Tuesday 2 February 2021

घाईत लग्न झालं असत तर?

  रोहिणी! एक वेगळच व्यक्तिमत्व! चौथी पास! दिसायला सामान्य. थोडी बावळट थोडी भोळसट. आई-वडिलांची एकुलती एक असल्यामुळे लाडावलेली. खरं सांगायचं तर अती लाडानी बिघडलेली.नटण्याची खूप आवड. आपण केलेला मेकप आपल्याला कसा दिसतोय, लोकं आपल्याला हसतायत. आपली चेष्टा करतायत. तिला ते कळत तरी नव्हतं, नाहीतर तिला त्यांनी फरक पडत नव्हता. ती स्वतावर खुश असायची. तिला बाहेर हॉटेलात खायला खूप आवडायचं!

  माझ्या आयुष्यात रोहिणी आली एक केस म्हणून! घरची परिस्थिती बेताची. वडील राम मंदिरासमोर फुलांचे वाटे विकायला बसायचे. आई दोन घरची काम करायची. ह्यातून जे उत्पन्न येईल त्यात घर खर्च आणि रोहिणीचे लाड भागायचे. भागायचे कसले आई-वडील उपाशी राहून भागवायचे. रोहिणी १८ पूर्ण झाल्यावर तिच्या आई-वडिलांनी, त्यांच्या ऐपतीप्रमाणे गावाकडचा मुलगा पसंत केला आणि तिचं लग्न उरकून टाकलं. मुलगा, रोहित, रोहिणीच्या तुलनेत खूपच बरा होता. दिसायला ठीक होता आणि १० वी पास होता. निर्व्यसनी व कष्टाळू होता. घरची थोडीफार शेती होती. दोन मुलींच्या पाठचा एकुलता एक वारस होता. कधी कोणाच्या अध्यात नाही कि मध्यात नाही. गरजेला सर्वांच्या मदतीला धावून  जायचा त्यामुळे गावात सर्वांचा लाडका. ह्या स्थळात खोड काढण्यासारख काही नव्हतं. पहिल्या मुळाला रोहिणी माहेरी आली आणि तिनी तिच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. आई नी कशीतरी समजूत काढून पाठवली.

  त्या घरात रोहिणी कशीतरी सहा महिने राहिली. पहिल्या दिवाळीत आली ती परत सासरी गेलीच नाही. फारकतीशिवाय दुसरा उपाय नाही असे लक्षात आल्यावर तिची आई तिला आमच्या कडे घेऊन आली.

  "शांताबाई, तुमच्या मुलीला फारकत हवी आहे हे समजलं, पण कारण नाही समजलं." असं मी म्हणाले तर तिची आई म्हणाली, " खरं सांगू का बाई आम्हाला पण नाही समजलं. तुम्हीच विचारा आणि मला सांगा."

  रोहीणीशी बोलल्यावर असं समजलं कि,'सासरी काही त्रास नाहीये. नवरा, सासू, सासरे व इतर नातेवाईक चांगले आहेत. खूप जीव लावतात आणि कौतुक करतात. पण रोहिणी तिथे राहू शकत नाही. कारण तिथे सिनेमा बघायला सोय नाही आणि भेळपुरी मिळत नाही.' हे काही फारकतीच कारण असू शकत का? आणि कोर्टाला तरी हे कारण पटेल का? फारकत मंजूर करायला?

  आम्ही तिला खूप समजावलं पण रोहिणी काही ऐकायला तयार होईना. अखेरीस तिची आणि रोहितची समजुतीनी फारकत करून दिली.

  तर अशी हि रोहिणी! आता तिला लग्न करायचं होतं. (फारकती नंतर ती खूप वेळा ऑफिस मध्ये यायची. काही दिवसातच ती हक्कांनी येऊ लागली. आणि या अधिकारानीच तिने आम्हाला तिच्या साठी मुलगा बघायला सांगितलं.) मुलगा नाशिक मध्ये राहणारा हवा होता. शिक्षणाची, दिसण्याची अट नव्हती. तिच्या दोनच अपेक्षा होत्या, तो कमवता असला पाहिजे आणि त्यांनी तिला फिरायला आणि भेळपुरी खायला, ती म्हणेल तेंव्हा न्यायला पाहिजे. आता असा मुलगा मिळणं जरा अवघडच होतं. ती वरचेवर चौकशी करायला येत होती. आणि दर वेळेस आम्ही 'योग्य स्थळ नाही सापडत आहे. सापडलं कि सांगू' असं सांगत होतो. तिला मनातल्या मनात 'आम्ही काहीच करणार नाही' अशी बहुतेक भीती वाटत असावी, कारण अलीकडे ती हा विषय आमच्याशी बोलतांना काढतंच नव्हती. मग लक्षात आल कि स्वतःच स्वतःसाठी स्थलं बघत होती. एखाद्या स्थळाची माहिती कळाली कि ती आम्हाला येऊन सांगायची. (कारण तिचे आई-वडील तिच्या मूर्खपणाला कंटाळले होते. ते कशातच लक्ष घालायला तयार नव्हते) आम्ही जाऊन त्या मुलाची चौकशी करायचो आणि त्याला नापास करायचो. (तिने सुचवलेल्या मुलांमध्ये काही ना काही प्रोब्लेम असायचाच. तो व्यसनी तरी असायचा, कमवत तरी नसायचा, आधीची फारकत झालेली नसायची, पहिल्या बायकोला मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगून आलेला असायचा. काहीतरी प्रोब्लेम असायचा.)

  रोहिणी आमच्यावर फार वैतागली आणि शेवटी तिने हा विषय बोलणच बंद केलं. आम्हाला वाटलं लग्नाचं भूत उतरलं असावं! पण एक दिवस ती अचानक पेढे घेऊन आली. तिचं लग्न ठरल्याची गोड बातमी द्यायला. 'चार दिवसांनी लग्न आहे' असं ती लाजत सांगत होती. आम्ही सगळे अवाक!

  मी विचारलं," रोहिणी, कोण मुलगा? कुठे रहातो? करतो काय?कमावतो किती? घरी कोण कोण आहे? तुला हे स्थळ सुचवलं कोणी? तू नीट चौकशी केली आहेस का?"

  "ताई, तू हे सगळं विचारणार हे ठाऊक होतं मला. मी पूर्ण माहिती काढली आहे. मुलगा सिन्नरला नोकरी करतो. १२०००/- कमावतो. टू बी एच के चा flat आहे. गावाकडे शेती आहे. दिसायला तर खूप भारी आहे. मला तो बसमध्ये भेटला. त्याच्या मित्रांनी ओळख करून दिली. माझं बसचं तिकीट पण त्यांनीच काढलं. आम्ही फिरायला गेलो, भेळपुरी खालली. खूप मज्जा आली. ताई, नाही म्हणूच नकोस कारण नकार देण्यासारखं स्थळच नाहीये."

  "अग रोहिणी! तू काय बोलतीयेस, तुला कळतंय तरी का? अग, कोणाचा कोण मुलगा? तुला बसमध्ये भेटतो काय? त्याची ओळख ना पाळख. आणि त्यांनी पाणीपुरी खाऊ घातली आणि फिरायला नेलं म्हणून तू त्याच्या बरोबर लग्न ठरवून आलीस? त्यांनी स्वताबद्दल सांगितलेली माहिती तपासून नको बघायला. तू जाऊन आलीस का सिन्नरला?"

  "मी गेले नाही आणि जाणार पण नाहीये. मला त्याची गरज वाटत नाही."

  "अग, तुला वाटत नसली तरी मला वाटतीये. माझ्यासाठी जाऊन ये."

  "माझ्याकडे बस भाड्यासाठी पैसे नाहीयेत."

  मी पर्स मधून पैसे काढत तिला सांगितलं,"हे घे पैसे. मला काही माहित नाही. तू उद्या सिन्नरला जाणार आहेस, त्याची चौकशी करणार आहेस आणि मला सांगणार आहेस. सिन्नरला जाऊन आल्यशिवाय मला भेटू पण नकोस आणि माझ्याशी बोलू पण नकोस. मी तुला तुझ्या आयुष्याचं वाट्टोळ करू देणार नाही. तू सांगतेस तसा मुलगा चांगला असला तर मी तुझं लग्न लाऊन देईन."

  अनिछेनीच पण रोहिणी दुसऱ्या दिवशी सिन्नरला गेली. परत आली ती वेगळ्याच मूडमध्ये. कशानितरी चांगलीच हादरली होती. माझा हात घट्ट धरून काही क्षण माझ्याकडे बघत उभी राहिली. तिच्या डोळ्यात वेगळेच भाव होते.

  "ताई, तू आज मला मोठ्या संकटातून वाचवलस. तू माझ्या भल्यासाठी सांगत होतीस आणि मला वाटत होतं तू मुद्दाम करतीयेस. तू मला पाठवलं नसतं तर मी त्याच्याशी लग्न करून किती मूर्खपणा करणार होते ह्याचा विचार केला तरी अंगावर काटा येतोय.

  "मी पत्ता विचारत त्यांनी सांगितलेल्या इमारती पाशी गेले. मी ज्यांना पत्ता विचारला त्यांच्या चेहेऱ्यावर त्याचं नाव ऐकून आश्चर्य होतं आणि माझ्या साठी काळजी. अगदी इमारती जवळच्या नळावर चार बायका पाणी भरत होत्या त्यांना विचारलं, तेंव्हा त्या म्हणाल्या, 'पोरी, तुझं त्या माणसाकडे काय काम आहे.'

  मी माझं काम सांगितलं. जेंव्हा त्यांना कळल कि मी त्याचाशी लग्न करणार आहे तेंव्हा त्यांचातल्या एका वयस्कर काकू म्हणाल्या," हे बघ पोरी, तो चांगला माणूस नाही. तो सांगतो ते घर त्याचं नाही. तो सहा महिन्यापासून तिथे भाड्यानी रहातो. घरमालकांनी त्याला खोली खाली करायला सांगितलं आहे. त्याच्या बरोबर एक बाई रहाते. आम्ही कोणी तिला बघितली नाहीये, पण तो घरी असतो तेंव्हा त्या घरातून किंचाळण्याचे, रडण्याचे आवाज येतात. तो जाताना घराला कुलूप लावून जातो. दारं खिडक्या पक्क्या बंद करतो. त्यामुळे आतल्या व्यक्तीला कधी बघितलं नाही. लोकांनी तक्रार केली म्हणून घरमालकांनी त्याला जागा सोडायला सांगितलं. काळजी घे ग पोरी."

त्या नाही म्हणत होत्या पण इथवर आलेच आहे तर त्याचं घर बघून जाते, असा विचार करून मी जिना चढत त्याच्या दुसऱ्या मजल्यावरील flat पाशी गेले. ताई तुला सांगते त्या वेळेस मला वाटत होतं कि तुझ्यासारखं ह्या बायकांना पण माझं लग्न व्हायला नकोय.

त्याच्या घरापाशी पोहोचले आणि बघितलं तर दाराला कुलूप. मी परत यायला निघणार तेवढ्यात मला कोणीतरी कन्ह्ताय असं वाटलं. मी हाक मारली तर आतून कोणीतरी हळू आवाजात बोलल्या सारखं वाटलं. सुदैवानी एका खिडकीला थोडी फट होती. जमेल तेवढी खिडकी उघडली आणि आत बघितलं. ताई, आतमध्ये एक बाई होती. अंगावरचे कपडे फाटलेले होते. तिला खूप मारलं होतं. बहुतेक पट्ट्यांनी मारलं असावं. तिने हात वर केला त्याचावर वळ होते. ती बाई रडत होती आणि 'मला वाचवा वाचवा' असं म्हणत होती. तिला तिच्याबद्दल विचारलं तर समजलं कि ती त्या नालायक माणसाची बायको आहे. तो रोज दारू पिऊन येतो आणि तिला मारहाण करतो. त्यांच्या लग्नाला तीन वर्षं झाली आहेत. ताई, मी तिला सांगितलं, आमच्या ताई तुला ह्यातून नक्की वाचवतील. ताई, तू तिला वाचवशील ना? तिला मदतीची खूप गरज आहे."

रोहिणी वाचल्याचा आनंद आणि समाधान होतंच पण आत्ता त्या मुलीचा जीव वाचवण्याची जास्त गरज होती. रोहीणीकडून त्या माणसाची सर्व माहिती घेतली आणि सिन्नर पोलीस स्टेशनला फोन करून घडलेला प्रकार कळवला. पोलिसांनी पण ताबडतोप ऐक्षन घेतली. त्या मुलीला सोडवलं, तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं आणि तिच्या नवऱ्यावर योग्य ती कारवाई केली.        

=============================================

 

 

 

 

 

 

 

 


3 comments: