Saturday 13 February 2021

 

गृह भेट:आजपर्यंत माझ्या कामाचा भाग म्हणून अनेक केसेस ऐकल्या, अनेक लोकांशी बोलले, अनेक प्रकारची माणस भेटली. कुसुमताई, आमच्या संस्थेच्या अध्यक्ष, आमच्यासाठी मार्गदर्शक आणि माझ्या साठी गुरु! त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील एक म्हणजे, गृह-भेटीचं महत्व. मग ते महिला हक्कच काम असो नाहीतर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातील काम असो! त्या नेहेमी सांगायच्या, "हेमा, गृहभेटी मुळे खरी परिस्थिती समजते. कधी कधी माणस मोकळं बोलू शकत नाहीत, त्यांचे प्रश्न मांडू शकत नाहीत, तेंव्हा गृहभेटीतून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात."

ह्याची प्रचीती अनेक वेळा आली पण संगिताला मदत करताना ते प्रकर्षाने जाणवलं. त्या दिवशीची घाबरलेली संगीता मला अजून आठवतीये. विस्कटलेले केस, अंगावरचं ब्लाउज बाहीवर फाटलेलं, साडी अंगाभोवती कशीतरी गुंडाळली होती, हातांवर चेहेऱ्यावर मारल्याच्या खुणा, एक दात पडलेला, तोंडातून रक्त येत होतं. एकूणच तिची अवस्था बघवत नव्हती. एव्हाना आम्ही आमच्या अनुभवातून शिकलो होतो की मारहाणीच्या केस मध्ये आधी पिडीतेला सिव्हील हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनची वारी करून आणणं गरजेचं आहे. सिव्हीलमध्ये प्राथमिक उपचार करून दिले. पोलिसांत तिला नवर्याविरुद्ध तक्रार नोंदवायची नव्हती. पण तरी आम्ही तिला साहेबां समोर नेउन आणली. सर्व सोपस्कार झाल्यावर आम्ही तिला घेऊन ऑफिसला आलो. तिचं म्हणणं काय आहे? कोणी आणि का तिला एव्हढी मारहाण केली हे विचारलं.

"ताई, मी संगीता. १० वी पर्यंत गावाकडे शिकले. वडील मजुरी करायचे. मी ८ वीत असतानाच वडील कन्सरनी गेले. घरची गरिबी. आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायची. थोडे फार मिळायचे. आम्ही तीन भावंडं. मी सर्वात मोठी. आई कामावर गेली कि घरात मोठं कोणी नाही ह्याचा गावातील काही मुलांनी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. माझा मामा शेजारच्या गावात रहात होता. त्याला हे समजल्यावर तो आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. (मामाचं नुकतच लग्न झालं होतं. आम्ही मामीसोबत आहोत ह्या विचारांनी तो पण थोडा निश्चिंत झाला.) तेथे आई पण मामाच्या बरोबर शेतात मजुरीला जायला लागली. नंतरचे काही दिवस मजेत गेले. दोघांच्या कमाईत जेमतेम भागत होतं. दोन वेळा पोटभर जेवत होतो. काही काळानी मामीला मुलगा झाला. खर्च वाढला.आणि लवकरच लक्षात आल कि दोघांच्या कमाईत आता खर्च भागत नव्हता. मामा-मामी मध्ये वाद सुरु झाले. मी तेंव्हा १७ वर्षांची होते. आई आणि मामांनी माझं लग्न लावायचं ठरवलं. (तेवढंच खाणार एक माणूस कमी, हा त्यामागचा विचार असावा) सुरेश नावाच्या ३४ वर्षे वय असलेल्या, ७ वी नापास, दिसायला सामान्य आणि एका पायात थोडा प्रोब्लेम असणाऱ्या माणसाबरोबर माझं लग्न लाऊन दिलं. हौस मौज काही नाही. हा सुरेश करतो काय? रहातो कुठे? त्याच्या घरी कोण कोण आहेत मला कशा बद्दल काहीपण माहिती नव्हती. पुढे सगळाच अंधार होता. पण त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली होती की मामाचं घर हे आता माझं घर नाही. मी जितकी तिथे कमी येईन तितकं आमच्या सगळ्यांसाठी बर असेल. घरच्या मोठ्यांना नमस्कार करून निघतानाच मी ठरवलं कि 'आज पासून माझं आयुष्य हि माझी जबाबदारी.' सुरेश नेईल तिथे जायचं आणि ठेवेल तसं राहायचं!

सुरेश मला आमच्या घरी, माझ्या हक्काच्या घरी घेऊन आला. घर म्हणजे नाशिक मधली एका  वस्तीतली झोपडी. मी त्याच्या बरोबर कुठे पण रहायला तयार होते, पण तो मला जिथे घेऊन आला ते घर नसून घाणीचं साम्राज्य पसरलेली वास्तू होती. ते पण मी एक वेळ स्वीकारलं असत. पण त्या घरात माझं जे स्वागत झालं ते मी मरे पर्यंत विसरू शकणार नाही. स्वागताला दारूची बाटली, जेवायला चकणा आणि झोपतांना भयानक अनुभव! हे मी कोणाला सांगणार होते? आईला सांगायची सोय नव्हती. तिच्यामागे खूप व्याप होते. मामा-मामीची मर्जी सांभाळून दोन मुलांना घेऊन दिवस काढायचे होते. तरी पण मी माझ्या आईची आतुरतेने वाट बघत होते. माझ्या लग्नानंतर दोन महिन्यांनी आई आणि मामा मला भेटायला आले. मी आईला लहान मुलीसारखी घट्ट मिठी मारली. मला खात्री होती, 'माझी आई आली आहे ती ह्यातून काहीतरी मार्ग काढेल. पण तसं काही झालं नाही. आईंनी मला दूर लोटलं. ती म्हणाली," संगीता, आवर स्वतःला. तू आता लहान नाहीस. तुझं लग्न झालं आहे. अश्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतातच. प्रत्येक वेळेस तू मला हाक मारशील आणि मी तुला मदत करीन ह्या आशेवर राहू नकोस. मामा आम्हालाच कसतरी सांभाळतोय. त्यात तुझी ब्याद नको." हे ऐकल्यावर मला कळून चुकलं कि हे सगळं मला सहन करायचं आहे, आयुष्यभर! मी स्वतःला सांगत होते, समजावत होते. ताई, मी खरं सांगते सहन पण करत होते, पण कधी कधी माझी सहन शक्ती संपून जायची. मग मी विरोध करायचे. विरोध केला कि मारहाण! मारहाण तर माझ्या आयुष्याचा एक भागच झाली आहे. सगळ्यात एकच गोष्टं बरी आहे, आम्हाला मुल-बाल नाही. खरं सांगायचं तर मला नकोच आहे.

काल नेहेमी प्रमाणे संध्याकाळचा आणि रात्रीचा कार्यक्रम उरकला. आणखीन एक दिवस संपला. आता करूया झोपेची आराधना! तेवढ्यात सुरेशनी मला लाथ मारून उठवलं. (जेंव्हा पासून त्याच्या लक्षात आल आहे की मला कोणाचा आधार नाही. माझी चौकशी करायला कोणी येत नाही, तेंव्हा पासून तो माझ्याशी जास्त करून हातानी आणि पायानीच बोलतो. मला पण त्याची सवय झाली आहे.) आज तो दमला होता म्हणून मी त्याचे पाय दाबून द्यावेत अशी त्याची मागणी होती. ती पण रात्रीच्या दोन वाजता! मी नकार दिला म्हणून त्यांनी मला मारलं आणि घराबाहेर हाकलून दिलं. सकाळी, मला शेजारच्या जाधव मावशींनी तुमचा पत्ता दिला. विचारत, विचारत आले."

"पण मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस. तुला माहेरचा आधार नाहीये, म्हणून त्याच्या कडे परत जाण्याची गरज नाही. सध्या तुझी संस्थेत (शोर्ट स्टे होम मध्ये) राहायची सोय करतो. तुला बर वाटलं कि काय करायचे ते ठरवू. चालेल का?"

त्यावर ती पटकन म्हणाली,"ताई, रहायची वगेरे सोय नको. घरी गेले नाही तर तो मला खूप मारेल. जाधव मावशी सांगत होत्या 'तुम्ही त्याला बोलावून समजाऊन सांगता. नाहीतर समज देता. मग सगळं ठीक होईल.' माझं पण तसच करा."

ह्यावर काय बोलणार. आम्ही तिची तक्रार नोंदवून घेतली. पुन्हा एकदा न रहावल्या मुळे तिला संस्थेचा पर्याय सुचवून बघितला, पण काही उपयोग झाला नाही. ती उठून जायला निघाली आणि भोवळ येऊन खाली बसली. आता मात्र तिचे निर्णय आपण घ्यायचे ठरवलं आणि ती थोडी सावरल्यावर तिला सांगितलं," संगीता, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तू भारतीताई बरोबर संस्थेत जाणार आहेस."

तिच्यात काही बोलायचीच ताकत नव्हती, तर विरोध करण्याची शक्यताच नव्हती. रिक्षातून तिची रवानगी संस्थेत केली. आणि पहिलं काम केलं, संबंधित पोलीस स्टेशनला त्याची नोंद करण्याचं! कारण आजपर्यंतच्या अनुभवातून आम्ही शिकलो होतो कि 'सुरेश सारखे नवरे घरात बायकोचं जगणं मुश्कील करतात आणि ती कंटाळून किंवा नाईलाजाने घर सोडून गेली कि पोलीस स्टेशन मध्ये तिची मिसिंग कम्प्लेंट नोंदवतात. कधी कधी तिने घरातील वस्तू चोरली असा आरोप पण करतात.'

संगीताकडे मोबाईल फोन नव्हता, तर सुरेश कडे फोन असण्याची काही शक्यता नव्हती. आमच्या संस्थेच्या नियमा प्रमाणे सुरेशला पत्राने संगीताच्या तक्रारी बद्दल कल्पना दिली.

सुरेश ऑफिस मधे भेटायला आला. अपेक्षे प्रमाणे त्यांनी 'संगीता कशी नालायक आहे. तिची शेजारच्या पुरुषांबरोबर लफडी आहेत. आमच्या वयात अंतर आहे. तिला मी आवडत नाही असं म्हणते. स्वैपाक नीट करत नाही. ती खूप कामचुकार आहे,' अश्या अनेक तक्रारी त्यांनी सांगितल्या.

"तिला तुम्ही का मारलंत? मारणं हा गुन्हा आहे ठाऊक नाहीये का तुम्हाला?"

"ओ म्याडम, मी संगीताचा नवरा आहे. मी तिचं काही पण करीन. ज्या कामासाठी आणलं ते करत नाही. तिला काय पोसायला आणली का? काही पण कामाची नाही. आणि तो तिचा बाप! साला माझ्या गळ्यात पोर बांधून गायब झाला. ना कधी भेटायला आला, ना जावयाचा मान राखला. आपलं टकोर सटकल कि आपण हाणतो तिला. आता कुठे आहे? गेली असेल....."

त्याच्या बोलण्यात खूप शिव्या होत्या आणि बसण्या वागण्यात गुर्मी होती. तो बहुदा दारू पिऊनच आला होता. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. त्याला शेवटी सांगितलं, "तुम्ही आता उठा आणि घरी जा. पुढच्या आठवड्यात दारू न पिता शुद्धीत असाल तेंव्हा या. आता निघा."

"संगीता कुठे आहे? कुठे लपवून ठेवली आहे? तुम्ही माझ्या बायकोला असं ठेऊ शकत नाही. मी तुमच्यावर केस करीन."

माझा पेशन्स संपत आला होता. मी म्हणाले, "भारती, जरा सरकारवाडा पोलीस स्टेशनला फोन लाव, साहेबांशी बोलायचं आहे." सुरेशच्या केटेगरितील लोकांना ह्याचा अर्थ चांगलाच समजतो, हे मी एव्हाना अनुभवातून शिकले होते. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. सुरेश एका मिनटात सरळ वागायला आणि बोलायला लागला. पुढच्या आठवड्यात मी ठरवलेल्या दिवशी येण्याचं कबूल करून तो गेला.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी संगीताला पण बोलावलं होतं. दोघांची एकत्र बैठक झाली. (कबूल केल्याप्रमाणे आज सुरेश दारू न पिता आला होता) १०-१२ दिवसांच्या विश्रांतीनंतर संगीता खूपच बरी दिसत होती. महिला हक्क समिती आपल्या पाठीशी आहे ह्या विचारांनी तिला एक वेगळाच आत्मविश्वास वाटत होता, जो तिच्या बोलण्या वागण्यातून जाणवत होता. सुरेशनी त्याची चूक कबूल केली. पुन्हा मारहाण करणार नाही, तिला घरात काही कमी पडू देणार नाही, असं लेखी आश्वासन दिल्यावर संगीता त्याच्या बरोबर समझोता करून जायला तयार झाली. दोघांनी दर ८ दिवसांनी ऑफिसमध्ये येऊन खुशाली सांगायचं कबूल केलं.

सुरेशचा स्वभाव विचित्र होता. समझोता तर झाला होता, पण सगळ्यांना संगीताची काळजी वाटत होती. मला काही चैन पडेना. समझोता करून दोनच दिवस झाले होते आणि मी अचानक त्यांच्या घरी गृहभेटीला गेले. दोघांना गप्पा मारत चहा पिताना बघून बर वाटलं. केस चांगली सोल्व झाल्याचं समाधान वाटलं. (पण हे समाधान फार काल टिकणार नव्हतं हे तेंव्हा मला माहित नव्हतं.)

ठरल्याप्रमाणे दोघं दर आठवड्याला खुशाली सांगायला येत होते. संगीता पण खुश दिसत होती. सुरेशनी आणलेली साडी कौतुकानी संगीता नेसून आली होती. महिना दोन महिने त्यांनी रिपोर्टिंग केलं. आम्हाला पण वाटलं सगळं ठीक चालू आहे. म्हणून दर आठवड्याची खुशाली दर महिन्याला येऊन सांगायचं ठरलं. त्या भेटीत पण सर्व ठीक आहे असं लक्षात आल. पुढे ३ महिने सुरेशनी कारण सांगून येण्याचं टाळल. आम्ही एक दिवस अचानक त्यांच्या घरी गेलो. सुरेश भेटला. त्यांनी सांगितलं 'संगीता बाहेर बाजारात गेली आहे. आमचं व्यवस्थित आहे.' आम्ही विश्वास ठेवला. असं दोन तीन वेळा घडलं. आम्हालापण हे चमत्कारिक वाटलं. मन सर्व ठीक असेल ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बराच विचार केला. अखेरीस शेजारच्या जाधव मावशींची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांना संगीताच्या आयुष्यात काय चाललं आहे ह्याची कल्पना होतीच. त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलं.

आम्ही निघालो आणि काय मनात आल मला नाही सांगता येणार. आम्ही संगीताच्या घरी परत गेलो. सुरेशला आम्ही परत येऊ असं वाटलं नसावं. आम्ही पोहोचलो तेंव्हा सुरेशनी संगीताचा हात पिरगाळला होता आणि तो म्हणत होता, "आता बोलाव तुझ्या ताईना. बघू तुला कोण वाचावतंय?"

"संगीता घाबरू नकोस. आम्ही आलोय." माझा आवाज ऐकून सुरेशचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता. एका क्षणात त्यांनी तिचा हात सोडला आणि संगीता लहान मुली सारखी माझ्या कडे धावत आली.

"ताई, मला वाचवा. मला ह्या नरकातून बाहेर काढा."

आम्ही संगीताला आमच्या बरोबर घेऊन आलो. तिला सुरेश विरुध्द केस करायची नव्हती. तिला त्याचाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचा नव्हता. तिच्या इत्छेप्रमाणे तिने फारकत घेतली. आज ती एका शाळेत मदतनीस ह्या पदावर नोकरी करते आहे. तिची आई आणि भावंडं अधून-मधून भेटायला येतात.

त्या दिवशी संगीताकडे अचानक परत गेलो म्हणून खरं काय ते कळल आणि आम्ही तिला वाचवू शकलो.  

 

 

 

1 comment:

  1. Jodidar jr changala nsel tr purushhach life pn change hot mam

    ReplyDelete