Sunday 7 March 2021

 समझोता

  मी आले तेंव्हा ऑफिसमध्ये तोबा गर्दी होती. विचारल्यावर समजलं, चार जॉईन्त मीटिंगस  होत्या. त्यातल्या दोन ठरवलेल्या आणि दोन त्यांच्या सोईने आलेल्या. प्रत्येक मीटिंग म्हणजे ७-८ माणस. काही मुलीकडून तर काही मुलाकडून. त्यात दोन नवीन केस नोंदवायला आलेल्या. त्या प्रत्येकी बरोबर दोघं जण, तक्रारदाराला मानसिक आधार द्यायला. अशी एकूण काय ऑफिसमध्ये तोबा गर्दी होती. आधी जास्तीची, केसच्या सोबत आलेल्या माणसाना बाहेर थांबायला सांगितलं आणि नवीन केस नोंदवायला घेतली.

  मधुकरराव, त्यांची बायको विमल आणि मुलगी स्वप्नाली माझ्या समोर येऊन बसले. बसतानाच मधुकररावानी बोलायला सुरुवात केली. "ताई, मी मधुकर. कुसुमताई आम्हाला शिकवायला होत्या. मी रचनाचा विद्यार्थी. हि माझी बायको विमल आणि मुलगी स्वप्नाली. स्वप्नालीच लग्न शेखरच्या बरोबर करून आम्ही पार फसलो. एकुलता एक मुलगा. त्यात त्याच्या वडिलांचं, तो ६ वीत असतानाच निधन झालं. तो आणि त्याची आई! बाकी घरात तिसरं कोणी नाही. लिमिटेड कुटुंब. विचार केला मुलगी सुखात राहील. पण कसलं काय. माझ्या मुलीचा नुसता छळ मांडलाय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं म्हणून खात्रीने बोलतोय. माझी मुलगी नोकरी करते. जावई पण बँकेत क्लार्क आहेत. दोघेपण दमून घरी येतात आणि घरी आल्यावर घरातील सर्व कामे माझ्या मुलीला करावी लागतात. अगदी घरात आल्यावर पहिला सर्वांसाठी चहा पासून सुरुवात होते ती रात्रीची  आवरा आवर करे पर्यंत. तिच्या सासूबाई घरात नुसत्या बसून असतात. शेखरराव पण कशाला, कुठल्या कामाला हातभार लावत नाहीत. म्हणायला सुशिक्षित कुटुंब आहे पण वागणं फार विचित्र."

  स्वप्नालिनी मधेच काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पण मधुकररावानी तिला गप्प करत म्हणाले, "स्वप्नाली, मी बाप आहे तुझा. तुझं भलं कशात आहे ते तुझ्यापेक्षा मला जास्त समजतं. तू हाच आगाउपणा कोर्टात केलास म्हणूनच आज आपल्याला इथे यावं लागलाय. तू जरा शांत बस."

  "मधुकरराव, हि कोर्टाची काय भानगड आहे?"

  "ताई, स्वप्नालीच्या लग्नाला सहा वर्षं झाली आहेत. तिच्या नवर्याचं आणि सासुच विचित्र वागणं बघितलं आणि ठरवलं माझी स्वप्नाली असा सासुरवास सहन करणार नाही. एका मित्राच्या सल्ल्यानी तिच्या फारकतीची केस कोर्टात टाकली. चांगली ५ वर्षं केस चालली. पाच वर्षानंतर केसचा निकाल सुनावताना कोर्टातील साहेबांनी सांगितलं, 'फारकत ना मंजूर करण्यात येत आहे. फारकत मंजूर करण्यासाठी लागणारा कोणताही मुद्दा किंवा कारण कोर्टासमोर समाधानकारक पणे मांडला नाही. फारकत ना मंजूर करत आहे.

  " आम्ही वकिलाला जाऊन विचारलं, 'आता पुढे काय करायचं? तिच्या आयुष्याची सहा वर्षं वाया गेली.' तेंव्हा त्यांच्या केबिनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने तुमच्या संस्थेची माहिती दिली. वकील पण म्हणाले, 'जाऊन बघा. कधी कधी आमच्याकडून ना सुटलेल्या केसेस त्या बायका सोडवतात.' म्हणून ताई तुमच्या कडे आलो."

  "अहो, पण कोर्टांनी फारकत ना मंजूर केली आहे. आता मी काही करू शकत नाही. आम्हाला  कोर्टापेक्षा जास्त अधिकार नाहीत. आम्ही कोर्टापेक्षा मोठे नाही. खरंच, मधुकरराव, तुम्ही सांगताय ते ऐकल्यावर मला पण असं वाटतंय कि तुमच्या मुलीनी फारकत घेऊ नये."

  "ताई, तुमच्याकडून काही होत नसेल तर आम्ही दुसरी कडे जातो. आम्ही खूप आशेनी आलो होतो." असं म्हणत मधुकरराव निघाले. ऑफिसमध्ये आल्यापासून त्यांच्या बायकोनी पहिल्यांदा हिम्मत करून स्वतःच मत मांडल. ती म्हणाली, "अहो, पण मी काय म्हणते. स्वप्नालीला तिची तक्रार इथे नोंदवू दे. ताई त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे जावयांना बोलवून घेतील. त्या त्यांच्या पद्धतीने बोलून बघतील. बघू त्यातून काही हाती लागतंय का? कोणास ठाऊक काहीतरी चांगलं पण घडेल."

  आणि अशा प्रकारे स्वप्नालिनी तिची तक्रार आमच्या कडे नोंदवली. शेखरला पत्र टाकून बोलावलं. तो लागलीच १० दिवसात भेटायला आला. शेखर, एक अतिशय साधा, देव भोळा माणूस! अंगात साधे कपडे,कपाळावर गंध, बोटावर पण गंध होतं, जे सुचवत होतं कि तो नुकतीच देव पूजा करून निघाला असावा. तो माझी परवानगी घेऊन समोर बसला. आणि 'तुमचं म्हणणं मांडा असं सांगितल्यावर बोलायला सुरुवात केली. (त्याला स्वप्नालीची काय तक्रार आहे ते सांगायची गरज नव्हती. त्याला बहुतेक अंदाज होता.)

  "ताई, मी शेखर. माझं आणि स्वप्नालीचा ६ वर्षांपूर्वी विवाह झाला. घरात आम्ही तीनच माणस. मी, माझी आई आणि स्वप्नाली. माझ्या वडिलांना खूप वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली. मी लहान असल्या पासून आईंनी खूप कष्टात दिवस काढले. चार घरी स्वैपाकाची काम करायची. वेळप्रसंगी लोकांनी दिलेल्या अन्नावर आम्ही जगलो आहोत. माझ्या शाळेची फी भरता यावी म्हणून माझ्या आईंनी कितीतरी वर्षात स्वतःसाठी वारभर कपडा घेतला नाही. आयुष्यात हौस-मौज तर कधी केलीच नाही. आज आता सगळं ठीक आहे तर मी हे माझं कर्तव्य समजतो कि इथून पुढच्या आयुष्यात माझ्या आईला सुखात ठेवीन. स्वप्नालीनी पण मला चांगली साथ दिली. पण तिचे वडील आले कि काय होतं ते मला अजून समजलेलं नाही. ते आमच्या घरी वेळी-अवेळी येतात. राग राग करतात. "माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही. आणि मी काही अजून बांगड्या भरल्या नाहीत. मुलीला पोसायची हिम्मत आहे.' असं म्हणतात, त्रागा करतात आणि स्वप्नालीला सोबत घेऊन जातात. त्यांचा प्रोब्लम काय आहे हेच मला समजू शकलेलं नाहीये. त्यांचं जाऊ द्या. पण मला स्वप्नालीची गम्मत वाटते. एरवी इतकी आमच्यात मिळून-मिसळून रहाणारी मुलगी, वडील आले कि तिला काय होतं काही कळत नाही. ते चल म्हणाले कि हातातलं काम टाकून त्यांच्या सोबत जाते. कधी आमची परवानगी मागत नाही कि कधी त्यांना विरोध करत नाही. ताई, लग्न हि काय रोज करायची गोष्ट आहे का? लग्न निभावण्यासाठी करायचं असत. मोडण्यासाठी नाही. मी असं नाही म्हणत कि माझं काहीच चुकत नाही. चुकतही असेल. पण प्रश्न बोलून सुटू शकतो, हे त्यांना मान्यच नाही. त्यांनी कोर्टात फारकतीचा दावा दाखल केला. कोर्टांनी र्तो ना-मंजूर केला. म्हणून ते तुमच्याकडे आले आहेत. ताई, मी कोर्टात जे सांगितलं तेच तुम्हाला पण सांगतो 'मी स्वप्नालीला फारकत देणार नाही. ती माझी बायको आहे आणि आज ना उद्या मी तिला माझ्या घरी घेऊन जाणार आहे."

  शेखरच्या बोलण्यात कुठेतरी सच्चेपणा जाणवला आणि मी दोघांची एकत्र बैठक बोलवायची ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघं आले. पण स्वप्नाली सोबत तिचे वडील पण आले. (नेहेमीप्रमाणे). मी त्यांना वेगळ्या खोलीत बसायची विंनती केली. आधी त्यांना ते मान्यच नव्हतं. पण अखेरीस कबूल झाले. मी, शेखर आणि स्वप्नाली वेगळ्या खोलीत बसलो. आमच्यात काय बोलणी चालू आहेत हे मधुकरराव ह्यांना ना कळल्यामुळे ते अस्वस्थ झाले. आमची मीटिंग जवळ जवळ दोन तास चालली. ऑफिसमधून माझ्यासाठी निरोप येत होते, "ताई, स्वप्नालीचे वडील खूप चिडले आहेत. रागानी त्यांचा चेहेरा लालबुंद झाला आहे. ताई, आम्हाला भीती वाटते आहे त्यांचं बिपी तर नाही ना शूट-अप होणार? ताई, ते कस तरीच करतायत."

  मी ऑफिसमधील कार्यकर्त्यांना सांगितलं, " बाहेर माझी गाडी आहे. काही वाटलं तर त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. पण स्वप्नाली सांगतीये त्यांना काहीच होणार नाही. ती सासरी जाईल अशी शक्यता निर्माण झाली कि ते असंच करतात. काही टेन्शन घेऊ नका."

  इकडे खोलीत आमची बोलणी चांगली चालली होती. स्वप्नालिनी पहिल्यांदा स्वतःबद्दल आणि तिला काय हवं आहे हे मांडल. स्वप्नाली सांगत होती, "ताई, मी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. लहानपणी मरता-मरता वाचले होते. मी दोघांची खूप लाडकी. दोघांनी मला तळहातावरच्या फोडासारख जपलं. मी जशी शाळेत जायला लागले तेंव्हापासून आजपर्यंत त्यांनी मला एकटीला कुठे कधी जाऊ दिलं नाही. माझं लग्न करायचं पण ते खूप दिवस टाळत होते. मधेच त्यांना वाटलं घर जावई व्हायला तयार असेल, असं स्थळ पहावं. आईंनी त्याला विरोध केला तेंव्हा त्यांच्यातच खूप वाद झाला. अखेरीस महा-मुश्किलीने ते माझं लग्न लाऊन द्यायला तयार झाले. गावातच सासर-माहेर असल्याने वरचेवर भेटायला यायचे. त्या घरातली माणस माझी, ते घर माझं असं मला त्यांनी कधी वाटूच दिलं नाही. ते भेटायला आले आणि मला काम करताना बघितलं कि त्यांचा संताप व्हायचा. मला त्यांच्या सोबत घरी जाण्यासाठी आग्रह करायचे. मी जायला नकार दिला तर आत्महत्या करण्याची धमकी द्यायचे. माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूबाईंना, खूप नको-नको ते बोलायचे.ताई, मी त्त्यांच्या वागण्याला खूप कंटाळून गेले होते."

सांगताना स्वप्नाली रडायला लागली. शेखरनी तिला जवळ घेऊन शांत केलं.स्वप्नाली आणि शेखर मध्ये समझोता होण्याची चिन्ह दिसत होती. त्यांना दोघांना १० मिनिटं बोलायला वेळ देऊन मी खोलीच्या बाहेर आले. बाहेर आले तर मधुकरराव माझी वाटच बघत होते. ते जवळ जवळ माझ्यावर ओरडलेच, "ताई, तुम्ही हे असं करू शकत नाही. तुम्ही माझ्या मुलीचा असा परस्पर समझोता करू शकत नाही. जर का उद्या तिचं काही बर वाईट झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला अजून माहित नाही मी कोण आहे ते!"

  त्यांना शांत करत मी सांगत होते,"मधुकरराव, स्वप्नाली हि तुमची मुलगी आहे. हे सत्य आहे. हे कोणीच नाकारत नाहीये. पण आता तुम्ही तिचं लग्न लाऊन दिलत. आता तिच्या संसारात लुडबुड करू नका. तिला तिचा संसार सुखानी करू द्या. शेखर चांगला मुलगा आहे. तुम्ही प्लीज समजून घ्या. उद्या असं नको व्हायला कि ज्या स्वप्नाली साठी तुम्ही हि टोकाची भूमिका घेताय तीच तुमच्याशी संबंध तोडायची."

  तेवढ्यात शेखर आणि स्वप्नाली बाहेर आले. तिला बघितल्यावर मधुकरराव अल्मोस्त धावतच तिच्या जवळ गेले, तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, "स्वप्नाली बाळ, चल. आपण आपल्या घरी जाऊ. तू कशाचं टेन्शन घेऊ नको. मी समर्थ आहे तुला सांभाळायला."

  स्वप्नालिनी त्यांचा हात झटकला आणि म्हणाली, "ताई, मी माझ्या नवर्यासोबत जायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. माझ्या वडिलांनी माझ्या घरी येऊ नये. मी माझी खुशाली तुम्हाला कळवीन, आम्ही येऊन सांगू पण कुठल्याही कारणांनी माझे वडील माझ्या कडे आलेले मला चालणार नाहीत. त्यांच्या मुळेच माझा संसार मोडणार होता. जर एवढंच मुलीचं प्रेम होतं तर माझं लग्नच लाऊन द्यायचं नाही ना त्यांनी. ताई, तुम्ही मला विचार करायला एक वेगळी दिशा दिलीत. तुमचे खूप खूप आभार!"

  दोघांमध्ये समझोता झाला आणि ते लिखापडी करून त्यांच्या घरी निघून गेले. मुलीनी वडिलांकडे वळून पण पाहिलं नाही.

  शेखर आणि स्वप्नाली अधूनमधून भेटतात. दोघंपण मजेत आहेत आणि सुखानी संसार करतायत.    

 

 

 

 

No comments:

Post a Comment