Thursday 28 January 2021

                                                                    माता ना तू वैरिणी 


  शालिनीच्या कुटुंबात तिचा नवरा आणि त्यांची दोन मुलं एवढेच होते. तिचे आई-वडील गावी रहात होते. मोल मजुरी करून पोट भरत होते. शालिनीचा नवरा, संदीप, सर्वगुणसंपन्न होता. तो धड कमवत नव्हता,त्यात दारू प्यायचा, जुगार खेळायचा आणि त्याला सिनेमा बघायचा आणि हॉटेलात जेवायचा भारी शोक होता. ह्या सगळ्यासाठी त्याची कमाई कमी पडायची. मग अधूनमधून पैसे कमी पडले कि शालिनीला शिवीगाळ, मारहाण करायचा. ती तरी त्याला पैसे कुठून देणार? माहेरी जायची सोय नव्हती. आई-वडिलांचं जेमतेम भागत होतं. मग काय निमुटपणे मार खायची, कधी अती झालं कि उलटून शिव्या द्यायची. तिला काम करून चार पैसे कमवायची खूप गरज होती. मुलांना दोन वेळा पोटभर जेऊ घालण्यासाठी, नवर्याचा मर चुकवण्यासाठी आणि चार दिवस सुखाचे जगण्यासाठी. तिच्या हातात कला होती. ती उत्तम शिवण शिवायची. ती काम शोधत होती आणि त्या सुमारास महिला हक्क संरक्षण समितीला गणवेश शिवायची एक मोठी ऑर्डर मिळाली होती, म्हणून आम्ही कारागीर शोधात होतो. अशी माझी आणि शालीनीची ओळख झाली.

  शिवणाच काम अडीच-तीन महिने चाललं. त्या काळात दर एक दिवसा आड शालिनी भेटायची. शांत स्वभाव, कामात चोख.कधी कशाची तक्रार नाही. कधी तिच्या बद्दल किंवा तिच्या कामाबद्दल कोणाची तक्रार नाही. काळी-सावळी, चुणचुणीत, प्रसन्न चेहेरा, मध्यम बांधा, अबोल स्वभाव आणि प्रेमळ अशी होती शालिनी. काम संपलं तरी नंतर ती भेटायला यायची. अधून मधून शिवणाच काही काम असलं तर आम्ही तिला सांगायचो. मध्ये बरेच दिवस आलीच नाही आणि आली ती 'दिवस गेले आहेत असं सांगायला'.

"ताई, मी आता एवढ्यात नाही यायची. पाच महिने झालेत. घरच करून चक्कर मारायला नाही जमायचं."

 "ते ठीक आहे. काळजी घे. पण दोन मुलांना सांभाळून स्वताच बाळंतपण स्वतःच करशील का? काही मदत लागली तर कळव. पैसे लागले तरी हक्कानी मागुन घे."

 "ताई, तुमचा लई आधार वाटतो. आठवा लागला कि आईला बोलवून घेणार आहे. ती राहील काही दिवस."

 असं सांगून शालिनी गेली ती एक वर्षांनी आली. आली तेंव्हा तिची अवस्था बघवत नव्हती. अंगावरची साडी आणि ब्लाउज फाटलेलं, चेहेऱ्यावर मारल्याच्या आणि बोच्रकारल्याच्या खुणा होत्या. ती लंगडत होती. बहुतेक पायावर फटका बसला असावा.

 "शालिनी, अग काय हि अवस्था. काय झालं काय? कसं झालं? कोणी केलं? मला नीट सविस्तर सांग", असं म्हणत तिला हाताला धरून खुर्चीत बसवलं. घोटभर पाणी प्यायल्यावर शालिनी सांगायला लागली.

  "ताई, मी ठरल्या प्रमाणे माझ्या आईला मदतीसाठी बोलावून घेतली. तिने माझी चांगलीच मदत केली. डीलीवरीच्या गडबडीत माझ्या लक्षात आल नाही. नवव्या महिन्या पासून ते बाळ तीन महिन्यांचं होईपर्यंत त्या दोघांनी मला किचनमध्ये झोपायला लावलं. (खरं म्हणजे शालिनीच दीड खोलीचं घर आहे. १०*१५ मध्ये सर्व) कारण सांगितलं, 'मला विश्रांती मिळावी म्हणून.' मी पण मुर्खासारखा त्यांच्यावर विश्वास ठेवला. मी बाळाला घेऊन आतमध्ये, मुलं शेजारी आत्याकडे आणि हि दोघं मजा मारायची. हे असं किती दिवस चालत होतं मला माहित नाही. एक दिवस मुलांनी घरी झोपण्यासाठी हट्ट केला. तेंव्हा माझा नवरा त्यांच्यावर खूप भडकला आणि मारून, रागावून त्यांना त्यांच्या आत्याकडे पाठवलं. मला हे थोडं विचित्र वाटलं. मला झोप लागेना. सगळं सामसूम झाल्यावर बाहेरच्या खोलीत येऊन बघितलं. ताई, शप्पत घेऊन सांगते, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझी आई आणि माझा नवरा एक-मेकांच्या मिठीत होते. तो किळसवाना प्रकार बघून मी ओरडले. दोघं दचकून उठले. कावरे बावरे झाले. त्यांची चोरी पकडली गेली होती. मी 'हे सगळं बापाला सांगीन असा दम दिला. काही दिवस ठीक गेले. आई माझ्या पाशी राहिली आणि नवरा (दोन गल्ल्या पलीकडे) त्याच्या बहिणीकडे गेला. काही दिवसांनी समजलं कि नणंद बरेच दिवसांपासून गावाला गेली आहे आणि ह्या दोघांचं त्या घरात भेटणं चालू आहे. हे समजल्यावर मला काय करावं काही सुचेना. मी माझ्या बापाला फोन करून बोलावून घेतलं. माझा बाप आला. मी काय चाललं आहे हे त्याच्या कानावर घातलं आणि त्याला विनंती केली, 'तुझी बायको तू गावाला वापस घेऊन जा.'

  बाप म्हणाला," हि कुठली रीत. तुला हवं तेंव्हा माझी बायको इकडे बोलावलीस. तुझा बाप तिकडे एकटा, बिन बाईचा कसा जगेल ह्याचा विचार केलास का? माझं तिकडे सुंदरा संग छान चाललं आहे. मला हि आता नाही लागत. तू गोंधळ घातला आहेस तूच निस्तर." असं म्हणून बाप गावी निघून गेला.

  आता ह्या दोघांना कोणाचीच भीती राहिली नाही. ते राजरोज पणे नवरा-बायको सारखे राहू लागले. माझी मोलकरीण करून टाकली. माझी आईच त्याची रखेल झाली आणि त्या नात्यांनी मालकीण. खूप दिवसांनी माझ्या आईंनी दूर लोटलं म्हणून जाम दारू पिऊन माझा नवरा रात्री माझ्या पाशी आला. मी त्याला जवळ जेऊ दिल नाही. त्याला खूप राग आला. ताई, त्यांनी मला खूप मारलं. आणि ती थेरडी नुसती गम्मत बघत बसली होती. ताई, तुम्ही काहीतरी करा. मला हि बाई आणि हा माणूस माझ्या घरात नको."

  (हे ऐकल्यावर काही क्षण माझं डोकं बंद पडलं.) मी शालीनीची तक्रार नोंदवून घेतली. तिच्या आईला आणि नवऱ्याला, तसेच तिच्या वडिलांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्यांना ते काय चुका करत होते ह्याची जाणीव करून दिली. (शालीनीची आई, वडील आणि तिचा नवरा ह्यांनी नव्यानी निर्माण केलेली नाती हि कायद्याच्या दृष्टीनी गुन्हा आहे, ज्याच्यासाठी त्यांना शिक्षा होऊ शकते. हे कळल्यावर शालिनीचे आई-वडील गावी निघून गेले. नाईलाजाने संदीपनी शालिनी बरोबर राहणं कबूल केलं.) तेवढ्यापुरते सगळे आपापल्या घरी गेले. त्या गल्लीत खूप बदनामी झाल्यामुळे शिलीनिनी तिचं बिऱ्हाड दुसऱ्या वस्तीत हलवलं. शिलीनीला तिच्या ह्या नवीन घरात नवऱ्याला घ्यायची किंवा त्याच्या बरोबर संसार करायची अजिबात इत्छा नव्हती. पण नवर्यानी माफी मागितली, काम करायची आणि मुलांचा सांभाळ करायची खात्री दिली. शालिनीला पण कोणाचा आधार नव्हता. ती पण समझोता करायला तयार झाली. (त्या प्रमाणे त्यांनी सहा महिने कमवून तिला पैसे आणून दिले. मगच समझोता झाला.)

  ह्या गोष्टीला सहा महिने झाले असतील. मागील सहा महिन्यात आम्ही नियमित गृह भेटीला जात होतो. सर्व ठीक चालल होतं. शालिनी कष्ट करून कमवत होती. नवर्याचा अधून मधून त्रास सहन करत होती. कसेतरी दिवस जगत होती. हे सगळं ती मुलांसाठी सहन करत होती. (आम्ही तिला संस्थेत, मुलांना घेऊन, रहातेस का? असं विचारलं होतं. त्यासाठी ती तयार नव्हती.)

  एक दिवस तिच्या शेजारच्या काशीबाई सांगत आल्या,' म्याडम, ती शालिनी तुमच्या कडे यायची ना, तिच्या नवर्यानी काल रात्री तिचा खून केला. काल ती नेहेमीसारखे कपडे शिवत होती. तिचा नवरा उशिरा घरी आला. आल्यावर पैशावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. आम्ही सोडवायला जाणार तेवढ्यात जोरात किंचाळण्याचा आवाज आला. जाऊन बघितलं तर शालिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा मोठा मुलगा (रमेश) म्हणत होता,' बापानी आईला कात्रीनी भोसकल. आणि बाप पळून गेला'. रात्रीच पोलीस आले होते. तुम्ही तिच्याकडे नेहेमी येत होतात म्हणून सांगायला आले.'

  हे धक्कादायक होतं. तो मूर्खपणा करेल हे अपेक्षित होतं पण असं काही करेल असं कधी वाटलं नाही. प्रत्येक वेळेस भेटलो कि आम्ही शालिनीला 'त्याचा नाद सोड. मुलांना घेऊन वेगळी रहा. तुझी दुसरी कडे सोय करतो' असं समजवून सांगत होतो. पण काही उपयोग झाला नाही. तिचं एकच म्हणणं होतं, 'ताई, माझे आई-वडील तर माझ्यासाठी मेले, पण उद्या माझं काही बर वाईट झालं तर मुलांना जवळ करणारा बाप तरी असेल.' आम्हाला तिची काळजी वाटायची. आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन केसची माहिती सांगून, गरज पडली तर मदत करण्याबद्दल विनंती केली होती.

  बातमी कळल्याबरोबर आम्ही निघालो. शालिनीच्या घरी भकास वातावरण होतं. शिजवलेलं अन्न इकडे तिकडे (इतस्ततः) पसरलं होतं. मुलं एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. शेजारच्या बायका त्यांची जमेल तशी काळजी घेत होत्या. कशाची काही गरज असेल तर कळवा असं त्या बायकांना सांगितलं आणि मुलांसाठी नेलेला खाऊ त्यांच्या कडे देऊन निघालो आणि तडक पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं होतं. आमच्या कडील कागदपत्रे, केस फाईल ची प्रत (जी तपासकार्यात किंवा चार्जशीट तयार करण्यासाठी कामास येईल असं त्यांना वाटलं ती सर्व) पोलिसांना देऊन आलो. शालिनीला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमच्या बाजूनी पूर्ण सहकार्य केलं.

  पुढे शालिनीच्या नवऱ्याला अटक झाली. त्याचावर खूनाचा गुन्हा दाखल झाला. केस कोर्टात चालली. संस्थेनी सादर केलेली माहिती, त्या केसमध्ये आम्ही केलेले प्रयत्न आणि वेळोवेळी केलेल्या नोंदींचा खूप उपयोग झाला. सर्वात महत्वाची साक्ष झाली रमेशची. ७ वर्षांच्या रमेशनी कोर्टात न घाबरता साक्ष दिली. साक्षीत त्यांनी आई-वडिलांमध्ये झालेलं भांडण, वडिलांनी नेहेमीप्रमाणे दारूसाठी पैसे मागितले, आईंनी त्यांचं जेवण वाढलं, 'पैसे दे, पैसे दे' म्हणत वडील आईला मारायला लागले. त्यांनी आईला कात्रीनी मारलं. सर्व घटना सविस्तर सांगितल्या. संदीपनी शालिनीचा खून केल्याचं, सादर झालेल्या पुराव्यातून सिद्ध झालं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. जगण्यासाठी धडपडणारी शालिनी गेली! सुटली! आई मेली, बाप तुरुंगात, मुलं पोरकी झाली! ह्याला जबाबदार कोण? शालिनी स्वतः? कि तिचे बेजबाबदार आई,वडील आणि नवरा? का नीती मुल्या बद्दल आग्रही असण्यासाठी शिकवणारा समाज?

1 comment:

  1. खरोखर मन सुन्न झाले वाचून. प्रश्न पडत आहे चूक कोणाची??

    ReplyDelete