Thursday 5 August 2021

प्लॅन...

 

त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये जे काही घडलं त्यानंतर रसिका आणि तिचा प्रोब्लेम कोणीच विसरू शकलो नव्हतो. इतर केसेस प्रमाणे रसिका तिची तक्रार नोंदवायला आली होती. तिच्या बरोबर तिची दोन मुलं होती. मोठा असेल तीन वर्षांचा आणि धाकटा कडेवर. चार चोघीन सारखीच तिची कथा होती. १२वि पर्यंत शिकलेल्या रसिकाच ५ वर्षां पूर्वी रोहनशी, रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं. रोहन सरकारी नोकरीत होता. पगार चांगला होता. रसिकाची सासू विचित्र होती. तिच्या मते रसिका हि घरातील सर्व काम करायला, घरातल्यांची मर्जी सांभाळायला आणलेली एक व्यक्ती! सासूची मरजी सांभाळली, तिची सेवा केली, तिला काय हवं नको ते पाहिलं कि ती कमी त्रास द्यायची. कमी शिव्या घालायची. नवर्याचा स्वभाव लहरी होता. कधी खूप प्रेम करायचा, लाड करायचा. तर कधी अपमान करायचा. एक-दोन वेळा तर हात पण उचलला होता. हे सर्व रसिका सहन करत होती. कारण वैवाहिक आयुष्य म्हणजे बाईसाठी अशी तारेवरची कसरत असतेच, हा तिचा समाज होता. तिची मुख्य तक्रार होती ती रोहनच्या अनैतिक संबंधान बद्दल. तिला खात्री होती कि रोहनची एक नाही अनेक लफडी आहेत. रात्री उशिरापर्यंत त्याचं कोणाशी तरी फोनवर चालणारं चेटिंग, ते फोनमधले ' आय लव यु' चे मेसेजेस, आणि ह्याबद्दल विचारायला गेलं कि वाद, भांडण आणि कधीतरी एखादा फटका, हे नित्याचं झालं होतं. ह्याला कंटाळूनच ती सल्ला घ्यायला आणि गरज पडली तर तक्रार नोंदवायला आली होती.

पण तिच्याशी आमचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी तिचे आई-वडील आले. तिच्या आईंनी ऑफिसमध्ये खूप गोंधळ केला. तिला आपल्या जावयाच (रोहनच) बाहेर लफडं आहे, अनैतिक संबंध आहेत हे मान्यच नव्हतं. रोहनसारखा जावई मिळायला भाग्य लागतं असा तिचा समज होता. तिने रसिकाला सांगितलं, " हे तुझ्या मनातला वहेम आहे. चांगली देवमाणसं मिळाली आहेत. नाती टिकवायला शीक. तुला जरका असं वाटत असेल कि नवऱ्याच घर सोडून तू दोन पोरं घेऊन माहेरी येशील आणि आम्ही तुला घरात राहू देऊ, तर तो तुझा गैरसमज आहे. चार दिवस माहेरी म्हणून यायचं आणि सासरी निघून जायचं."

रसिका काही म्हणणार तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ रोहन ऑफिसमध्ये हजर झाला. त्यांनी आल्या-आल्या तिच्या हातातून मुलाला स्वतःच्या कडेवर उचलून घेतलं. सोबत आणलेली साडी तिला देत म्हणाला, "रसिका, मला आज डिफरंसचे पैसे मिळाले म्हणून तुझ्यासाठी साडी घेऊन घरी गेलो तर तू घरी नव्हतीस. तुझ्या वडिलांना फोन केला तर समजलं तू इथे आली आहेस. रसिका, तू अशी का वागतेस? माझा तुझ्यावर आणि मुलांवर किती जीव आहे. तू अशी न सांगता जात नको जाऊस." असं म्हणत तिचा हात धरून रडायला लागला. आम्ही त्यांचा फमिली ड्रामा बघत होतो. मध्ये काही बोलणार तेवड्यात रसिकाच्या आईंनी रसिकाचा हात घट्ट पकडला आणि तिला रोहन समोर आणून उभं करत म्हणाली, "रसिका, बास झाली आता तुझी नाटकं. जावई घ्यायला आलेत तेंव्हा मुकाट्यानी त्यांच्या बरोबर घरी जा."

रसिकांनी आपला हात सोडवत म्हणाली, "आई, जो पर्यंत माझ्या नवऱ्याच्या फोन मधले मेसेजेस कुणाचे आणि त्या मुली कोण, हे मला कळत नाही तोवर मी कुठे पण जाणार नाही."

"रसिका, तू माझ्यावर का संशय घेतेस? अग माझी, तुझ्या व्यतिरिक्त कोणी मैत्रीण नाही. इतर कोणाबरोबर ओळख वाढविण्याचा पण मी विचार करू शकत नाही, अग संबंध लफडं ह्या शब्दांनी पण मला त्रास होतो. तुला माझा विश्वास वाटत नाहीये ना. हा माझा मोबईल मी इथे टेबलवर ठेवतो. आई-बाबा, तुम्ही चेक करा. ताई तुम्ही चेक करा. रसिका तू बघून घे. जर का त्यात काही सापडलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे."

तिच्या आई-वडिलांचा तर जावयावर मुलीपेक्षा पण जास्त विश्वास होता. त्यांना फोन बघायची गरज वाटली नाही. रसिकांनी फोन मध्ये फोटो मेसेजेस शोधायचा खूप प्रतत्न केला, पण काही सापडलं नाही. ' पण मी पाहिलेले फोटो, मेसेजेस कुठे गेले ' असं ती पुटपुटली.

"रसिका, आतातर तुझी खात्री पटली ना? आता चल घरी. आई-बाबा, तुम्ही पण चला. सगळे गैरसमज दूर झाले आहेत. इस खुशिमे साथमे खाना खायेंगे."

असं त्या दिवशी रसिका आली आणि तिच्या आई-वडील आणि नवर्याबरोबर निघून गेली. वेगळ्याच केसच्या बरोबर आलेला एक विशीतला मुलगा सहज हसत म्हणाला, "ताई नवरा स्मार्ट आहे. त्यांनी काही डाटा लपवलेला असू शकतो. हे असं करणं सहज शक्य आहे."

तो हे वाक्य सहज बोलून गेला, पण आमच्या मनाला रुखरुख लागली.

रसिका, आज जवळ जवळ साडेतीन वर्षांनी आमच्या ऑफिसमध्ये आली होती. पहिली दोन मुलं होती. ह्या वेळेला तिसर्या मुलाची भर पडली. तिच्या सोबत तिचे आई-वडील पण होते. तिची आई म्हणाली' "ताई, आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. रसिका काय झालं ते ताईना सांग."

रसिका सांगत होती, "ताई त्या दिवशी मी काहीच सिद्ध करू शकले नाही म्हणून त्याच्या सोबत गेले. पण मला संशय होताच. काही दिवस मी शांत राहिले. मग आई-वडील आणि नवऱ्याला पटवून कंपनीत नोकरी करायला लागले. तिथे मला महेश भेटला. त्यांनी मला मोबईलचा पासवर्ड क्रेक करायला आणि लपवलेला डाटा शोधायला शिकवलं. दरम्यानच्या काळात सुहासचा जन्म झाला. मी काही दिवस शांत राहिले. मला हवी ती सगळी माहिती गोळा केली. मग एक दिवस आई-वडिलांना जेवायला घरी बोलावलं, आणि सगळ्यांसमोर हा विषय काढला. माझ्या हातात पुरावे होते. त्याचं खरं रूप सर्वांसमोर आल्यावर तो खूप चिडला आणि माझ्या आई-वडिलांसमोर मला मारलं. आईला माझं म्हणणं पटलं. आई मला आणि मुलांना घेऊन घरी आली. ८-१० दिवसांत रोहन 'मुलांची खूप आठवण येते आहे म्हणून त्यांना भेटायला आला. मुलांना खाऊ घेऊन देतो असं सांगून घेऊन गेला तो परत आलाच नाही. मग पोलिसांत तक्रार केली आणि त्याला मुलं आणून सोडावी लागली.

त्या दिवसानंतर तो खूप वेळा माझ्या माहेरी आला. कधी विनवण्या करायचा तर कधी दारू पिऊन यायचा आणि खूप तमाशा करायचा. एक दोन वेळा त्यानी घरात येऊन मुलांना घेऊन जायचा प्रयत्न केला. दोन तीन वेळा मला मारहाण केली. माझ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन तमाशा करतो. ताई, तुम्ही प्लीज काहीतरी करा."

रसिकांनी रीतसर तक्रार नोंदवली. रोहनला ऑफिसात बोलावलं. तो पहिला निरोप मिळाल्याबरोबर ऑफिस मध्ये आला. त्यानी, रसिकाचा कसा गैरसमज झाला आहे, आणि त्याचं तिच्यावर आणि मुलांवर किती प्रेम आहे, हि टेप परत एकदा वाजवली. तो समझोता करायला तयार होता. एकत्र मीटिंगची तारीख ठरली.

रसिकांनी एकच मुद्दा लाऊन धरला. "ताई, मी रोहन कडे जायला एका अटीवर तयार आहे. त्यांनी रंजना, माधुरी आणि शोभाला, इथे तुमच्या समोर बोलवावं आणि त्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं सांगावं. ह्या तिघी मला ठाऊक आहेत. इतर असतील तर त्यांना पण बोलावू दे. एकाच दिवशी सगळे समाज गैरसमज दूर होतील."

रोहन म्हणाला, "रसिका, तो भूतकाळ आहे. तू तेच किती दिवस उगाळत बसणार आहेस? तुला आपला संसार, आपली मुलं, त्याचं भविष्य असा काहीच विषय बोलायला नाहीये का? तुला मी कसं समजाऊ माझा तुम्हा सगळ्यांवर किती जीव आहे'. आजपर्यंत मी तुमच्यासाठी कमी केलं का? तुम्हाला कधी काही कमी पडू दिलं का? माझ्या कर्तव्यात कुठे कमी पडलो का? नाही ना? मग तू अशी का वागतेस? प्लीज मला सोडून जाऊ नकोस." असं म्हणत रोहन अक्षरशः तिच्या पाया पडला.

"रोहन, हे ऑफिस आहे. आपलं घर नाही. इथे तमाशा करू नकोस. तुझा आमच्यावर जीव आहे हे मला ठाऊक आहे. पण तुझी बाहेर लफडी आहेत हे पण तितकच खरं आहे. मला ह्या सगळ्याचा खूप त्रास होतो. तुझ्या जागी मी असते आणि असे मित्र असते तर तुला ते चाललं असत का?" रसिकाच्या ह्या प्रश्नाला रोहनकडे काहीच उत्तर नव्हतं.

त्या दिवशी समझोता होऊ शकला नाही.

पण समझोता झालाच नाही असं नाही. तो आमच्या ऑफिसमध्ये, आमच्या समोर लिखापढी करून झाला नाही. त्या दोघांमध्ये परस्पर समझोता झाला. त्याला कारण देखील तसच होतं. रोहन खूप वेळा तिच्या घरी गेला, तिची माफी मागितली, तिच्या आई-वडिलांच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागितली. समाजातील चार माणसांसमोर, चार नातेवाईकांसमोर सर्व गोष्टी कबूल केल्या. पुन्हा चुकणार नाही. रसिका म्हणेल तसं वागण्याचा शब्द दिला. शेवटी रसिका आणि तिच्या आई-वडिलांचं नाईलाज झाला. ते रसिकाला पाठवायला तयार झाले, पण एका अटीवर- इथून पुढे रसिका आणि रोहनच्या आयुष्यात जे काही घडेल त्याला सर्वस्वी ते दोघे जबाबदार असतील. सुख-दुख्खाला दोघांनी यावं, त्यांचं स्वागतच होईल. पण भांडण झाल्यामुळे रसिका माहेरी आली तर तिला आम्ही घरात घेणार नाही. रसिकाची द्विधा मनस्थिती होती. पण शेवटी समाजातील चार प्रतिष्ठित लोकांनी आणि नातेवाईकांनी भरीस घातलं म्हणून ती 'हा शेवटचा चान्स' असं मनाची समजूत घालून जायला तयार झाली.

ह्याला पण सुमारे पाच-सहा महिने झाले असतील. एक दिवस रसिका पुन्हा आमच्या ऑफिसमध्ये आली. ती स्वताहून आली नव्हतीच. तिला तिची मावशी (वत्सलाबाई) घेऊन आली होती. (तिच्या सोबत तिचा नवरा पण होता) ते सुद्धा असं सांगायला कि, "ताई ह्या मुलीची कुठे तरी सोय करा. ती माझ्या घरात नको. तिच्यामुळे माझ्या घरात खूप प्रोब्लेम्स झाले आहेत. स्वताचा नवरा सांभाळू शकली नाही, लग्न टिकवता आल नाही, आता माझ्या मुलाच्या मागे लागली आहे. चांगलंच फसवलं आहे त्याला. माझा दीपक आहे भोळा. ती जे सांगेल ते त्याला खरंच वाटतं. ती त्याला तिच्या जाळ्यात अडकवतीये. आतातर माझा दीपक म्हणतोय, 'आई मी हिच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही माझं हिच्याशी लग्न लाऊन दिलं नाहीत तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बर वाईट करून घेईन.' हिच्यामुळे घरातील शांतता बिघडून गेली आहे."

"पण हि तुमच्या घरात का आणि कधी आली? आणि मागील दिडेक महिन्यात काय घडलं?"

"महिना झाला असेल. त्यांच्यात (रसिका आणि रोहन मध्ये) खूप कडाक्याचा वाद आणि भांडण झालं. हे त्यांचं नेहेमीचच झालं होतं. रसिका धाकट्याला घेऊन तिच्या माहेरी गेली, पण तिच्या आई-वडीलानी  तिला घरात घेतलं नाही. मला तिची दया येऊन मी तिला घरात घेतलं, तर केलेल्या उपकाराची चांगलीच परतफेड करतीये."

आणि रसिकाला उद्देशून म्हणाली, "रसिका, तुला मी ऑफिसात आणून सोडली आहे. इथून तू तुझ्या मुलाला घेऊन कुठे पण जा. पण आमच्या घरी परत येऊ नकोस."

ह्यावर रसिका काहीच बोलली नाही. ती शांतपणे तिच्या दोन वर्षांच्या सुहासला बिस्कीट भरवत होती.

आमच्या ऑफिसमधल्या भारतीताई म्हणाल्या, "अग रसिका, तुझं लक्ष कुठे आहे? ताई काय विचारतायत?"

"ताई, मला माहित आहे रोहनचा माझ्यावर आणि माझ्या मुलांवर खूप जीव आहे. पण म्हणून मी हि अशी लफडी सहन करू शकत नव्हते. मी घर सोडून जाऊ नये म्हणून त्यानी खूप प्रयत्न केले. "रोहन, तुझ्या ह्या वागण्याचा मला खूप मानसिक त्रास होतोय. हा त्रास काय असतो ते तुला कधी तरी कळेल." असं सांगून मी त्याच्या जवळ मोठी दोन्ही मुलं ठेवली, आणि सुहासला सोबत घेऊन रडतच घरातून निघाले. मी माहेरी गेले. पण आईंनी मला घरात घेतलं नाही. मी सुहासला घेऊन तिच्या दारातच रडत बसले. काय करावं, कुठे जावं काही सुचत नव्हतं. त्या दिवशी मावशी आईला सहजच भेटायला आली होती. माझ्या आयुष्यात काय घडलंय हे समजल्यावर ती मला तिच्या घरी घेऊन आली . तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि मावशीचे माझ्यावर खूप उपकार आहेत. एक दिवस सकाळी मी कामावर जायला निघाले तेंव्हा मावशी म्हणाली, 'रसिका, इथे रहायचं असेल तर महिन्याच्या खर्चाचे पैसे द्यावे लागतील.' मला ते मान्यच होतं. मी माझा संपूर्ण पगार मावशीला दिला. ते मला परत नको आहेत. आज ती मला घरातून बाहेर जायला सांगतीये. मी चार दिवसांपूर्वी काकांना १०००० रुपये दिले होते ते त्यांनी मला द्यावेत. मी लगेच घर सोडायला तयार आहे."

"आणि मावशीची तुझ्या बद्दल तक्रार आहे, त्याचं काय? ती म्हणतीये तू दीपकला नादी लावलंस. हा काय प्रकार आहे."

"ताई, दीपक माझ्या पेक्षा लहान आहे. त्याला फिरायला, हॉटेलात जायला आवडतं. त्याच्या आई वडिलां कडे त्याला द्यायला पैसे नाहीत. म्हणून मी त्याची हौस पुरी करते. एवढंच.

"काकांनी माझे १०००० द्यावेत मी त्याचं घर लगेच सोडते."

काकांनी ताबडतोप खिशातून चेक काढला आणि लिहायला सुरुवात केली. तेवढ्यात रसिका म्हणाली, "काका, बँकेत पैसे आहेत का? काल आपलं किराणा बील मी भरलं म्हणून विचारते."

"दोन दिवसांत पैशांची सोय करतो. पण हिने आमच्या मुलाचा नाद सोडावा." असं काकांनी कबूल केलं.

दोन दिवसांनी वत्सलाबाईचा फोन आला. सांगायला, "ताई, माझा दीपक घर सोडून गेला. दोन दिवसांपासून गायब आहे. मी आत्ताचा मिसिंग कम्प्लेंट करून आले"

"आणि रसिका?"

"रसिका त्या दिवशी आमच्या बरोबर आली नाही. ती तिच्या आईकडे गेली असेल. मला ठाऊक नाही."

थोड्यावेळानी रसिकाच्या आईने कळवले, "ताई, दोन दिवसांपूर्वी रसिका घरी आली होती, तिचे कपडे न्यायला. मुलांची आठवण येतीये. रोहनकडे जाते म्हणाली. आज सकाळी त्याला विचारलं तेंव्हा समजलं ती त्याच्या घरी गेलीच नाही. ताई, मला खूप काळजी वाटते आहे. कुठे गेली असेल रसिका?"

दीपक आणि रसिकाच्या पालकांनी आणि रोहननी वेग-वेगळ्या पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार नोंदवली.

ह्या घटनेला १० दिवस झाले असतील. एक दिवस रोहनचा असं कळवायला फोन आला की, 'रसिका घरी सुखरूप पोहोचली.'

८ दिवसांनी रसिकाचा खुशाली कळवायला फोन आला. तेंव्हा सर्व गोष्टींचा खुलासा झाला. तिने सांगितलं, "ताई, दीपक आणि मी, आम्ही दोघं मावस भावंडं आहोत. आमच्यात चांगलं मैत्रीचं नातं आहे. ते आम्ही नेहेमीच जपलं. एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून मी त्याच्याशी माझा प्रोब्लेम बद्दल बोलले. रोहनला धडा शिकवण्यासाठी मला हे रिस्क घेणं गरजेचं वाटलं. दिपकनी मला चांगली साथ दिली. हॉटेलच्या दोन खोल्यांचं भाडं आणि बाहेर जेवणावर झालेला खर्च आमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त झाला. ८ दिवसातच जवळचे पैसे संपले. मग दिपकनी त्याच्या आईला फोन करून कळवलं. तिने रोहनला कळवलं. रोहननी मला घरी आणायला स्पेश्यल गाडी पाठवली. मी घरी आल्या पासून रोहन इज अ चेंज्ड पर्सन. मोबईल चा पासवर्ड, लॉक सगळ गेलं. मेसेजेस आणि रात्री उशिरा पर्यंतचे फोनवरचं चेतिंग बंद झाल......

ती अजून काही सांगणार तेवढ्यात रोहनने फोन घेतला. म्हणाला, "ताई, मागील १५ दिवसांत रसिकांनी माझं जगच बदलून टाकलं. तिच्यावर माझा खूप विश्वास आहे. पण ती कोणाबरोबर तरी निघून गेली आहे. कुठे आहे काही कळत नव्हतं. कशी आहे? काळजीने बेजार झालो. तेंव्हा मला ती मला इतके वर्षं काय सांगायचा प्रयत्न करत होती ते समजलं. ताई, मी तुम्हाला शब्द देतो, मी आयुष्यात कधीच असं चुकीचं, तिला त्रास होईल असं वागणार नाही." 

 

1 comment: