Tuesday 29 June 2021

तो म्हणेल ती पूर्व दिशा

 

संपत, एका सुखवस्तू शेतकरी  कुटुंबातील सदस्य. सात भावंडानमधील एक. पण त्याचं घरी, दारी, नातेवाईकांमध्ये, गावांमध्ये सगळ्यांना खूप कौतुक होतं. तो चुणचुणीत आणि हुशार होता. गावातील इतर मुलांच्या तुलनेत तो खूप शिकला. बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात ५०वा, तर तालुक्यात १५वा आला होता. अर्थात गावात सर्व विषयात प्रथम क्रमांक त्यानेच पटकावला होता. गावच्या सरपंचानी त्याचा सत्कार केला. पुढे शिकून तो सरकारी नोकरीत लागला. गावातल्या सगळ्यांना त्याचा खूप अभिमान होता. सर्व त्याला 'साहेब, साहेब' म्हणून संबोधायला लागले. तो म्हणेल ती पूर्व दिशा असंच काहीसं होत गेलं. त्याच्या मनात स्वतःबद्दल एक वेगळीच भावना झाली होती. 'मी चुकूच शकत नाही. मला कोणाची गरज नाही. मी मनात आणीन ते मिळवू शकतो.'

कालांतरानी त्याचं लग्न पंचक्रोशीतल्या एका सुखवस्तू कुटुंबातील हिरा नावाच्या मुलीशी झालं. हिरा, मुळातच हुशार, पण कधी शिक्षणाची संधी मिळाली नाही. तिच्या आई-वडिलांना मुलींनी शिक्षण घेणं मान्य नव्हतं. तिची हुशारी तिला गप्प बसू देत नव्हती. एखादी गोष्ट खटकली, कोणाचं वागणं पटलं नाही कि सुरुवातीला तिने वाद घालायचा, आपलं मत पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण घरातल्या मोठ्या माणसांच्या मते हि हुशारी नव्हती. तो आगाऊपणा होता. मुलीच्या जातीला तोंड वर करून बोलणं शोभत नाही. 'दुसऱ्यांच ऐकून घ्यायला शिक. एखाद वेळेस समोरच्याचं म्हणणं, वागणं पटलं नाही तरी ऐकून घ्यावं. त्यांनी काही अंगाला भोकं पडणार नाहीत. अशीच वागत राहिलीस तर उद्या सासरी जाऊन आमचं चांगलच नाव काढशील. वेळीच शहाणी हो.' घरातून मिळालेल्या ह्या शिकवणी मुळे, तिने स्वतःच्या स्वभावाला मुरड घातली. ती परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकली! मन मारून जगायला शिकली! अपमान सहन करायला शिकली. सासरी आणि समाजात, एक आदर्श मुलगी, आदर्श सून असं नाव कमावल. आई-वडिलांचं, तिच्या खानदानाच नाव मोठं झालं.

हिराच संपतशी लग्न झालं तेंव्हा ती जेमतेम १९ वर्षांची होती आणि संपत २४ वर्षांचा. हिरानी बघता-बघता घरातील अनेक जबाबदार्या स्वीकारल्या, कष्टाच्या! स्वतःची चार मुलं, (दोन मुलं आणि दोन मुली) आणि भांडून माहेरी गेलेल्या जावेची दोन मुलं अश्या सहा मुलांना, घरातील इतर मोठ्यांना काय हवं नको ते बघत होती. घरातली काम,  स्वैपाक-पाणी, आला-गेला, नातेवाईक अस सगळ सांभाळून शेतात कष्ट करायची. कधी कशाची अपेक्षा नाही. कि कशा बद्दल तक्रार नाही. अशी सर्वगुणसंपन्न सून सगळ्यांची लाडकी होती. पण संपतरावांच काय? त्याला त्याची बायको बिनडोक, अडाणी वाटायची. तो पदोपदी तिचा अपमान करायचा. रात्री जरी हक्कांनी जवळ घेत असला तरी दिवसा त्याला ती नजरे समोर नको असायची. त्याची मर्जी सांभाळण्यासाठी सासूबाईनी एक फतवा काढला, "संपातला आवडत नाही तर तो घरात असतांना हिरा स्वैपाकघरातून बाहेर येणार नाही." हिरानीपण निमुटपणे ते मान्य केलं. सर्व काही सुरळीत चाललं होतं. एकदा ती मुलांना जेवणासाठी बोलवायला बाहेर आली आणि तिच्या दुर्दैवाने संपत ऑफिसला जाण्यासाठी निघाला. तिला बघताच त्याचं पित्त खवळल. कोणाच्या काही लक्षात यायच्या आत त्यांनी रागाच्या भरात हिराच्या कानफटात लगावली. झालेल्या अपमानाने आणि वेदनेने हिराच्या डोळ्यात पाणी आल. घरातील सगळ्यांनी काय घडलं ते बघितलं. पण संपतला काही सांगायची, बोलायची कोणाची हिम्मत झाली नाही. उलट सासू हिरालाच म्हणाली, "हीरा, तुला सांगितलं होतं ना, तू बाहेर येऊ नकोस म्हणून? माझं थोड ऐकना ग पोरी. तुझ्या अश्या वागण्यामुळे त्रास होतो ग सगळ्यांना." त्या दिवसानंतर बायकोवर हात उचलायला, संपतला कुठलं पण कारण पुरेसं होतं. संपतच्या तिरसट आणि मगरूर स्वभावाला हिराचा सोशिकपणा पोषकच ठरला.

अश्या प्रकारे हिरानी आपला संसार टिकवला. मुलं मोठी झाली. मुली लग्न करून सासरी गेल्या. मोठा मुलगा बायकोला घेऊन गावातच वेगळा राहू लागला. धाकट्या मुलानी (महेश) लग्नच केलं नाही. त्याला आईची काळजी वाटत होती, आणि वडिलांचा राग येत होता. वडिलांच्या विचित्र वागण्यामुळे त्याला खात्री होती कि, 'आपला संसार सुखी व्हायला हवा असेल तर, बायकोला घेऊन, वेगळ राहण्याला पर्याय नाही.' आणि आईनी वडिलांसोबत एकटीने रहावं हे त्याला सुरक्षित वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी लग्नाचा विचारच करायचा नाही असं ठरवलं. महेशला नोकरी लागली तेंव्हा त्यांनी आपल्या आईला समजावलं, "आई, आता हे सहन करण थांबव. मला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतोय. आपण दोघं, दादा आणि वहिनी सारखं वेगळीकडे खोली घेऊन राहू. वडिलांचं तुझ्याशी वागणं हे असंच चालू राहिलं तर एखाद दिवशी माझ्या हातून काहीतरी अघटीत घडेल." पण हिरानी घर सोडण्यास नकार दिला. महेशचा पण नाईलाज झाला.

अखेर एक दिवस हिराच्या सहनशक्तीचा अंत झाला. घरात काहीतरी कार्यक्रमासाठी मुलं, सूना, लेकी, जावई, नातवंड, असे सगळे जमले होते. घरात गडबड होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. मुलं मस्ती करण्यात खेळण्यात मग्न होती. तेवढ्यात कोणाचातरी धक्का लागला आणि हिराच्या हातून पाण्याचा ग्लास, संपतच्या अंगावर पडला. मागचापुढचा विचार न करता (जो त्यांनी आजपर्यंत कधीच केला नाही) संपतनी हीराच्या धोबडीत मारलं आणि अर्वाच्य शिव्या दिल्या. एरवीची गोष्टं वेगळी होती. पण आज लेकी,सूना, जावई, ह्यांच्या समोर झालेला अपमान तिला सहन झाला नाही. त्या घटनेनंतर हिरानी ठरवलं, "आता बास! आता ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायची वेळ आली आहे."

तिने कुठूनतरी आमच्या संस्थेची माहिती मिळवली आणि येऊन नवर्याविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. स्वतःची माहिती तिने अगदी शांतपणे सांगितली. कशाही बद्दल त्रागा नाही, कोणासाठी तिने अपशब्द वापरला नाही. तिने कशाबद्दल कोणाला पण दोष दिला नाही. तिचं एकच म्हणणं होतं, "आज ४५ वर्षाच्या संसारा नंतर मला कळून चुकलाय कि मी ह्या माणसासोबत एकाच छताखाली आता नाही राहू शकत. ताई, मी काय करायला पाहिजे ते तुम्ही मला सांगा."

नेहेमीप्रमाणे आमच्या मनात अनेक प्रश्न होते. "हिराताई, तुम्ही रहाणार कुठे? तुमच्या सुरक्षिततेच काय?............

"मी कुठे रहाणार म्हणजे? तिथेच! मी आणि महेश! संपतरावांच्या मालकीची दोन घरं आहेत, शेती आहे, त्याचं उत्पन्न आहे, त्यांना मिळणारं पेन्शन आहे, बँकेत ठेवलेला रगड पैसा आहे. आहे सगळं. पण द्यायची दानत नाही. पैसा पण नाही आणि कोणाला सुख पण नाही. ते जाऊ दे.

"माझ्या सुरक्षिततेची काळजी नाही. त्याला मला मारून टाकण्यात इंटरेस्ट नाही, त्रास देण्यात आहे. माझा अपमान करण्यात आहे. नाहीतर ४५ वर्षात मला कधीच संपवली असती.

"मी तुमच्याकडे आले आहे. आता तुम्ही सांगाल ते आणि तसं मी वागेन. आज मी माझ्या मुलीकडे जाणार आहे. तसं मुलगी आणि जावई बरेच दिवसांपासून बोलावतायत. काही दिवस राहीन. न अपमान करून घेता, न शिव्या खाता जगायची सवय करायला हवी. तसं जगता येतं हेच विसरत चालले आहे." हिराताईच्या डोळ्यात पाणी आल. ऑफिसमध्ये आल्यापासून पहिल्यांदा तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

संपतराव आमचं पाहिलं पत्र मिळाल्याबरोबर आम्हाला भेटायला आले. त्यांच्या मनात हिराताई बद्दलचा  राग, तिरस्कार त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. त्यांच्या मते त्याचं काहीच चुकत नव्हतं. ते म्हणाले, "तिच्या लायकी प्रमाणे तिला वागणूक मिळत होती. उलट तिची लायकी नसतांना मी तिला इतके वर्षं सहन केलं, घरात राहू दिलं, जगू दिलं, ह्याचे आभार मानायचे सोडून तुमच्याकडे तक्रार करते. समजते काय ती स्वतःला? सध्या तर कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. कुठे गेली आहे? कधी येणार? माहित नाही. तिची बेफिकिरी किती? इकडे आपला नवरा जगाला कि मेला? तो जेवला का? रात्रीची त्याची काय सोय होत असेल? त्याची सेवा कोण करत असेल? हिला कशाचं काही नाही. तिला ठाऊक आहे रात्री झोपायच्या आधी माझ्या डोक्याला तिने तेल लाऊन दिलं नाही, माझे पाय चेपून दिले नाहीत तर मला झोप लागत नाही. मी आयुष्यभर केलेल्या उपकाराची हि चांगलीच परतफेड करतीये. हे सर्व करण्यासाठी, असं वागण्यासाठी महेशचीच फूस असणार. ह्यात काही शंका नाही. नाहीतर तिला एवढं डोकं नाहीये. तिला जर असं वाटत असेल कि एवढं तारतम्य सोडून वागल्यावर पण मी तिला घरात घेईन, तर तो तिचा गैरसमज आहे. बघू कुठे जाते आणि कोण सांभाळताय ते. चार दिवस उपाशी राहिली कि सर्व डोकं ठिकाणावर येईल."

संपतराव बोलायचं थांबले. जेंव्हा आम्ही त्यांना सांगितलं, 'त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. हिराताईनी त्यांच्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतलाय.'

हे त्यांच्यासाठी फारच अनपेक्षित होतं. क्षणभर काय बोलावं त्यांना काही सुचेचना. 'हिरा येणार नाही, ह्याचा अर्थ काय? सेवा करणारी, अपमान सहन करून, वेळप्रसंगी होणारी मारहाण सहन करून मुकाट्यानी जगणारी हिरा नाही मग आयुष्यात काही मजाच नाही.'

संपतराव म्हणाले, "ताई, तुम्ही सांगितलं ते मी ऐकलं आणि मला समजलं. पण जो पर्यंत हिरा हे माझ्या समोर सांगत नाही तोवर मी हे मान्य करायला तयार नाही."

त्यांच्या आग्रहाखातर लगेच पुढील आठवड्यातील तारीख, एकत्र मीटिंग साठी ठरली. मीटिंग मध्ये संपतरावांच्या समोर हिराताई म्हणाल्या, "ताई, मी तुम्हाला जे सांगितलं तेच माझं आजपण म्हणणं आहे. मी ह्या माणसाबरोबर एका छताखाली नाही राहू शकत."

हिराताईचा बदललेला अवतार, तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास, हे सगळं संपतरावांसाठी नवीन होतं. हिरा नाही तर आपली जगण्याची फारच पंचाईत होईल, हे संपतरावांच्या लक्षात आल होतं. अनिच्छेने का होईना पण त्या दिवशी आम्हा सर्वांसमोर त्यांनी मान्य केलं कि कधी कधी त्याचं हिराशी वागणं चुकलं. 'आता माझी मला चूक कळली आहे तर मी ती सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करीन. हिरानी मला एक संधी द्यावी.'

त्यांनी बरीच गळ घातली, आग्रह केला म्हणून हिराताई संपतरावांच्या बरोबर जायला तयार झाली. तिने घातलेल्या काही अटी पण त्यांनी मान्य केल्या. (अटी अगदीच सध्या होत्या- महेश तिच्या बरोबर त्याचं घरात राहील. नवर्यानी तिचा अपमान करू नये. तिच्यावर हात उचलू नये. तिला शिव्या देऊ नयेत.) अश्या तर्हेनी ७० वर्षांचे संपतराव आणि ६४ वर्षांची हिराताई ह्यांच्यात समझोता झाला. आम्हालाच खूप बरं वाटलं. (संपतरावांना त्यांची चूक समजली, आणि त्यांनी नीट वागायचं कबूल केलं म्हणून.)

पण आमचं हा आनंद खूप काळ टिकणार नव्हता. समझोता होऊन आठ दिवसांच्या आत हिराताई पुन्हा ऑफिसला आल्या. खुशाली सांगायला नाही तर नवर्यानी केलेली नवीन नाटकं सांगायला. ह्या आठ दिवसांत त्यांनी कबूल केल्याप्रमाणे तो वागला. पण ह्या वेळेस त्यांनी त्रासाचा प्रकार बदलला. हिराताई सांगत होती, "ताई, एक दिवस तो सकाळी लवकर उठला आणि स्वैपाकघराला कुलूप लाऊन मुलाकडे खुशाल निघून गेला. मी आणि महेश, दिवसभर उपाशी राहिलो. त्या दिवसापासून आम्ही रात्री शांत झोपू शकलो नाही, कारण ह्या माणसाची काही खात्रीच वाटत नाही. मध्ये एकदा मी संद्याकाळी भाजीबाजारात गेले आणि महेश कामावरून आला नव्हता. तर हा बाबा घराला कुलूप लाऊन कुठेतरी निघून गेला. रात्रभर आम्ही दोघं उपाशी दाराशी ह्याची वाट बघत बसून राहिलो. ताई, मी ह्या माणसाबरोबर नाही राहू शकत."

आम्ही फोन करून संपतरावांना बोलावून घेतलं. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सांगितलं, "ताई, मला अजून पण वाटतंय हिने माझ्या सोबत रहावं. मी हे असं वागलो कारण मला महेश माझ्या घरात नको आहे. त्याच्यामुळेच ती शेफारात चालली आहे. त्याउप्पर पण तिला राहायचं नसेल तर ती कुठेही जाऊ शकते. माझा मोठा मुलगा आणि सून माझ्या बरोबर रहातील."

संपतरावांच हे म्हणणं कोणालाच मान्य नव्हतं. खूप प्रकारे समजावून सांगितल्यावर ते त्यांच्या रहात्या घरात हिराताई साठी एक खोली द्यायला तयार झाले. हिराताई तिच्या म्हणण्यावर ठाम होती. ती कोणत्याही कारणांनी नवर्या बरोबर रहायला तयार नव्हती. तिने तिची मागणी परत मांडली, 'शेतातलं दोन खोल्यांचं घर त्यांनी मोकळं करून द्यावं, जिथे ती आणि महेश रहातील.'

हो नाही करत संपतराव हे करायला कबूल झाले. आता प्रश्न आला घरातील भांडीकुंडी आणि महिन्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पैशांचा. आधी तर त्यांना हे मान्यच नव्हतं. मग महा मुश्किलीने ते ५०००/- महिना आणि वर्षाला एक पोतं धान्य द्यायला कबूल झाले. पण संपतराव भांडी सोडायला तयार नव्हते. लहान मुलांसारख त्यांना नको असलेल्या वस्तू: तुटकी-फुटकी भांडी, मोडकळीस आलेलं कपाट, अडगळीतले डबे द्यायला तयार झाले.

आम्ही काही म्हणणार तर हिराताई म्हणाल्या, "ताई, मला एवढं बास झालं. महेशपण आता कमावतोय. आम्ही आम्हाला लागणाऱ्या वस्तू हळूहळू गोळा करू."

८ दिवसांत संपतरावानी शेतातल्या घराची डागडुजी करून घ्यायचं कबूल केलं. तोवर हिराताई त्यांच्या मुलीकडे रहातील हे पण सर्वाना मान्य झालं. ठरल्याप्रमाणे ८-१० दिवसांत हिराताई आणि महेश त्यांच्या नवीन घरात राहायला गेले. आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही होम विझिटला गेलो. हिराताईनी आमचं छान स्वागत केलं. दोन खोल्या आणि स्वैपाघर असं छोटंसं घर होतं. पण हिराताई आणि महेशसाठी ते पुरेसं होतं. आम्ही गेलो तेंव्हा महेश कामानिमित्त बाहेर गेला होता. हिराताई आम्हाला आग्रहाने तिच्या स्वैपाघरात घेऊन गेल्या. आमच्या अपेक्षेपेक्षा घरात खूपच सामान होतं,मुख्यता स्वैपाकघरात! घरात लागणारी सर्व भांडी होती आणि ती पण सुस्थितीत! आमच्या चेहेर्यावरचे भाव ओळखत, मिस्कील हसत हिराताई म्हणाल्या, "तुम्ही काय म्हणता ना ते केलं. भांडी स्मगल केली. नवरा बाहेर गेला कि रोज दोन चार भांडी मुलाकडे आणून ठेवली. त्याला काही कळणार नाही. अहो त्याला काल काय खाल्लं आणि कोणते कपडे घातले होते ते आठवत नाही. त्याला घरातून कमी झालेली भांडी मरेपर्यंत आठवणार नाहीत."

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. हिराताईनी स्वताहून विषय काढला. 

"ताई, तुम्ही सगळ्या मला देवासारख्या भेटलात. तुम्ही मदत केलीत म्हणून आज मी हे सुखाचे दिवस अनुभवतीये. कानाला शिव्या ऐकायची आणि मनाला धाकात राहायची इतकी सवय झाली होती, कि सुरवातीला खूप चुकल्या-चुकल्या सारखं वाटायचं. पण मला वाटलं त्या पेक्षा लवकर ह्याची सवय झाली आणि आता हेच भारी वाटतंय."

"हिराताई, संपतराव काय म्हणतायत? मोठ्या मुलाकडे मजेत का? त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, तेंव्हा मुलगा आणि सून चांगली सेवा करत असतील."

"ताई, संपतरावांची सर्व गुर्मी उतरली आहे. मोठा मुलगा आणि त्याच्या बायकोने त्यांचं काही करणं तर लांबच. साध भेटायला पण जात नाहीत. मला विचारलं होतं, 'तुझ्याकडे जेवायला आलो तर चालेल का?' मी काही सांगायच्या आधी महेशनी त्यांना निक्षून 'जमणार नाही' असे सांगितले आणि विषय संपवला. कुठून तरी  जेवणाचा डबा मागवतात असं ऐकलं."

आम्ही पुढे काही म्हणणार तेवढ्यात एक मुलगा जेवणाचा डबा घ्यायला आला. "हा कोणासाठी?" असं न रहावल्यामुळे आम्ही विचारलं. आलेल्या मुलाच्या हातात डबा देत हिराबाई म्हणाली, "संपतरावांना कोरोना झाला आहे. मोठा मुलगा आणि सून त्याची काळजी घेत नाहीत. माणुसकी म्हणून मी सकाळ संध्याकाळ जेवण पाठवते!"   

Sunday 13 June 2021

माझं कधीच काही चुकत नाही

माझं कधीच काही चुकत नाही

आज मी जरा ठरवूनच ऑफिसला उशिरा गेले. खरं म्हणजे मी एखादवेळेस येणार नाही, असाच निरोप दिला होता. पण इतक्या वर्षांची ऑफिसला जाण्याची, सर्वाना भेटण्याची, अडचणीत सापडलेल्या कुटुंबाना मदत करण्याची सवय मला काही घरात स्वस्थ बसू देईना. ऑफिसला पोहोचले तर नवीन नोंदणी करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी होती. पण खुशाली सांगायला आलेल्या हीना आणि परेशची चौकशी करण्यात, आणि त्यांच्या जुळ्या मुलांचं कौतुक करण्यात सर्वजणी मग्न होत्या. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान होतं. खरं म्हणजे हि केसपण वेगळीच होती.

मागील ३-४ वर्षातील केस असेल. हीना आणि परेश दोघं उच्च शिक्षित! दोघपण इंजिनीअर! सुशिक्षित, सधन कुटुंबातील! मुलगी नाशिकची आणि मुलगा सुरतचा. मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला. २-२.५ लाख महिना पगार. परेशच्या घरी चारच माणस. तो, त्याचे आई-वडील आणि धाकटी बहीण दिप्ती. दिप्तीच शिक्षण संपलं कि ती पण लग्न करून सासरीच जाणार. म्हणजे २-३ वर्षात राजा-राणीचा संसार! एवढं चांगलं स्थळ. हिनाच्या आई-वडिलांनी १५-२० लाख खर्च करून थाटात लग्न लाऊन दिलं.

लग्न करून हीना सासरी आली. पहिले ८-१५ दिवस बरे गेले. मग लहान-सहान कारणांवरून कुरबुरी सुरु झाल्या. हिनानी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तुलना तिच्या सासू (सरलाबेन) बरोबर होऊ लागली. अगदी चहा करण्यापासून. तिने केलेली घरातील साफसफाई, स्वैपाक, काही पण कोणाच्या मनास येत नव्हतं. तिची प्रत्येक गोष्ट जणू चुकत होती. जाता-येता प्रत्येक जण टोमणे मारत होता. तिचा अपमान करत होता आणि माहेरच्या लोकांचा उद्धार! एक दिवस सरलाबेन नी फतवा काढला आणि घरातील नोकरांना काढून टाकलं. असं केल्यानी घरातील सर्व काम करायला एकच नोकर उरला, हीना! हिनाच्या शिक्षणाचं, तिच्या इतर कौशल्याचं (जसं तिला वाचनाची खूप आवड होती. तिला विविध विषयांची खूप माहिती होती. ती एक चांगली कलाकार होती. नृत्य आणि रंगभूमीवर विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने अनेक बक्षिसं मिळवली होती.) कोणाला काही कौतुक नव्हतं. तिला नोकरी करायची होती, पण त्यासाठी  परवानगी मागायचं तिने धाडसच केलं नाही. एक दिवस सर्वांच्या खुशालीची चौकशी करायला हिनाच्या आईंनी फोन केला. तेंव्हा सरलाबेन चिडून म्हणाल्या," कशी बिनडोक मुलगी आमच्या गळ्यात बांधली आहे. ना स्वैपाक येत, ना साफ-सफाई करता येत. शिक्षणाचं काय कौतुक सांगताय? मुलीच्या जातीला घर, संसार आणि पतीच सुख महत्वाचं. तिला स्वैपाक यायला पाहिजे, स्वच्छता करता आली पाहिजे, घरातील मोठ्यांची मर्जी सांभाळता आली पाहिजे."

त्यांना मधेच थांबवत सरोजबेनने (हिनाची आई) सांगण्याचा प्रयत्न केला, "सरलाबेन, मुलगी शिकायला होस्टेलमध्ये होती. शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच लग्न करून तुमच्या घरी आली. तुम्ही तिला तुमच्या पद्धतीने शिकवा, तयार करा. तिला समजून घ्या. तिला तुमच्या घरात रुळायला वेळ द्या. तुम्ही तिला फोन देता का? मी तिच्याशी बोलते, तिला समजून सांगते."

"तुम्हाला माहिती होतं ना, कि तुमच्या मुलीला घरकामातील काहीच येत नाही. तर मग लग्न लाऊन द्यायची घाई का केलीत? मी काय कुकिंग क्लास सुरु केलाय. सगळं आम्हीच शिकवायचं तर तुम्ही इतकी वर्षं काय केलत? एक वेळेस हे पण समजून घेतलं असत. पण हीना घरात आल्यापासून कोणालाच कुठल्याच प्रकारचं सुख नाही. ना मुलगा खुश आहे ना आम्ही! आमची काय जगावेगळी अपेक्षा होती. घर सांभाळावं आणि दोन चार नातवंड असावीत. पण ते पण सुख आमच्या नशिबात नाहीये असंच वाटतंय."

"अहो सरलाबेन, मुलांच्या लग्नाला सहा महिने होतायत. अहो निसर्गाचे काही नियम आहेत. सगळ्या गोष्टी घाईने नाही मिळवता येत. ती थोडी रुळली, त्यांची मन जुळली की होईल सगळं ठीक......"

सरोजबेन पुढे काही बोलणार तर सरलाबेननी फोन कट केला.

फोनवरील संभाषणाने सरोजबेन अस्वस्थ झाली. पुढील आठवड्यात काहीतरी कारण काढून ती सुरतला लेकीला भेटायला गेली.' (घरी गेल्यावर तिला समजलं की हिनाला शक्तिवर्धक इंजक्शन (जबरदस्तीने) दिलं त्याची रिअक्शन आली, म्हणून दवाखान्यात एडमित केलं होतं.) दार उघडायला हीना आली ती पदराला हात पुसत. हिनाची अवस्था आणि अवतार  बघून सरोजच्या डोळ्यात पाणी आल. चेहेरा ओढलेला, डोळे निस्तेज, डोळ्याखाली काळी वर्तुळ, तब्येत खूपच खराब झाली होती. केस विस्कटलेले आणि साडी इतकी अजागळपणे नेसली होती की क्षणभर त्या माउलीला प्रश्न पडला की 'माझी टीप-टोप रहाणारी, गोड दिसणारी आणि मोकळं हसणारी हीना गेली कुठे? ह्या लोकांनी हीच हे काय करून टाकलाय?'  आईला बघितल्यावर हीना आईच्या गळ्यात पडून लहान मुली सारखी रडायला लागली. तिच्या डोळ्यात एकच आशा होती 'आता आई आली आहे ती सगळं ठीक करेल.'

ती आईला काही सांगणार तेवढ्यात सरलाबेननी सांगायला सुरुवात केली, "केवढी नाटकी आहे ही. आम्ही हिला 'दिवस का रहात नाहीत' म्हणून तपासायला घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले विकनेस आहे, मी टोनिक लिहून देतो. तिला पटकन बर वाटावं म्हणून परेशनी सुचवलं म्हणून डॉक्टरनी बि१२ चं इंजक्शन दिलं. तुमच्या मुलीनी केवढा तमाशा केला. इतकी लाज वाटली त्या दिवशी. (खरतर हिनाला तो डोस सूट नाही झाला. त्याची रिअकशन आली. आणि तिला दवाखान्यात एडमिट करावं लागलं. आदल्या दिवशीच तिला घरी आणलं होतं.) ती आता नजरेसमोर पण नको असं वाटतय. आपले संबंध जुळल्यापासून आज पहिल्यांदा तुम्ही काहीतरी शहाणपणा दाखवला. वेळेवर आलात. जाताना तुमची लाडकी लेक बरोबर घेऊन जा."

सरोजबेनचा झालेला अपमान, हिनाची अवस्था, सरलाबेनच वागणं, ह्या सगळ्यामुळे सरोज आल्या पावली आपल्या मुलीला नाशिकला घेऊन आली.

ह्या घटनेला जवळ-जवळ तीन वर्षं झाली. ह्या तीन वर्षात हिनानी परेशला फोन करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी तिचा फोन घेणं टाळल. समाजाच्या एका कार्यक्रमात भेटला तेंव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, "हीना, तू मला सांगून, विचारून गेली नाहीस. मी घरात नसतांना तू तुझ्या आईसोबत निघून गेलीस. आता तुझं काय करायचं ते माझी आईच ठरवेल. ती म्हणेल तेच माझं पण म्हणणं असेल." हिनाच्या आई-वडिलांनी  सासरच्या लोकांपर्यंत नातेवाईकांच्या हाती खूप वेळा निरोप दिला. समजुतीने प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊया. एकदा भेटूया. मुलं अशी किती दिवस एक-मेकांपासून लांब ठेवायची आणि का? एकत्र आली तर त्यांची मन जुळतील आणि संसाराला लागतील.

पण सासरच्या लोकांकडून काहीच उत्तर आल नाही, आणि कोणीतरी सुचविलं म्हणून हीना, तिच्या आई बरोबर, महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात तक्रार नोंदवायला आली. तिचं म्हणणं ऐकल्यावर हिनाची सासरी झालेली घुसमट, अपमान आणि त्याचा तिच्या तब्येतीवर झालेला परिणाम कळत होता. तीन वर्षं विभक्त राहिल्यावर समझोता होणं अवघड होतं पण अशक्य नव्हतं. मागील तीन वर्षात परेशनी किंवा त्याच्या आई-वडिलांकडून फारकातीची मागणी आली नव्हती. एवढंच नाही तर तो विषय पण कधी त्यांनी उच्चारला नव्हता. हाच एक आशेचा धागा पकडून आम्ही पत्रव्यवहार सुरु केला. पहिल्या दोन पत्रांची परेशनी दखलच घेतली नाही. फोन केला तर उडवा-उडवीची उत्तरं दिली. नाईलाजाने पुढील पत्र त्याच्या ऑफिसच्या पत्यावर पाठवलं. ह्याचा उपयोग झाला. आठ दिवसांत त्याचा चिडून फोन आला. त्यांनी आमच्या ऑफिसात येण्यास स्पष्ट नकार दिला. नाशिकमध्ये राहणाऱ्या त्याच्या काकांनी समजावल्यावर, तो त्याच्या आई-वडिलांना घेऊनच आला. अपेक्षेप्रमाणे पहिल्या भेटीत तिघांनी पण हीना बद्दलच्या त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. परेशच्या बोलण्यात बायको 'न भेटता, बोलता माहेरी निघून गेल्यामुळे त्याचा झालेला अपमान आणि तिच्या ह्या अश्या वागण्यामुळे परेशनी करून घेतलेला गैरसमज की, हिनाच्या मनात आपली काही किंमत नाही' हे जाणवत होतं. सासऱ्यांच काहीच म्हणणं नव्हतं. सरलाबेनच्या मते त्यांचं वागणं चुकलेलच नव्हतं. त्यांचं अजूनपण असंच मत होतं की, सुनेला कामात, धाकात ठेवलं तरच ती घर आणि संसार नीट सांभाळते. (त्यांना त्यांच्या सासूकडून मिळालेल्या वागणुकी मुळे त्याचं असं मत झालं असावं) त्या बैठकीत एक गोष्ट प्रकर्षानी जाणवली की, त्या दिवशी आमच्या समोर ना फारकत घेण्याबद्दल कोणी काही म्हणालं, ना समझोता करण्याबद्दल.

हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही दोघांना एकत्र मीटिंग साठी बोलावलं. परेशला खूप गोष्टी समजून सांगितल्या. त्याच्या जबाबदारी बद्दल. हिनाला घरातून मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकी बद्दल. तिचं शिक्षण, तिच्यातील कलागुण, तिच्या अपेक्षा, तिच्या भावनांची कदर करण गरजेचं आहे. त्या समजून घेणं हे कसं त्याच काम आणि कर्तव्य आहे. दोघांनी एक-मेकांना आणि त्यांच्या गरजा समजून घेणं, मित्रत्वाच नातं जपणं आणि जोपासण सुखी संसारासाठी खूप गरजेचं आहे. काही वेळ विचार केल्यावर  परेश म्हणाला की, पुढील एक वर्षं त्याला कंपनीच्या कामासाठी अहमदाबादला रहावं लागणार होतं. हिनाची तयारी असेल तर आणि त्याच्या काही अटी- तिने त्याच्या सोबत रहावं, घर नीट सांभाळावं आणि काहीही अडचण असेल तर मोकळं बोलावं. हे मान्य असेल तर समझोता करायची त्याची तयारी होती. हीनाने पण ती सासरी रहात असतांना सहा महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्या पुन्हा होऊ नयेत ह्या साठी तो खबरदारी घेईल आणि जातीने लक्ष घालेल, अशी आशा व्यक्त केली. हिनाची पहिल्या दिवसापासून समझोता करून, नांदायला जायचीच इच्छा आणि तयारी होती. परेशच्या बोलण्यातून पण समझोता करायची तयारी जाणवली. एकत्र बैठकीत दोघांमध्ये समझोता झाला.

दोघांचा सुखाचा संसार सुरु झाला. वर्षभरात हिनाकडून अपेक्षित गोड बातमी आली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. आम्हाला वाटलं, आता सगळं छान होईल. पण तसं घडलं नाही. एक दिवस हिना भेटायला आली आणि म्हणाली, "ताई, मला कसं वागू तेच कळत नाहीये. मी माहेरी आल्यापासून आजपर्यंत परेश मला कधी भेटायला आला नाही. अजून त्यांनी मुलांना पण बघितलं नाही. तो फोन करून खुशाली विचारतो. मुलांचे फोटो मी पाठवते. इकडे भेटायला ये असं म्हणाले कि त्याचं एकच उत्तर असत, आईशी बोलतो आणि कळवतो. ताई, मला खात्री आहे त्याच्या आईने त्याला येऊ दिलं नसेल. तो त्याच्या आईचं इतकं का ऐकतो? तो स्वतःची बुद्धी का नाही वापरत? आमच्या दोघांमध्ये काहीच वाद नाहीत, कि भांडण नाही. त्याला समजत नाहीये का, कि त्याच्या अश्या वागण्याने सगळ्यांनाच त्रास होतोय. ताई, प्लीज काहीतरी करा. माझा संसार वाचवा."

हिनाच्या समोर परेशला अभिनंदन करायला फोन केला आणि भेटायला बोलावलं. कबूल केल्याप्रमाणे तो आठ दिवसांत भेटायला आला. त्या वेळेस बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला. परेशनी परस्पर समझोता केलेला त्याच्या आईला अजिबात आवडलं नव्हतं. त्या दिवसापासून तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. नातवंड झाल्याचं समजलं पण तिच्या वागण्यात फरक पडला नाही. आता ती माझ्याशी बोलते कारण मी तिला कबूल केलंय कि मी तिच्या परवानगीशिवाय माझ्या मुलांना भेटणार नाही. आणि बघायला जाणार नाही. "ताई, ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. आईंनी आमच्यासाठी खूप कष्ट केलेत. मला तिला सुखात ठेवायचं आहे. तिचं मन नको दुखवायला म्हणून मी हे सगळं करतोय. आज मी इथे आलोय हे तिला माहित नाहीये. कळल कि काय करेल सांगता येत नाही. पण मला माझ्या मुलांना आणि हिनाला भेटायची बघायची खूप इच्छा आहे. ताई, मी काय करू?"

"परेश, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बरोबर तुझं वेगळ नातं आहे. त्याचं तुझ्या आयुष्यात वेगळ स्थान आहे. प्रत्येकाच्या प्रती वेगळी जबाबदारी आहे. कोणाला किती महत्व द्यायचं आणि कोणाच्या भावना जपण्यासाठी कुठलं नातं तोडायचं हे तू ठरवायचं आहे. ह्या सगळ्यातून एक समतोल साधू शकलास तरच सुखी होशील. काय ठरवशील ते कळव."

दुसऱ्या दिवशी हिनाचा खुशखबर द्यायला फोन आला. परेश भेटायला आला होता आणि तो तिला त्याच्या बरोबर घेऊन जायला तयार होता.

दोघं ऑफिसमध्ये भेटायला आले. काल झालेल्या बोलण्याचा परेशनी गांभीर्याने विचार केला आणि विचारा अंतीच हा निर्णय घेतला होता. आईच्या प्रतिक्रियेबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, "ताई, मला कळून चुकलंय, माझी आई आणि तिचा स्वभाव बदलणार नाही. ती हिनाला कधीच सुखात राहू देणार नाही. तिचे विचारच वेगळे आहेत. मी हीना आणि मुलांना घेऊन वेगळ्या घरात राहायचं ठरवलं आहे. मी वेगळ राहून पण माझ्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकीन. ताई, आमच्या कडून काही लिहून घ्यायचं असेल तर घ्या."

त्या दिवशी दोघं आमचं निरोप घेऊन गेले ते जवळ-जवळ चार महिन्यांनी भेटायला आले. मधल्या काळात फोनवरून त्यांची खुशाली नियमितपणे कळवत होते. आज त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद आणि समाधान बराच काही सांगत होतं. म्हणून आजचं त्याचं येणं आणि भेटणं आमच्यासाठी खास होतं!