Sunday 14 March 2021

 आंधळं कर्तव्य!


 त्रासलेली, कोणावरतरी किंवा कशावरतरी खूप वैतागलेली सारिका त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आली आणि माझ्या समोरची माणस उठायची वाट बघत बसली. जशी ती माणस गेली, लगेच माझ्या समोरील खुर्चीत बसत तिने विचारलं, "हेमाताई तुम्हीच ना?"

  मी होकारार्थी मान हलवल्यावर तिने भराभरा बोलायला सुरुवात केली.

  "ताई, मला फारकत हवी आहे. फारकत मिळवायला तुम्ही मला मदत कराल? आमच्या ओळखीतली शीतल, तिची फारकत तुम्हीच करून दिलीत. ताई,प्लीज, मलापण मदत करा."

  "तू आधी मला तुझी माहिती सांग. तुझं नाव काय? लग्न कधी झालं? नवरा काय करतो? सासरची माणस, नवरा व इतर नातेवाईक काही त्रास देतात का? नीट सविस्तर सांग.

दुसरं म्हणजे शीतलची फारकत झाली म्हणून तुझी होईल असं नाही. तिच्या बाबतीत फारकत घेणं एवढा एकच पर्याय होता. तुझा प्रोब्लेम समजून घेते आणि मग बघू तुझ्यासाठी काय योग्य आहे ते!"

  "ताई, मी सारिका. माझं ६ महिन्यांपूर्वी लग्न झालं. माझ्या नवऱ्याच नाव भावेश. माझं माहेर दिंडोरीचं. वडील झेड. पी. त क्लार्क आहेत. वडिलांची थोडीफार शेती आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालाय आणि माझा धाकटा भाऊ शिकतोय. मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच चांगलं स्थळ आहे म्हणून आई-वडिलांनी लग्न करून दिलं. (भावेश पोस्टात नोकरी करतो. त्याच्या वडिलांची घोटी येथे थोडीफार जमीन आहे. भावेशचा मोठा भाऊ आणि त्याची फेमिली घोटीत राहून वडिलांना शेतीत मदत करतात. लग्न झाल्यावर मी आणि भावेश नाशिकला राहायला आलो.) तसे नाशिकला आम्ही दोघंच असतो. भावेशचे आई-वडील, भाऊ-भावजई, सगळी देव-माणस आहेत. आम्ही जितके दिवस एकत्र होतो तितके दिवस त्यांनी माझं खूप कौतुक केलं, जीव लावला. माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त लाड केले. सासरची सगळी माणस खूप चांगली आहेत."

  "मग सारिका, प्रोब्लेम कुठे आहे? नवरा त्रास देतो का? कामावर जात नाही? काही व्यसन आहे? बाहेर कोणाशी काही? मैत्रीण?" (मी आपले माझ्या अनुभवावर आधारित बेसिक प्रश्न विचारले)

  "नाही हो ताई. भावेशचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांना कसलंपण व्यसन नाही. अगदी सुपारी पण खात नाहीत.

  पहिला महिना मजेत गेला. रोज दहा वाजता ऑफिसला जाणार आणि सहा वाजता ऑफिस सुटलं कि घरी. त्यांचा मूड असेल त्या प्रमाणे कधी बागेत फिरायला जायचो आणि मग घरी येतानाच वाटेत भेळ-पुरी, तर कधी चायनिस, तर कधी उडप्याकडे इडली-डोसा खाऊन घरी यायचो. एक दोनदा आम्ही सिनेमा बघायला पण गेलो होतो.

 "मग एक दिवस सासऱ्यांनी फोन करून ह्यांना घोटीला बोलावून घेतलं. त्यांचात काय बोलणं झालं मला नाही माहित. पण तेंव्हा पासून ह्याचं वागणंच बदललं. ऑफिसच्या व्यतिरिक्त सकाळ संद्याकाळ अजून कुठेतरी काम करायला लागले. सकाळी एक कप चहा घेऊन बाहेर पडतात ते रात्री १० वाजताच घरी येतात.( मधे सकाळी १० वाजता जेवणाचा डबा घ्यायला येतात.) संध्याकाळी इतके दमलेले असतात कि जेमतेम जेवण होईपर्यंत जागे असतात. मागच्या ५ महिन्यात ना बोलणं, ना एकत्र बसणं, ना कुठे फिरायला गेलो. ताई, काय प्रोब्लेम आहे ते स्वताहून सांगत नाहीत विचारायला गेले तर चीड-चीड करतात. एवढी रात्रंदिवस मेहेनत करतात तर ते पैसे जातात कुठे. हौस-मौज तर बंदच आहे, पण घरातील वातावरण देखील बिघडत चालल आहे. त्यांना बर वाटावं म्हणून कधी व्यवस्थित तयार होऊन बसले तर ते त्यांना जाणवत पण नाही. कधी त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ केला तर त्याचं कौतुक तर नाहीच उलट वैतागून म्हणतात, 'काटकसर करायला हवी. मी इकडे चार पैसे कमावण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय आणि तू जेवणात खीर-भजी बनवतीयेस? सगळ्यांनी माझा अंत बघायचं ठरवलं असेल तर मला तसं सांगून टाका.'

  "ताई, काय करू मला काही सुचत नाहीये. आई-बाबा म्हणतात 'एवढं सोन्यासारख सासर आहे, समजूतदार  नवरा आहे. तुलाच समजून घेता येत नाही. माणस सांभाळायला शिक. सारख्या तक्रारी सांगू नकोस. तू नीट वाग. सगळं ठीक होईल.' ताई, मला तर काहीच ठीक होताना दिसत नाहीये. मी पार कंटाळून गेले आहे. मी असा संसार नाही करू शकणार. तुम्हीच सांगा मी काय करू?"

  मनातलं बोलून मोकळ झाल्यामुळे असेल कदाचित, पण ऑफिसमध्ये आली तेंव्हा पेक्षा सारिका शांत झाली होती. तिच्या चेहेऱ्यावर हताश, हरलेला भाव होता. डोळे थोडे पाणावले होते. खाली मान घालून ती माझ्या उत्तराची वाट बघत होती.

  मी सारिकाला समजावून सांगितलं, "सारिका, प्रश्न फारकतीने सुटणार नाही. भावेशला बोलवून घेऊया. त्याचाशी मला बोलू दे. त्याची नेमकी काय अडचण आहे ती जाणून घेऊया. त्याच्या अश्या वागण्याला काहीतरी कारण असेल. मला वाटतंय बोलल्यानी प्रश्न सुटतील. सारिका तू रीतसर तुझी तक्रार नोंदव."

  सारीकानी लेखी तक्रार दिल्यावर आम्ही आमच्या प्रोसिजर प्रमाणे भावेशला, त्याची बाजू समजून घेण्यासाठी बोलावलं. आमचं पत्र मिळाल्या बरोबर भावेश आमच्याकडे येऊन गेला. पण तो ऑफिसमध्ये आला नाही. बाहेरून चौकशी करून निघून गेला. असं ३-४ वेळेला झालं. पुढच्या वेळेस तो दिसल्याक्षणी त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. आढेवेढे घेत तो ऑफिसमध्ये आला. आत आल्या-आल्या त्यांनी डीक्लेर केलं, "हेमाताई कोण आहेत? मी फक्त त्यांचाशीच बोलीन."

  आम्ही त्याची अट मान्य केली आणि मी त्याला बसायला खुणावलं. तो सेटल झाल्यावर त्याला सारीकानी केलेली तक्रार आणि तिचं म्हणणं थोडक्यात सांगितलं. (त्या आधी मी त्याला ३-४ वेळा बाहेरच्या बाहेर निघून जाण्याचं कारण विचारलं. त्याचं उत्तर ऐकून फारच आश्चर्य वाटलं. आमचं पत्र मिळाल्यावर त्यांनी संस्थेची माहिती काढली. तेंव्हा त्याच्या मित्रांनी सांगितलं 'त्या लई डेंजर बायका आहेत. ऐकलं नाही तर पोलीस स्टेशन मध्ये बंद करतात.' तो ३-४ वेळा आमच्या कामाच्या पद्धतीबद्दल चौकशी करून गेला. खात्री पटल्यावरच आत येण्याचं धाडस केलं.) बराच वेळ तो काहीच बोलला नाही. त्याच्या चेरेर्यावर कसलंतरी टेन्शन आणि मागील ५ महिन्याच्या धावपळीचा थकवा दिसत होता. मी त्याला रिलेक्ष व्हायला अजून थोडा वेळ दिला. 

"भावेश, तुम्हाला कसलं तरी टेन्शन आहे. काय आहे ते मोकळं बोला. तुम्ही बोललात तर त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल."

  "ताई, सारीकानी असं करायला नको होतं. मला मान्य आहे मी तिला वेळ देऊ शकत नाही. पण तिने तुमच्या कडे येऊन तक्रार नको होती नोंदवायला. माझ्याशी एकदा बोलून तरी बघायला हवं होतं."

  "भावेश, तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. Anyway. तुम्ही आता मला सांगा नेमका काय प्रोब्लम आहे. तुम्ही इतकं काम करता, डबल ड्युवटी करता, बऱ्यापैकी कमवत असाल, तरी घरखर्चाची ओढाताण का होते? तुम्हाला कोणताही शोक नाही कि व्यसन नाही. मग इतके कष्ट करून कमवलेले पैसे जातात कुठे? त्याचं करता काय?"

  भावेशनी बोलायला तोंड उघडलं आणि गप्प झाला. बहुतेक आपली पर्सनल गोष्ट, प्रोब्लम मला कसा सांगावा त्याला कळत नसेल. किंवा सांगावा कि नाही हे ठरत नसेल.

  "बोला भावेश. काय मनात असेल ते मोकळं बोला. बोलल्यानी प्रश्न सुटू शकतात."

  भावेश दोन मिनिटं शांत बसला, एक ग्लास पाणी प्यायला आणि जे सांगायला सुरुवात केली ते संपूर्ण बोलून झाल्यावरच थांबला.

  "ताई, माझं आणि सारिकाच ६ महिन्यापूर्वी लग्न झालं. सारिका छान मुलगी आहे. तिच्याबद्दल आमची कोणाची काहीच तक्रार नाही. खरं सांगायचं तर ती आहे म्हणून मी आज आहे. मला माझे प्रोब्लम तिला सांगून तिला टेन्शन द्यायचं नाहीये, म्हणून तिला काही सांगितलं नाही.

  "पहिला महिना मजेत गेला. मग एक दिवस वडिलांनी गावी बोलवून सांगितलं कि गावाकडे एक चांगलं घर बांधावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी मी काही आर्थिक मदत करू शकतो का? म्हणजे एक रकमी त्यांच्या कडे पैसे नव्हते. ती रक्कम मी कुठून तरी देऊ शकतो का? मी सोसायटीतून कर्ज काढलं आणि त्यांना ते पैसे दिले. ताई, कधी नव्हे ते इतक्या वर्षात माझ्या वडिलांनी माझ्या कडे काहीतरी मागितलं होतं. मी त्यांना मदत करू शकलो ह्याच्यातच मी धन्य झालो. त्यांनी माझ्या साठी खूप केलं आहे. माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला. त्यांचे खूप उपकार आहेत, माझ्यावर."

  "वडिलांना गरज होती तेंव्हा तुम्ही मदत केलीत हे चांगलंच केलत. पण त्याचा तुमच्या आजच्या प्रोब्लमशी काय संबंध? तुमची धावपळ, पैशांची ओढाताण कशामुळे? सोसायटीचा हप्ता कोण भरत? तुम्ही रहाता ते घर तुमचं स्वतःच आहे कि भाड्याचं?"

  "ताई घराचं भाडं, सोसायटीचा हप्ता, घर खर्च, सगळं भागवता भागवता मी अगदी दमून गेलोय. काही केल्या पैसे पुरतच नाहीत. मी काय करू काही समजत नाहीये." बोलता बोलता भावेशच्या डोळ्यात पाणी आल.

  "भावेश, तुम्ही वडिलांशी बोललात का, ह्या सगळ्याबद्दल? ते काय म्हणतात?"

  "ताई मी वडिलांना काहीच सांगितलं नाहीये."

  "मग मोकळं बोला वडिलांशी. तुमच्या होणाऱ्या ओढाताणीची कल्पना द्या त्यांना. सोसायटीचा हप्ता किंवा भाड्याची रक्कम, पैकी काहीपण एक भरायला ते मदत करू शकतात का? असं विचारा त्यांना."

  "ताई, मी हे वडिलांना कसं विचारू. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांच्या उपकाराची फेड मी अशी नाही करणार."

  "भावेश, तुम्ही दोन गोष्टींची गल्लत करताय. तुमच्या वडिलांनी केलं ते त्याचं वडील म्हणून कर्तव्य होतं. त्यांच्या आजारपणात किंवा म्हातारपणी जेंव्हा त्यांना तुमची गरज असेल तेंव्हा त्यांची सेवा करून, त्यांना काय हवं नको ते बघून तुम्ही तुमचं कर्तव्य करा. हप्ता किंवा भाडं भरणे, आणि ती रक्कम तुम्हा दोघांपैकी कोणी भरावी हा व्यवहार आहे. तुम्ही कर्तव्य आणि व्यवहार ह्याचात गोंधळ करू नका. बघा विचार करून. पटलं तर वडिलांशी बोला. नाही तर तुम्ही आता ज्या पद्धतीने वागताय त्यांनी सारिका खूप वैतागलेली आहे. ती तुम्हाला सोडून गेली तर चालेल का? विचार करा. मला वाटतंय तुम्ही वडिलांशी एकदा मोकळं बोलावं."

  बहुतेक सारिका सोडून जाऊ शकेल हि शक्यताच त्याच्या मनात कधी आली नाही. तो पटकन म्हणाला, "ताई, मी सारिका शिवाय नाही राहू शकत. मी प्रयत्न करतो आणि बोलतो वडिलांशी."

  "भावेश, आणखीन एक गोष्ट करा. तुमच्या प्रोब्लम बद्दल मला जे सांगितलं ते सर्व सारीकाशी शेअर करा. त्यांनी तुमचं नातं अजून चांगलं होईल."

  ह्या सगळ्या बोलण्यानी भावेश खूपच रीलेक्स झाला. तो घरी जाऊन सारीकाशी सगळं मोकळं बोलला. (मला हे समजलं कारण दुसऱ्या दिवशी सारिकानी फोन करून सांगितलं.) पण मनाची तयारी करून वडिलांशी हा विषय बोलायला भावेशला तब्बल दोन महिने लागले.

  दोन महिन्यांनी एक दिवस भावेश आणि सारिका पेढे घेऊन ऑफिसमध्ये आले. "ताई, तुमचे खूप खूप आभार. मी वडिलांशी बोललो. त्यांना माझ्या होणाऱ्या धावपळीची कल्पना दिली आणि त्यांनाच विचारलं काय आणि कसं करायचं ते. वडील जरा वैतागूनच म्हणाले,' भावेश, तू थोडा वेडा आहेस का? ७ महिने हे असं जगत राहिलास. तुला एकदापण तुझ्या बापाशी येऊन बोलावसं वाटलं नाही? मी तरी कसा मूर्ख. मला पण कसं लक्षात नाही आल कि कर्जाचे हप्ते, घर भाडं आणि घर खर्च! तू कसं सगळं भागवत असशील? ते काही नाही. इथून पुढे कर्जाच्या हप्त्याचे पैसे मी देत जाईल. आणि आयुष्यात पुन्हा अशी चूक करू नकोस'.

  ताई, मला वाटलं त्या पेक्षा वडिलांशी बोलणं खूप सोप्पं होतं. ताई, पुन्हा तुमचे आभार, आमचा संसार वाचवल्याबद्दल!

 

 

 

 

No comments:

Post a Comment