Sunday 13 June 2021

माझं कधीच काही चुकत नाही

माझं कधीच काही चुकत नाही

आज मी जरा ठरवूनच ऑफिसला उशिरा गेले. खरं म्हणजे मी एखादवेळेस येणार नाही, असाच निरोप दिला होता. पण इतक्या वर्षांची ऑफिसला जाण्याची, सर्वाना भेटण्याची, अडचणीत सापडलेल्या कुटुंबाना मदत करण्याची सवय मला काही घरात स्वस्थ बसू देईना. ऑफिसला पोहोचले तर नवीन नोंदणी करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी होती. पण खुशाली सांगायला आलेल्या हीना आणि परेशची चौकशी करण्यात, आणि त्यांच्या जुळ्या मुलांचं कौतुक करण्यात सर्वजणी मग्न होत्या. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान होतं. खरं म्हणजे हि केसपण वेगळीच होती.

मागील ३-४ वर्षातील केस असेल. हीना आणि परेश दोघं उच्च शिक्षित! दोघपण इंजिनीअर! सुशिक्षित, सधन कुटुंबातील! मुलगी नाशिकची आणि मुलगा सुरतचा. मुलगा चांगल्या कंपनीत नोकरीला. २-२.५ लाख महिना पगार. परेशच्या घरी चारच माणस. तो, त्याचे आई-वडील आणि धाकटी बहीण दिप्ती. दिप्तीच शिक्षण संपलं कि ती पण लग्न करून सासरीच जाणार. म्हणजे २-३ वर्षात राजा-राणीचा संसार! एवढं चांगलं स्थळ. हिनाच्या आई-वडिलांनी १५-२० लाख खर्च करून थाटात लग्न लाऊन दिलं.

लग्न करून हीना सासरी आली. पहिले ८-१५ दिवस बरे गेले. मग लहान-सहान कारणांवरून कुरबुरी सुरु झाल्या. हिनानी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तुलना तिच्या सासू (सरलाबेन) बरोबर होऊ लागली. अगदी चहा करण्यापासून. तिने केलेली घरातील साफसफाई, स्वैपाक, काही पण कोणाच्या मनास येत नव्हतं. तिची प्रत्येक गोष्ट जणू चुकत होती. जाता-येता प्रत्येक जण टोमणे मारत होता. तिचा अपमान करत होता आणि माहेरच्या लोकांचा उद्धार! एक दिवस सरलाबेन नी फतवा काढला आणि घरातील नोकरांना काढून टाकलं. असं केल्यानी घरातील सर्व काम करायला एकच नोकर उरला, हीना! हिनाच्या शिक्षणाचं, तिच्या इतर कौशल्याचं (जसं तिला वाचनाची खूप आवड होती. तिला विविध विषयांची खूप माहिती होती. ती एक चांगली कलाकार होती. नृत्य आणि रंगभूमीवर विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने अनेक बक्षिसं मिळवली होती.) कोणाला काही कौतुक नव्हतं. तिला नोकरी करायची होती, पण त्यासाठी  परवानगी मागायचं तिने धाडसच केलं नाही. एक दिवस सर्वांच्या खुशालीची चौकशी करायला हिनाच्या आईंनी फोन केला. तेंव्हा सरलाबेन चिडून म्हणाल्या," कशी बिनडोक मुलगी आमच्या गळ्यात बांधली आहे. ना स्वैपाक येत, ना साफ-सफाई करता येत. शिक्षणाचं काय कौतुक सांगताय? मुलीच्या जातीला घर, संसार आणि पतीच सुख महत्वाचं. तिला स्वैपाक यायला पाहिजे, स्वच्छता करता आली पाहिजे, घरातील मोठ्यांची मर्जी सांभाळता आली पाहिजे."

त्यांना मधेच थांबवत सरोजबेनने (हिनाची आई) सांगण्याचा प्रयत्न केला, "सरलाबेन, मुलगी शिकायला होस्टेलमध्ये होती. शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच लग्न करून तुमच्या घरी आली. तुम्ही तिला तुमच्या पद्धतीने शिकवा, तयार करा. तिला समजून घ्या. तिला तुमच्या घरात रुळायला वेळ द्या. तुम्ही तिला फोन देता का? मी तिच्याशी बोलते, तिला समजून सांगते."

"तुम्हाला माहिती होतं ना, कि तुमच्या मुलीला घरकामातील काहीच येत नाही. तर मग लग्न लाऊन द्यायची घाई का केलीत? मी काय कुकिंग क्लास सुरु केलाय. सगळं आम्हीच शिकवायचं तर तुम्ही इतकी वर्षं काय केलत? एक वेळेस हे पण समजून घेतलं असत. पण हीना घरात आल्यापासून कोणालाच कुठल्याच प्रकारचं सुख नाही. ना मुलगा खुश आहे ना आम्ही! आमची काय जगावेगळी अपेक्षा होती. घर सांभाळावं आणि दोन चार नातवंड असावीत. पण ते पण सुख आमच्या नशिबात नाहीये असंच वाटतंय."

"अहो सरलाबेन, मुलांच्या लग्नाला सहा महिने होतायत. अहो निसर्गाचे काही नियम आहेत. सगळ्या गोष्टी घाईने नाही मिळवता येत. ती थोडी रुळली, त्यांची मन जुळली की होईल सगळं ठीक......"

सरोजबेन पुढे काही बोलणार तर सरलाबेननी फोन कट केला.

फोनवरील संभाषणाने सरोजबेन अस्वस्थ झाली. पुढील आठवड्यात काहीतरी कारण काढून ती सुरतला लेकीला भेटायला गेली.' (घरी गेल्यावर तिला समजलं की हिनाला शक्तिवर्धक इंजक्शन (जबरदस्तीने) दिलं त्याची रिअक्शन आली, म्हणून दवाखान्यात एडमित केलं होतं.) दार उघडायला हीना आली ती पदराला हात पुसत. हिनाची अवस्था आणि अवतार  बघून सरोजच्या डोळ्यात पाणी आल. चेहेरा ओढलेला, डोळे निस्तेज, डोळ्याखाली काळी वर्तुळ, तब्येत खूपच खराब झाली होती. केस विस्कटलेले आणि साडी इतकी अजागळपणे नेसली होती की क्षणभर त्या माउलीला प्रश्न पडला की 'माझी टीप-टोप रहाणारी, गोड दिसणारी आणि मोकळं हसणारी हीना गेली कुठे? ह्या लोकांनी हीच हे काय करून टाकलाय?'  आईला बघितल्यावर हीना आईच्या गळ्यात पडून लहान मुली सारखी रडायला लागली. तिच्या डोळ्यात एकच आशा होती 'आता आई आली आहे ती सगळं ठीक करेल.'

ती आईला काही सांगणार तेवढ्यात सरलाबेननी सांगायला सुरुवात केली, "केवढी नाटकी आहे ही. आम्ही हिला 'दिवस का रहात नाहीत' म्हणून तपासायला घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले विकनेस आहे, मी टोनिक लिहून देतो. तिला पटकन बर वाटावं म्हणून परेशनी सुचवलं म्हणून डॉक्टरनी बि१२ चं इंजक्शन दिलं. तुमच्या मुलीनी केवढा तमाशा केला. इतकी लाज वाटली त्या दिवशी. (खरतर हिनाला तो डोस सूट नाही झाला. त्याची रिअकशन आली. आणि तिला दवाखान्यात एडमिट करावं लागलं. आदल्या दिवशीच तिला घरी आणलं होतं.) ती आता नजरेसमोर पण नको असं वाटतय. आपले संबंध जुळल्यापासून आज पहिल्यांदा तुम्ही काहीतरी शहाणपणा दाखवला. वेळेवर आलात. जाताना तुमची लाडकी लेक बरोबर घेऊन जा."

सरोजबेनचा झालेला अपमान, हिनाची अवस्था, सरलाबेनच वागणं, ह्या सगळ्यामुळे सरोज आल्या पावली आपल्या मुलीला नाशिकला घेऊन आली.

ह्या घटनेला जवळ-जवळ तीन वर्षं झाली. ह्या तीन वर्षात हिनानी परेशला फोन करायचा प्रयत्न केला. पण त्यांनी तिचा फोन घेणं टाळल. समाजाच्या एका कार्यक्रमात भेटला तेंव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, "हीना, तू मला सांगून, विचारून गेली नाहीस. मी घरात नसतांना तू तुझ्या आईसोबत निघून गेलीस. आता तुझं काय करायचं ते माझी आईच ठरवेल. ती म्हणेल तेच माझं पण म्हणणं असेल." हिनाच्या आई-वडिलांनी  सासरच्या लोकांपर्यंत नातेवाईकांच्या हाती खूप वेळा निरोप दिला. समजुतीने प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेऊया. एकदा भेटूया. मुलं अशी किती दिवस एक-मेकांपासून लांब ठेवायची आणि का? एकत्र आली तर त्यांची मन जुळतील आणि संसाराला लागतील.

पण सासरच्या लोकांकडून काहीच उत्तर आल नाही, आणि कोणीतरी सुचविलं म्हणून हीना, तिच्या आई बरोबर, महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयात तक्रार नोंदवायला आली. तिचं म्हणणं ऐकल्यावर हिनाची सासरी झालेली घुसमट, अपमान आणि त्याचा तिच्या तब्येतीवर झालेला परिणाम कळत होता. तीन वर्षं विभक्त राहिल्यावर समझोता होणं अवघड होतं पण अशक्य नव्हतं. मागील तीन वर्षात परेशनी किंवा त्याच्या आई-वडिलांकडून फारकातीची मागणी आली नव्हती. एवढंच नाही तर तो विषय पण कधी त्यांनी उच्चारला नव्हता. हाच एक आशेचा धागा पकडून आम्ही पत्रव्यवहार सुरु केला. पहिल्या दोन पत्रांची परेशनी दखलच घेतली नाही. फोन केला तर उडवा-उडवीची उत्तरं दिली. नाईलाजाने पुढील पत्र त्याच्या ऑफिसच्या पत्यावर पाठवलं. ह्याचा उपयोग झाला. आठ दिवसांत त्याचा चिडून फोन आला. त्यांनी आमच्या ऑफिसात येण्यास स्पष्ट नकार दिला. नाशिकमध्ये राहणाऱ्या त्याच्या काकांनी समजावल्यावर, तो त्याच्या आई-वडिलांना घेऊनच आला. अपेक्षेप्रमाणे पहिल्या भेटीत तिघांनी पण हीना बद्दलच्या त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. परेशच्या बोलण्यात बायको 'न भेटता, बोलता माहेरी निघून गेल्यामुळे त्याचा झालेला अपमान आणि तिच्या ह्या अश्या वागण्यामुळे परेशनी करून घेतलेला गैरसमज की, हिनाच्या मनात आपली काही किंमत नाही' हे जाणवत होतं. सासऱ्यांच काहीच म्हणणं नव्हतं. सरलाबेनच्या मते त्यांचं वागणं चुकलेलच नव्हतं. त्यांचं अजूनपण असंच मत होतं की, सुनेला कामात, धाकात ठेवलं तरच ती घर आणि संसार नीट सांभाळते. (त्यांना त्यांच्या सासूकडून मिळालेल्या वागणुकी मुळे त्याचं असं मत झालं असावं) त्या बैठकीत एक गोष्ट प्रकर्षानी जाणवली की, त्या दिवशी आमच्या समोर ना फारकत घेण्याबद्दल कोणी काही म्हणालं, ना समझोता करण्याबद्दल.

हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही दोघांना एकत्र मीटिंग साठी बोलावलं. परेशला खूप गोष्टी समजून सांगितल्या. त्याच्या जबाबदारी बद्दल. हिनाला घरातून मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकी बद्दल. तिचं शिक्षण, तिच्यातील कलागुण, तिच्या अपेक्षा, तिच्या भावनांची कदर करण गरजेचं आहे. त्या समजून घेणं हे कसं त्याच काम आणि कर्तव्य आहे. दोघांनी एक-मेकांना आणि त्यांच्या गरजा समजून घेणं, मित्रत्वाच नातं जपणं आणि जोपासण सुखी संसारासाठी खूप गरजेचं आहे. काही वेळ विचार केल्यावर  परेश म्हणाला की, पुढील एक वर्षं त्याला कंपनीच्या कामासाठी अहमदाबादला रहावं लागणार होतं. हिनाची तयारी असेल तर आणि त्याच्या काही अटी- तिने त्याच्या सोबत रहावं, घर नीट सांभाळावं आणि काहीही अडचण असेल तर मोकळं बोलावं. हे मान्य असेल तर समझोता करायची त्याची तयारी होती. हीनाने पण ती सासरी रहात असतांना सहा महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्या पुन्हा होऊ नयेत ह्या साठी तो खबरदारी घेईल आणि जातीने लक्ष घालेल, अशी आशा व्यक्त केली. हिनाची पहिल्या दिवसापासून समझोता करून, नांदायला जायचीच इच्छा आणि तयारी होती. परेशच्या बोलण्यातून पण समझोता करायची तयारी जाणवली. एकत्र बैठकीत दोघांमध्ये समझोता झाला.

दोघांचा सुखाचा संसार सुरु झाला. वर्षभरात हिनाकडून अपेक्षित गोड बातमी आली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. आम्हाला वाटलं, आता सगळं छान होईल. पण तसं घडलं नाही. एक दिवस हिना भेटायला आली आणि म्हणाली, "ताई, मला कसं वागू तेच कळत नाहीये. मी माहेरी आल्यापासून आजपर्यंत परेश मला कधी भेटायला आला नाही. अजून त्यांनी मुलांना पण बघितलं नाही. तो फोन करून खुशाली विचारतो. मुलांचे फोटो मी पाठवते. इकडे भेटायला ये असं म्हणाले कि त्याचं एकच उत्तर असत, आईशी बोलतो आणि कळवतो. ताई, मला खात्री आहे त्याच्या आईने त्याला येऊ दिलं नसेल. तो त्याच्या आईचं इतकं का ऐकतो? तो स्वतःची बुद्धी का नाही वापरत? आमच्या दोघांमध्ये काहीच वाद नाहीत, कि भांडण नाही. त्याला समजत नाहीये का, कि त्याच्या अश्या वागण्याने सगळ्यांनाच त्रास होतोय. ताई, प्लीज काहीतरी करा. माझा संसार वाचवा."

हिनाच्या समोर परेशला अभिनंदन करायला फोन केला आणि भेटायला बोलावलं. कबूल केल्याप्रमाणे तो आठ दिवसांत भेटायला आला. त्या वेळेस बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला. परेशनी परस्पर समझोता केलेला त्याच्या आईला अजिबात आवडलं नव्हतं. त्या दिवसापासून तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. नातवंड झाल्याचं समजलं पण तिच्या वागण्यात फरक पडला नाही. आता ती माझ्याशी बोलते कारण मी तिला कबूल केलंय कि मी तिच्या परवानगीशिवाय माझ्या मुलांना भेटणार नाही. आणि बघायला जाणार नाही. "ताई, ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. आईंनी आमच्यासाठी खूप कष्ट केलेत. मला तिला सुखात ठेवायचं आहे. तिचं मन नको दुखवायला म्हणून मी हे सगळं करतोय. आज मी इथे आलोय हे तिला माहित नाहीये. कळल कि काय करेल सांगता येत नाही. पण मला माझ्या मुलांना आणि हिनाला भेटायची बघायची खूप इच्छा आहे. ताई, मी काय करू?"

"परेश, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बरोबर तुझं वेगळ नातं आहे. त्याचं तुझ्या आयुष्यात वेगळ स्थान आहे. प्रत्येकाच्या प्रती वेगळी जबाबदारी आहे. कोणाला किती महत्व द्यायचं आणि कोणाच्या भावना जपण्यासाठी कुठलं नातं तोडायचं हे तू ठरवायचं आहे. ह्या सगळ्यातून एक समतोल साधू शकलास तरच सुखी होशील. काय ठरवशील ते कळव."

दुसऱ्या दिवशी हिनाचा खुशखबर द्यायला फोन आला. परेश भेटायला आला होता आणि तो तिला त्याच्या बरोबर घेऊन जायला तयार होता.

दोघं ऑफिसमध्ये भेटायला आले. काल झालेल्या बोलण्याचा परेशनी गांभीर्याने विचार केला आणि विचारा अंतीच हा निर्णय घेतला होता. आईच्या प्रतिक्रियेबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, "ताई, मला कळून चुकलंय, माझी आई आणि तिचा स्वभाव बदलणार नाही. ती हिनाला कधीच सुखात राहू देणार नाही. तिचे विचारच वेगळे आहेत. मी हीना आणि मुलांना घेऊन वेगळ्या घरात राहायचं ठरवलं आहे. मी वेगळ राहून पण माझ्या आई-वडिलांची काळजी घेऊ शकीन. ताई, आमच्या कडून काही लिहून घ्यायचं असेल तर घ्या."

त्या दिवशी दोघं आमचं निरोप घेऊन गेले ते जवळ-जवळ चार महिन्यांनी भेटायला आले. मधल्या काळात फोनवरून त्यांची खुशाली नियमितपणे कळवत होते. आज त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद आणि समाधान बराच काही सांगत होतं. म्हणून आजचं त्याचं येणं आणि भेटणं आमच्यासाठी खास होतं!   

 

2 comments:

  1. सुशिक्षित मुलींना ही सोसावं लागते.नवरा समजूतदार हवा

    ReplyDelete