Wednesday 25 November 2020

बचत तो बस एक बहाना है!

महिला हक्क संरक्षण समितिनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले. सगळेच गरजेचे होते. त्यातील एक होता बचत गट! बचत गट सुरु करण्यापूर्वी आम्ही बचत खात ह्या नावानी काम करत होतो. त्या विभागाची जबाबदारी औटेबाई बघत होत्या.

बचत खात्यात गरीब, कष्टकरी कुटुंबातल्या महिला त्यांना जमेल तशी बचत करायच्या. २ रुपये रोज,२५/- रुपये आठवडा, १००/- रुपये महिना अशी जिला जशी जमेल तशी ती बचत करायची.तिला गरज पडेल तेंव्हा ह्या बचतीवर कर्ज घ्यायची, कर्जाचे हप्ते नियमित पणे परत पण करायची.ह्या सर्व पैश्यांचा हिशोब ठेवणं बरंच जिकिरीच तर होतंच, पण रोजचं कलेक्शन करणं अवघड होत होतं. दोन वर्षं सातत्यानी हे चालवल्याने महिलांना बचतीची सवय लागली खरी, पण आमच्या असं लक्षात आल कि ह्यांनी महिलांना बँकेचे व्यवहार समजत नाहीयेत आणि त्यांची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढत नाहीये. 'एकीच्या बळाची ताकत' त्यांच्या लक्षात येत नाहीये. ह्यातूनच १२-१५ महिलांचा बचत गट सुरु करण्याचा विचार पक्का झाला. (२००० च्या सुरुवातीला संस्थेचे एकूण ४५ गट कार्यरत होते.) बचत गटाची रचना निश्चित केली. एका गटात कमीत कमी १०-१२ महिला असाव्यात. व जास्तीतजास्त २० ची संख्या असावी. ह्या महिलांमधुनच तिघींची गट प्रमुख म्हणून निवड करतील. गटाच्या नावांनी बँकेत खात उघडून, त्याचे सर्व व्यवहार गटप्रमुख बघतील. बचतीची रक्कम जमा करणे, त्याचा हिशोब ठेवणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे, दर महिन्याला सभासदांची मीटिंग घेऊन त्यांना गटाचे हिशोब सांगणे, कर्जासाठी आलेल्या अर्जांवर सर्वानुमते निर्णय घेणे, व्याजाचा दर ठरविणे, कर्ज वसूल करणे आणि सर्वात महत्वाचे गटासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे. हि व अशी गटाशी संबंधित सर्व काम गटातील महिला व गट प्रमुखांवर सोपविली. त्यांना गरज भासेल तिथे संस्थेची मदत त्यांनी घ्यावी असे ठरले. बघता-बघता बचत गट व गटातील महिला सक्षम झाल्या. अडी-अडचणीत एक-मेकीना साथ देऊ लागल्या, गरज पडली तर सर्व जणी पिडीतेला आधार देऊ लागल्या. ह्या सक्षम महिलांचा एक अनुभव (किस्सा) शेअर करते.

नाशिकमध्ये गंजमाळ भागाच्या परिसरात जास्त करून कष्टकरी लोकांची वस्ती आहे (होती). छोटी-छोटी घरं! त्यातील काही नशीबवान लोकांच्या घराच्या पक्क्या भिंती होत्या. बहुतांशी घरांना लाकडी फळ्यांच्या भिंती होत्या. घरात हौसेनी, काटकसर करून जमवलेल्या काही वस्तू. मोल-मजुरी करणारा पुरुष वर्ग. कष्ट करून, छोटी मोठी काम करून चार पैसे कमवून संसाराला हात-भार लाऊ पाहणाऱ्या महिला. महिला मुलांना शिकविण्यासाठी धडपड करत होत्या. मोजक्या नशीबवान बायकांना त्यांच्या नवऱ्याची साथ मिळायची. पण बहुतेक घरांमध्ये आर्थिक ओढाताण, पुरुषांना असलेली व्यसनं( त्यात प्रामुख्यांनी दारू, जुगार, मटका आणि बायांची लफडी ) व त्यावर होणारा आणि न परवडणारा खर्च, ह्यामुळे नवरा-बायको मधे खूप भांडणं व्हायची. शाब्दिक बाचा-बाची, शिवीगाळ हे तर नित्याचच होतं पण अधून मधून मारहाण पण व्हायची. त्या वस्तीतल्या आमच्या गटात सुरेखा होती. तिचा नवरा फारसं कमवायचा नाही, रोज दारू प्यायचा आणि दारूसाठी पैसे कमी पडले कि सुरेखाला मारहाण करून तिच्याकडून पैसे हिसकून घ्यायचा. सुरेखा आणि सुरेशचा हा तमाशा रोजचाच होता. काही लोक बिचारी सुरेखा असं म्हणायचे आणि त्यांचं भांडण ऐकून न ऐकल्यासारखं वागायचे. तर काही लोक तिची बाजू घेऊन सुरेशला समजवायला जायचे, तर हा बहाद्दर तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि आलेल्या लोकांना आया-बहिणीवरून शिव्या द्यायचा. सुरेखानी २-३ वेळा नवर्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार पण दिली. पण घरेलू मामला आहे, नवरा-बायकोचं भांडण आहे, असं म्हणत पोलिसांनी त्याला समज दिली, सुरेखाला समजून सांगितलं आणि घरी पाठवून दिलं. मध्यंतरी एका साहेबांनी त्याला एक दिवस पोलीस चौकीत बसवून ठेवलं. त्या दिवसानंतर काही दिवस सगळं शांत होतं. पोलीस दखल घेतील, शेजारी तक्रार करतील, मुलं पण थोडी मोठी झाल्यामुळे ती पण थोडा प्रतिकार करतील, ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला कि मारहाण कमी झाली. म्हणजे मारण्याचं स्वरूप बदललं. ती कोणाला दाखवू शकणार नाही अश्या जागी इजा करायचा आणि 'पैसे दिले नाहीस तर घर पेटवून देईन' म्हणायचा नाहीतर ५ लिटरचा केरोसीनचा डब्बा घ्यायचा आणि आत्महत्येची धमकी द्यायाचा. (आपली बायको बचत गटातून कर्ज घेऊ शकते आणि ते फेडायला पैसे बाजूला टाकते, हे त्याला माहित होतं) 'आपलं लाकडी फळ्यांचं घर. नवर्यानी खरंच पेटवून घेतलं तर आपलं आणि इतरांचं खूप नुकसान होईल', असा विचार करून आणि माराला घाबरून सुरेखा त्याला पैसे देत होती. ह्याचा परिणाम तिच्या बचत गटातील व्यवहारावर झाला. कशीतरी बचतीची रक्कम ठरलेल्या तारखेला ती देउ शकायची. पण कर्जाचे हप्ते द्यायला टाळाटाळ करू लागली. गटाच्या मिटींगला पण गैरहजर राहू लागली. 'काही अडचण आहे का?  सर्व ठीक चाललं आहे ना?' असं विचारल्यावर उडवा-उडवीची उत्तर द्यायची. एक दिवस ती लंगडत मिटींगला आली. 'काय झालं?' विचारल्यावर ती रडायला लागली. तिने साडी व  परकर वर करून दाखवलं. तिच्या मांडीवर वळ होते, पट्ट्यांनी मारल्यासारखे! काही ठिकाणी सिगारेटचे चटके दिल्यासारख्या खुणा होत्या.

'काय झालं? कस झालं? कोणी केलं? हे असं कधीपासून चालू आहे? तू कधी कोणापाशी काहीच बोलली का नाहीस? आणि तू हे का सहन केलंस?' गटातील सर्व बायकांनी प्रश्नांचा भडीमार केला. तेंव्हा सुरेखानी तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सगळ्यांना सांगितलं. पैशांसाठी नवऱ्याकडून होणारा त्रास आणि आत्महत्येची त्यांनी वारंवार दिलेली धमकी. कसं गटातील हप्ते भरण्यासाठी वाचवलेले पैसे तो घेऊन जातो आणि म्हणून ती गटाचे हप्ते वेळेवर भरू शकत नाही. तिनी सगळ्यांना विनंती केली कि," माझा नवरा सुधरणार नाही. माझा आजपर्यंत जो हिशोब झाला असेल तो बघून काही शिल्लक रहात असेल तर मला द्या. मी हेच सांगायला आले होते. माझ्यामुळे तुमचं नुकसान नको."

गटप्रमुख काशीबाई म्हणाली," सुरेखा, तू बचत गट सोडणार नाहीस. तुझ्या प्रश्नावर आपण गट म्हणून उत्तर शोधू शकलो नाही तर आपल्याला गट चालवायचा अधिकार नाही. आपण सगळ्या मिळून तुझ्या नवऱ्याला अद्दल घडवू. तू त्याला पैसे देऊ नकोस. तो तमाशा करेल. त्यांनी तमाशा केला कि शालिनी, तुझ्या शेजारीच रहाते, आम्हाला निरोप देईल. पुढे काय करायचं ते तू आमच्यावर सोड."

काशीबाईच्या शब्दांनी सुरेखाला धीर आला. गटातील बायका आपल्याला ह्याच्यातून वाचवतील अशी खात्री तिला वाटू लागली. ती घरी गेल्यावर काशीबाईनी गटाची मीटिंग घेतली आणि काय करायचं, कस करायचं ह्याची रूपरेषा ठरवली.

संध्याकाळ झाली. अंधार पडला. अपेक्षे प्रमाणे सुरेश झिंगलेल्या अवस्थेत,सुरेखाला शिव्या देत घरी आला. आत आल्या आल्या त्यांनी दारूसाठी पैसे मागितले. ठरल्याप्रमाणे सुरेखानी नकार दिला. आता तो मारणार ह्या भीतीनी सुरेखा दाराच्या दिशेनी पळाली. त्यांनी तिला आत ढकललं, आणि मुश्कीलिनी तोल सावरत, तिला अर्वाच्य शिव्या देत तो केरोसिनचा डब्बा उचलायला गेला. 'आता मी स्वतःला पेटवून घेतो आणि आयुष्य संपवतो. तू तर माझ्या मरण्याची वाटच बघतीयेस ना? म्हणजे तू लफडी करायला मोकळी. पण मी तुला घेऊन मरणार. मला जगायचा कंटाळा आला आहे. साली, मनासारखी, शांतपणे दारू पेऊ देत नाहीस? आता बघतोच तुझ्याकडे' असं म्हणून तो तिला फटका मरणार, तेवढ्यात काशीबाई गटातील बायकांना घेऊन घरात शिरल्या. "अरे मुडद्या! तू कशाला टेन्शन घेतोस? ५ लिटर मध्ये तू पूर्ण जळणार नाहीस आणि तुझी आत्महत्येची इच्छा अपूर्ण राहील. आम्ही सर्वजणी ५-५ लिटर घेऊन आलोय. पण तुला इथे नाही, चौकात पेटवणार. तू तर मरून जाशील पण आमची आगीत उधवस्त झालेली घरं कोण बांधून देईल. तेंव्हा चला ग बायानो ह्याला चौकात घेऊन चला. आणि त्याला वाजत गाजत घेऊन जाऊ म्हणजे वस्तीतले बाकीचे सुरेश पण शहाणे होतील."

सर्व बायकांनी त्याला मारत-मारत चौकात आणलं. तिथे असलेल्या खांबाला त्याला बांधून ठेवलं. रात्री उशिरापर्यंत सुरेश तिथेच होता. त्याची नशा, हौस, गुर्मी सर्व जिरली. 'बायकोला आणि मुलांना त्रास देणार नाही, दारू पीऊन तमाशा करणार नाही, चार पैसे कमवीन आणि कुटुंबाची काळजी घेईन' अशी ग्वाही दिली तेंव्हा त्याला सोडलं. ह्यामुळे त्याच्यासकट वस्तीतले बरेच सुरेश बरेच दिवस शुद्धीत होते आणि नीट वागत होते.

बचतगटाची ताकद अशा अनेक केसेसमधून सातत्याने आमच्या समोर येते. त्यामुळेच आता बचतगट हे नाव बदलून सगळीकडे त्याला स्वयंसहाय्यता गट म्हंटल जातं. कारण इथे बायका एकमेकींसाठी उभ्या राहतात, बचत तो बस एक बहाना है!

Wednesday 18 November 2020

जगात खरच भूत असत का?

जगात भूतं असतात असं मला खूप दिवस वाटत होतं. आम्ही लहान असतांना आमच्या घरी माझ्या वडिलांचे मित्र, पाटणकर काका यायचे. ते पहिल्यांदा जेव्हा कोकणातून आले तेंव्हा काही दिवस आमच्या घरी होते. पाटणकर काका खूप भारी होते. रात्रीचं जेवण झालं कि ते रोज आम्हाला गोष्ट सांगायचे. त्यांच्या बहुतेक गोष्टी भुताच्या असायच्या. मी तेंव्हा ७ वीत होते. त्या गोष्टी ऐकायला भारी वाटायच्या आणि भीती पण खूप वाटायची. आम्ही त्यांना विचारायचो, 'काका, भूत कशी असतात? ती कुठे रहातात? ती कुठून येतात?'

  काका सांगायचे,'जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल आणि ती मिळायच्या आधीच ती व्यक्ती मेली कि तिचं भूत होतं.'

  आम्हाला ते खरं वाटायचं.आम्ही भावंडं एक-मेकांना भूत होण्याची भीती घालून काम करून घ्यायचो.

  जगात खरच भूत असत का? ह्या प्रश्नाच उत्तर मला 'असू शकेल' असं वाटायचं. अगदी कांताची केस आणि कांता माझ्या आयुष्यात येई पर्यंत.

  ८६-८७ मध्ये नाशिकला एस.पी ऑफिस होतं. आमच्या कडील केसेस संदर्भात आमची एस.पी साहेबां बरोबर नियमित पणे बैठका व्हायच्या. अशाच एका मीटिंगमध्ये चर्चे नंतर असं ठरलं कि 'हुंडाबळीसारख्या केस मध्ये जळीत महिलेची मृत्युपूर्व जबानी घेताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी (शक्य असेल तर) तिथे हजर रहावं. कुसुमताईनी होकार कळवला. दोन दिवसातच संध्याकाळी ७-७.१५ च्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलमधून दूरध्वनीवरून सांगितलं,'ताई, एक ९२% जळीत महिला दाखल झाली आहे. तिचा जबाब घ्यायचा आहे. कोणाला तरी पाठवा.'

  आमचं ऑफिस तर ५.३० वाजता बंद झालं होतं. घरात पाहुणे आले होते. कुसुमताई जाऊ शकत नव्हत्या. त्यांनी मला जायला सांगितलं. नाही म्हणायची खूप इत्छा होती, पण हिम्मत होत नव्हती. जायची पण हिम्मत नव्हती. दिवसा ऑफिसमध्ये बसून समझोते करणं, तक्रार ऐकून घेणं, नोंदवून घेणं वेगळ आणि रात्री ८ वाजता एक जळालेल्या महिलेचं स्टेटमेंट घेणं वेगळ. काहीही झालं तरी मलाच जावं लागणार होतं. अनिछेनीच, पण गेले.

  आयुष्यात पहिल्यांदा सिव्हील हॉस्पिटलमध्ये जात होते आणि ते पण जळीत वार्डात! ते पण ९२% जळालेल्या महिलेचा जबाब नोंदवायला. मला सगळ्याचच खूप दडपण आल होतं. सिव्हील मध्ये सगळे वाटच बघत होते. आम्ही लगेचच कामाला लागलो. माझ्याबरोबर एक डॉक्टर, जुदिशिअल magistrate, आणि एक पोलीस खात्यातली व्यक्ती होती. मुलीचे आईवडील आणि इतर नातेवाईकांना बाहेर जाण्यास विनंती केली. त्या वार्डात आम्ही गेलो. ८ जळीत पेशंट होते. कमी जास्त प्रमाणात भाजलेले. वेदनेनी कण्हत होते. त्या खोलीत एक विचित्र दर्प होता. त्यांनी मला मळमळ आणि चक्कर येऊ लागली. खूप निग्रहाने आणि हिंमतीने मी उभी होते. पहिल्या नोंदी झाल्या-नाव,वय, इत्यादी माहिती घेऊन झाली. कांताला प्रश्न विचारत होते आणि ती जुजबी उत्तरं  देत होती.

  तिथे उभ्या एका नर्सनी तिला सांगितलं,'कांता, ह्या ताई आल्या आहेत. त्या महिलांना न्याय मिळवून द्यायचं काम करतात. तुला त्यांना काही सांगायचं आहे का?'

  डॉक्टरच्या मते जबाब नोंदवायचं काम झालं होतं. पण हि नवी माहिती मिळाल्यावर कांताला काहीतरी सांगायचं होतं. तिच्यात एक वेगळच बळ आल होतं. तिच्यात अजिबात शक्ती नव्हती. तिने 'ताई' अशी हाक मारली ती आम्ही ऐकली. तिचा आवाज खूप बारीक होता. आम्ही सगळे तिचं म्हणणं ऐकायला पुढे वाकलो. तो पर्यंत मी कांताला पाहिलंच नव्हतं. तिचा पूर्ण शरीर एका जाळीने झाकलेल होतं. त्या जाळीवर एक पांढरी चादर होती. आम्ही वाकल्यावर मला जे दिसलं ते भयानक होतं. भरीताच वांग भाजल्यावर त्याची जशी साल निघते तसं कांताच्या शरीरावरच कातडं निघालं होतं. मला चक्कर आली आणि उलटी होईल असं वाटलं. डॉक्टरनी मला धरलं म्हणून बर झालं.

  कांतानी जे सांगितलं ते भयानक होतं. तिचं एक वर्षापूर्वी दशरथ बरोबर लग्न झालं होतं. कांता १२वि पर्यंत शिकलेली, दशरथ एका पायानी थोडा अधू आणि ८ वी पास होता, पण कांताच्या बापाची गरीब परिस्थिती म्हणून हे लग्न झालं. पहिल्या दिवसापासून दशरथनी कांताचा कधी बायको म्हणून स्वीकार केलाच नाही. मनात येईल तेंव्हा जवळ जायचं, बाकीच्या वेळेला अपमान करायचा आणि तुच्छ वागणूक द्यायचा. दशरथची स्वतःची शेती होती आणि कांताच्या वडिलां पेक्षा परिस्थिती चांगली होती. काही दिवसा पूर्वी त्याची संगीताशी ओळख झाली. स्थळ तोलामोलाचं. तिच्या वडीलांची ती एकुलती एक मुलगी. त्यातून ते हुंडा द्यायला तयार होते. संगीता शिकलेली नव्हती आणि दिसायला पण बरीच होती, पण त्यांनी दशरथला काही फरक पडत नव्हता. त्याला संगीता बरोबर लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याला कांता कडून फारकत हवी होती. तो कांता कडे फारकत मागत होता आणि ती द्यायला तयार नव्हती. आधीच आपलेपणा नाही त्यात हा नवीन प्रॉब्लेम. त्याची दिवसेंदिवस चीड-चीड वाढत होती. तो कांताला उपाशी ठेऊ लागला, मारहाण करू लागला. पण कांता फारकतीच्या कागदांवर सही करेना. त्या दिवशी, दोन मित्रां बरोबर दशरथ दारू प्यायला. दारू बऱ्यापैकी चढली होती. त्यांनी कांताला जेवण वाढायला सांगितलं. ती जेवणाचं ताट घेऊन आली आणि दशरथनी पुन्हा फारकतीचा विषय काढला. कांता नी नकार दिल्यावर त्याला खूप राग आला. त्यात एक मित्र म्हणाला,"साली काय माजली आहे. दशरथ, तुला उलटून बोलते? मी तर तिला तुडवलीच असती."

  आधीच दारू चढलेली, त्यात मित्रांच्या समोर अपमान झाला. दशरथनी मारणं कांता साठी नवीन नव्हतं. पण आज त्याचा अवतार भीतीदायक होता. अर्वाच्य शिव्या देत त्यांनी कोपर्यातली काठी उचलली आणि मारायला (बडवायला) सुरुवात केली. तो मारत होता आणि वेड लागल्या सारखं 'फारकत दे, फारकत दे,' म्हणत होता. मी बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेंव्हा समजलं कि तिला खांबाला बांधलं आहे. तिच्यात बोलायचे पण त्राण नव्हते. तिला दुरून कोणाचा तरी आवाज आला. "अरे ही तर मरून गेली. आता काय करायचं?" तेवढ्यात अंगावर काही तरी गार शिंपडल्या सारखं वाटलं. वाटलं आपण स्टोव्ह मध्ये रौकेल भरतोय. वास येतोय. तेवढ्यात अंगाची लाही-लाही झाली. ताई, मला न्याय हवा आहे."

  कांताचा आवाज क्षीण होत होता. ती श्वास घेण्यासाठी तडफडत होती. डॉक्टरनी आम्हाला बाहेर जाण्यासाठी हाताने खुणावलं. मी इतकी सुन्न झाले होते कि पुढची १० मिनिटे काय झालं मला काही समजलंच नाही. डोळे उघडले तेंव्हा जवळ एक नर्स होती. तिच्या हातात पाणी होतं आणि ती विचारत होती,'ताई, कस वाटतंय? बऱ्या आहात का? थोडं पाणी घेता का?' मी त्यांना विचारलं,'कांता?' त्यांनी खुणावून सांगितलं,'ती गेली'. मला खूप वाईट वाटलं. माझा आणि तिचा काही संबंध नव्हता कि ओळख. पण मला खूप वाईट वाटलं. अगदी जवळचं कोणीतरी गेल्यासारखी मी खूप रडले.

  माझी अवस्था बघून पोलिसांनी मला घरी सोडलं. घरी सगळे वाटच बघत होते. काय पाहिलं काय ऐकलं हे कथन करताना मी माझ्या नकळत खूप रडले. मी पुढचे २-३ दिवस न धड झोपू शकले कि जेऊ शकले. दुसर्या दिवशी मी आदल्या दिवशी जे ऐकलं, पाहिलं ते लिहून स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात पाठवलं.(हे कुसुमताई च्या सांगण्यावरून).

  मनात एक विचार आला, आता कांताचं भूत होईल का? झालं तर ती त्याला चांगली अद्दल घडवेल. कांता आणि तिचं भूत जे करायचं ते करतील. पण आपण आपल्या बाजूनी जे शक्य आहे ते करून कांताला न्याय मिळवून द्यायला मदत करायची, असं मी ठरवलं. मला by this time, कळल होतं कि भूत वगेरे काही नसतं, पण कोणत्याही मार्गांनी दशरथला शिक्षा व्हावी हि तीव्र इत्छा होती. म्हणून बहुतेक विचारांत भुताचा आधार घेतला. (इतक्या नव-विवाहित मुली हुंडाबळी होतायत, सुखी संसाराची स्वप्नं बघत लग्न करून सासरी जातात आणि अतोनात छळ सहन करून माहेरी येतात, किंवा आत्महत्या करतात, त्यांची कधी भूतं झाल्याचे ऐकले नाही)

पुढे दशरथ विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वर्षभरात केस बोर्डावर आली, चालली आणि दशरथला जन्मठेप झाली.


Wednesday 11 November 2020

पट्ट्याची भाषा आणि ताकत

एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये एक बाई आली. साधारण ३२-३५ वय असेल. शिडशिडीत बांधा. ९ वारी साडी नेसलेली, तिच्या डोक्यावर एक रिकामी टोपली होती. तिच्या सांगण्यावरून समजलं कि ती  दारोदार जाऊन फळ विकायची, मुख्यता केळी. ऑफिसमध्ये आल्यावर डोक्यावरची रिकामी टोपली खाली ठेवली आणि खाली बसत म्हणाली," ताई, मला मदत करा. मी विधवा आहे. मला एक १४ वर्षांची मुलगी आहे. आम्ही दोघी एका झोपडीवजा घरात रहातो. घरखर्च भागवण्यासाठी मला काम करावंच लागतं. मी फळ विकायला बाहेर जाते, तेंव्हा ती घरात एकटीच असते. आमच्या घराच्या जवळ राहणारा एक माणूस घरी येऊन तिला त्रास देतो. दारावर थाप मारतो, जोरजोरात हाका मारतो. ती खूप घाबरून जाते. ताई, तुम्ही प्लीज काहीतरी करा. मला आणि माझ्या मुलीला वाचवा!"

आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि,'तिला आम्ही मदत नाही करू शकणार. तिने पोलिसांची मदत घ्यायला हवी. हे काम पोलिसांच आहे'.

त्यावर 'पोलीस काहीच मदत करत नाहीत. मी साहेबांना भेटून आले' असं तिनं सांगितलं.

झालं! कुसुमताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ५ जणी तिला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. संध्याकाळचे ५-५.३० वाजले होते. साहेब चौकीत होते. आम्ही आमची ओळख करून दिली आणि त्या महिलेची अडचण थोडक्यात सांगितली.

पोलीस इन्स्पेक्टरला काय घडलं असेल हे लक्षात यायला एक क्षण पण लागला नाही. त्यांचं ते रोजचच काम होतं. आम्हीच नवखे होतो. आमचं योग्य पद्धतीने (बसायला खुर्ची आणि पाणी) स्वागत करून त्यांनी त्या बाईची हजेरी घ्यायला सुरुवात केली."बाई, हा कोण माणूस? तो तुला कस ओळखतो? तुमची आधीची काही ओळख, काही व्यवहार, काही संबंध आहे का? असं आपल्याकडे कोणी कोणाला त्रास देत नाही. काय असेल ते खरं खरं सांग."

केलीवाल्या बाईनी तिची त्या माणसाशी काहीच ओळख नाही असे निक्षून सांगितल्यावर साहेबांनी प्रश्न विचारायची पद्धत बदलली. त्यांनी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि हवालदाराला सांगितलं,'माझा पट्टा आण. खूप दिवसापासून त्याला पोलिश करायचं होतं. राहून गेलं.'

हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत ती बाई इन्स्पेक्टरच्या पाया पडून,' साहेब माझं चुकलं. मला आता आठवलं, माझी मंजू ५ वर्षांची होती तेंव्हा सोमनाथ मला भेटला होता. त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणि माझा धनी मेला होता. आमच्या कडे बघणारं, कमावणार कोणी नव्हतं आणि त्याला भाकर खाऊ घालणारं! आम्ही संगती रहायला लागलो. ७-८ वर्षं छान मजेत गेली. ६-८ महिन्यांपासून तो दारू पिऊ लागला आणि सगळी घडी विस्कटली. मी त्याला घरातून हाकलून दिला. तेंव्हा पासून तो आम्हाला त्रास देतोय.'  

"म्हणजे, तुला आणि तुझ्या मुलीला तो आधार देत होता, तुम्हाला दोन वेळेचं खाऊ घालत होता, तेंव्हा तो तुझ्या घरी आलेला तुला चालत होता. आणि आता तुझे बरे दिवस आले आहेत आणि दारूच्या आहारी जातोय म्हणून तू त्याच्या बद्दल खोटी तक्रार नोंदवायला आली आहेस? तो नक्की काय त्रास देतो? देतो का नाही देत हे तू ह्या संस्थेतल्या बायकांना खरं काय ते सांग."

" तो फुकटची भाकर खायला येतो ते मला चालणार नाही. मी एकटी तरी कोणा कोणाला आणि कशी पुरी पडणार? त्यांनी चार कष्ट करावेत, चार पैसे कमवावेत. मग तो आला तरी चालेल."

"पण त्याचावर हि वेळ कशामुळे आली? तो काय काम करत होता? ते काम कशामुळे सुटलं?"

ह्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळण्यासाठी ती उठत, आम्हाला उद्देशून म्हणाली," ताई, तुमचे आणि साहेबांचे लई उपकार झाले. तुमच्या सारख्या मोठ्या लोकांनी वेळ काढून माझं म्हणणं ऐकून घेतलत. लई उपकार साहेब." असं म्हणत ती चौकीच्या बाहेर जाणार तोच इन्स्पेक्टर साहेबांनी फक्त 'उत्तर' एव्हडाच शब्द उच्चारला आणि ती मटकन खालीच बसली. त्यांच्या आवाजात झालेला बदल, आवाजातील जरबच अशी होती कि तीच काय आमची पण खुर्चीतून उठायची हिम्मत झाली नसती.

"साहेब, सोमनाथ गवंडी काम करायचा. चांगला रोज कमवत होता. आम्हाला वाटलं आमच्या दोघांच्या कमाईत, त्यात थोडं कर्ज काढून आपल्या मालकीचं एक झोपडी घेता येईल. त्याच्या मालकाकडून आणि दोन मित्रांकडून त्यांनी उसने पैसे आणले. आमचा किमतीचा अंदाज चुकला. त्यांनी व्याजानी पैसे आणले. त्याची परतफेड आम्ही करू शकलो नाही. कर्जाचे हप्ते वसूल करायला माणस घरी यायला लागली. त्याला धमक्या द्यायला लागली. तो घाबरून पळून गेला. काय करावं मला काही समजले नाही. रोज दारी घेणेकरी येत होते, शिव्या देत होते, अचकट विचकट बोलत होते. त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला सुचला. मी ती झोपडी विकली, सगळ्यांची देणी फेडली आणि ती वस्ती सोडून मुलीला घेऊन दुसरी कडे राहायला लागले. त्याचा काही पत्ताच नाही. तो जिवंत आहे कि नाही काही कळायला मार्ग नाही. तो एक वर्षभरानंतर आला. तो पण खूप दारू पिऊन. त्याला कशाचीच शुद्ध नव्हती. तो जबरदस्ती घरात शिरत होतं, मी आरडा ओरडा केला. शेजारी आले आणि त्यांनी त्याला मारून हाकलून दिलं. मी त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही कारण मला तो माझ्या घरात अश्या अवस्थेत नको होता."      

तिच्या डोळ्यात पाणी आल. ती विनंती करत म्हणाली," साहेब, ताई, सोमनाथ वाईट नाहीये. तुम्ही त्याला समजून सांगा. तो तुमचं ऐकेल."

सोमनाथला बोलावून, त्याला समजणाऱ्या भाषेत त्याला सांगायची, समजवायची जबाबदारी साहेबांनी घेतली. त्यांनी दोघांमध्ये समझोता करून दिला.

एक दिवस केळीवाली, सोमनाथला घेऊन ऑफिस मध्ये भेटायला येऊन गेले.

आम्ही सगळे अवाक! ही बाई आपल्याशी खोटं का बर बोलली असेल? तिने आपल्याला अर्धवट माहिती का सांगितली? असं करण्यामागे तिचा काय हेतू असेल? पण जशी वर्षं उलटत गेली, आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो कि तक्रार नोंदवायला आलेली व्यक्ती क़्वचितच पूर्ण खरं बोलते. ते पूर्ण खोटं पण नसतं. ते अर्धसत्य असत.

पट्टा घेरे जरा, ह्यातून त्या बाईला काय समजलं? त्याचा अर्थ काय? त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेले नसते तर माझ्या ज्ञानात भर पडली नसती. पोलिसांची लोकांकडून खरं वदवून घेण्याची कला भारी होती. मला पट्ट्याची भाषा आणि ताकत, नाहीतर कशी कळली असती?

Wednesday 4 November 2020

आर्थिक स्वावलंबनाने महिला सक्षमीकरण होतं का?

 मला बरेच दिवस अशी खात्री होती कि आर्थिक स्वावलंबन हा एक महिला सक्षमीकरण साधण्याचा हुकमी मार्ग आहे. बाई कमवायला लागली कि तिला कुटुंबात समाजात प्रतिष्ठा व स्थान प्राप्त होतं. तिच्या विचारांना व मतांना महत्व प्राप्त होतं. तिच्या भावनांची घरातले कदर करतील. पण हा माझा भ्रम होता.

आमच्या उद्योगकेंद्रात तीन कंपन्यांमधून काम यायचं. व्ही.आंय.पी, जी.पी.इलेक्ट्रॉनिक, आणि फीनोतेक्स! सगळ्या मिळून ७० बायका काम करायच्या. सर्वजणी वेळेवर यायच्या. सकाळी ९ वाजता काम सुरु करायचो. दुपारी १ वाजता जेवणाची सुट्टी आणि संद्याकाळी ६ वाजता दिवस संपायचा. अर्जंट मटेरियल द्यायचं असलं तरच उशिरापर्यंत महिला थांबायच्या. बहुतेक महिला सिडको परिसरातील असल्याने ज्यांना हवं त्या जेवणाच्या सुट्टीत घरी जायच्या. व्ही.आय.पी. विभागात काम करणारी सीमा पण रोज जेवणाच्या सुट्टीत घरी जायची व घरून वेळेवर यायची.

संस्थेत काम करणाऱ्या महिलांसाठी काही गोष्टी आम्ही करायचो. त्यांना ई.एस.आय.सी. ह्या शासकीय योजनेचा लाभ मिळावून देण्यासाठी त्यांच्या नावाची त्या कार्यालयात नोंद केली. ह्या योजनेमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सुविधा मिळू लागल्या. वर्षभर लागणारं धान्य भरण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करत होतो. त्यांचे बचत गट सुरु केले होते. ह्या गटांच्या माद्यमातून त्या त्यांच्या कौटुंबिक गरजेप्रमाणे कर्ज काढत व ते सुलभ हपत्यात फेडत होत्या. ह्यातून त्यांना आर्थिक व्यवहार व बँकेच्या व्यवहाराची चांगली माहिती झाली होती. एकूण संस्थेत येऊ लागल्या पासून त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.

रोजच्या सारखी त्या दिवशी दुपारी ३.३०  वाजता टी ब्रेंक झाला. अचानक व्ही. आय.पी विभागातून आरडा ओरडा ऐकू आला. जाऊन पाहिल तर समजलं सीमा चक्कर येऊन पडली आहे. थोड्या वेळानी ती शुद्धीत आल्यावर तिला दोघींसोबत घरी पाठवलं. तिची पाठवणी केल्यावर सीमा आणि तिच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. त्या विभागातील मंदाताईनी दिलेली माहिती चक्राऊन टाकणारी आणि राग आणणारी होती. सीमाच्या घरात एकूण ७ माणस! ती, तिचा नवरा, त्यांची ४ मुलं तिची सासू व नणंद. खाणारी सात तोंड आणि कमावणारी हि एकटी. घर म्हणजे १०*१५ ची खोली! घरातली सगळी काम ती एकटीच करायची. पहाटे ४-४.३० ला उठून, रात्रीची भांडी घासायची. सगळ्यांसाठी चहा नास्ता करायचा. सगळ्यांसाठी दुपारचंजेवण बनवायचं, केरवारे करून, धुणं धुऊन धावत उद्योगकेंद्र गाठायची. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी जायची. काही जेवण उरलं असेल तर खायची. नाहीतर भांडी घासून पाणी पिऊन कामावर यायची. इतकी स्वार्थी आणि नालायक माणस असू शकतात? माझा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या व्यक्ती मुळे घर चालत, त्यांना दोन वेळा पोटभर जेवण मिळत, त्या बाई साठी चार घास वगळावेत, तिला घरातल्या कामात मदत करावी असं घरातील एकालाही वाटू नये? माझ्या जीवाचा संताप होत होता. तिचं नशीब म्हणून सोडून देणं मला मान्य नव्हतं! माझ्यातील सत्सत्विवेकबुद्धी मला शांत बसू देत नव्हती. ऑफिसचं काम संपवून मी मंदाताई बरोबर तिच्या घरी गेले. घरातील दृश्य तर आणखीन संताप आणणारं होतं. नवरोजी शेषशाही भगवान झाले होते, सासू व नणंद गप्पा मारत होत्या, मुलं खेळत होती आणि सीमा, नुकताच संपलेल्या चहाचे कप धुवून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली होती. मला दारात पाहिल्यावर तिने माझं स्वागत केलं आणि नवऱ्याला नीट उठून बसण्यासाठी खुणावलं. तो नाईलाजान उठून बसला. सीमाच्या तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मोर्चा सरळ तिच्या नवऱ्याच्या दिशेने वळवला.

"आपण शंकरराव ना? नमस्कार. मी हेमा पटवर्धन."

"काय ताई? मी ओळखतो तुम्हाला. खरं सांगायचं तर निम्मं सिडको तुम्हाला ओळखतं. तुम्ही सीमा सारख्या महिलांना काम देता, त्यांनी खूप लोकांची मदत होते. ताई तुम्ही उभ्या का? बसाना."

असं म्हणत त्यांनी पलंगावर जागा करून दिली.

"शंकरराव, तुम्ही सध्या काय काम करता? म्हणजे नोकरी कुठे करता?"

"मी सध्या घरीच आहे."

"कधीपासून?"

"वर्ष होऊन गेलं. ताई काही कामच मिळत नाही. म्हणून घरीच बसलोय."

"आणि तुमची आई आणि बहीण? त्यापण काही करत नाहीत का? घरीच असतात का?".

"हो"

"म्हणजे तुमच्या घरात कमावणारी एकच व्यक्ती आहे. सीमा! आणि तिची तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला सर्वाना ऐयत खायला मिळतंय पण तिला काही होतंय का, तिची तब्येत ठीक आहे ना, ह्याची काळजी  करण्याची तुम्हाला गरज वाटत नाहि. आज ती कामावर असतांना चक्कर येऊन पडली. त्याला जबाबदार कोण? तर तुम्ही सगळे! तिच्या जवळची माणस! तुम्हाला तिच्या जीवाची काळजी नाही. ती जिवंत आहे का मेली ह्याची तरी खबर घ्याल कि नाही? अरे!  तिच्या मुळे तुम्हाला ऐतं बसून खायला प्यायला मिळतंय न? जी बाई आपल्यासाठी एव्हडी राबते तिच्यासाठी दोन घास वगळण्या इतकीपण माणुसकी तुमच्यात शिल्लक नाही का? मला मान्य आहे कि हा तुमचा घरचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल 'तुमचा काय संबंध? तुम्ही ह्याचात मध्ये पडू नका.' पण मला हे मान्य नाही. मी मध्ये बोलायला नको. पण काय करू? तुम्हा सर्वांची लाज वाटते आणि चीड येते. काम करायची इच्छा असणार्याला काम मिळतच. ८ दिवसानंतर पुन्हा येते भेटायला. सीमा विश्रांती घे. बर वाटलं कि ये."

दुसर्या दिवशी, 'आता मी बरी आहे म्हणत सीमा कामावर रुजू झाली. तिच्या घरच्या लोकांच्या डोक्यात काही प्रकाश पडण्याची मला अजिबात आशा नव्हती. ऑफिसच्या जवळ रहाणार्या जाधवबाईना सांगून तिच्या दुपारच्या जेवणाची, एक महिन्यासाठीची सोय केली. ह्या सगळ्यामुळे सीमाच्या तब्येतीत फरक दिसू लागला.

हे सगळं झाल्यामुळे उद्योग्केंद्रातील बायका टेन्शनमध्ये! त्या मला सांगत होत्या,"ताई जरा सांभाळा. सीमाचा नवरा खूप डेंजर माणूस आहे. तुम्ही बसनी येता. त्यांनी वाटेत तुम्हाला काही केलं तर? नाहीतर तुम्ही ८-१० दिवस नका येऊ. आम्ही घेऊ सांभाळून.'

त्यांना माझ्या बद्दल वाटणाऱ्या भावना मी समजू शकत होते पण शंकररावला घाबरण्याच काही कारण नाही हे माझ म्हणणं त्यांना पटत नव्हतं आणि त्यांचं मला. शेवटी असं ठरलं कि सायंकाळी दोघीजणी माझ्या सोबत बस स्टेन्ड पर्यंत येतील. असं जवळ जवळ चार आठवडे चाललं. एक दिवस अचानक एका गल्लीतून शंकरराव,"ताई, ताई" अश्या हाका मारत सायकल चालवत आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. ते जवळ आले, सायकल बाजूला लावली आणि रस्त्यात माझ्या पाया पडले. मी व माझ्या सोबतच्या दोघी आश्चर्यचकित झालो. काय बोलावं आणि काय करावं क्षणभर काही सुचेना. भानावर येऊन म्हणाले,"शंकरराव, उठा! हे आता काय नवीन नाटक? असा तमाशा करू नका. आपण रस्त्यात आहोत ह्याचं भान ठेवा."

स्वतःला सावरत, शंकरराव उठून उभे राहिला. त्यांनी पिशवीतून एक पेढ्याचा बॉक्स काढला. तो माझ्या हातावर ठेवत म्हणाले," ताई, त्या दिवशी तुम्ही येऊन गेलात. आम्हाला खूप बोललात. मी त्यावर विचार केला. मला तुमचं म्हणणं पटलं. मी काम शोधायला लागलो आणि आईला अनो ताईला घरातल्या कामात मदत करायला पण सांगितलं. ताई, मला नोकरी मिळाली. वाचमनची नोकरी आहे. आज पहिला पगार झाला. अजून घरी पण गेलो नाही. आधी तुम्हाला पेढे देण्यासाठी थांबलो होतो."

आपल्या कुठल्या वागण्याचा आणि बोलण्याचा कोणाला कसा उपयोग होईल काही सांगता येत नाही. त्या दिवशी आपण सीमा च्या घरातील लोकांना बोललो ते बरंच झालं, माझा मन तरी शांत झालं. पण त्या दिवशी आपण थोडं जास्तच  बोललो असं एक क्षण वाटलं खरं. पण उपाशी राहणं काय असत हे मी २-३ वेळा अनुभवलंय.

आमच्या सहामाही परीक्षा चालू होत्या. ११-१ भूमितीचा पेपर होता. परीक्षेचा अभ्यास म्हणून धड नाश्ता केला नव्हता आणि २ पर्यंत जेवायला घरी पोहोचू म्हणून टिफिन घेतला नव्हता. १२.३० च्या सुमारास announcement झाली. 'शहरात दंगल झाली आहे. जे विद्यार्थी बसनी प्रवास करणार असतील किंवा लांब रहात असतील त्यांना घरी पोहोचवायची व्यवस्था शाळा करेल.' मला शाळेत बाईनी थांबवून ठेवलं. शाळेपासून घर ५.५० किमी दूर होतं. त्या दिवशी सगळीकडेच नुसता गोंधळ होता. आम्हाला घरी सोडायला संद्याकाळी ६ वाजता पोलीस व्हान आली. सर्वाना सोडून झाल्यावर माझा नंबर आला. मी रात्री ८.३० वाजता घरी पोहोचले. भुकेनी जीव कासावीस झालं होता.

बाकीच्या दोन्ही घटना कोलेज मधल्या. एफ.वाय. ला असतांना नाव-निर्माण आंदोलन झालं होतं. त्यात अडकलो होतो. आणि दुसरी घटना त्याच वर्षी जयप्रकाश नारायण याचं भाषण ऐकायला गेले होते, तेंव्हा. स्वप्नात विचार केला नसेल एव्हडी गर्दी जमली होती, त्यांचं भाषण ऐकायला. भाषण संपल्यावर घरी जायला वाहन मिले ना. शेवटी निघालो चालत. उपाशी-तापाशी, दमलेलो, ५ किमी चालून घरी पोहोचलो. त्या प्रसंगांपासून मनात उपाशी राहण्याची भीती आहे आणि उपाशी ठेवण्याची चीड आहे.