Tuesday 16 February 2021

 

 अद्दल

"ताई, येऊ का?" असं विचारायची औपचारिकता करत जोशी काकू एका तिशीच्या आतल्या महिलेला सोबत घेऊन ऑफिसमध्ये आल्या. मालतीताई जोशी, आमच्या साठी जोशी काकू (आम्हा कार्यकर्त्यांपेक्षा २० एक वर्षांनी तरी मोठ्या असतील). ह्या आमच्या संस्थेच्या (महिला हक्क संरक्षण समिती) स्वयं घोषित कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या बघण्यात एखादी पिडीत महिला किंवा अडचणीत सापडलेली महिला आली कि त्या तिला आमच्या ऑफिसला घेऊन यायच्या. ह्यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता. कधी कधी तर रिक्षा साठी पदरचे पैसे पण खर्च करायच्या आणि वर म्हणायच्या, 'तेवढीच समाज सेवा".

माझ्या समोरच्या खुर्चित बसत म्हणाल्या, "ताई, हि संध्या. आज भाजीबाजारात  भेटली. साधारण ओळखीची आहे. म्हणजे बाजारातीलच ओळख. सासरची माणस जरा विचित्र आहेत. दाखवण्या सारखा त्रास नाही, म्हणजे मारहाण वगेरे. सासू कधी ह्यांच्यात असते तर कधी नाशिकरोडला, लेकीकडे. लेकीचं लग्न झालाय. तिच्या नवऱ्याचा टुरिंगचा जॉब आहे. त्यामुळे अधून मधून तिला सोबत महणून सासू तिच्या घरी तर कधी लेक आपल्या आईकडे. मीच काय सांगत बसले आहे. मला बरीच काम आहेत. ताई, मी जाऊ? संध्या, तुला जे सांगावसं वाटेल, बोलावसं वाटेल ते मोकळेपणाने सांग. ताई ह्याच्यातून काहीतरी मार्ग नक्की काढतील."

असं म्हणत जोशी काकू उठल्या आणि त्यांची काम करायला गेल्या. जाताना संध्याला सांगून गेल्या, 'इथेच थांब. माझी काम झाली कि मी तुला न्यायला येते.'

खुर्चीत बसत संध्यानी सांगायला सुरुवात केली,"ताई, मी संध्या. माझं महेशबरोबर ६ वर्षांपूर्वी लग्न झालं. माझं माहेर नागपूर कडच. सासर इगतपुरी येथील. महेश रेल्वेत चांगल्या पोस्टवर आहे. पगार चांगला आहे. घरात सासू (हौसाबाई), नणंद (सरोज), महेश आणि मी. सुरुवातीची तीन वर्षं बरी गेली. छोट्या मोठ्या कुरबुरी होत होत्या. लग्नातील देणघेण, मानपान अशा नेहेमींच्या विषयावरून सासूबाई व इतर सर्वांची कुरकुर असायची. लागोपाठ झालेली दोन बाळंतपण आणि पहिल्या वर्षातील सणवार, ह्या मुळे त्या काळात माहेरहून कोणी ना कोणीतरी भेटायला येत होतं. (तेंव्हा गरज पण होती). येतांना काहीना काहीतरी सासरच्या लोकांसाठी आणत होते. पुढे माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि त्याचं येणं कमी झालं. खरं सांगायचं तर दोन्ही कडील माणस आणि त्यांच्या न संपणाऱ्या मागण्या पुरविण माझ्या वडिलांना जड जात होतं.

 पुढे सरोजचं लग्न झालं. कर्ज काढून थाटामाटात लग्न केलं. (तेंव्हा माझ्या माहेरच्यांनी मदत करावी अशी अपेक्षा होती. तसं सासूबाईनी बोलून पण दाखवलं. माझ्या वडिलांनी मदत करण्यास असमर्थ आहोत असं कळवल्यावर तो विषय तेवढ्यापुरता थांबला. पण त्याचे व्हायचे ते परिणाम झालेच.)तिचं सासर नाशिकच! तिच्या नवऱ्याची फिरतीची नोकरी. सर्वांच्या सोईसाठी आम्ही इगतपुरीहून नाशकात आलो. महेश रोज अप डाऊन करायचा. त्याच घराकडे आधीच लक्ष कमी होतं, त्यात रोजची धावपळ सुरु झाल्यावर तर बघायलाच नको. त्याचा त्याच्या आईवर पूर्ण विश्वास होता. खरं तर श्रद्धाच होती. 'ती म्हणेल ती पूर्व दिशा.'तो नेहेमी म्हणायचा, 'माझी आई आहे तोपर्यंत मला कशाचच टेन्शन नाही. बाबा गेल्यानंतर तिनेच तर आम्हाला मोठं केलं. घर संभाळल, आम्हाला शिकवलं. शी इज अ स्त्रोंग अंड ग्रेट वूमन.'

सरोजच्या लग्नानंतर घरातील वातावरण बदललं. खरं तर बिघडत गेलं. संध्याकाळी महेश घरी आला कि त्या (सासूबाई) वाकडं तोंड करून बसायच्या. माझ्याबद्दल उलटसुलट तकरारी करायच्या. अपेक्षे प्रमाणे महेश माझ्यावर वैतागायचा, मग रागवारागवी, वाद, भांडणं असा आमच्या नात्यात तणाव वाढत गेला. इतके की अलीकडे तर मारहाण पण करतो.

पहिल्या पासूनच घरात येणारा प्रत्येक पैसा सासूबाईंना द्यायचा, मग त्यांच्या परवानगीने खर्च करायचा. हि प्रथाच होती. एक दिवस रात्रीच्या जेवणात महेशच्या पानात सासुनी दोडक्याची भाजी  वाढली.(त्याला दोडकी अजिबात आवडत नाहीत, हे माहित होतं तरी.) महेश वैतागला. चिडून म्हणाला, 'इथे मी दिवसभर मरमर मरायचं, कमवायचं, आणि घरी आल्यावर व्यवस्थित जेवण पण नसावं? संध्या, आता तुला साधा माझ्या आवडीचा स्वैपाक पण जमत नाही कि काय?'

मी सांगायला सुरुवात केली, 'आईनी सांगितलं म्हणून......'

तेवढ्यात सासुनी आवाज वाढवत सांगितलं, "हीचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं. मी तिला करू नको म्हणाले कि मुद्दाम करते. दोडकी आणू नको असं सांगितलं होतं. विचार तिलाच आणि जरा खडसून विचार. हि दिवसभर पुस्तकं वाचत लोळत पडते. एक काम करत नाही. कि सांगितलेलं ऐकत नाही. सगळी काम करून मी थकून जाते. आता बाजारात जाऊन भाजीपाला पण मीच आणायचा असेल तर ते पण करते. मंदिरात सुधाताई भेटल्या त्या म्हणतच होत्या ह्या शिकलेल्या मुली नवर्यांना आपलंसं करतात आणि सगळी सत्ता ताब्यात घेतात. हे बघ महेश, तू म्हणत असलास तर उद्यापासून तुझी महाराणी म्हणेल तसं."

महेशचा पारा चढत होता आणि सासूबाई आगीत तेल ओतायचं काम करत होत्या. त्या संध्याकाळी कोणीच जेवल नाही. सगळ्याचा परिणाम म्हणून आमच्यात खूप वाद झाला. 'आमच्या घरात राहायचं तर शिस्तीत राहायचं. तुझा फालतूपणा खपवून घेणार नाही'. ह्या वाक्यांनी दिवस संपला.

असे प्रसंग वरचेवर घडू लागले. सासूबाई रोज नवीन नाटक करायच्या. वाद आणि भांडण खूप वेळा होऊ लागलं. मी अगदी वैतागून गेले होते. कळत नव्हतं, काय करावं? कोणाशी बोलावं? आई-वडिलांना त्रास द्यायला नको वाटत होता. आणि त्यांना कळवण्याची काही सोय पण नव्हती. घरात एक मोबाईल! तो हि महेशकडे.

अचानक एक दिवस आईचा फोन आला, (तो पण बद्रीनाथहून! भरत मामानी त्यांना सरप्राईज दिलं होतं. ट्रिपचा खर्च, बुकिंग सर्व त्यांनी केलं होतं. आई-बाबा खुश होते.) पण माझ्याकडच वातावरण एकदम तापल. फोन ठेवल्या क्षणी सासूची बडबड सुरु झाली. "बघितलस महेश. सरोजच्या लग्नात मदत करा म्हणालो तर ह्यांच्या कडे पैसे नव्हते आणि ट्रीपला जायला बरे पैसे आहेत. संध्याला आपल्या गळ्यात बांधली, आता स्वतः मजा करायला मोकळे. ते काही नाही. आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लाव आणि जाब विचार. नाहीतर एक काम कर. संध्याला बोलायला सांग. तिला मागु देत त्यांच्या कडे पैसे."

आईचं ऐकून महेश मला तसं करायला सांगणार, ह्याची मला खात्री होती. मी फोनवर बोलायला नकार दिला. दोघांचा खूप अपमान झाला. महेशनी चिडून माझ्यावर हात उगारला. मागून सासूचा आवाज आला,"दे दोन चार टोले. त्याशिवाय ती सुधरणार नाही." त्या दिवशी माझ्या नवर्यानी पहिल्यांदा मला मारलं. आणि तिथून मारहाणीला सुरुवात झाली.

मी बरेच दिवस आई-वडिलांना फोन करायचं टाळल. पण शेवटी रोजच्या मारहाणीला आणि भांडणाला कंटाळून, दोन दिवसांपूर्वी वडिलांना फोन लावला. वडिलांना सासरच्या लोकांच्या पैश्याच्या मागणी विषयी सांगितलं. तिकडून वडील विचारत होते,'सर्व ठीक आहे ना? तुझ्या आवाजाला काय झालाय? असा का येतोय?काही होताय का? घरचे सगळे कसे आहेत? महेशची नोकरी व्यवस्थित चालू आहे ना? मग ते सारखे पैसे का मागतायत? अग संध्या, आम्हाला पण आमचे खर्च आहेत. त्यांना तूच का नाही सांगितलस माझ्या वडिलांना जमणार नाही असं....ते बोलतच होते. मी 'हो, नाही मध्ये उत्तरं देत होते. (मी त्यांना सांगूच शकत नव्हते की आजचा फोन टाळण्यासाठी मी मागच्या दोन महिन्यात असंख्य वेळा मार खाल्ला आहे, अपमान सहन केला आहे, मुलांना माझ्या पासून लांब केल्यावर दयेची त्यांच्या कडे भिक मागितली आहे. आणि आजपण फोन ठेवल्यावर काय होईल, ते काय करतील ह्या कल्पनेनी मन सुन्न झाल आहे.)

महेशनी हातातला फोन हिसकून घेतला. सासू मुलांना घेऊन आतल्या खोलीत गेली. मुलं मला हाका मारून रडत होती. मला काही कळायच्या आत माझ्या पाठीत एक दणका बसला. महेशनी मला हाताला धरून घराबाहेर काढल. रात्रीचे १० वाजले होते. इतक्या उशिरा मी कुठे जाऊ? कशी जाऊ? मुलं आतमध्ये रडत होती. मी बाहेरून खूप हाका मारल्या, विनवण्या केल्या. पण काही उपयोग झाला नाही. रात्रभर मी दारापाशी आशेनी बसून राहिले. सकाळी सासुनी मला 'एखाद्या अंगणात शिरलेल्या जनावराला हाकलाव तसं अंगणाबाहेर हाकलल. मी वेड्यासारखी बाजारात फिरत होते. तेंव्हा मला ह्या मावशी भेटल्या.

ताई, तुम्हीच सांगा मी काय करू? मी माझ्या मुलांशिवाय जगू शकत नाही. मला माझी मुलं हवी आहेत. ताई, मला एकदा तरी माझ्या मुलांना बघायचं आहे."

संध्याची रीतसर तक्रार नोंदवून घेतली. तिची शोर्ट स्टे होम मध्ये रहाण्याची सोय केली. महेशला पत्र पाठवून बोलावून घेतलं. तो आला नाही म्हणून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो रजा मिळत नाही. ऑफिसमध्ये खूप काम आहे अशी कारण देऊन भेटणं टाळत होता. शेवटी त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या साहेबांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी सहकार्य केलं. दुसऱ्या दिवशी महेश ऑफिसमध्ये हजर झाला.

आला तो जरा गुश्यातच होता. "हेमाताई कोण आहेत? आणि माझी बायको कुठे आहे? जर का तिला काही झालं तर तुम्हाला सोडणार नाही."

"मिस्टर महेश, मी हेमा. काय बोलायचं ते माझ्याशी बोला. आणि ऑफिसमध्ये आहात हे विसरू नका. भाषा जरा सांभाळून वापरा." असं म्हणत मी त्याला बसायला खुणावलं.

"तर महेशराव तुम्हाला तुमच्या बायकोची खूप काळजी वाटतीये. हो ना? म्हणून तुम्ही तिला रात्री अपरात्री घराबाहेर काढलत, दुसऱ्या दिवशी तिला हाकलून दिलत, तिची मुलं हिसकून घेतलीत, तिला त्यांना भेटू दिलं नाही. एवढंच नाही तर १५ दिवस झाले संध्या कुठे आहे? कशी आहे? हे जाणून घेण्याची तुम्हाला गरज पण वाटली नाही. खरंच काळजी वाटतीये का, तिने संस्थेत तुमच्या विरुद्ध तक्रार दिली म्हणून घाबरला आहात?"

"मी कशाला घाबरू? चुका तिने करायच्या आणि आम्ही का बर घाबरायचं? रागाच्या भरात बोललो असेन. तिला अक्कल यावी म्हणून काढलं होतं घराबाहेर. पण तिला तिची जबाबदारी कळायला नको. खुशाल मुलं सोडून निघून गेली. माझ्या समोर बोलवा तिला. आई म्हणते तेच बरोबर आहे. तिला कोणाचा धाकच राहिला नाही. संध्या साली......."

"तिचं म्हणणं होतं कि तुम्ही तिच्या वडिलांकडून पैशांची मागणी करत होतात?"

"ताई, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तो आमचा घरचा मामला आहे. मी लाख मागीन हो पण तो हराम... देतोय कुठे? एवढं पण कळत नाही त्याला, तिच्या बापाला, आपली पोर तिथे नांदतीये. आपण कस शिस्तीत वागावं. पण नाही. आता येतील नाक घासत आणि विनवण्या करत,'आमचं चुकलं. माफ करा. पोरीला घरात घ्या."

काय त्याची भाषा आणि किती बोलण्यात मगरूरी! न रहावून मी म्हणाले, "महेशराव, भाषा जरा नीट वापरा. तुम्ही संस्थेच्या कार्यालयात आहात. ह्याच भान असू द्या. तुम्ही तुमच्या वागण्याचं समर्थन करताय कारण तुम्हाला अजून कायद्याची माहिती नाहीये. तुम्ही चुकीचं वागला आहात. ह्याच्या साठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तुमची नोकरी जाऊ शकते. नीट वागा. अजून वेळ गेली नाहीये. दोघांनी एकत्र बसून काही उत्तर सापडताय का, काही मधला मार्ग निघतोय का, ते बघा.

बर मग कधी बोलवू संध्याला. तुम्ही सांगाल त्या दिवशी तिला बोलवून घेते."

"म्हणजे काय संध्या तुमच्याकडे नाहीये? मग ती आहे कुठे?"

"ती सुखरूप आहे. कधी येताय ते सांगा आणि येतांना मुलांना घेऊन या."

कायदा, शिक्षा हे शब्द ऐकल्यावर महेश थोडा नरमला. एकत्र बैठकीचा दिवस ठरला. संध्या मुलांना भेटायच्या आशेनी वेळेच्या आधीच आली. महेश आला, पण मुलांना न घेता.

त्या दिवशी काहीच बोलणी होऊ शकली नाहीत. मुलं भेटली नाहीत म्हणून संध्या रडत होती आणि महेशचं एकच म्हणणं होतं, 'नांदायला यायचं असेल तर संध्यानी लिहून द्यावं मी आज पर्यंत केलेल्या चुकांबद्दल माफी मागते. पुन्हा अशा चुका करणार नाही. केल्या तर माझा नवरा जे ठरवेल ते मान्य असेल.' लिहून दिलन तर ठीक नाहीतर मला ती नाही लागत. संध्या मुलांसाठी काहीपण लिहून द्यायला तयार होती. पण आम्हाला ते मान्य नव्हतं. ८ दिवसांनी परत भेटायचं ठरलं.

एक गोष्ट नक्की होती कि संध्याला नमवण्यासाठी महेश मुलांचा वापर करत होता आणि तिच्या भावनांशी खेळत होता. हे तिच्या लक्षात आणून देणं गरजेचं होतं. खूप कौन्सिलिंग केलं, तिला खूप समजावलं. मुलांचं वय लक्षात घेता, त्यांनी नाही दिली तरी कायद्यांनी मुलं तिच्याच ताब्यात मिळतील हा विश्वास दिला. तिला आणखीन एक माहिती दिली कि ,'आम्ही समक्ष बघून आलो. तुझी मुलं सुखरूप आहेत. तेंव्हा पुढच्या भेटीत त्यांनी मुलांना देणार नाही असं म्हणाला तर ते मान्य कर. फक्त भावनेच्या भरात वाट्टेल ते कबूल करू नकोस'.

अपेक्षे प्रमाणे महेश मुलांना न घेता आला. बोलणी फिस्कटली. महेश जायला निघाला. संध्यानी न रहावून विचारलं, "आणि मुलाचं काय?"

"मुलांचं काय? कोणती मुलं? कोणाची मुलं? मुलांना विसरा आता." असं म्हणत महेश जायला निघाला. संध्या काहीच बोलत नाही असं लक्षात आल्यावर माघारी फिरला आणि म्हणाला, "तुला ह्याच्यावर काहीच बोलायचं नाहीये?"

संध्या शांतपणे म्हणाली,"तुम्ही असल्यावर, त्यांची आजी व आत्या असल्यावर मला त्यांची काही काळजी नाही. मुलं राहू देत तुमच्यापाशी. त्यांची काळजी घ्या."

महेशसाठी हे खूपच अनपेक्षित होतं. जाता जाता सांगून गेला,"अजून वेळ गेली नाहीये. विचार कर. ह्या बायांच्या नादी लागू नकोस. वाटलं तर फोन कर." (महेश गेला आणि संध्या मुलांची आठवण काढत खूप वेळ रडली. त्या दिवशी संध्याच्या बद्दल खूप वाईट वाटलं. पण तिच्या हिमतीच कौतुक पण वाटलं.)

महेश घरी गेला. काय घडलं आहे हे जेंव्हा त्याच्या आईच्या लक्षात आल तेंव्हा ती मुलीकडे रहायला गेली. दोन दिवसातच महेशनी फोन करून संध्याला भेटायचं आहे असं सांगितलं. आज नाही उद्या असं करत आम्ही ८ दिवस ताणल. नवव्या दिवशी तो मुलांना घेऊनच ऑफिसमध्ये आला. "ताई, काही पण करा. माझ्या संध्याला बोलवा. मला नोकरी करायची आणि मुलं सांभाळायची असं दोन्ही नाही झेपत आहे. हवं तर मी तिची माफी मागतो. काय सांगाल ते लिहून देतो. पण संध्याला घरी पाठवा."

त्याची आणि मुलांची अवस्था बघवत नव्हती. पण महेशला धडा शिकवण्यासाठी हे गरजेचं पण होतं. निरोप मिळाल्यावर संध्या लगेच आली. आधी मुलांना भेटली. महेशकडून नीट वागण्याची लेखी हमी घेतली. दर ८ दिवसांनी खुशाली कळवायला येण्याची अट घातली. मग संध्याची पाठवणी केली.

पुढे काही महिने ते खुशाली सांगायला येत होते. काही वर्षं संपर्कात होते. अजूनही अधून मधून भेटतात. सगळे खूप मजेत आहेत.

1 comment:

  1. खुप छान ताई , नेहमी प्रमाणे छान लिखाण
    आजही मुलं म्हणजे कोणत्याही महिलेची दुखरी नस समजतात ,पण खरंच समोरच्याला अक्कल शिकवायची असेल , तर महिलांनी अशी नाटकं केली पाहिजे

    ReplyDelete