Thursday, 15 October 2020

रोशन की जिंदगी में रोशनी आयेगी?

महिला हक्क संरक्षण समितीत आजपर्यंत विविध काम केली. अनेक जबाबदार्या स्वीकारल्या. त्यातील एक उद्योगकेंद्राची! सातपूर व अंबड येथील कंपन्यांमध्ये जाऊन, तेथील साहेबांना भेटून कामे मिळवणे. त्यामागील प्रेरणा आणि विचार १९८८-८९ पर्यंत सोडविलेल्या केसेस मधून पुढे आला. आमच्या अस लक्षात आलं कि सासरी त्रास होतो, नवरा मारहाण करतो, सांभाळत नाही, वेळी अवेळी मारहाण करून मुला बालांसकट घरातून हाकलून देतो तेंव्हा नाईलाजाने ती महिला माहेरी मदत मागायला येते. ३-४ मुलांना घेऊन माहेरी आलेली मुलगी ही पालकांसाठी व त्यांच्या भावांसाठी एक नकोशी जवाबदारी असते. (काही नशीबवान मुलींचे पालक त्यांचा स्वीकार करतात) पण बहुतेक वेळा तिचं आणि तिच्या मुलांच ओझं वाटतं. काही वेळा कुटुंब मोठं आणि कमावणारी व्यकी एक, त्याच्या उत्पन्नात भागत नाही म्हणून देखील चिडचिड होते. आणखीन एक कारण म्हणजे तिच्या लग्नात दिलेला हुंडा! काही केसेसमध्ये भाऊ बोलून दाखवतात कि तुझ्या लग्नात तुझं जे काही होतं ते देऊन झालं आहे. आता ते घर तुझं आहे. आल्या सारखी चार दिवस माहेरी रहा आणि आपल्या घरी जा. आणखीन एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती म्हणजे अनेक कुटुंबात नवऱ्याच्या उत्पन्नात घरखर्च भागत नाही. बाईनी चार पैसे कमावले तर ती कुटुंबाला  हातभार लाऊ शकेल आणि वेळप्रसंगी तिचे उत्पन्न तिला जगायला मदतरूप ठरेल.

  बघता बघता ३ मोठ्या कंपन्यांची कामे आम्हाला मिळाली. आम्ही ६५-७० महिलांना रोजगार देऊ लागलो. अगदी फेक्टरी सारख काम सुरु झालं. सकाळी ९ ते सायंकाळी ६पर्यन्त काम चालायचं. काम चोख अगदी मागणी प्रमाणे पुरवठा करत होतो. साहेबलोक पण खूष होते. बघता बघता सिडकोतील लोकांना माहित झालं कि गरीब व गरजू महिलांना संस्था काम देते. आमच्या उद्योगकेंद्राच्या  आणखीन दोन जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे काम घराच्या जवळ होतं, दुसरं महिलांची संस्था आणि तिसरं वेळेवर मिळणारा मोबदला. बायका खूष, आम्ही खूष आणि कंपनीतले साहेब खूश!

  त्या दिवशी मला सिडकोतील ऑफिसला जायला उशीर झाला. जवळ जवळ १२ वाजले. केलेल्या कामाची बिल करायचं काम काल अर्धवट झालं होतं ते पूर्ण करायला सुरुवात करणार तेवढ्यात अलकाताई एका बाईला, रोशनला घेऊन आल्या. रोशन मला भेटण्यासाठी सकाळी १०पसुन थांबली आहे असं त्या म्हणाल्या.

  अलकाताईनी रोशनला उद्देशून सांगितलं, "हेमाताईसे बात करले. आमच्या कडे जागा नाहीये. गरजेप्रमाणे बाया घेऊन झाल्या आहेत. मी तुला सकाळपासून हेच समजावायचा प्रयत्न करतीये. ताई काही जादू करणार आहेत का? जागाच नाही तर त्या तुला काम कुठून देतील?"

  "ताई मी तिला खूप समजावलं, पण ती ऐकतच नाहीये. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही असंच आल्यापासून घोकतीये.

  मी काही म्हणायच्या आत रोशनने माझा हात तिच्या हातात घट्ट धरला आणि म्हणाली,"ताई, नही मत कहो. बहुत उम्मीद लेकर तुम्हारे पास आई हु. घरमे बच्चे कलसे भूखे है. मैने तो दो दिनसे कुचभी नही खाया. ताई कुचभी काम दो. मै झाडू मारूंगी, टोईलेट साफ करूंगी, जो बोलोगे वो करूंगी. मगर ताई मेरेको ऐसेही वापीस मत भेजो." इतक बोलून ती रडायला लागली. काय बोलावं, काय करावं, मला काही सुचत नव्हतं.

  मी रोशानला सांगितलं, "आधी घरी जा आणि तुझ्या मुलांना घेऊन ये. तुझ्या कामाचं काय करायचं ते नंतर बघू. रोशन गेल्यानंतर मी अलकाताई आणि मंदाताईना बोलावलं. आत येताना दोघींनी एकाच सुरात सांगितलं, "ताई, आपल्याकडे अजिबात व्हेकन्सी नाहीये. कालच आपण तिन्ही विभागात प्रत्येकी दोन बायका घेतल्या आहेत. त्या छान काम करतायत. तुम्ही त्याच्यात काही प्लीज बदलू नका.' सेक्शन सुपरवायसर म्हणून त्यांचं दुख मी समजू शकत होते. त्यांच्या युनिट मध्ये बदल होणार नाही असं आश्वासन दिलं, तेंव्हा कुठे आमचं बोलणं पुढे सरकलं. मी त्यांना समजावला कि तिला आज कामाची, मिळणाऱ्या पैशांची खूप गरज आहे. तिला काय काम द्यायचं, तिचा पगार कशातून द्यायचा हे मी बघीन. तुम्ही फक्त तिला सांभाळून घ्या. आणखीन एक, आपण आपल्या बरोबर तिला व तिच्या मुलांना जेवायला बोलवूया.

  रोशन तिच्या मुलांना घेऊन आली. ती येईपर्यंत एक वाजून गेला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही जेवणाची सुट्टी केली. जेवायला बसतांना आम्ही रोशनला व तिच्या मुलांना आग्रहानी जेवायला बसवलं. मुलं पोटभर जेवली. रोशननी पण नको नको म्हणत चार घास खाल्ले.जेवण झाल्यावर सर्वजणी आपल्या सेक्शनमध्ये गेल्या. रोशनची मुलं बाहेर अंगणात गेली. रोशानला सांगितलं आता तुझी काय अडचण आहे ती सविस्तर सांग.

 

  रोशनच्या सांगण्यातून मला जे समजलं ते,

  तिचे लग्न १० वर्षापूर्वी अब्दुलशी  झालं होतं. अब्दुल गवंडीकाम करायचा. राहायला झोपडी व मर्यादित उत्पन्न. त्याला तीन शोक होते- दारू,जुगार आणि बाई! सर्व कमाई त्यात खर्च व्हायची. पैसे कमी पडले कि तो राग रोशनवर निघायचा. उपासमार व मारहाण हि नित्याचीच होती. त्याच्या मर्जीप्रमाणे वेळी अवेळी शरीरसुखाची अपेक्षा पूर्ण करावी लागत होती. तिची ३ मुलं आज जिवंत आहेत व तिची ३ मुले वेळेवर उपचार न झाल्यामुळे मरण पावली. आईवडील व भाऊ कशातच लक्ष घालत नव्हते. त्रास असह्य झाला की लेकरांना घेऊन माहेरी आशेनी जायची. पण एकदापण त्यांनी कधी जावयाला समजावलं नाही का हिला एखादी रात्र ठेऊन घेतलं नाही. खरं सांगायचं तर तिच्या माहेरची परिस्थिती पण बेताचीच होती. वडिलांचं इस्त्रीच दुकान. भाऊ पण वडिलांसोबत त्याच दुकानात काम करत होता. ८ वर्षांपूर्वी भावाचं लग्न झाल होतं. त्यांला पण तीन लेकरं होती. राहायला झोपडी. तो तरी काय आणि कशी मदत करणार. चार महिन्यांपूर्वी तिच्या नवर्यानी तीला बेदम मारहाण करून माहेरी आणून सोडलं. "परत पाठवू नका. मी तिला घरात घेणार नाही." असं म्हणाला. तिचे वडील काही समजवायला गेले तर अब्दुल म्हणाला, "मै तुम्हारी रोशनको तलाक़ देता हुं." त्या नंतर ३ वेळा तलाक़ म्हणून तो निघून गेला. आता रोशन कुठेच जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी नाईलाजाने तिला घरात रहायला परवानगी दिली. आपण इथे सगळ्यांना नकोसे आहोत हे कळत होतं पण तिचा नाईलाज होता. रोशननी घरातली सर्व काम करायची असं ठरलं. घरातील ११ माणसांचा स्वैपाक, कपडे धुणे, भांडी घासणे व इतर लहान मोठी पडतील ती कामे ती मुकाट्यानी करत होती. वहिनी काढून देईल तेवढच  जेवण बनवायचं. सर्वांच्या शेवट जे उरेल ते रोशनला मिळायचं. काही दिवसांनी तिच्या मुलांना पण मोजकच जेवण द्यायचं ठरलं. परवा भावाच्या मुलांबरोबर माझ्या मुलांनी शाळेत जाण्यासाठी हट्ट केला. तेंव्हा त्यांची मामी म्हणाली,"मेरा अकेला मरद क्या क्या करेगा? ११ लोगोंको खिलावो, उनको सम्हालो, और अब इनको पढने भेजो. इत्ता बेठके खाते हो. थोडा काम करो और कमाई करो."

  तर अशी हि रोशन! दुसर्या दिवसापासून आमच्या उद्योगकेंद्रात येऊ लागली. तिला तिच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. ती मन लाऊन काम करत होती. पहिला महिना तिला नेमकं काय काम सांगावं, हि थोडी अडचण होती. दुसरं म्हणजे तिला पगार कश्यातून द्यावा हे समजत नव्हतं. मी आमच्या अध्यक्षा मा.कुसुमताईना विचारून माझं त्या महिन्याचं मानधन तिला द्यायचं ठरवलं. संस्थेत येणारं काम वाढतच होतं. पुढील महिन्यापासून तिला एका विभागात (सेक्सन) रुजू करून घेतलं. बघता बघता रोशनची आर्थिक परिस्थिती सुधारली. ती घरात भावाच्या बरोबरीने पैसे देऊ लागली. महिला हक्क संरक्षण समिती तर्फे उद्योग केंद्रातील महिलांसाठी एक उपक्रम राबवला जायचा. त्यांना वर्षाला लागणारं धान्य भरायला आर्थिक मदत करणे. त्याचा रोशन व तिच्या कुटुंबाला खूप उपयोग झाला.

  आज बरेच दिवसांनी मला रोशन भेटली. (१९९४ मध्ये बंगलोर येथे "बाल हक्क परिषद, ९५ साली बेईजिंग, चीन, येथे झालेली अंतर-राष्ट्रीय महिला परिषद आणि महिला हक्क संरक्षण समिती च्या कामाच्या संदर्भात झालेला १९९७चा कॅनडा दौरा, त्याची पूर्वतयारी व नंतरचं अनुभव कथन, रिपोर्टिंग ह्यात ३ वर्षं खूप गड-बडित गेली. ह्या संदर्भातील बंगलोर, अमदाबाद, पुणे, दिल्ली, उदैपूर अश्या वेग-वेगळ्या शहरांमध्ये झालेल्या मिटींग्स ह्या सगळ्यामुळे बाकी कशालाच वेळ मिळाला नाही) भेटल्यावर मी तिची विचारपूस केली, "घरी सर्व ठीक आहे न? मुलं शिकतायत ना?" असं विचारल्यावर ती पटकन म्हणाली," ताई अब घरमे मेरीही चलती है. घरका खर्चा चलाती हुं. यहा कामपे लगी. पहेले दो महिनेका पगार बच्चोपे खर्च करी. सबको एक जोडी नये कपडे लिये. अम्मी अब्बू भाई भौजाई सबके वास्ते कुछतो लाई. घरमे सब खुश थे. फिर मैने भाई और अब्बू को समझाया ऐसे कित्ते दिन बच्चोको लेकर झोपडेमे रहेंगे. वन रूम किचन भाडेसे लेकर उसमे रहेंगे. अच्चे लोग आपके पास आएंगे. उससे अपनीही आमदानी बढेगी. पहेले मेरी बात कबूल करना उनके लिये थोडा मुश्कील था. मगर बादमे मान गये. अब हम सब दो रूम किचन वाले मकानमे रहेते है. अब सब अछेसे चल रहा है. आपने बोले वैसे मेरे बच्चोके साथ भाईके बच्चे भी सिखाती हुं. सबके साथ अच्छेसे रेहेती हुं. ताई, बहोत बार सोचती हुं, अगर आप मुझे नही मिलती तो मेरा और मेरे परीवारका क्या होता"?

असे अनुभव आले की दर वेळी वाटतं, की अजून खूप काम करायचं बाकी आहे. महिला हक्क संरक्षण समिती आपल्या परीने शक्य ते काम करतेच आहे. आजवर त्यात अनेक हितचिंतकांची साथ लाभली आहे. अशीच साथ यापुढेही लाभू दे, म्हणजे गरजू महिलांपर्यंत आपल्याला मदत पोचविता येईल.

Tuesday, 6 October 2020

शालिनी

शालिनी मला भेटली तेंव्हा २० वर्षांची होती. बारीक, मध्यम बांधा, सावळी आणि स्मार्ट अशी शालिनी १२ वी पर्यंत शिकलेली होती. वडिलांची दिंडोरी जवळ थोडीफार शेती होती. आई, वडील, २ भाऊ आणि ती स्वतः असं कुटुंब. शेतीच्या उत्पन्नात सर्व कुटुंब सुखानी जगात होते. शालिनीला १२ वी नंतर पुढे शिकवायच नाही, हे आई-वडिलांचं ठरलेलं होतं. वेळ घालवायला तिने २ वर्षाचा शिवण क्लास लावला. क्लासचं एक वर्षं जेमतेम झालं असेल आणि शालिनीला शेजारच्या गावातून लग्नासाठी मागणी आली. 'अजून तर महिन्या भारापुर्वीच तिला २० व वर्षं लागलाय. एवढी घाई कशाला करायची? शिवणाच्या क्लासची २ वर्षांची फी भरली आहे. अजून जवळ-जवळ एक वर्षं बाकी आहे. तो क्लास पूर्ण होऊ दे मग लग्नाचं बघू.' असं घरातील सगळ्यांचच मत होतं. पण दोन दिवसांत परत निरोप आला. त्यांना दोन महिन्यात लग्न उरकायचं होतं. स्थळ चांगलं होतं. मुलगा डॉक्टर होता. सरकारी दवाखान्यात नोकरीला होता. घरची शेती होती. मोठं घर होतं. त्याच्या पेक्षा मोठ्या दोन बहिणीचं लग्न झालं होतं. धाकटा भाऊ शिकत होता. मुलाची आई झेड.पी. च्या शाळेत शिक्षिका होती. शोधून पण असं स्थळ मिळालं नसतं. काय करावं? इतकं चांगलं चालून आलेल्या स्थळाला नकार देणं म्हणजे मूर्खपणाचंच ठरेल. बऱ्याच विचारा अंती, शालिनीच्या वडिलांनी होकार कळवला.

'देण्या-घेण्या ची बोलणी करायला कधी भेटायचं? साखरपुडा आधी करायचा का? कधी करूया?' असे विविध प्रश्न घेऊन माधवराव (शालिनीचे वडील) शंकररावांना (नवर्या मुलाचे वडील) भेटायला गेले. शंकररावांनी त्यांचं आगत-स्वागत केलं. 'अहो, कसलं देणं-घेणं आणि कसला साखरपुडा? सगळे विधी लग्नातच उरकूया. मुलगा शिकलेला आहे, कमावता आहे, देवाच्या कृपेनी आमच्या कडे गरजेपेक्षा जास्तच आहे. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. लग्नात फक्त मुलगी आणि नारळ द्या. लग्न साधेपणानी करू. तुमची २०-२५ माणस आमच्या कडची पण तेव्हढीच असतील. तुमच्या लोकांचे मन-पान तुम्ही सांभाळा आमचे नातेवाईक आम्ही सांभाळू!' असं म्हणत १० मिनिटात लग्नाची बोलणी उरकली. माधवरावांचा तर स्वतःच्या कानावर आणि नशिबावर विश्वासच बसत नव्हता. दोन महिन्या नंतरची तारीख ठरली. पंचक्रोशीतल स्थळ, समजूतदार आणि साधी माणस, त्यांना पैशाचा लोभ नाही. गावात शेजारी-पाजारी चौकशी केली तर सगळीकडून त्यांच्याबद्दल चांगलंच कानावर आल. शालिनी किती नशीबवान आहे असं सर्वाना वाटलं. आईंनी तर 'शालिनी, तू नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी पुण्य्याच काम केलं अशील म्हणून इतकं चांगलं स्थळ मिळालं.' असं म्हणत मागच्या जन्माला पण क्रेडीट देऊन टाकलं!

ठरल्याप्रमाणे लग्न साधेपणानी पार पडलं. (ह्या सगळ्या प्रकारात ना शालिनीच मत विचारलं किंवा नवर्या मुलाचं! मुलगातर डॉक्टर होता, कमवता होता पण लग्नाच्या निर्णयात मुलांना विचारायची गरज नाही. आमच्यात तशी पद्धत नाही, असं विधान केलं कि संपलं!) शालिनीची  वाजत-गाजत सासरी पाठवणी झाली. आठवड्याभरात पहिल्या मुळाला शालिनी माहेरी आली. ती थोडी गप्प-गप्पच होती. आईंनी (शांताबाईनी ) काळजीने विचारले,'काय ग सगळं ठीक ना? घरातले सगले कशे आहेत? सासू-सासरे सगळ्यांचा स्वभाव कसा आहे? आणि महत्वाचं, डॉक्टर काय म्हणतायत?'

शालिनीने तुटक उत्तर दिलं,'कोणी काही म्हणत नाहीये. सगळे मजेत. ह्यांचा स्वभाव माहित नाही. त्या घरी गेल्यापासून मला ते भेटले नाहीत कि बोलले नाहीत. खरं सांगायचं तर मला ते दिसलेच नाहीत.'

शांताबाई शालीनिकडे बघतच राहिली . त्यांना क्षणभर काय बोलावं काही सुचेना. त्यांच्या मनात एक भीती घर करू लागली. 'जावई असं का वागत असतील. नवीन लग्न झालं आहे आणि तो माझ्या मुलीच्या जवळ पण आला नाही. किंबहुना तिला टाळतोय कि काय असं वाटतंय. काही काळजीच कारण तर नसेल ना?' तिने मनात आलेले निगेटिव विचार बाजूला सारत शालिनीला विचारलं,'अग, लग्न घर आहे. घरात माणस, पाहुणे असतील. असं जवळ येणं, बर दिसत नाही असं विचार केला असेल, जावयांनी.'

शालिनी तुटकपणे 'असेल' असं म्हणाली आणि निघून गेली. पुढे दोन दिवसांच्या मुक्कामात तिने सासर, सासरची माणस, जावई, त्यांचं वागणं हे सर्व विषय टाळले. दोन दिवसांनी सासरहून घ्यायला कोणीच आल नाही. हे तिला आणि तिच्या आईला खटकलं, पण वडिलांनी 'जावईबापू गडबडीत असतील. रजा मिळाली नसेल' अशी कारण सांगून वेळ मरून नेली. शांताबाईनी पाठवणीची तयारी केली आणि माधवराव मुलीला सासरी सोडून आले.

८-१० दिवसांत दुसऱ्या मुळच्या निमित्ताने शालिनी माहेरी आली. ह्या वेळेस ती आधीपेक्षा पण गप्प होती. ती धड कोणाशी बोलत नव्हती कि जेवत नव्हती. तिची तब्येत पण खराब झाली होती. चेहेरा निस्तेज झाला होता, वजन उतरलं होतं. तिला कशात काहीच इंटरेस्ट नव्हता. दोन दिवसांनी सासरी जायची वेळ झाली. ह्या खेपेला पण कोणी घ्यायला आला नाही. वडील कर्तव्य म्हणून 'मी सोडायला जातो 'म्हणाले. ह्या वेळेस शांताबाई हिम्मत करून म्हणाल्या," काहीतरी चुकतंय. पंधरा दिवसांत मुलीचं आयुष्य पार बदलून गेलं. मला तर शालीनिकडे बघवत नाहीये. काय अवस्था झाली आहे तिची? कुठेतरी काहीतरी चुकतंय. बिनसलय. काय ते कळत नाहीये. ते जो पर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली पोर त्या घरात कशी पाठवायची?"

त्या दिवशी रात्रीची जेवणं झाल्यावर माधवराव आणि शांताबाई त्यांच्या मुलीला घेऊन बसले. माधवरावांनी विचारलं," शालिनी, सासरी काही त्रास आहे का? कोणी काही तुला बोललं का? तू सासरी खुश नाहीयेस हे जाणवतंय. पण नेमकं काय झालाय हे तू बोलल्या शिवाय आम्हाला कस कळेल? तू बोल. सांग काहीतरी."

शालिनी आपली गप्प बसलेली. आई-वडिलांनी तिला बोलतं करायचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशीची शालीनीची पाठवणी दोन दिवस पुढे ढकलली. २४ तास उलटले. शालिनी काहीच बोलेना. शेवटी शांताबाईनी त्यांचं हुकमी पान वापरायचं ठरवलं. 'इमोशनल ब्लाकमैल'. त्यांनी सकाळी उठल्यापासून सगळ्यांशी बोलणं बंद केलं. नाश्ता, जेवण बंद. त्याचा उपयोग झाला. शालीनिनी त्यांचापाशी लग्न झाल्यापासून काय-काय घडलं ते सांगितलं. 'लग्न करून शालिनी सासरी गेली. पहिले ३ दिवस घरात खूप पाहुणे होते. घरातील बायका एकीकडे आणि पुरुष दुसऱ्या खोलीत झोपत होते. चौथ्या दिवसापासून सचिनने (तिच्या नवऱ्याने) रात्रीची ड्युटी मागून घेतली. दिवसा मित्र, झोप आणि रात्री हॉस्पिटल. मला ह्या वागण्याचा त्रास होत होता. पण घरात बाकी कोणालाच हे चुकीचं आहे असं वाटत नव्हतं. मी सांगणार तरी कुणाला होते. तुम्ही इतक्या उत्साहानी माझं लग्न लावलंत. तुम्ही माझ्या सुखी संसाराची स्वप्नं पाहिली आहेत. ह्याचं हे असं वागणं कळल असत तर तुम्हाला काय वाटलं असत?

मागच्या आठवड्यात मी गेले तेंव्हा सासूबाईंना मी हे सगळं सांगितलं. त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मी ह्यांच्या वडिलांशी पण बोलले. तेंव्हा ते म्हणाले, 'जे झालं त्यातून सावरायला त्याला थोडा वेळ लागेलच. सचिन मनाचा खूप हळवा आहे. सर्व काही ठीक होईल. थोडा धीर धर आणि त्याला समजून घे.' मला ह्याचा अर्थ कळला नाही. मी इकडे येण्या आधी ह्यांना विचारलं,'नेमका काय प्रोब्लम आहे? तुम्हाला मी आवडत नाही का? तुमच्या इत्छेविरुद्ध लग्न झालं आहे का? काय असेल ते मला खरं-खरं सांगा. माझ्यापासून काही लपवू नका.' माझ्या ह्या बोलण्यानी ते आश्वस्त झाले. त्यांनी माझा हात हातात धरला आणि त्यांच्या मनातल्या भावना भरा-भर बोलू लागले.' शालिनी, मला माफ कर. माझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्याची बरबादी झाली आहे. आमच्या हॉस्पिटल मध्ये सुवर्णा (नर्स) काम करते. आमची चार वर्षांपासूनची ओळख आहे. आमचं प्रेम आहे, एक-मेकांवर. आम्ही मंदिरात माळा घालून लग्न केलं. चार महिन्यां पूर्वी माझ्या आई-वडिलांना ते कुठून तरी समजलं. त्यावरून घरात खूप भांडणं झाली. घरात सुवर्णाचा कोणीच स्वीकार करायला तयार नव्हतं. वडील म्हणाले प्रकरण हाताबाहेर जाण्या आधी सचिन साठी चांगली मुलगी बघून लग्न उरकून टाकू. मुलगी कमी शिकलेली असली तरी चालेल, घरची परिस्थिती बेताची असली तरी चालेल. एकदा का लग्न झालं कि मग सगळं ठीक होईल. घरात माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं. कोणी माझ्याशी चार वाक्य बोलत नव्हते. तुझी माहिती घेऊन वडील जेव्हा घरी आले तेंव्हा मी लग्नाला विरोध केला होता. मी घरातल्यांना कल्पना दिली होती कि ह्या सर्व भानगडीत तुझं आयुष्य बरबाद होईल. माझं  कोणी काहीच ऐकलं नाही. उलट मला घरात कोंडून ठेवलं. मी काहीतरी करेन किंवा तुझ्या वडिलांना भेटून खर्या परिस्थितीचा अंदाज देईन ह्या भीतीने वडिलांनी आपलं लग्न साधेपणानी आणि घाईत उरकलं.

तू एक चांगली मुलगी आहेस. माझ्या आई-वडिलांच्या मूर्खपणाचा बळी झाली आहेस. मला तुझं आयुष्य आणखीन खराब करायचं नव्हतं. म्हणून मी तुझ्या पासून लांब रहात होतो.'

हे बोलायचे थांबले. मला समजत नव्हतं कि आपण हसावं कि रडावं? त्यांच्यावर चिडावं कि त्यांचे आभार मानावेत. आई मला सांग ना, नशिबानी माझ्याशी हा क्रूर खेळ खेळला आहे, ह्याचा दोष कुणाला देऊ? मी सासरी जाऊन पण काही साध्य होणार नाही आणि न गेल्यानी कोणाला फरक पडणार नाही. आई-बाबा आता तुम्हीच सांगा मी काय करू'? शालिनीच्या डोळ्यात पाणी होतं पण चेहेऱ्यावर काही भाव नव्हता!

दुसऱ्या दिवशी माधवराव, शंकररावांना भेटायला गेले. शंकरराव बोलले चांगलं, पण त्यांनी कोणत्याही प्रकारे काही मदत करण्यात असमर्थता दर्शविली. त्यांनी मन मोठं करून सांगितलं कि,'हे शालीनिचच घर आहे. ती आमच्या घरची सून आहे. तिला तुम्ही केव्हाही पाठवून द्या. तिचं इथे स्वागतच आहे.'

शंकररावान साठी विषय संपला होता. पण हि माधव्ररावांसाठी चिंतेची बाब होती. घरी आल्यावर सगळ्यांनी बसून शालिनीला त्या घरी परत पाठवायची नाही हे एकमतानी ठरवलं.

माधवरावांना महिला हक्क संरक्षण समितीच्या कामाची माहिती होती. त्यांनी ८-१० दिवसांनी समितीच्या ऑफिस मध्ये रीतसर तक्रार नोंदवली. आम्ही आमच्या नियमानुसार डॉक्टर सचिन ह्यांना कार्यालयात बोलावलं. त्यांनी भेटायला येण्याचं कबूल केल्याप्रमाणे ते ८ दिवसांत येऊन भेटून गेले. त्यांनी त्यांची बाजू मांडली. त्यांनी शालीनीवर अन्याय झाल्याचंपण कबूल केलं. 'ह्या सगळ्याबद्दल शालिनीला नुकसान भरपाई द्या आणि विषय संपवा (कारण माधवरावांना तेच हवं होतं) असं सुचवलं. त्या दिवशी डॉक्टरांनी 'विचार करून कळवतो' असं सांगितलं आणि नंतर आमच्याशी सर्व संपर्क थांबवला. ना भेटायला आले, ना आमच्या पत्राला लेखी उत्तर दिलं, नाही कोणाकडून निरोप पाठवला. शेवटी कोर्टात जाऊन न्याय मागायचं ठरलं.

शालीनिनी खावटीसाठी कोर्टात अर्ज केला. कोर्टाच्या कामाला वेळ लागतोच. त्याच प्रमाणे शालीनीची केस पण हळू-हळू पुढे सरकत होती. पहिली नोटीस, मग त्याच्या कडून नोटीसला उत्तर. मग त्याच्या उत्तरातील काही मजकूर आपल्याला मान्य नाही म्हणून परत नोटीस. हाच खेळ वर्षभर चालला. वर्षं सव्वा वर्षांनी केस बोर्डावर आली.(म्हणजे कोर्टातली पहिली तारीख मिळाली). त्यानंतर कधी त्याचा वकील गैरहजर तर कधी हिचा वकील गैरहजर. कधी डॉक्टरचा रजेचा अर्ज! सर्व हजर असले तर साहेब रजेवर.असं करत-करत साधारण अडीच वर्षांनी (केस दाखल केल्या दिवसापासून) साक्षी पुरावे, जाब-जबाब ह्याला सुरुवात झाली. अखेरीस शालिनीच्या साक्षी साठी एक तारीख ठरली. तारखेच्या आधी दोन दिवस वकिलांनी शालिनीला बोलवून घेतलं आणि एक कागद वाचायला दिला. त्यात लिहिलेला मजकूर वाचून शालिनीला काहीच अर्थबोध होईना. त्यावर वकिलांनी शांतपणे सांगितलं,'उद्या कोर्टात साक्षीच्या वेळेस तुला हे बोलायचं आहे.'

'अहो, वकीलसाहेब! असं काहीच घडलं नाही. माझा नवरा बाहेरख्याली नव्हता. लग्ना आधी त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. त्याला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. आई-वडिलांच्या दबावाखाली त्याने लग्न केलं. त्यांनी मला कधी उपाशी ठेवलं नाही आणि मारहाण पण केली नाही'.

'अहो शालिनीताई, कोर्टात न्याय हवा असेल तर थोडा खोटं बोलावं लागतं. माधवराव, समजवा तुमच्या मुलीला.'

अपेक्षे प्रमाणे आई-वडिलांनी शालिनीला खूप समजावलं. 'त्यांनी तुझ्या आयुष्याचं वाट्टोळ केलं आहे. त्यांना अद्दल घडवायची आणि न्याय मिळवायची हि शेवटची संधी आहे. ती वाया घालवू नकोस.'

दुसऱ्या दिवशी कोर्तच कामकाज सुरु झालं. आज सर्व जण हजर होते. म्हणजे केस चालणार. आश्चर्य म्हणजे पहिला पुकारा शालिनीच्या केसचा झाला. शालिनी साक्ष द्यायला सांगितलेल्या जागी उभी राहिली. तिच्या वकिलांनी बोलायला सुरुवात केली. कालच्या कागदावर लिहिलेल्या बाबी तो कोर्टात मांडत होता. अधून मधून डॉक्टरचा वकील त्यातील काही मुद्दे अमान्य असल्याचे त्याच्या हावभावातून निदर्शनास आणत होता. शालिनीचा वकील तिला काही प्रश्न विचारत होता. तिचं त्याकडे लक्षच नव्हतं. शालीनिनी कोर्टात बसलेल्या लोकांकडे पाहिलं. समोर खाली मान घालून बसलेला डॉक्टर तिला दिसला. त्या क्षणी तिच्या लक्षात आल कि तिचं ह्या माणसाशी काहीच भांडण नाहीये. तिला त्याचा कडून एकच आश्वासन हवं होतं,' जो पर्यंत शालिनी स्वतःच्या पायावर उभी रहात नाही, काही कमवत नाही, तोपर्यंत त्याने तिला खावटी द्यावी.'

जज साहेबांनी 'तुम्हाला हे मान्य आहे का?' असा प्रश्न विचारला, ज्यांनी ती भानावर आली.

तिने हात जोडून तिचं म्हणणं मांडण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर तिनी मांडलेले मुद्दे ऐकून सगळेच अवाक झाले. ती म्हणाली," साहेब, हे वकील साहेब म्हणतात तसं काहीपण झालं नाहीये. ह्या माणसाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. आई-वडिलांच्या दबावाला बळी पडून तो लग्नाला तयार झाला. ह्या नात्याचा त्यांनी कधीपण गैरफायदा घेतला नाही. तो बाहेरख्याली नाही. त्याचं एका मुलीवर प्रेम आहे. मला अशा परिस्थितीत त्याच्या सोबत राहण्याची इच्छा नाही. माझी, कोर्टाला एकच विनंती आहे. मी माझ्या वडिलांवर अवलंबून राहू इच्छित नाही. मी स्वताचा खर्च स्वतः भागवू शकत नाही तोपर्यंत त्यांनी मला खावटी द्यावी. मी चार पैसे कमवायला लागले कि खावटी बंद करायचा स्वतः अर्ज करीन."

शालिनीच्या केसचा साहेबांनी दोन दिवसांत निकाल दिला. तिला खावटी मंजूर झाली. महत्वाचं म्हणजे पुढे दीड वर्षात शालिनीला नोकरी मिळाली. तिने खावटी बंद करायचा अर्ज कोर्टात दिला.

Tuesday, 8 September 2020

लग्नाची बैठक

महिला हक्क संरक्षण समितीचं काम करताना अनुभवातून खूप शिकले, समाजाबद्दल त्यातील मान्यता आणि रूढी ह्या बद्दल. मानापमानाच्या कल्पना, लग्नाच्या बैठका, बस्ता बांधणे, देणे घेणे, अश्या अनेक गोष्टी! मी ज्या घरात लहानाची मोठी झाले(माझ्या माहेरी) आणि लग्न करून ज्या घरी आले(माझ्या सासरी) त्या दोन्ही घरात ह्या बद्दल कधी कुठल्याच प्रकारे काही ऐकायला मिळालं नसतं. लग्नाची बैठक म्हणजे काय असं विचारल्यावर ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्यांनी पाहिलं. खर म्हणजे त्यांच्या चेहेर्यावरचा भाव अविश्वासाचा होता, कारण अश्या बैठकी शिवाय माझं लग्न कस झालं हा त्यांना पडलेला प्रश्न. माझ्या आयुष्यात हा विषय आला तो आर्या आणि अश्विन मुळे.

एक दिवस दोन तरुण मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, ऑफिसमधे आले. बराच वेळ दारातच घुटमळत उभे होते. ऑफिसमधील थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यातील मुलगा हिम्मत करून पुढे आला आणि म्हणाला," आम्हाला अध्यक्षांना भेटायचं आहे."

"अध्यक्ष आज येणार नाहीत. तुझं काय काम आहे ते आम्हाला सांग. बघूया, आम्ही तुला काही मदत करू शकतो का ते" असं म्हणत मी त्याला माझ्या समोरील रिकाम्या खुर्चीत बसायला खुणावलं. खुर्चीत बसतांना त्यांनी त्याच्या सोबत आलेल्या मुलीला येऊन बसायला खुणावलं. दोघं बसल्यावर मुलांनी बोलण्यास सुरुवात केली.

"ताई, मी अश्विन आणि हि आर्या! आम्ही जुन्या नाशकात रहातो. आमची घरं शेजारी शेजारी आहेत. आर्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकते आणि मी फायनल इयरला आहे. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. ताई, आम्हाला मदत करा."

मी विचार केला, ज्या अर्थी मुलं संस्थेची मदत मागतायत त्या अर्थी एक तर त्यांच्या लग्नाला घरातून विरोध तरी असेल किंवा त्यांच वय बघता त्यांनी घरी विचारलंच नसेल. अश्या वेळेस काही गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं असत. कायद्याच्या परिभाषेत ते सज्ञान आहेत का? मुलाचं वय २१ पूर्ण आणि मुलीचं वय १८ पूर्ण आहे का? मग पुढचे प्रश्न. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक इ. त्याबद्दलचे मी त्यांना काही प्रश्न विचारले:

घरी आईवडिलांशी किंवा घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीशी ह्या बाबतीत बोलायचा प्रयत्न केला आहे का? त्यांचा ह्या लग्नाला विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं कि तुम्हाला वाटतंय?

तुम्ही लग्न केल्यावर राहणार कुठे, खाणार का? उत्पन्नाचं काही साधन आहे का?

एकमेका व्यतिरिक्त तुम्हाला इतर लोकांची गरज भासेल-बोलायला,शेयर करायला, अडचणीत मदत मागायला. आपल्या लक्ष्यात येत नाही पण आपण खूप लोकांवर अवलंबून असतो. दोघांनीच जगणं सोपं नाहीये. तुम्ही ह्याचा विचार केला आहे ना?

माझ्या प्रश्नांना उत्तर म्हणून अश्विन बाहेर गेला आणि एका पन्नाशीतल्या गृहस्थाना घेऊन आला.

"ताई, हे आर्याचे मामा आहेत. त्यांचा सपोर्ट आहे आम्हाला. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तुमच्या कडे आलो. ते मंदिरात आमचं लग्न लाऊन देणार आहेत. व नंतर सुरतला त्यांच्या मित्राकडे राहायची सोय करणार आहेत."

मामा एक खुर्ची घेऊन अश्विनच्या शेजारी बसले. त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीतून आर्या आणि अश्विनचा जन्माचा दाखला काढला. मुलं कायद्यांनी सज्ञान आहेत हे त्यावरून निश्चित झालं. मामा म्हणाले,"ताई, आता काय सांगायचं? दोन्ही कुटुंबांची गेल्या २५ वर्षांची ओळख आहे. ह्या दोन्ही मुलांचे वडील एकाच कंपनीत गेली अनेक वर्षं एकत्र काम करतात. दोन्ही कुटुंबाचा खूप घरोबा आहे. मुलं एकत्र खेळली वाढली. आता वयात आल्यावर प्रेमात पडली. मीच त्यांना सांगितलं आधी शिक्षण पूर्ण करा, चार पैसे कमवायची अक्कल येऊ दे मग बघू लग्नाचं! घाई काय आहे?

मुलानीपण माझं ऐकलं. पण कुठून कोणास ठाऊक, आर्याच्या आईला कुठूनतरी ह्यांच्या प्रेमप्रकरणा बद्दल कळल. मग काय तिने घरात गोंधळ घातला. आर्याला विचारून ती खरं काय ते सांगत नाही हे लक्षात आल्यावर तिने तिचा पवित्रा बदलला. तिने हे शैक्षणिक वर्षं संपल कि आर्याच लग्न उरकायचं ठरवलं. तिने मला विश्वासात घेऊन सांगितलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग होत नाहीये. ताई, तिचा ह्या लग्नाला का विरोध आहे हेच कळत नाहीये. अश्विन पुढच्या वर्षी इंजिनिअर होईल. माझ्या इतक्या ओळखी आहेत. त्याला कुठेही काम मिळेल. २०-२५ वर्षांची ओळख आहे, आमची जात एक आहे. मला तर विरोध करण्यासाठी एक पण पटेल असं कारण दिसत नाहीये. मी मुलांना सर्व मदत करायला तयार आहे. मी सर्व तयारी केली आहे. फक्त लग्न तुमच्या सल्ल्यांनी आणि मदतीनी व्हावं असं मला वाटतं. मुलांना त्रास होणार नाही असं काहीतरी करा."

आमच्या परिचयातल्या वकिलांच्या सल्ल्याने आर्या आणि अश्विनच लग्न, मामांच्या उपस्थितीत मंदिरात लागल. कोर्टात लग्नाची नोंदणी केली. ह्या सगळ्याची पोलीस स्टेशनला नोंद केली (कारण तरुण मुलगा आणि मुलगी घरातून गायब झाले कि त्यांचे पालक सर्वप्रथम त्यांची मिसिंग कम्प्लेंट नोंदवतात. आज ना उद्या हि मुलं पोलिसांना सापडतात आणि मग ते त्यांना पालकांच्या ताब्यात देतात.) आणि मामांच्या मदतीने नवदाम्पत्य सूरतसाठी रवाना झालं.

ह्या गोष्टीला दिडेक महिना झाला असेल. रोजच्या केसेसच्या गडबडीत आम्ही आर्या,अश्विन आणि त्यांचं लग्न विसरलो होतो. एक दिवस अचानक आर्याच्या मामांचा कळवायला फोन आला कि 'मुलं एका आठवड्या पूर्वीच नाशिकला आली आहेत. दोघं आपापल्या घरी आहेत. आता दोघांचे आईवडील त्यांच्या लग्नाला मान्यता द्यायला तयार आहेत. पण दोन्ही कुटुंबांच म्हणणं आहे कि समाजाच्या रिती रिवाजाप्रमाणे, देवा धर्माच्या साक्षीने हे लग्न व्हावं.'

मी विचारलं 'मुलं नवरा-बायको सारखे एकत्र राहून आलेत आणि आता हे लग्नाचं काय मधेच. पण एक गोष्ट चांगली आहे घरातील सगळ्यांना हे लग्न मान्य आहे. का...."

मामानी मला मधेच थांबवलं. 'ताई, अश्विनच्या वडिलांना रीतसर लग्नाची बोलणी करायची आहेत. देणं-घेणं, मान-पान, हुंडा किती देणार? बस्ता कुठे बांधायचा? असं सगळं ठरवायचं आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजता आमच्या घरी बैठक आहे. ताई, तुम्ही प्लीज या. नाहीतर काहीतरी राडा होईल. मी तुम्हाला घ्यायला येतो.'

मी काही बोलायच्या आत त्यांनी फोन बंद केला. (त्या काळी फक्त लेंन्डलाईन फोन होते. माझ्या कडे मामांचा नंबर नव्हता.) मला अक्षरशः घाम फुटला! लग्नाची बोलणी करायला मी जाणार? ३२-३३ वर्षांची मी, माझं कोण ऐकणार. मी आज पर्यंत कधी असा कार्यक्रम बघितलेला नाही, अनुभवलेला नाही. मी तिथे जाऊन काय बोलणार? मला काही सुचेना. घशाला कोरड पडत होती. ते सगळ टाळण्यासाठी काही कारण पण सुचत नव्हतं. मी एरवी पेक्षा खूप जास्त पाणी पीत आहे आणि अस्वस्थ आहे हे शांताबाईंच्या (ऑफिसमधील मदतनीस) लक्षात आल. तिने हळू आवाजात विचारलं, 'ताई, काय होतय?' मी तिला थोडक्यात ५.३० वाजता येणाऱ्या संकटाची कल्पना दिली. तिने माझ्या सोबत येण्याची तयारी दर्शविली. त्या दिवशी मला तिचा खूप आधार वाटला.

ठरल्या प्रमाणे मामा आले आणि आम्ही सो काल्ड लग्नाची बोलणी करायला गेलो. आर्याची आई आणि मामा यांचं खूप काहीतरी म्हणणं होतं. आतल्या खोलीत नेऊन ते मला पुनःपुन्हा एक गोष्ट सांगत होते, 'ताई, काहीही झालं तरी हुंडा देऊ असं कबूल करू नका. मुलांनी आधीच लग्न केलंय. आता कशाचा हुंडा?' मी काही बोलणार तेवढ्यात पुढच्या खोलीतून कोणीतरी बोलवायला आला. 'ताई, बाहेर सगळे जमलेत. तुम्हाला बोलावलं आहे.'

बैठक बसली होती त्या खोलीत जाऊन पाहिलं आणि माझं टेन्शन अजूनच वाढलं. तिथे बहुतेक सगळे (बायका आणि पुरुष) माझ्यापेक्षा वयाने २०-२५ वर्षांनी तरी मोठे होते. धोतर-टोपी-सदरा घातलेले पुरुष आणि नऊवारी साड्या नेसलेल्या बायका! सर्वांच्या प्रश्नार्थक नजरा जणूकाही विचारत होत्या, हि पोर हा प्रश्न सोडवणार?

मी सगळ्याचं म्हणणं आधी ऐकून घेतलं. त्यामुळे मला विचार करायला थोडा अवधी मिळाला. सर्व लग्नाची बोलणी हुंड्याच्या पाशी येऊन अडकली होती. मुलाचे वडील म्हणत होते कि, 'आर्याच्या वडिलांनी १५०००/- रुपये हुंड्यासाठी बाजूला ठेवले आहेत. (हि घटना १९८७-८८ सालची आहे).ते त्यांनी आम्हाला द्यावेत. मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं होतं कि 'मुलांनी पळून जाऊन लग्न केलंय, तर आता देण्या-घेण्याचा विषय येतोच कुठे?'

मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वजण माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. मी जो निर्णय देईन तो सर्वाना मान्य असणार होता. त्या क्षणाला मला अचानक स्वतःबद्दल खात्री वाटायला लागली. कशानीतरी माझा आत्मविश्वास वाढला. शिक्षणामुळे असेल, मी करत असलेल्या कामामुळे असेल, त्यांनी मला दिलेल्या महत्वामुळे असेल. मी थोडा विचार केला. मुलांसाठी हे लग्न होणं गरजेचं होतं.(त्याला मान्यता मिळणं). हुंड्याची प्रथा मला स्वतःला मान्य नव्हती. पण माझा अनुभव मला शिकवत होता कि कधी कधी पैशांनी नाती घट्ट होतात आणि टिकतात. आर्याच्या वडिलांकडे १५०००/- रुपये तिच्यासाठी ठेवलेले होते. जे नंतर तिलाच मिळतील ह्याची खात्री नव्हती. सर्व बाजूनी विचार करून मी सांगितलं,

"अश्विनचे वडील जे म्हणतात ते मला पटतंय. आर्याच्या वडिलांनी तिच्यासाठी बाजूला ठेवलेले १५०००/- रुपये द्यावेत." मी क्षणभर सर्वांच्या प्रतिक्रिया बघायला थांबले. मुलाकडील लोकात आनंदाचे वातावरण तर मुलीकडील लोकांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. मामानी तर, 'ताई पण....' असं म्हणायला सुरुवात केली होती. मी त्यांचं बोलणं मधेच तोडत विचारलं, "मग हे सर्वाना मान्य आहे?"

मुलाकडून एका सुरात होकार आला. सगळे उठून जायला लागले. मी सर्वाना बसायची विनंती केली.

"थोडं सांगायचं राहून गेलं. पैसे द्यायचे ठरले आहेत, पण हे पैसे आर्या आणि अश्विन च्या नावाने १० वर्षांसाठी बँकेत डीपोझीट करा."

अचानक खोलीतलं वातावरण बदललं, मला जाणवलं. काही काळ कोणीच काहीच बोलेना. मी जे काही सांगितलं त्याचा अर्थ लक्षात यायला बहुतेक वेळ लागला असेल. कोणी काहीच बोलत नाही म्हणून मी निघायची तयारी केली. मुलीच्या आईवडील व मामा ह्यांचा निरोप घ्यायला वळले. माझ्या बोलण्याचा अर्थ मामांच्या लक्षात आला होता. त्यांनी माझ्या कडे बघितलं आणि 'आम्हाला मान्य आहे ' असं मोठ्याने म्हणाले.आता अश्विनच्या वडिलांची वेळ होती. सगळे त्यांच्या उत्तराची वाट बघतायत हे त्यांना जाणवलं. नाईलाजाने त्यांनी पण दुजोरा दिला. सर्व जमलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खोलीतील वातावरण आता आनंदी झालं. आता लग्नाची तारीख, जागा, इतर देणी-घेणी,नवरदेवा साठीचे कपडे, नवरीचा शालू, अश्या अनेक मुद्यांवर एकदम चर्चा सुरु झाली. आर्या आणि अश्विननी माझे आभार मानले. 'लग्नाला मला न विसरता बोलवा' आणि मुलांच्या नावानी केलेली एफ.डी.आर. मला ऑफिस मधे आणून दाखवा, असं सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघाले.

दोन दिवसांनी मुलीचे मामा आणि मुलाचे वडील मला लग्नाचं आमंत्रण द्यायला आणि पैसे बँकेत ठेवल्याची पावती दाखवायला आले. लग्न ठरल्या प्रमाणे पार पडलं. आर्या आणि अश्विन आशीर्वाद घ्यायला ऑफिसमध्ये येऊन गेले.

माझ्या आयुष्यातील पहिली आणि (बहुदा) शेवटची लग्नाची बैठक मला समृद्ध करून गेली.

Tuesday, 1 September 2020

सुखाची (रिकामी) ओंजळ

 आमची दुपारची जेवणाची सुट्टी झाली. रोजच्या सारखं आम्ही ऑफिसचे दार थोडं लोटून घेतलं. आम्ही जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात एक २०-२२ वर्षांची महिला/मुलगी ३ लेकरांना घेऊन आत आली. एक कडेवर आणि बाकीची दोघं असतील २ आणि ३ वर्षाची. अंगात मळकट, कळकट कपडे. कपडे म्हणण्या सारखं काही नव्हतं. खूप ठिकाणी फाटलेली साडी तिने कशीतरी स्वतःभोवती गुंडाळली (नेसली) होती. मुलं तर उघडी नागडी होती. त्या बाईची अवस्था बघवत नव्हती. शरीरावर खूप ठिकाणी मारल्याच्या जखमा, खुणा होत्या. कपाळावरची जखम ताजी होती. खोक पडली होती. त्यातून रक्त येत होतं. ती बाई इतकी बारीक, थकलेली आणि अशक्त होती, कि ती कशीतरी ऑफिसमध्ये आली आणि मटकन खाली बसली. तिच्यात बोलायचे पण त्राण नव्हते. आमच्या डब्यातून आधी तिला आणि तिच्या मुलांना खाऊ घातलं. चार घास पोटात गेल्यावर ती पण जरा सावरून बसली.

 

तिने स्वतःची माहिती सांगण्यास सुरुवात केली. "ताई, मी शांता. घोटीच्या जवळच्या एका पाड्यावर बालपण गेलं. घरची खूप गरिबी. आम्ही चार बहिणी, जिवंत. (गर्भापातात ३ भावंड दगावली आणि उपासमारी मुळे दोघे जण) मी सर्वात लहानी. एकबी दिस सुखाचा म्या पाहिला नाय. बाप मजुरीला जायाचा. चार पैके कमवायचा. त्यातील थोडे माझ्या मायला द्यायचा आणि काहीची पिवून यायचा. जे जमेल जसं जमेल तसं चार घास माय खाऊ घालायची. आज  पत्तूर अमी एक दिसबी पोटभर जेवलो नाय. मटण बनवलं नाय म्हणून बाप मायला लय हाणायचा! मग रातच्याला जवळ घ्यायाचा. ती लय वरडायची किंचाळायची. मग थोड्या टायमानी समद शांत व्हायाच. एक दिस माझी माय मरून गेली. बाप आमच्या संग वेगळंच वागू लागला. एक दिस शेजारील पाड्यावरचा महादू आला. बापानी त्याचा कडून पैका घेतलं आणि मोठीला पाठवलन त्याच्या संगती. असं मला पण त्यांनी पैका घेऊन सखाराम संगती लगीन लाऊन पाठवून दिलं. पैका देऊन आणल्यामुळे सखाराम माझ्या संगती हव तसं वागतो. खूप तरास देतो. दिवस रात जीव नकोसा करतो. लहान सहान कारणावरून हाणतो.

पोटभर जेवण नाही. पोर अंगावर पिते. दूध येत नाही. काल रातच्याला पोर भुकेने रडत होती आणि हा अंगाशी ..... मी नाही म्हणाले. त्यांनी हाणल." तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहेऱ्यावर भीती, घृणा, किळस असे सगळे भाव येऊन गेले. "मला जीव नकोसा झाला. तीन पोरं घेऊन जाऊ कुठे. बाप मागल्या शिम्ग्यातच खपला. जीत्तेपणी त्यांनी काही केलं नाही. आता तर मदत करायचा सवालच नाही. मला माझा नवरा समोर आला तरी घाण वाटते. तीन पोरं घेतली आणि बसले बसमध्ये. कुठे जायाच, काय करायचं, पोरांना कुठे ठेवायचं, मला काही बी ठाऊक नवतं. बस नाशिकला आली म्हणून आले नाशिकला. बसमधून उतरले आणि येड्यावानी इकडे तिकडे बघत होते. सखाराम आता तरास देणार न्हाय त्यांनी बर वाटलं पण जायाच कुठे ते ठाऊक नव्हतं. एक रिक्षावाला दादा म्हणाला,' कुठे जायचं?' म्या म्हणलं,'ठाऊक नाय.' तो म्हणाला,' बस रिक्षात. मी तुला बराबर सोडतो.' आणि त्यांनी तुमच्या पाशी आणून सोडलं."

 

शांता बोलायची थांबली. माझा मेंदू बधीर झाला होता. मला काय बोलावं काही सुचत नव्हतं. काय ते आयुष्य, किती सहन करण. एक दिवस काय एक क्षण आनंदाचा नाही. मरत नाही म्हणून जगतोय म्हणायचं. मला शांता आणि तिच्या आईसाठी वाईट वाटत होतं. कसला हा बाप. पोरं जन्माला घालायची आणि ती पोसायची अक्कल नाही. बायको नामक बाईचा नुसत्या शरीर सुखासाठी आणि गुलामा सारखा वापर केला. लग्नाच्या नावाखाली आपल्या पोटच्या पोरी विकल्या. त्याचं आयुष्य उधवस्त केलं. त्यांना नरकात ढकलून आलेल्या पैशातून फक्त स्वार्थ पहिला, मजा केली. त्या क्षणाला तिच्या वडिलांबद्दल इतका तिरस्कार आणि राग मनात होता कि ते समोर असते तर माझ्या हातून काहीतरी विपरीत  घडल असत.

फोनच्या आवाजानी मी भानावर आले. शांताची तक्रार नोंदवून घेतली. तिला झालेली मारहाण इतकी जबरदस्त होती कि सर्वप्रथम तिला औषोध-उपचाराची गरज होती. तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. तिथून डिस्चार्ज मिळाल्यावर, तिची-तिच्या मुलांसकट महिला आश्रमात (सुरक्षित ठिकाणी) पाठवणी केली.

शांताचा बाप तर मेल्यामुळे सुटला होता, पण सखारामला आम्ही इतक्या सहजी सोडणार नव्हतो. आम्हाला माहित होतं कि शांताचे वडील आणि सखाराम मध्ये झालेला व्यवहार सिद्ध करणं अवघड होतं. पण शांताला झालेली मारहाण, तिचा झालेला शारीरिक आणि लैंगिक छळ सिद्ध करता येणार होता. शांताला समझोता करून सखाराम कडे जायचं नाहीये ह्याची खात्री पटल्यावर, तिला झालेल्या मारहाणीबद्दल पोलिसांकडे तक्रार द्यायला सांगितलं. शांताची तक्रार आणि सिव्हील हॉस्पिटलचं सर्टीफिकेट, ह्याच्या आधारावर साखरामवर गुन्हा दाखल झाला. पुढे ती केस कोर्टात चालली, सखारामला शिक्षा झाली.

 

सखाराम विरुद्ध कोर्टात केस उभी राहायला खूप दिवस लागले आणि ती खूप दिवस चालली. कोर्टात सादर केलेले साक्षी-पुरावे (ह्यात माझी, त्या रिक्षा वाल्याची, बस चालकाची, डॉक्टरची, पोलीस आणि खुद्द शांताची साक्ष झाली.) (पुराव्यासाठी तिने त्या दिवशी नेसलेली फाटकी साडी, जिच्यावर रक्ताचे डाग होते, ती सादर करण्यात आली) आणि सिव्हीलची कागदपत्रे ह्यांच्या आधारवर तब्बल ५ वर्षांनी त्याला शिक्षा झाली. शांताच पुनर्वसन करणं पण सोपं नव्हतं. ती आमच्या कडे आली तेंव्हा इतकी अशक्त, परिस्थितीने गांजलेली, हरलेली आणि टेकीस आली होती कि तिच्याशी लगेच काही बोलण्यात अर्थच नव्हता. पहिले जवळ-जवळ दोन महिने तिला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सावरण्यात गेले. औषधोपचार, सकस आहार, विश्रांती आणि भयमुक्त वातावरण, ह्या सगळ्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा ती लवकर सावरली. संस्थेमार्फत चालविलेल्या पाळणाघरात तिच्या मुलांची सोय केली. थोडं बर वाटायला लागल्यावर तीला काहीतरी काम हवं होतं. स्वभाव प्रेमळ, खूप कष्ट करायची तयारी, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इत्छा पण अशिक्षित आणि भोळसट. कोणाकडे पाठवायची तर काळजी आणि जबाबदारी वाटत होती. शेवटी माहितीतल्या आणि विश्वासाच्या घरातून तिला काम मिळवून दिली.

बापाने आणि नवऱ्याने शांताच्या आयुष्यात सुखाचा एक क्षणही कधी आणला नाही. मात्र कष्ट करण्याची आणि शिकण्याची तयारी असल्यामुळे शांताला काम मिळत गेली. हळूहळू ती आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायांवर उभी राहिली, आणि मग मात्र तिने जिद्दीने स्वतःची आणि मुलांचीही ओंजळ सुखाने भरली.

Tuesday, 25 August 2020

आंटीचा डबा

 

माझ्या सारखी सुखवस्तू कुटुंबातील मुलगी वस्त्यांमध्ये जाऊन काम करते, ते पण सामाजिक काम, हे बघून खूप लोकांच्या मनात अनेक प्रश्न आले. काही जणांनी ते विचारून दाखवले. उदाहरणार्थ,"ताई, तुम्हाला समाजकार्याची पहिल्या पासून आवड होती का इकडे आल्यावर (सासरी) आवड निर्माण झाली?तुम्हाला हे काम करताना काही अडचण आली का?" माझ्यासाठी हा अवघड प्रश्न आहे. ह्या कामाची गरज आहे हे पहिल्यापासून समजत होत, पण संधी इथे आल्यावर मिळाली. इतरांच्या उपजोगी पडण्याचे संस्कार लहानपणा पासूनचेच आहेत. पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि आपल्यापरीने शक्य असेल तेव्हढे करायला हवे हे लहानपणीच्या एका प्रसंगातून शिकले.

मेरी डिसौझा, माझी बालवाडीपासून ची मैत्रीण! आमची घरं आमने सामने होती, त्यामुळे दिवसातला बराच काळ एकमेकीन कडे पडे रहो असायचो. मेरीला ३ भाऊ आणि १ बहीण. तिचे वडील टेक्स्टाईल मिल मध्ये कामाला होते. घरखर्चासाठी त्यांची फारशी मदत होत नव्हती. मग ऑन्टी(मेरीची आई) विविध प्रकारची काम करून कसातरी खर्च भागवायची. त्यांच्या घरी कोंबड्या, बकर्या, कुत्री, पोपट,मैना असे विविध प्राणी आणि पक्षी असायचे. ऑन्टी कागदी फुलं बनवून विकायची. केकच्या ऑर्डर घ्यायची. त्यांच्या घरी काही ना काही घडत असायचं. नाताळ आणि न्यू इयरला तर तिच्या केकला इतकी मागणी असायची की तो आठवडा रोज जागरण असायचंच. मी पण त्यांना सर्व कामात मदत करायचे.

एक वर्षं, (मी बहुदा ७वीत असेन) ऑन्टीला १०० अंड्याचा एक, अश्या २ केकची जम्बो ओर्डर मिळाली. खूप मेहेनत घेतली, दोन रात्री तीन वाजेपर्यंत काम केलं आणि ती ओर्डर पूर्ण करून दिली. आम्ही सगळे खूप खुश होतो. २-३ दिवसांनी ऑन्टीला पैसे मिळाले. तिने मला त्यातील काही रक्कम देऊ केली. मी घेणार नाही म्हणाल्यावर नाराज झाली. एव्हाना मी तिच्यासाठी तिची एक मुलगी असल्यासारखच ती वागत होती. त्याच अधिकारांनी मी तिला सांगितलं,"ऑन्टी,माझे पैसे पण तुमच्या डब्यात टाका."

आंटीचा डबा हा एक त्यांच्या घरातील नाजूक विषय होता. ती त्याच्या बद्दल खूपच सेन्सिटिव्ह होती. मी खूप दिवस बघत होते कि कुठल्याही कामाचे पैसे मिळाले कि त्यातली काही रक्कम ऑन्टी ह्या डब्यात टाकायची. एक दिवस अंकल दारू पिवून आले. येतांना चिकन कबाब आणले होते. ते खायला बसले. जुडास, मेरीचा सगळ्यात धाकटा भाऊ, वय ४ वर्ष! त्यांनी वडिलांकडे कबाब मागितले. ह्या कारणावरून अंकलनी त्याला खूप मारलं. त्याचा एक दात पडला. जुडास चिकनसाठी हटून बसला. दिवसभर काम करून दमलेल्या ऑन्टीने जोरात ओरडून सांगितलं,"चिकन आणायला माझ्याकडे दमड्या नाहीत. आज मुगाची खिचडी करणार आहे. जेवायचं असेल तर जेवा नाहीतर पाणी पिवून झोपा. माझ डोकं फिरवू नका." (घरातली काम, ५ मुलं, त्यांच्या मागील उठबस, बारा महिन्यांची पैशांची चणचण, घरखर्च भागवण्या साठी करावे लागणारे कष्ट, त्यात नवऱ्याचा विचित्र स्वभाव, त्याची लफडी, वेळप्रसंगी होणारी मारहाण, ह्या सगळ्यामुळे ती कावलेली असायची. तेंव्हा हि कारण समजत नव्हती, पण माताजींशी पंगे घ्यायचे नाहीत, एव्हढं आम्हाला समजत होतं!)

फळीवरच्या डब्यात पैसे आहेत हे मला काय, सर्वांनाच ठाऊक होतं. मी हिम्मत करून विचारलं,"ऑन्टी, आपण त्या डब्यातल्या पैश्यातून चिकन अनुया का?"

त्यावर 'नाही. ते आपले पैसे नाहीत'. ह्या उत्तरांनी विषय कट करून टाकला.

 तो डब्बा आणि त्यातील पैसे! त्या डब्यातील पैशांचं ती काय करणार होती? मला जाणून घ्यायचच होतं. आज पर्यंत मी मुलांसाठी काही पण करायची तयारी असणाऱ्या खूप आया पाहिल्या होत्या. पण हि माता आणि तिचं वागणं मला समजत नव्हतं. ४ वर्षाच्या लेकराला रागावली, त्याचावर चिडली, तो उपाशी झोपला तरी तिला चालणार होतं. इतकंच काय त्या दिवशी जुडासनी तिचं ऐकलं नसतं तर त्यांनी मार पण खाल्ला असता. त्या दिवसापासून तो डबा आणि त्यातील पैसे ह्याच्या बद्दलचं उत्तर शोधण्यासाठी मी वेगवेगळे प्रयत्न केले. केकच्या निमित्तांनी मला त्याचं उत्तर मिळेल अशी आशा होती. आणि तसच झालं. दोन दिवसांनी क्रिसमस इवच्या (नाताळच्या आधीचा दिवस) दिवशी मला ऑन्टीनी बोलावला आणि म्हणाली," हेमा, तुमको डब्बेके बारेमे जानना था ना? आज मेरे साथ चलो. हम चर्चमे येशू का प्रेयर बोलेगा, फादरसे ब्लेसिंग लेगा और फिर जाएगा. तुम्हारी मम्मिको बोलके रखना देर होएंगा. तुम हमारे साथ है."

घरून आम्ही दोघी निघालो. आधी चर्च मध्ये गेलो. तिथे येशूची प्रार्थना केली. धर्मगुरूला भेटलो, त्याचा आशीर्वाद घेतला. मग बाजारात गेलो. ऑन्टी ला हव्या असलेल्या वस्तू घेतल्या. एवढं करेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता. आम्ही चालत चालत एका वस्तीपाशी आलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वस्तीत (झोपडपट्टीत) जात होते. सर्वकाही माझ्या समजण्या पलीकडच होतं. मी आयुष्यात इतकी दाटीवाटीनी राहणारी माणस पाहिली नव्हती. इतकी गरिबी, इतका रोज लागणाऱ्या गोष्टींचा अभाव. हे माझ्या शहरात,माझ्या घरापासून अर्ध्या तासाच्या पाई चालत जाण्याच्या अंतरावर असून मला ह्याची कधीच जाणीव झाली नाही? त्या नंतर आम्ही जिथे गेलो ती झोपडी, तिथलं दारिद्र्य, ते कुटुंब आणि त्यांची जगण्यासाठीची धडपड मी आजपर्यंत विसरू शकले नाही. आम्ही आणखीन पुढे गेलो. गल्ल्या अंधाऱ्या व अरुंद होत्या. अखेरीस आम्ही एका झोपडी पाशी येऊन थांबलो. आतमध्ये किर्र अंधार. लहान मुलं भुकेनी कळवळून रडण्याचा आवाज येत होता. किती मुलं असावीत ह्याचा मी अंदाज लावत होते. दोन असावीत असा माझा अंदाज होता. एक क्षीण आवाज त्यांची समजूत काढत होता. हातातील सामान खाली ठेवत ऑन्टीने त्यातून मेणबत्ती काढून पेटवली. झोपडीतल दृश्य भयानक होतं. आतमध्ये एक बाई होती. तिच्या मांडीत एक बाळ व भोवती तीन मुलं होती. सगळी नागडी. त्यातील एकाला ग्लानी आली असावी. दोघं रडत होती आणि चौथ्याच्या तोंडातून आवाजच येत नव्हता. त्या बाईची अवस्था बघवत नव्हती. अंगभर कपडा नाही. जे फडकं होतं त्यानेच अंग झाकायचा प्रयत्न करत होती. पोट खपाटी गेलेलं. अंगावर मुठभर पण मास नव्हतं. हतबल आणि केविलवाण्या नजरेने ती त्या लेकरांना बघत होती आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होती.

ऑन्टी नी पिशवीतून सोबत आणलेलं सामान काढलं. बाईसाठी साडी आणि गाऊन. मुलांसाठी अंदाजानी आणलेले कपडे दिले. त्यांच्यासाठी आणलेला केक, खाऊ,फळ आणि थोडा शिधा दिला. त्या बाई नी ती साडी आधी स्वतःभोवती गुंडाळून घेतली. ऑन्टी तिच्या पद्धती प्रमाणे म्हणाली,"मेरी क्रिसमस." मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद होता. त्या माउलीच्या चेहेर्यावरचे भाव खूप काही सांगत होते. तिने हात जोडले. तिने काही सांगण्याची गरजच नव्हती.

आम्ही बाहेर पडलो. मी माझ्या विचारात मग्न होते. हे जग, हि माणस,ते जगत असलेलं आयुष्य. सगळंच माझ्यासाठी नवीन आणि मला व माझ्या विचारांना हलवून टाकणारं होतं.

"अग, हेमा. कुठे हरवलीस? आयुष्य हे असं आहे. आपल्याला देव जे देतो त्यातील काही हिस्सा हा आपला नसतो. तो त्या माउली, तिची मुलं आणि तिच्यासारख्या अनेक लोकांसाठी असतो." ऑन्टी च्या वाक्यांनी मी भानावर आले .


Tuesday, 18 August 2020

सामाजिक कामाची सुरुवात

 

मला आजपर्यंत खूप वेळा खूप लोकांनी हाच प्रश्न विचारला आहे, "तुम्हाला सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड आहे का? कश्यामुळे हे काम करावसं वाटलं? ह्याची सुरुवात कधी व कशी झाली? ईत्यादि ...

खरं सांगायचं तर मी एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेली आणि सुखवस्तू सासर मिळालेली मुलगी! स्त्री-पुरुष असमानता, मुलींना मिळणारी दुय्यम वागणूक, महिलेवर होणारा अन्याय, सासरी होणारा छळ, ह्या सर्व गोष्टी मी कधी ऐकल्यापण नव्हत्या. त्या अनुभवण्याचा तर प्रश्नच नव्हता.

मी लग्न करून नाशिकला आले. घरात सर्व कामांना नोकर! मग वेळ घालवण्यासाठी शिवणक्लास लावला. एका शाळेत मुलांना इंग्रजी शिकवायला जाऊ लागले. व्यायाम, पुस्तकं वाचणे असं करत दिवस मजेत जात होते. कशाचं टेन्शन नाही कशाची कमी नाही. कधी कधी कंटाळा पण यायचा.

आप्पा(माझे सासरे) मला नेहेमी म्हणत,'हेमा, तुला काय आवडेल ते कर. तुला नोकरी करावीशी वाटली तर नोकरी कर, शेजारी तुझ्या वयाच्या काही लेकी-सूना आहेत त्यांचाशी ओळख करून घे. स्त्री मंडळात जा.' भास्कर (माझा नवरा) च्या शेजारीच राहणाऱ्या मित्राच्या बायकोशी (रत्नाशी) ओळख वाढवायचं मी ठरवलं. एक-दोन वेळा आमची रस्त्यात भेट झाली. मग दोघींनी एक मेकीना घरी येण्याबद्दल आग्रहाचं आमंत्रण दिलं. मी एक दिवस रत्नाच्या घरी गेले. ६०-७० पायऱ्या चढून तिच्या घरी गेले तर समजलं कि ती बाजारात गेली आहे. मला तिच्या वागण्याचा अर्थच कळेना. त्या दिवशी तिने बोलावलं म्हणून मी गेले आणि ती चक्क बाजारात गेली! हे असं ३-४ वेळा झालं. दर वेळेस ती घरी नसायचीच. तिची सासू भेटायची. तिचीपण सुनेबद्दल अशीच तक्रार होती,'रत्ना बेजबाबदार आहे. तिला माणसांची किंमत नाही. मैत्रीणीना घरी बोलवायचं आणि आपण गायब व्हायचं. माझी फार विचित्र अवस्था होते. आता तुझ्या सारख्यांना मी काय उत्तर देऊ?'

मी पुढे रत्नाच्या घरी जाण बंद केलं. ह्या घटनेला पण वर्षं दीड वर्षं उलटलं असेल. मी हळू हळू माझ्या रुटीन मध्ये रमत होते. एक दिवस सकाळी ६ वाजता दारावरची  बेल वाजली. आपल्याला भास झाला असं वाटून मी झोपणार तो परत बेल वाजली. वैतागूनच उठत दार उघडलं, तर दारात रत्ना! हातात बौग! माझ्या चेहेऱ्यावर आश्चर्य होतं. ती शांतपणे म्हणाली,'हेमा, तू खूप दिवसांपासून मला बोलावत होतीस ना. घे मी तुझ्या घरी राहायला आले, कायमची!' क्षणभर काय बोलावं, मला काही सुचेचना. भानावर येत मी तिला घरात घेतलं, बसायला सांगत पाणी दिलं. थोड्या वेळात घरातील सगळे उठले. रत्नाला बघून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सकाळचा चहा, ब्रेकफास्ट झाल्यावर, रत्ना थोडी सेटल झाल्यावर मी तिला,'रत्ना, नेमकं काय झालं?' एवढं विचारता क्षणी ती भडा भडा बोलू लागली.

 

"हेमा, तू माझ्यावर रागावली आहेस ना? मी अगदी समजू शकते. तुझ्या जागी मी असते तर मला पण असंच वाटलं असत. पण मी तरी काय करू? खरं सांगू का, माझ्या लग्नाला ५ पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. मला कोणाकडे जायला, कोणाशी बोलायला परवानगी नाहीये. तू जेव्हा भेटलीस आणि  घरी यायला तयार झालीस तेंव्हा मला इतका आनंद झाला होता, मी काय सांगू? मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायला घेतलं होतं. त्यावरून माझ्या सासूला घरी कोणीतरी येणार आहे ह्याचा अंदाज आला होता. तू जिना चढत होतीस तेंव्हा तिने मला खोलीत कोंडलं. आणि हे असं दर वेळेस तू यायचीस तेंव्हा ती करायची. मी तुझ्याशी घरातल्या गोष्टी सांगेन अशी भीती वाटत असेल बहुतेक. आमचं घर खूप मोठं आहे. ते दिवसातून तीन वेळा पुसायचं. खूप भांडी घासायला काढायची. मी सारखी काम करत राहावं असं तिला वाटते. दुपारी झोपायचं नाही, नवऱ्याशी फार बोलायचं नाही. जाऊ दे. खूप त्रास काढला.पण आता सहन होत नाही. माझे आई वडील २-४ दिवस माहेरी घेऊन जातात आणि परत आणून सोडतात. मला कळत नाही मी काय करू? तू पण मला त्यांच्याकडेच सोडलस तर.... तिच्या डोळ्यात पाणी आलं. ही सिच्युएशन कशी हाताळावी मला काहीच समजत नव्हतं. तिला जा म्हणायची इच्छा नव्हती आणि घरातल्या मोठ्यांशी बोलल्याशिवाय तिला थांबवून तरी कशी घेणार? मी, कुसुमताई (माझ्या सासूबाई) आणि अप्पांशी बोलायचं ठरवलं. त्यांना पण सर्व ऐकून आश्चर्य वाटलं. दोघांनी सांगितलं कि रत्ना इथेच राहील. जो पर्यंत तिला घ्यायला कोणी येत नाही तोपर्यंत ती इथेच राहील. त्यानंतर आईंनी रत्नाच्या (सासरी) निरोप पाठववून रत्ना आमच्या घरी आहे असं कळवलं. ह्याची त्यांनी दखल घेतली नाही. काही दिवसांनी रत्नाचे वडील येऊन तिला घेऊन गेले.

 

ह्या घटने नंतर, का कोण जाणे, पण हुंडाबळीच्या वर्तमानपत्रातील बातम्या नजरेस पडू लागल्या. बातम्या वाढल्या पण होत्या आणि आम्हाला जाणवू पण लागल्या होत्या. सर्वच जण अस्वस्थ होतो. कुसुमताईनी समाजवादी महिला सभा आणि राष्ट्र सेवा दल ह्यातील काही महिला कार्यकर्त्यांची घरी मीटिंग बोलवली. त्यात अक्का ठाकूर, शकुंतला मुरुगकर, विजयाताई मालुसरे, वसुंधरा केसकर, सुशीला म्हत्रे आणि अफकोर्स मी! (मी घरातील सदस्य, माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे अस्वस्थ झाले होते, आणि नवीन काहीतरी ऐकायला, शिकायला मिळेल म्हणून बसले होते.) ह्या प्रश्नाच्या संदर्भात काम सुरु करण्याबद्दल ठरलं.काम कसं आणि कुठून सुरु करावं? ह्याची गरज किती आहे? मदत मागणारे आपल्यापर्यंत कसे येणार? त्यांना आपण कशी मदत करणार? कशाचा काही अंदाज नव्हता. ह्या विषयात काम करायची गरज आहे, हे सर्वाना पटलेलं होतं.त्या वर्षीच्या गणेश उत्सवात पोस्टर प्रदर्शन लाऊन ह्या प्रश्नाचं गांभीर्य आणि गरज समजून घेऊया असं ठरलं. त्या वर्षी कुसुमताई, रचना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ह्या पदावरून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या सामाजिक कामामुळे व शाळेमुळे त्यांच्या खूप ओळखी होत्या. त्यांनी नावाजलेले चित्रकार श्री. धनंजय गोवर्धने व श्री. ज्ञानेश सोनार, ह्यांना, ह्या विषया संदर्भातील पोस्टर्स काढून देण्यासाठी विनंती केली. आम्ही पण हुंडाबळी संदर्भातील वर्तमानपत्रातील कात्रणं जमा करू लागलो. बघता बघता आमच्या कडे ५० हून अधिक पोस्टर्स तयार झाली.

 

१९८२ च्या गणेश उत्सवात ठरल्या प्रमाणे पोस्टर प्रदर्शन लावलं,नाशिकमधील एम.जी.रोड वरील झेड.पी.च्या गाळ्यात. (तेंव्हा त्या दुकानांचे बांधकाम चालू होते). लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या १० दिवसांत खूप लोकांनी प्रदर्शन पाहिलं आणि तिथे ठेवलेल्या नोंद वहीत त्यांची मत मांडली. नोंद वहीतल्या नोंदी व प्रतिक्रिया वाचून आम्ही अवाक/थक्क झालो. कोणाच्या मुलीचा सासरी हुंडा मिळाला नाही म्हणून छळ होत होता, तर कोणाच्या मावशीच्या आयुष्यात तर कोणाच्या मावस बहिणीच्या घरी सासरची माणस तिला त्रास देत होती. बहुतेक प्रतीक्रीयान मध्ये आशेनी एका गोष्टीची चौकशी प्रत्येक जण करत होता, 'ह्या साठी कोणी काम करताय का? असेल तर आम्हाला प्लीज त्यांचा पत्ता सांगा'. ह्या विषयावर काम करण्याची गरज किती आहे हे ह्यावरून लक्षात आल. कामाची गरज ओळखून आम्ही दर गुरुवारी दु.४-६ जमायचं ठरवलं. कुठे हा प्रश्नच नव्हता. ऑफिस आमच्या घरी, म्हणजेच कुसुमताईच्या घरी सुरु झालं.

 

बघता बघता तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. अडचणीत सापडलेल्या महिलेला, कुटुंबाला आमची फक्त सहानभूती नको होती. त्यांना सल्ला हवा होता, आम्ही काही मार्ग सुचवावा अश्या अपेक्षेने ते येत होते. आमच्या विनंतीचा मान राखण्यासाठी एक-दोन वकील येऊ लागले. मान राखण्यासाठी आलेले वकील कधी संस्थेचे सदस्य झाले, त्यांनापण कळले नाही. त्यांच्यासाठी पण हा विषय नवीन होता त्या काळात कोर्टाची पायरी चढणं वाईट समजायचे. त्यात हे नवरा-बायकोचे भांडण. त्यात समाजात बाईच्या जगण्या मरण्याला किंमत नव्हती. तिने सासरी मार खात जगावं किंवा मराव. एखादी नशीबवान असायची, जिचं म्हणणं माहेरची माणस ऐकायची आणि तिला समजून घेऊन मदत करायची. माझ्यासाठी तर हे सगळं इतकं नवीन आणि अनाकलनीय होतं कि मी रात्र रात्र विचार करायचे, हे असं का? वाजत गाजत, चार लोकांच्या, देवा धर्माच्या,नातेवाईकांच्या साक्षीने जी मुलगी आपल्या घरी सून म्हणून आणली तिला इतकी वाईट वागणूक कोणी देऊच कस शकतं? आणि का? आणि ज्या व्यक्तीचा हात धरून ती त्या घरात प्रवेश करते तो हे सर्व घडत असताना काय करतो. गम्मत बघत बसतो का तो पण हतबल असतो? आजपर्यंत माझ्या आयुष्यात माझ्याशी कोणी आवाज चढवून बोललं नाही. अपमान आणि मारहाण तर माझ्या कल्पनेच्या पलीकडील गोष्टी आहेत.

 

येणाऱ्या केसेसचं वाढतं प्रमाण लक्षात घेता आम्ही लवकरच पूर्ण वेळेचं ऑफिस सुरु केलं. हळू हळू केसेस वाढत होत्या, आम्ही पण सांत्वनाच्या पुढे जाऊन सल्ला देऊ लागलो. आज नाहीये असं नाही, पण त्या दिवसांत उत्साह खूप होता.(त्या काळात दर महा ६-७ केसेस येत होत्या. त्यांचं प्रमाण खूप वाढलाय. २०२० मध्ये आमच्या कडे ३५-४० केसेस दर महा नोंदविल्या जातात) समझोता झाला कि गृहभेट असायचीच. कोणी फोनवरून शेजारी होणाऱ्या मारहाणी बद्दल सांगितलं कि आम्ही समक्ष जाऊन त्या महिलेला भेटायचो. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये मी खूप शिकले. छोटे छोटे किस्से घडले ज्याच्यातून मी शिकत गेले आणि कार्यकर्ती म्हणून घडत गेले. काही अंगी असलेल्या गुणांची, शिक्षणाची, संस्कारांची व घरातून मिळणाऱ्या प्रोत्साहन व पाठिंब्याची जोड मिळाल्यामुळे मी समाजासाठी काहीतरी करू शकले.

 

शिकत गेले समृद्ध होत गेले: महिला हक्क संरक्षण समितीचं काम १९८२मध्ये सुरु झालं. त्या काळात मला कशाचीच माहिती नव्हती. न कायद्याची माहिती होती, ना सामाजिक प्रश्नांची ओळख होती. आजपर्यंतच्या आयुष्यात बाहेर च्या जगात एकट्यानी वावरायची कधी वेळच आली नव्हती. समाज, त्यातील माणस, त्यांचे प्रश्न, त्यांचातील लबाडी, त्यांच्या गरजा आणि त्या भागवण्यासाठी त्यांना आयुष्याशी करावा लागणारा समझोता! ह्या सगळ्या बद्दल फारशी माहिती नव्हती. संस्थेच्या कामातून मला हळू हळू समाज कळायला लागला. त्यातील माणस थोडी थोडी समजू लागली.

Monday, 16 February 2015

Broadening periphery of social responsibility

I have been working with a women's organization, Mahila Hakka Samrakshan Samiti, since 1982. I have done counselling in many cases, and tried to settle marital problems. In some cases, I have been successful and families have re-united. The cases in which matter could not be settled, the couples have parted. Sometimes the custody of children would be given to father but in most of the cases, it was the mother who took up the responsibility of her children. I used to feel sad at the breakup, but always felt relaxed to see children being handed over in safe custody.

In those days, I never wondered as to what happens to the children of such parents. How do such incidents affect them psychologically, socially, emotionally and most important in their overall development. In cases of divorce, the wife along with her children leaves the town and goes to reside with her parents, if she is lucky. Otherwise she is admitted in a shelter home. In some cases she prefers to live independently. In all above possibilities, it is the children who suffer. They have to leave their schools, friends, neighbor hood and adjust to new people, new environment. It is difficult to get admission in schools. Their mothers or fathers have to work for a living. Such children become school drop outs.

In June 2004, I was appointed as a member of Child welfare committee, Nasik. In continuation, in July 2008, I was appointed as the Chairperson of Child welfare committee, Nasik, by Government of Maharashtra. I continued working on this post till May 2013 (when my term was over).
During these 9 years, I handled many cases of children, who were in need of care and protection. The cases were presented before us through different sources, like social workers, police, parents( in case of single parent) or guardian of the child (in case he has lost both his parents). This work gave me a chance to understand these children and their needs better.

A boy was presented before us by the police. He had broken window panes of a house. The police felt that instead of lodging a complaint, he should give the boy a chance to improve. The boy was 13 year old and was a school dropout. His mother worked in a shop as a helper. Her duty hours were from 9 am to 8 pm, with half an hour lunch break. She was noticing the gradual change in her son but she was helpless. She had to earn to support her family. She had taken a divorce six months back, from her drunkard husband and preferred to live with her two children. She had sent her 10 year old daughter to her mother's place and kept her son with her as a support. She separated from her husband in middle of the academic year and her son never got an admission in the new locality school. She started receiving complaints from neighbors about his behavior. She scolded him, beat him and even sometimes locked him in the house! Nothing helped. The boy's behavior worsened. She stopped caring for him and taking efforts to bring about improvement in him.

In another case, police presented a 10 year old boy. He was caught stealing vegetables from vegetable vendors in the market yard area. When we tried to talk to him, he said he had to do it, because he had to support his grand mother. He was too young to get a job and so this was the only way he could earn and support his granny. On further inquiry we learnt that this boy had lost his mother when he was 6 months old and his father had left home since then. His grand mother had looked after him and tried to educate him. Today she had developed some eye sight problem and was unable to earn to support them. The boy studied in municipal school in 4th standard. He did this stealing vegetables and selling them after school hours. Sometimes his teachers used to buy vegetables from him, but they were not aware of their source and his activities. He had plans to leave school if his granny developed further eye sight problem.

Another incident introduced me to a 7 year old girl. She had lost her father and her mother had admitted her in the children's home. The complaint about this girl was, she would keep away a part of eatables given to her. She would hide them in her bag. And so her baggage and the room had a rotten smell. Even if the management sprayed pest control medicines and tried to keep the room clean, they faced a recurring problem of cockroaches and ants. The little seven year old had her explanation ready. She said, my mother works hard. She can hardly have enough food. She has never eaten anything without giving me. We have never eaten such a variety of nice food. I keep aside everything that I get. I will give it to my mother when she comes to meet me. Her mother is able to visit her hardly once in a month.

I have handled quite a number of cases as a part of my work. I have seen children quite attached to their parents, I have seen vagabond children, those who are a nuisance to the society, some who work as laborer and some are involved in criminal activities. All this 9 years of experience made me think. Think as to what I can do to help these children. I am very much aware of my limitations. But I thought let me try and do something to guide and support all those children who want to learn, to improve their lives and to become responsible citizens.

So I decided to start working in the name of YOUTH SUPPORT FOUNDATION! Through this I wish to extend guidance and financial assistance to all such needy children. I have started working on this project in May 2013. The starting of the project, i.e finding the needy children has not at all been a easy task. 

I will share my experiences with you in my next blog!