुलं खेळत होती आणि सीमा, नुकताच संपलेल्या चहाचे कप धुवून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. मला दारात पाहिल्यावर तिने माझं स्वागत केलं आणि नवऱ्याला नीट उठून बसण्यासाठी खुणावलं. तो नाईलाजान उठून बसला. सीमाच्या तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मोर्चा सरळ तिच्या नवऱ्याच्या दिशेने वळवला.

"आपण शंकरराव ना? नमस्कार. मी हेमा पटवर्धन."

"काय ताई? मी ओळखतो तुम्हाला. खरं सांगायचं तर निम्मं सिडको तुम्हाला ओळखतं. तुम्ही सीमा सारख्या महिलांना काम देता, त्यांनी खूप लोकांची मदत होते. ताई तुम्ही उभ्या का? बसाना."

असं म्हणत त्यांनी पलंगावर जागा करून दिली.

"शंकरराव, तुम्ही सध्या काय काम करता? म्हणजे नोकरी कुठे करता?"

"मी सध्या घरीच आहे."

"कधीपासून?"

"वर्ष होऊन गेलं. ताई काही कामच मिळत नाही. म्हणून घरीच बसलोय."

"आणि तुमची आई आणि बहीण? त्यापण काही करत नाहीत का? घरीच असतात का?".

"हो"

"म्हणजे तुमच्या घरात कमावणारी एकच व्यक्ती आहे. सीमा! आणि तिची तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला सर्वाना ऐयत खायला मिळतंय पण तिला काही होतंय का, तिची तब्येत ठीक आहे ना, ह्याची काळजी  करण्याची तुम्हाला गरज वाटत नाहि. आज ती कामावर असतांना चक्कर येऊन पडली. त्याला जबाबदार कोण? तर तुम्ही सगळे! तिच्या जवळची माणस! तुम्हाला तिच्या जीवाची काळजी नाही. ती जिवंत आहे का मेली ह्याची तरी खबर घ्याल कि नाही? अरे!  तिच्या मुळे तुम्हाला ऐतं बसून खायला प्यायला मिळतंय न? जी बाई आपल्यासाठी एव्हडी राबते तिच्यासाठी दोन घास वगळण्या इतकीपण माणुसकी तुमच्यात शिल्लक नाही का? मला मान्य आहे कि हा तुमचा घरचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल 'तुमचा काय संबंध? तुम्ही ह्याचात मध्ये पडू नका.' पण मला हे मान्य नाही. मी मध्ये बोलायला नको. पण काय करू? तुम्हा सर्वांची लाज वाटते आणि चीड येते. काम करायची इच्छा असणार्याला काम मिळतच. ८ दिवसानंतर पुन्हा येते भेटायला. सीमा विश्रांती घे. बर वाटलं कि ये."

दुसर्या दिवशी, 'आता मी बरी आहे म्हणत सीमा कामावर रुजू झाली. तिच्या घरच्या लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडण्याची मला अजिबात आशा नव्हती. ऑफिसच्या जवळ रहाणार्या जाधवबाईना सांगून तिच्या दुपारच्या जेवणाची, एक महिन्यासाठीची सोय केली. ह्या सगळ्यामुळे सीमाच्या तब्येतीत फरक दिसू लागला.

हे सगळं झाल्यामुळे उद्योग्केंद्रातील बायका टेन्शनमध्ये! त्या मला सांगत होत्या,"ताई जरा सांभाळा. सीमाचा नवरा खूप डेंजर माणूस आहे. तुम्ही बसनी येता. त्यांनी वाटेत तुम्हाला काही केलं तर? नाहीतर तुम्ही ८-१० दिवस नका येऊ. आम्ही घेऊ सांभाळून.'

त्यांना माझ्या बद्दल वाटणाऱ्या भावना मी समजू शकत होते पण शंकररावला घाबरण्याच काही कारण नाही हे माझ म्हणणं त्यांना पटत नव्हतं आणि त्यांचं मला. शेवटी असं ठरलं कि सायंकाळी दोघीजणी माझ्या सोबत बस स्टेन्ड पर्यंत येतील. असं जवळ जवळ चार आठवडे चाललं. एक दिवस अचानक एका गल्लीतून शंकरराव,"ताई, ताई" अश्या हाका मारत सायकल चालवत आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. ते जवळ आले, सायकल बाजूला लावली आणि रस्त्यात माझ्या पाया पडले. मी व माझ्या सोबतच्या दोघी आश्चर्यचकित झालो. काय बोलावं आणि काय करावं क्षणभर काही सुचेना. भानावर येऊन म्हणाले,"शंकरराव, उठा! हे आता काय नवीन नाटक? असा तमाशा करू नका. आपण रस्त्यात आहोत ह्याचं भान ठेवा."

स्वतःला सावरत, शंकरराव उठून उभे राहिला. त्यांनी पिशवीतून एक पेढ्याचा बॉक्स काढला. तो माझ्या हातावर ठेवत म्हणाले," ताई, त्या दिवशी तुम्ही येऊन गेलात. आम्हाला खूप बोललात. मी त्यावर विचार केला. मला तुमचं म्हणणं पटलं. मी काम शोधायला लागलो आणि आईला अनो ताईला घरातल्या कामात मदत करायला पण सांगितलं. ताई, मला नोकरी मिळाली. वाचमनची नोकरी आहे. आज पहिला पगार झाला. अजून घरी पण गेलो नाही. आधी तुम्हाला पेढे देण्यासाठी थांबलो होतो."

आपल्या कुठल्या वागण्याचा आणि बोलण्याचा कोणाला कसा उपयोग होईल काही सांगता येत नाही. त्या दिवशी आपण सीमा च्या घरातील लोकांना बोललो ते बरंच झालं, माझा मन तरी शांत झालं. पण त्या दिवशी आपण थोडं जास्तच  बोललो असं एक क्षण वाटलं खरं. पण उपाशी राहणं काय असत हे मी २-३ वेळा अनुभवलंय.

आमच्या सहामाही परीक्षा चालू होत्या. ११-१ भूमितीचा पेपर होता. परीक्षेचा अभ्यास म्हणून धड नाश्ता केला नव्हता आणि २ पर्यंत जेवायला घरी पोहोचू म्हणून टिफिन घेतला नव्हता. १२.३० च्या सुमारास announcement झाली. 'शहरात दंगल झाली आहे. जे विद्यार्थी बसनी प्रवास करणार असतील किंवा लांब रहात असतील त्यांना घरी पोहोचवायची व्यवस्था शाळा करेल.' मला शाळेत बाईनी थांबवून ठेवलं. शाळेपासून घर ५.५० किमी दूर होतं. त्या दिवशी सगळीकडेच नुसता गोंधळ होता. आम्हाला घरी सोडायला संद्याकाळी ६ वाजता पोलीस व्हान आली. सर्वाना सोडून झाल्यावर माझा नंबर आला. मी रात्री ८.३० वाजता घरी पोहोचले. भुकेनी जीव कासावीस झालं होता.

बाकीच्या दोन्ही घटना कोलेज मधल्या. एफ.वाय. ला असतांना नाव-निर्माण आंदोलन झालं होतं. त्यात अडकलो होतो. आणि दुसरी घटना त्याच वर्षी जयप्रकाश नारायण याचं भाषण ऐकायला गेले होते, तेंव्हा. स्वप्नात विचार केला नसेल एव्हडी गर्दी जमली होती, त्यांचं भाषण ऐकायला. भाषण संपल्यावर घरी जायला वाहन मिले ना. शेवटी निघालो चालत. उपाशी-तापाशी, दमलेलो, ५ किमी चालून घरी पोहोचलो. त्या प्रसंगांपासून मनात उपाशी राहण्याची भीती आहे आणि उपाशी ठेवण्याची चीड आहे.

Thursday 15 October 2020

रोशन की जिंदगी में रोशनी आयेगी?

महिला हक्क संरक्षण समितीत आजपर्यंत विविध काम केली. अनेक जबाबदार्या स्वीकारल्या. त्यातील एक उद्योगकेंद्राची! सातपूर व अंबड येथील कंपन्यांमध्ये जाऊन, तेथील साहेबांना भेटून कामे मिळवणे. त्यामागील प्रेरणा आणि विचार १९८८-८९ पर्यंत सोडविलेल्या केसेस मधून पुढे आला. आमच्या अस लक्षात आलं कि सासरी त्रास होतो, नवरा मारहाण करतो, सांभाळत नाही, वेळी अवेळी मारहाण करून मुला बालांसकट घरातून हाकलून देतो तेंव्हा नाईलाजाने ती महिला माहेरी मदत मागायला येते. ३-४ मुलांना घेऊन माहेरी आलेली मुलगी ही पालकांसाठी व त्यांच्या भावांसाठी एक नकोशी जवाबदारी असते. (काही नशीबवान मुलींचे पालक त्यांचा स्वीकार करतात) पण बहुतेक वेळा तिचं आणि तिच्या मुलांच ओझं वाटतं. काही वेळा कुटुंब मोठं आणि कमावणारी व्यकी एक, त्याच्या उत्पन्नात भागत नाही म्हणून देखील चिडचिड होते. आणखीन एक कारण म्हणजे तिच्या लग्नात दिलेला हुंडा! काही केसेसमध्ये भाऊ बोलून दाखवतात कि तुझ्या लग्नात तुझं जे काही होतं ते देऊन झालं आहे. आता ते घर तुझं आहे. आल्या सारखी चार दिवस माहेरी रहा आणि आपल्या घरी जा. आणखीन एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती म्हणजे अनेक कुटुंबात नवऱ्याच्या उत्पन्नात घरखर्च भागत नाही. बाईनी चार पैसे कमावले तर ती कुटुंबाला  हातभार लाऊ शकेल आणि वेळप्रसंगी तिचे उत्पन्न तिला जगायला मदतरूप ठरेल.

  बघता बघता ३ मोठ्या कंपन्यांची कामे आम्हाला मिळाली. आम्ही ६५-७० महिलांना रोजगार देऊ लागलो. अगदी फेक्टरी सारख काम सुरु झालं. सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यन्त काम चालायचं. काम चोख अगदी मागणी प्रमाणे पुरवठा करत होतो. साहेबलोक पण खूष होते. बघता बघता सिडकोतील लोकांना माहित झालं कि गरीब व गरजू महिलांना संस्था काम देते. आमच्या उद्योगकेंद्राच्या  आणखीन दोन जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे काम घराच्या जवळ होतं, दुसरं महिलांची संस्था आणि तिसरं वेळेवर मिळणारा मोबदला. बायका खूष, आम्ही खूष आणि कंपनीतले साहेब खूश!

  त्या दिवशी मला सिडकोतील ऑफिसला जायला उशीर झाला. जवळ जवळ १२ वाजले. केलेल्या कामाची बिल करायचं काम काल अर्धवट झालं होतं ते पूर्ण करायला सुरुवात करणार तेवढ्यात अलकाताई एका बाईला, रोशनला घेऊन आल्या. रोशन मला भेटण्यासाठी सकाळी १०पसुन थांबली आहे असं त्या म्हणाल्या.

  अलकाताईनी रोशनला उद्देशून सांगितलं, "हेमाताईसे बात करले. आमच्या कडे जागा नाहीये. गरजेप्रमाणे बाया घेऊन झाल्या आहेत. मी तुला सकाळपासून हेच समजावायचा प्रयत्न करतीये. ताई काही जादू करणार आहेत का? जागाच नाही तर त्या तुला काम कुठून देतील?"

  "ताई मी तिला खूप समजावलं, पण ती ऐकतच नाहीये. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही असंच आल्यापासून घोकतीये.

  मी काही म्हणायच्या आत रोशनने माझा हात तिच्या हातात घट्ट धरला आणि म्हणाली,"ताई, नही मत कहो. बहुत उम्मीद लेकर तुम्हारे पास आई हु. घरमे बच्चे कलसे भूखे है. मैने तो दो दिनसे कुचभी नही खाया. ताई कुचभी काम दो. मै झाडू मारूंगी, टोईलेट साफ करूंगी, जो बोलोगे वो करूंगी. मगर ताई मेरेको ऐसेही वापीस मत भेजो." इतक बोलून ती रडायला लागली. काय बोलावं, काय करावं, मला काही सुचत नव्हतं.

  मी रोशानला सांगितलं, "आधी घरी जा आणि तुझ्या मुलांना घेऊन ये. तुझ्या कामाचं काय करायचं ते नंतर बघू. रोशन गेल्यानंतर मी अलकाताई आणि मंदाताईना बोलावलं. आत येताना दोघींनी एकाच सुरात सांगितलं, "ताई, आपल्याकडे अजिबात व्हेकन्सी नाहीये. कालच आपण तिन्ही विभागात प्रत्येकी दोन बायका घेतल्या आहेत. त्या छान काम करतायत. तुम्ही त्याच्यात काही प्लीज बदलू नका.' सेक्शन सुपरवायसर म्हणून त्यांचं दुख मी समजू शकत होते. त्यांच्या युनिट मध्ये बदल होणार नाही असं आश्वासन दिलं, तेंव्हा कुठे आमचं बोलणं पुढे सरकलं. मी त्यांना समजावला कि तिला आज कामाची, मिळणाऱ्या पैशांची खूप गरज आहे. तिला काय काम द्यायचं, तिचा पगार कशातून द्यायचा हे मी बघीन. तुम्ही फक्त तिला सांभाळून घ्या. आणखीन एक, आपण आपल्या बरोबर तिला व तिच्या मुलांना जेवायला बोलवूया.

  रोशन तिच्या मुलांना घेऊन आली. ती येईपर्यंत एक वाजून गेला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही जेवणाची सुट्टी केली. जेवायला बसतांना आम्ही रोशनला व तिच्या मुलांना आग्रहानी जेवायला बसवलं. मुलं पोटभर जेवली. रोशननी पण नको नको म्हणत चार घास खाल्ले.जेवण झाल्यावर सर्वजणी आपल्या सेक्शनमध्ये गेल्या. रोशनची मुलं बाहेर अंगणात गेली. रोशानला सांगितलं आता तुझी काय अडचण आहे ती सविस्तर सांग.

 

  रोशनच्या सांगण्यातून मला जे समजलं ते,

  तिचे लग्न १० वर्षापूर्वी अब्दुलशी  झालं होतं. अब्दुल गवंडीकाम करायचा. राहायला झोपडी व मर्यादित उत्पन्न. त्याला तीन शोक होते- दारू,जुगार आणि बाई! सर्व कमाई त्यात खर्च व्हायची. पैसे कमी पडले कि तो राग रोशनवर निघायचा. उपासमार व मारहाण हि नित्याचीच होती. त्याच्या मर्जीप्रमाणे वेळी अवेळी शरीरसुखाची अपेक्षा पूर्ण करावी लागत होती. तिची ३ मुलं आज जिवंत आहेत व तिची ३ मुले वेळेवर उपचार न झाल्यामुळे मरण पावली. आईवडील व भाऊ कशातच लक्ष घालत नव्हते. त्रास असह्य झाला की लेकरांना घेऊन माहेरी आशेनी जायची. पण एकदापण त्यांनी कधी जावयाला समजावलं नाही का हिला एखादी रात्र ठेऊन घेतलं नाही. खरं सांगायचं तर तिच्या माहेरची परिस्थिती पण बेताचीच होती. वडिलांचं इस्त्रीच दुकान. भाऊ पण वडिलांसोबत त्याच दुकानात काम करत होता. ८ वर्षांपूर्वी भावाचं लग्न झाल होतं. त्यांला पण तीन लेकरं होती. राहायला झोपडी. तो तरी काय आणि कशी मदत करणार. चार महिन्यांपूर्वी तिच्या नवर्यानी तीला बेदम मारहाण करून माहेरी आणून सोडलं. "परत पाठवू नका. मी तिला घरात घेणार नाही." असं म्हणाला. तिचे वडील काही समजवायला गेले तर अब्दुल म्हणाला, "मै तुम्हारी रोशनको तलाक़ देता हुं." त्या नंतर ३ वेळा तलाक़ म्हणून तो निघून गेला. आता रोशन कुठेच जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी नाईलाजाने तिला घरात रहायला परवानगी दिली. आपण इथे सगळ्यांना नकोसे आहोत हे कळत होतं पण तिचा नाईलाज होता. रोशननी घरातली सर्व काम करायची असं ठरलं. घरातील ११ माणसांचा स्वैपाक, कपडे धुणे, भांडी घासणे व इतर लहान मोठी पडतील ती कामे ती मुकाट्यानी करत होती. वहिनी काढून देईल तेवढच  जेवण बनवायचं. सर्वांच्या शेवट जे उरेल ते रोशनला मिळायचं. काही दिवसांनी तिच्या मुलांना पण मोजकच जेवण द्यायचं ठरलं. परवा भावाच्या मुलांबरोबर माझ्या मुलांनी शाळेत जाण्यासाठी हट्ट केला. तेंव्हा त्यांची मामी म्हणाली,"मेरा अकेला मरद क्या क्या करेगा? ११ लोगोंको खिलावो, उनको सम्हालो, और अब इनको पढने भेजो. इत्ता बेठके खाते हो. थोडा काम करो और कमाई करो."

  तर अशी हि रोशन! दुसर्या दिवसापासून आमच्या उद्योगकेंद्रात येऊ लागली. तिला तिच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. ती मन लाऊन काम करत होती. पहिला महिना तिला नेमकं काय काम सांगावं, हि थोडी अडचण होती. दुसरं म्हणजे तिला पगार कश्यातून द्यावा हे समजत नव्हतं. मी आमच्या अध्यक्षा मा.कुसुमताईना विचारून माझं त्या महिन्याचं मानधन तिला द्यायचं ठरवलं. संस्थेत येणारं काम वाढतच होतं. पुढील महिन्यापासून तिला एका विभागात (सेक्सन) रुजू करून घेतलं. बघता बघता रोशनची आर्थिक परिस्थिती सुधारली. ती घरात भावाच्या बरोबरीने पैसे देऊ लागली. महिला हक्क संरक्षण समिती तर्फे उद्योग केंद्रातील महिलांसाठी एक उपक्रम राबवला जायचा. त्यांना वर्षाला लागणारं धान्य भरायला आर्थिक मदत करणे. त्याचा रोशन व तिच्या कुटुंबाला खूप उपयोग झाला.

  आज बरेच दिवसांनी मला रोशन भेटली. (१९९४ मध्ये बंगलोर येथे "बाल हक्क परिषद, ९५ साली बेईजिंग, चीन, येथे झालेली अंतर-राष्ट्रीय महिला परिषद आणि महिला हक्क संरक्षण समिती च्या कामाच्या संदर्भात झालेला १९९७चा कॅनडा दौरा, त्याची पूर्वतयारी व नंतरचं अनुभव कथन, रिपोर्टिंग ह्यात ३ वर्षं खूप गड-बडित गेली. ह्या संदर्भातील बंगलोर, अमदाबाद, पुणे, दिल्ली, उदैपूर अश्या वेग-वेगळ्या शहरांमध्ये झालेल्या मिटींग्स ह्या सगळ्यामुळे बाकी कशालाच वेळ मिळाला नाही) भेटल्यावर मी तिची विचारपूस केली, "घरी सर्व ठीक आहे न? मुलं शिकतायत ना?" असं विचारल्यावर ती पटकन म्हणाली," ताई अब घरमे मेरीही चलती है. घरका खर्चा चलाती हुं. यहा कामपे लगी. पहेले दो महिनेका पगार बच्चोपे खर्च करी. सबको एक जोडी नये कपडे लिये. अम्मी अब्बू भाई भौजाई सबके वास्ते कुछतो लाई. घरमे सब खुश थे. फिर मैने भाई और अब्बू को समझाया ऐसे कित्ते दिन बच्चोको लेकर झोपडेमे रहेंगे. वन रूम किचन भाडेसे लेकर उसमे रहेंगे. अच्चे लोग आपके पास आएंगे. उससे अपनीही आमदानी बढेगी. पहेले मेरी बात कबूल करना उनके लिये थोडा मुश्कील था. मगर बादमे मान गये. अब हम सब दो रूम किचन वाले मकानमे रहेते है. अब सब अछेसे चल रहा है. आपने बोले वैसे मेरे बच्चोके साथ भाईके बच्चे भी सिखाती हुं. सबके साथ अच्छेसे रेहेती हुं. ताई, बहोत बार सोचती हुं, अगर आप मुझे नही मिलती तो मेरा और मेरे परीवारका क्या होता"?

असे अनुभव आले की दर वेळी वाटतं, की अजून खूप काम करायचं बाकी आहे. महिला हक्क संरक्षण समिती आपल्या परीने शक्य ते काम करतेच आहे. आजवर त्यात अनेक हितचिंतकांची साथ लाभली आहे. अशीच साथ यापुढेही लाभू दे, म्हणजे गरजू महिलांपर्यंत आपल्याला मदत पोचविता येईल.