Sunday, 9 July 2023

नाझिया

एप्रिल मधील दुपारची वेळ. भयानक उकाडा! रस्त्यावर एक चिटपाखरू दिसत नव्हतं. मनोहर त्याच्या रोजच्या सवयीने दुकानात येऊन बसला होता. त्याचं रेडीमेड गारमेंट्सचं दुकान होतं. त्याला ठाऊक होतं की एवढ्या उन्हात आपल्या दुकानात कोणी गिऱ्हाईक येणार नाही. पण धंद्याचा एक नियम असतो. कोणी येवो अगर न येवो, दुकानदारांनी त्याच्या वेळेला दुकान उघडायला पाहिये! हि त्याच्या आजोबा-पणजोबांपासून चालत आलेली शिस्त होती. त्याच्या दुकानात काम करणारा राजू ‘शेठ, आज मी दुपारी थोडा उशिरा येईन’ असं सांगून गेला होता. थोडक्यात काय? मनोहर दुकानात एकटा होता. नुकतच जेवण झालेलं, दुपारची वेळ, त्यात कुलरची गार हवा, त्याला सुस्ती यायला लागली. तेवढ्यात त्याला एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. ‘हे कसं शक्य आहे? आपल्याला बहुतेक भास होतोय’ असं वाटून त्याने डोळे मिटून घेतले. पण हळू-हळू तो आवाज जवळ येतोय असं त्याला जाणवलं. कुतूहलानी त्यांनी दुकानाच्या बाहेर येऊन पाहिलं. रस्त्यांनी एक भिकारी जोडपं जात होतं. बाई पांगली असल्याने व्हील चेअर मधे होती. अंगात फाटके, मळकट कपडे. केस विस्कटलेले. एकूण अवतारच होता. तिचा पांगुळगाडा एक माणूस ढकलत होता. कमरेला लुंगी आणि अंगात मळका, फाटका, भोकं पडलेला बनियन. एकूण त्यांच्या पेहेरावावरून त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात येत होती. त्यांच्या मागून अंदाजे एक ६-७ वर्षांशी मुलगी, अनवाणी, अंगभर काळा बुरखा घातलेली रडत चालली होती. तापलेल्या रस्त्यावरचे चटके तिला सहन होत नव्हते. ती रडत, केविलवाण्या विनवण्या करत त्यांच्या मागे फरफटत जात होती. हे बघून मनोहरनी त्या माणसाचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला, ‘ओ भैया, तुम्हारे पीछे ये लाडकी रोती हुई चल रही है. इतनी कडी धुपमे नंगे पाव चल नाही पा रही है. आप उसे उस औरतके पास बिठा क्यो नही लेते.’

मनोहरचा आवाज ऐकून तो माणूस दचकला, घाबरला आणि पांगुळगाडा जोरात ढकलत, जवळ जवळ धावतच गेला. त्या माणसाचं वागणं मनोहरला थोडं विचित्र वाटलं. पण तो दुकान सोडून त्याच्या मागे जाऊ पण शकणार नव्हता.

काही दिवसांनी मनोहरच्या दुकानासमोरून तेच जोडपं तसच जाताना त्याला दिसलं. आज दुकानात राजू असल्याने मनोहरने त्या जोडप्याचा पाठलाग करायचा ठरवला. स्कूटर काढून निघे पर्यंत ते जोडपं आणि ती मुलगी जवळच्या वस्तीत गायब झाले. शंभरहून अधिक घरं, ८-१० गल्ल्या असलेली दाट वस्ती. त्याचं नाव-गाव काही माहित नाही. त्यांच्या सारखी अजून बरीच कुटुंब असू शकतील तेंव्हा तिथे त्यांना शोधणं अवघड आहे, हे मनोहरच्या लक्ष्यात आल. मनोहर दुकानात परत आला. पण त्याला ते जोडपं, ती मुलगी, तिचं रडणं, त्यांचं तिच्याशी असंवेदनशील वागणं, सगळंच अस्वस्थ करत होतं.

पुन्हा काही दिवसांनी ते कुटुंब त्याच्या दुकानासमोरून जाताना त्याला दिसलं. आज हातातील सर्व काम सोडून तो त्यांच्या मागे पायीच निघाला. त्यांचा पाठलाग करत तो त्या वस्तीत पोहोचला. पण त्याला कळायच्या आत ते एका झोपडीत गायब झाले. मनोहरने आजूबाजूला चौकशी केल्यावर त्याला मिळालेली माहिती फारच विचित्र होती. तेथील काही लोकांनी सांगितलं, “ते जोडपं समोरच्या घरात रहाते. ते काय काम करतात कोणालाच माहित नाही. ही मुलगी त्यांची नसावी असं आम्हाला वाटतं. नाहीतर इतकं अमानुष पणे कोणी एवढ्याशा मुलीला कशी वागणूक देऊ शकेल? ६-७ महिन्यांपूर्वी हे लोक इथे आले. दिवसभर बाहेर असतात. रात्री-अपरात्री त्या मुलीचा रडण्याचा कधी किंचाळण्याचा आवाज येतो. बहुतेक वेळा ती एक तर घरात असते नाहीतर बुरख्यात असते. एकदाच तिला शेजारच्या काकूंनी बघितलं होतं. त्या सांगत होत्या, त्या मुलीच्या चेहेर्यावर कशानितरी मारल्यासारख्या जखमा होत्या.”

न रहावल्याने मनोहर म्हणाला, “अहो, तुमच्या समोर हे सगळं घडतंय आणि तुम्ही काहीच कसं केलं नाहीत? कमीत कमीत पोलिसांना तरी खबर करायला हवी होती. मला तर वाटतंय पोलिसात तक्रारच द्यायला हवी.”

त्यावर एक गृहस्थ म्हणाले, “आम्ही पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यांना चौकीत बोलावून घेतलं. त्या लुंगीवाल्या बाबानी पोलिसांना सांगितलं की, ‘नाझिया मनोरुग्ण आहे. ती कधीपण कोणाच्यापण अंगावर धावून जाते. आम्हाला पण तिची काळजी वाटते.’ त्या दिवशी पोलीस आमच्या वस्तीत आले. त्या झोपडीत बघितलं. त्या मुलीला एखाद्या जनावराला बांधावं तसं साखलिनी बांधून ठेवलं होतं. मी जे बघितलं ते पोलिसांना दिसलं की नाही ठाऊक नाही पण ती मुलगी ग्लानीत होती आणि तिच्या चेहेर्यावर जखमा होत्या. त्या दिवसानंतर पुढे काहीच झालं नाही. तिचं रडणं, किंचाळण अधून-मधून चालूच आहे.”

आपण त्या मुलीला काहीतरी मदत करूया ह्या विचारांनी मनोहर पोलीस स्टेशनला गेला. एका हवालदाराला ती मुलगी आणि तिच्या संदर्भातील तक्रार आठवत होती. त्यांनी मनोहर समोर साहेबांना येवून सांगितलं, ‘साहेब ती मुलगी वेडी आहे. त्या दिवशी मी पण होतो, त्यांच्या घरी गेलो तेंव्हा!”

ह्यावर चौकीतल्या वरिष्ठ साहेब म्हणाले, “हे असं असत. तुम्ही तक्रार द्यायला आलात पण सत्य काहीतरी वेगळच आहे. आमचं आहे लक्ष. आम्हाला काही वाटलं तर आम्ही एक्श्न घेऊ.” 

इथून काही मदत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर मनोहरने त्याच्या एका वकील मित्राला फोन करून त्याचा सल्ला घेतला. वकील मित्रांनी त्याला बाल कल्याण समिती ची मदत घेण्याचा सल्ला दिला.

आणि अश्या प्रकारे नाझिया ची केस आमच्या कडे आली.

बाल कल्याण समितीला, Juvenile Justice Act अंतर्गत, काही अधिकार बहाल केले आहेत. (हे अधिकार ५ सदस्यांच्या समितीला आहेत, वैयक्तिक एका सदस्याला त्याचा उपयोग करता येत नाही.) ह्याच अधिकाराचा वापर करून, मनोहरच्या तक्रारीच्या आधारे, आम्ही त्या पोलीस चौकीतील अधिकार्याला ह्या केस संदर्भात ती मुलगी आणि माहिती सादर करायला सांगितले. पोलिसांनी आमच्या आदेशाचे पालन करत नाझिया आणि तिच्या पालकांना (जे खरंच तिचे पालक आहेत का हे कागद पत्रांची सहानिषा करून ठरवायचं होतं) समिती समोर हजर केलं. नाझियाचा बुरखा काढला आणि समोर एक ६-७ वर्षांची, बारीकशी, घाबरलेली मुलगी दिसली. तिची अवस्था बघवत नव्हती. चेहेर्यावर आणि हाता पायांवर मारल्याच्या जखमा-काही जुन्या, काही ताज्या होत्या. अंगात फाटलेला, मळकट फ्रॉक, केस पिंजारलेले. डोक्याला कितीतरी दिवसात तेलाचा स्पर्श झाला नसावा. तिचा अवतार बघून तिला खूप दिवसात अंघोळ पण करायला मिळाली नसण्याची दाट शक्यता वाटत होती. तिने किलकिले डोळे करत चौफेर पाहिलं. सोबत आलेल्या त्या जोडप्यावर तिची नजर पडली. तिच्या चेहेर्यावर एका क्षणात भीती, वेदना, राग, तिरस्कार, असे विविध भाव दिसले आणि आम्हाला कोणाला काही कळायच्या आत ती धावत आमच्या कडे आली आणि घाबरून आमच्या खुर्चीच्या मागे लपली. तिला जवळ घेत, शांत करत आम्ही तिला सांगायचा प्रयत्न करत होतो की ‘तिला इथून कोणी कुठे पण घेऊन जाणार नाही. तिला कोणी त्रास देणार नाही.’ आम्ही तिला आश्वस्त करायचा प्रयत्न करत होतो. बहुतेक आमच्या प्रयत्नांना यश येत होतं. एखादं मुल ज्या विश्वासाने आपल्या आईकडे जाते त्याचप्रमाणे ती आम्हाला चिकटून बसली. थोड्या वेळानी तिला वाटलेली भीती कमी झाली. मग तिला संस्थेतील मावशी कडे सोपवून आम्ही आमच्या कामाला लागलो.

नाझिया सोबत आलेलं जोडपं एव्हाना खूप अस्वस्थ झालं होतं. ते सारख्या आमच्या विनवण्या करत होत की, “सर, म्याडम, नाझिया हमारी बच्ची है. उसको हमारे हवाले कर दो.”

त्यावर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, “नाझिया कशानी तरी खूप घाबरली आहे. तिच्या अंगावर जखमा आहेत. ती अशक्त पण वाटते आहे. तिच्यावर थोडे उपचार करायला सांगतो. तोवर तुम्ही तिचे पालक आहात हे सिद्ध करणारे कागदपत्रे घेऊन या. नाझिया तुमची मुलगी आहे हे सिद्ध झालं की तिला घेऊन जा.”

“म्याडम, इसमे सिद्ध करनेकी क्या बात है. वो हमारी बेटी है, हमारा खून है. हम आपको बता रहे है. इतना काफी नाही है क्या?”

“नाही. तेवढ पुरेसं नाहीये. तुम्ही तुमचं रेशनकार्ड- ज्यावर तिचं कुटुंबातील सदस्य असल्याचा पुरावा आहे, तिचं नाव आहे. किंवा तिचा जन्माचा दाखला घेऊन या.”

“ये हम कहासे लाये. आप हमे बच्ची दे दो और बात खतम कर दो.”

अखेरीस त्यांनी मान्य केलं की योग्य कागद बघितल्याशिवाय, आमची खात्री पटल्या शिवाय नाझिया त्यांना मिळणार नाही. म्हणून ते गेले. त्या दिवशी बाकीची काम संपल्यावर आम्ही बराच वेळ विचार करत होतो-ते जोडपं खरंच ह्या मुलीचे पालक असतील का? ती एवढी कशामुळे आणि कोणाला घाबरली आहे? तिला कोणी आणि का इतकी मारहाण केली असेल? तिचं खरं नाव काय असेल? ते खरंच तिचे पालक असतील तर तिला त्यांच्या ताब्यात देताना काय काळजी घेतलेली मुलीच्या दृष्टीने बरी राहील?......

दुसर्या दिवशी बाल गृहातून निरोप आला की ते जोडपं आल आहे आणि ‘आमची मुलगी आम्हाला द्या’ असा हट्ट धरून बसले आहेत. त्यांच्या कडे अपेक्षेप्रमाणे कागदपत्रे नव्हती. ती असल्याशिवाय मुलगी ताब्यात मिळणर नाही. पण मुलीला भेटायचं असेल तर बाल कल्याण समितीच्या उपस्थितीत भेटता येईल. ते पण मुलीची इच्छा असेल तर. असा निरोप दिला.

त्यांनी संस्थेत येऊन नाझियाला भेटण्याचा प्रयत्न पण केला पण नाझिया त्यांच्या कडे जायला काय, त्यांच्या कडे बघायला किंवा त्यांच्या समोर यायला पण तयार नव्हती. सुरवातीला ती त्यांना बघितलं की घाबरून लपून बसायची. त्यांच्या प्रती तिला वाटणारी भीती, राग, तिरस्कार, हे सर्व तिच्या वागण्यातून जाणवत होतं. त्यामुळे आम्ही त्या जोडप्याची आणि नाझियाची भेट होऊ दिली नाही.

मग काय पुढील महिना दोन महिने ते दर दोन-तीन दिवसांनी येऊन आमची मुलगी द्या अशी विनंती करत राहिले, तर कधी दम दाटी करायचा प्रयत्न केला. आणि आम्ही त्यांच्या कडे कागद मागत राहिलो. हळू-हळू त्यांनी त्याचं म्हणणं बदललं. काही दिवसांनी त्या माणसानी सांगितलं, “वो हमारी बेटी नही है. वो मेरे भाईकी बेटी है.”

त्यावर भावाला घेऊन ये म्हणता क्षणी त्यांनी नवीन माहिती दिली. “भाई और भाभी अब इस दुनियामे नही रहे.”

ते कुठे आहेत? काय झालं? असे प्रश्न विचारल्यावर माहिती मिळाली की दोघंही रोड अक्सिडेंत मधे मेले. त्याचे डीटेल्स विचारले, त्यांच्या मृत्यूचा दाखला मागितला तर काही तरी उडवा उडवीची उत्तरं दिली. मग सांगितलं सिन्नरच्या घाटात झाला अक्सिडेंत. आम्ही हायवे पोलिसांमार्फत चौकशी केली तर हि माहिती चुकीची आहे असे समजले. एका बाजूला ते जोडपं विविध मार्गांनी ती मुलगी ताब्यात मिळवायचा प्रयत्न करत होतं आणि दुसर्याबाजूला आम्ही तिचे खरे पालक शोधायच्या प्रयत्नात होतो.

प्रेम, काळजी, योग्य आहार आणि संरक्षण मिळाल्यामुळे नाझियाची तब्येत सुधारत होती. तिच्या कडून तिच्या आई-वडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवस तिच्या कडून समजलं की ती  शाळेत जात होती. पहिलीत होती. वर्ग शिक्षिकेच नाव- पाटील बाई होतं. शाळा एका टेकडीवर होती. घरी आई-बाबा, एक भाऊ आणि एक ताई होती. आता आम्हाला सर्वांनाच तिचे खरे पालक सापडण्याची आशा वाटायला लागली. पण हि शाळा नाशिकमधे आहे कुठे? कशी शोधायची? प्रत्येक जण आपापल्यापरीने ह्या वर्णनाची शाळा शोधत होता. एव्हाना विविध कारणांनी बाल कल्याण समितीत येणारे विविध संस्थेतले कार्यकर्ते पण मदतीला धावून आले. नाशिकमधे अशी शाळा सापडली नाही. सापडली असती तरी तिथे, नाझियाचं खरं नाव माहिती नसल्याने, माहिती मिळणं अवघड होतं. एकानी सुचवलं, ‘कल्याण, भिवंडी कडे अश्या शाळा आहेत. झेड पी ची किंवा नगरपालिकेची.’ तिथे पण कार्यकर्ते पाठवून शोध घेतला पण काही हाती लागलं नाही.

नाझियाला संस्थेत दाखल होऊन तीन महिने होत आले होते. तिच्या आई-वडिलांचा कुठून, काहीही पत्ता सापडत नव्हता. आम्हा समिती सदस्यांची इतर काम चालू होती. एक दिवस एका संस्थेतील कार्यकर्त्यांनी माता मेळाव्याचे आयोजन केले आणि त्या मातांशी बोलायला मला बोलावलं. मुलांची काळजी, त्याचं संगोपन, योग्य आहार-व्यायाम ह्याची गरज, अश्या अनेक मुलांच्या संदर्भातील विषयांवर माहिती दिली. त्या सोबतच मुलांच्या सुरक्षितते बद्दल बोलताना मी नाझियाच्या नावाचा उल्लेख न करता तिच्याबद्दल आणि अश्या घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती दिली. मी बोलत असताना जमलेल्या मातांमधून एक महिला रडायला लागली आणि ती उठून सरळ माझ्यापाशी आली आणि माझा हात घट्ट धरून आशेनी म्हणाली, “ताई, कुठे आहे ती मुलगी? तिचं नाव काय आहे? कशी दिसते? वय किती आहे? ताई, मी तिला भेटू शकते का? ती माझी सोनाली असेल. मला प्लीज एकदा तिला बघू द्या.”

कार्यकर्ते पटकन पुढे आले आणि तिला सावरत म्हणाले, “त्याचं काय आहे ताई, सुमनताई ची सोनाली ९-१० महिन्यांपासून गायब आहे. बाहेर गल्लीत इतर मुलांसोबत खेळत होती. थोड्या वेळानी सुमनताई तिला बोलवायला गेल्या तर सोनाली कुठे दिसे ना. त्यांनी शेजारी पाजारी तिला खूप शोधलं. आम्हाला कळवलं. आम्ही पण तिला खूप शोधलं. पोलीस स्टेशनला मिसिंग पण नोंदवली. पण काही उपयोग झाला नाही. आज तुम्ही त्या मुलीची माहिती दिलीत तर त्यांना वाटतंय त्यांची सोनालीच असेल. आईची वेडी आशा.”

आम्ही सुमनताईला दुसर्या दिवशी बाल गृहात लागणारी कागदपत्र घेऊन यायला सांगितलं. माझी पण वेडी आशाच असेल, सुमनताई खरंच सोनाली उर्फ नाझियाची आई असेल तर आई-मुलीच्या भेटीला आणखीन एक दिवसाचा विलंब नको.

आम्ही बोलावलं त्याच्या आधी तासभर सुमनताई संस्थेच्या कार्यालयात येऊन वाट बघत होत्या. थोड्या वेळानी सोनाली उर्फ नाझिया चे वडील बाकीच्या दोन्ही मुलांना घेऊन पोहोचले. आम्ही गेल्यावर नियमाप्रमाणे त्यांनी सादर केलेले कागदपत्र बघितली. जवळ जवळ आम्हा सर्वांची खात्री पटली होती की समोर बसलेलं जोडपं हेच नाझिया चे खरे आई-वडील आहेत. सोनालीला बोलावलं. ती कार्यालयात आली. आणि ज्या पद्धतीने सोनाली धावत सुमनताई कडे गेली आणि आई म्हणत तिच्या गळ्यात पडून, तिला घट्ट मिठी मारून रडली. आणि सोनालीला बघता क्षणी जो आनंद त्या कुटुंबाच्या चेहेर्यावर बघितला, त्यानंतर आम्हाला आणखीन पुराव्याची गरज नव्हती. बाकीच्या फोर्मेलीती पूर्ण केल्या आणि सोनालीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं.

सोनालीच्या पालकांचा शोध चालू होता तेंव्हा दुसरी कडे पोलीस त्यांचं काम करत होते. मिळालेली माहिती, मनोहरने दिलेली तक्रार ह्याच्या आधारे त्यांनी त्या जोडप्याविरुद्ध मुलीचं अपहरण केल्या बद्दल केस दाखल केली. पुढे ती केस कोर्टात चालली. वास्तविक बघता सोनालीच्या आई-वडिलांचा शोध लागला आणि सोनालीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिल्यावर बाल कल्याण समिती म्हणून आमची जबाबदारी संपत होती. पण मागील ३-४ महिन्यांच्या कालावधीत मनोहरचं कारणा-कारणांनी बाल कल्याण समितीत खूप वेळा येणं झालं. आम्हाला नाझिया उर्फ सोनालीच्या केस मधे पुढे काय झालं हे जाणून घ्यायची उत्सुकता होतीच आणि मनोहर पण दर खेपेला केस संदर्भातील नवीन घडामोडींची माहिती देत राहिला. त्याच्या कडूनच आम्हाला समजलं की केस कोर्टात सुनावणीला आली तेंव्हा मनोहर फिर्यादी ह्या नात्याने एकटा हजर होता. पण ते भिकारी जोडप्याला आधार द्यायला, मदत करायला २०-२५ माणस होती. एवढंच नाही तर त्यांच्या बाजूनी युक्तिवाद करायला एक चांगला क्रिमिनल लोयेर उपस्थित होता. हे ऐकल्यावर आम्ही पण गोंधळून गेलो. हि माणस होती तरी कोण? ते खरंच भिकारी होते का आणखीन काही? त्यांच्या मागे त्यांना आधार देणारे, मदत करणारे कोण होते? त्यांच्या मागे कोणाचं पाठबळ होतं? जितका विचार करत होतो तितका विचारांचा गोंधळ वाढत होता. खालच्या कोर्टात त्यांना शिक्षा झाली. त्यांनी उच्च न्यायालयात अपील केलं, इथपर्यंत माहिती आम्हाला मिळाली. पुढे काय झालं ते समजलं नाही.

पुनःपुन्हा सोनालीची ह्या सगळ्यातून सुखरूप सुटका झाली आणि ती होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मनोहर बद्दल खूप अभिमान आणि आदर वाटत होता आणि आहे. खरंच समाजात, आपल्या अवती भवती अश्या किती गोष्टी, घटना घडत असतात. आपण त्या बघतो, कधी वाईट वाटतं, कधी हळहळतो. पण पुढाकार घेऊन करत काहीच नाही. ना ते थांबवण्याचा प्रयत्न करत, ना कोणाच्या निदर्शनास आणून देत. पण जास्त लोकांनी मनोहरसारखं वागायचं ठरवलं, तर सोनालीसारख्या अनेक मुलांना आणि मोठ्या माणसांनाही न्याय मिळायला आणि नव्याने आयुष्य सुरु करायला मदत होईल यात काही शंका नाही. पण जास्त लोकांनी मनोहरसारखं वागायचं ठरवलं, तर सोनालीसारख्या अनेक मुलांना आणि मोठ्या माणसांनाही न्याय मिळायला आणि नव्याने आयुष्य सुरु करायला मदत होईल यात काही शंका नाही.

Thursday, 22 June 2023

जसं पेराल तसं उगवेल

 २५ वीशी तील कविता, एक स्मार्ट, चुणचुणीत मुलगी ऑफिसमध्ये आली. जीन्सची पेन्ट आणि लूज शर्ट तिला छान दिसत होता. एरवी तिच्यातला आत्मविश्वास आज जाणवत नव्हता. ऑफिसच्या दाराशी जरा घुटमळत, आमचं लक्ष वेधायचा प्रयत्न करत उभी होती. किती वेळ अशी वाट बघत होती ठाऊक नाही, पण छायाचं लक्ष गेलं आणि तिने आत बोलवत विचारलं, “कविता, अशी दारात का उभी आहेस. ये ना आत ये. घरी सर्व ठीक आहे ना? नवर्याकडून काही निरोप? इथे ऑफिसमध्ये तर अजून काही फोन आला नाहीये. वाटलं परस्पर तुझ्याशी संपर्क साधून मिटवायचा प्रयत्न करत असेल एखादवेळेस. पण कविता, लिखापडी केल्याशिवाय परस्पर समझोता करून जाऊ नकोस.”

कविता ऑफिसमधे आली आणि टेबलापाशी घुटमळत उभी राहिली. तिच्या मनातील विचारांचा गोंधळ जाणवत होता. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण बहुदा सुरुवात कुठून करावी हे ठरत नव्हतं.

“ताई, दिपकचा फोन आला होता. तो खूप आजारी आहे. त्याचा आवाज पण खोल गेलेला, थकलेला वाटत होता. ताई, मला त्याची खूप काळजी वाटते आहे. मी त्याला बघायला जाऊन येते. जाण्यापूर्वी तुम्हाला भेटून, सांगून जावं, म्हणून आले. मागच्या २-३ वेळेला जी चूक (तुम्हाला न सांगता, कळवता गेले) केली ती माझ्या कडून परत व्हायला नको. ताई, मी तुम्हाला कसं सांगू? माझ्या मनात त्याच्यासाठी विचित्र भावना आहेत. तो खरंच एक चांगली व्यक्ती आहे. मला तो आवडतो. पण त्याच्या मैत्रिणी म्हणू की लफडी? हे कसं deal करावं हेच मला समजत नाहीये.” बोलता-बोलता कविताच्या डोळ्यात पाणी आल.

“कविता, तुला वाटणारी काळजी आम्ही समजू शकतो. पण तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय, एकदा कोणाकडून तरी, तुमचे नातेवाईक किंवा त्याचे मित्र ह्यांच्या कडून त्याला नेमकं काय झालाय हे विचारून घे. तुझ्या बरोबर कोणी येणार आहे का?”

ह्यावर तिने नकारार्थी मान हलवली.

“हे बघ कविता, तू आमच्या कडे तक्रार नोंदवून वर्ष होऊन गेलं. ह्या काळात आम्ही त्याला, ‘एकदा येऊन तुझी बाजू मांडून जा’ असं सांगायला पत्र पाठविली, फोन केले. पण तो काही आला नाही. आज येतो, उद्या येतो, असं सांगत राहिला. कधी आईला बर नाहीये, तर कधी कामावरून रजा मिळत नाहीये, अशी कारणे सांगून इथे येण्याचं टाळत राहिला. त्याच्या मनात नेमकं काय आहे ते समजायला हवं. आम्ही त्याला ‘ऑफिस मधे कधी येणार आहे?’, अशी चौकशी करायला फोन करतो. त्यावरून त्याला नेमकं किती बर नाहीये ह्याचा अंदाज येईल. त्याच्याशी फोनवर बोलणं होई पर्यंत तू इथेच थांब. जायची घाई करू नकोस.”

वर्षभरा पूर्वी कविता जेंव्हा तक्रार नोंदवायला आली होती तेंव्हाचा तिचा अवतार आणि आजचं तिचं रहाणीमान ह्यात खूप फरक पडला होता. आई-वडिलां बरोबर आलेली कविता. तिला कोणाचातरी, कशाचातरी खूप राग आला होता. तिच्या मनातील रागाची, अपमानाची भावना चेहेर्यावर दिसत होती. नेहेमी प्रमाणे तिला आणि तिच्या आई-वडिलांना बसायला सांगितलं. तिने चिडूनच आमच्या कडे पाहिलं आणि म्हणाली, “ओ म्याडम, मी काही बसायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला आले नाहीये. हे माझे आई-बाबा म्हणाले म्हणून मी आले आहे. आधी एकतर कुठेही आपल्या मुलीचं लग्न लाऊन द्यायचं. ना धड मुलाची, त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. ना त्याचं शिक्षण किंवा नोकरी बघितली. अरे कमीतकमी त्याची काही लफडी आहेत का? ह्याची तरी माहिती काढायला नको होती का? घाईत लग्न उरकलं आणि माझ्या आयुष्याचं वाट्टोळ केलं. आणि आता त्यातून काही मार्ग निघतोय का हे बघायला आणि आम्हाला मुलीची किती काळजी आहे हे दाखवायला तुमच्या कडे घेऊन आलेत.”

ह्यावर तिच्या वडिलांनी, “अग कविता बेटा, अग आम्ही तुझ्या .....”

“बाबा माझ्या भल्यासाठी केलत वगैरे नाटकं बंद करा. मला तुम्ही काही सांगू नका आणि समजावण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या आयुष्याचा झालाय तेवढा खेळ आणि तमाशा बास झालाय. तुमचा मान राखून मी ह्या ताई ला भेटायला आले आहे. त्यांनी काही केलं तर ठीक. नाहीतर मी हे सगळं माझ्या पद्धतीने सोडविन.”

कविताच्या समोर पाणी ठेवलं आणि तिला बसून हळू आवाजात बोलायची विनंती केली.

दोन घोट पाणी प्यायली, दोन मिनिटं डोळे बंद करून बसली. थोडी शांत झाली. शांत झाल्यावर तिचा अवतार, तिचं दिसणं बदललं. आम्हाला असं जाणवलं की कविता otherwise दिसायला स्मार्ट आहे. मगाच पेक्षा बर्याच शांतपणे आपलं म्हणणं तिने मांडल.

“ताई, सॉरी. ताई, माझं शिक्षण पूर्ण झालं, तेंव्हा मी जेमतेम २१ वर्षांची होते. कॉम्प्युटर मधे डिप्लोमा केला होता. आम्ही ग्रुप मधील सर्व मैत्रिणीनी दोन वर्ष नोकरी करायची, चार पैसे कमवायचे, धम्माल करायची, मज्जा करायची असं ठरवलं होतं. मी चांगल्या मार्कांनी पास झाले आहे हे ऐकून आई-बाबांना खूप आनंद झाला. त्या दिवशी आम्ही झक्कास पार्टी केली. नंतर दोन चार दिवस मजेत गेले. एक दिवस आईनी विचारलं, “कविता, तुझं शिक्षण झालं. आता पुढे काय करायचा विचार आहे?”

“मी आई पाशी मोकळेपणानी आम्हा मैत्रिणींचा प्लान सांगितला. तेंव्हा आई काही बोलली नाही. पण माझ्या मनातील विचार तिने बहुतेक झोपायच्या आधी बाबांना सांगितला. दुसर्या दिवशी सकाळी बाबांनी अचानक माझ्या लग्नाचा विषय आई समोर काढला. “मी काय म्हणतो सुमन, कविता आता मोठी झाली आहे. तिचं शिक्षण पण पूर्ण झालाय. तिच्या साठी योग्य स्थळ बघून यंदाच्या वर्षात तिचं लग्न उरकून टाकूया. म्हणजे टेन्शन नाही. माझ्या मामे बहिणीच्या (मंदाच्या) चुलत दिराचा मुलगा लग्नाचा आहे. माणस चांगलीच असतील. आता मामे बहिणीकडील स्थळ आहे म्हटल्यावर जास्त चौकशीची काही गरज वाटत नाही.”

ह्याला आईने पुस्ती जोडली, “आणि शिवाय नणंद बाईंच्या सासरकडील स्थळाची चौकशी केली तर त्यांना किती वाईट वाटेल? मी काय म्हणते, तुम्ही आज-उद्याकडे नणंद बाईना फोन करून बघता का?”

तेंव्हा मी माझा विरोध आणि निषेद नोंदवत म्हणाले, “आई-बाबा, मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. एखाद-दोन वर्ष नोकरी करते, थोडी मजा करते, मग तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करीन.”

ह्यावर बाबा विषय संपवत म्हणाले, “नोकरी, मजा, जे काही करायचं, ते लग्नानंतर करा. संपूर्ण आयुष्य पडलंय ते सगळं करायला. आयुष्यात सर्व गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बर्या असतात. आणि मला आता ह्या विषयावर अधिक चर्चा नको आहे.”

मी ह्या सर्वाला विरोध करायचा, लग्न टाळायचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्या दिवसानंतर आमच्या घरातील चक्र वेगानी फिरू लागली. स्थळाची चौकशी केली असं भासवल, पण ती अगदी जुजबी स्वरुपाची. म्हणजे केल्याचा दिखावा. कारण दीपकचं स्थळ निश्चित करतोय असं समजल्यावर आमच्या एका हितचिंतकांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं, “सुमनताई, मी असं ऐकलं की तुम्ही तुमच्या कविताचा विवाह मंदाताईच्या दीपकशी करताय. तसं स्थळ ठीक आहे. मुलगा पण ठीक आहे. पण त्याच्या मोठ्या भावाची चार महिन्या पूर्वी फारकत झाली आणि लागलीच त्याचं दुसरं लग्न पण करून टाकलं. कारण नीटसं कळल नाही. पण मला वाटलं की तुम्हाला माहिती असावं म्हणून फोन केला.”

मी तिथेच होते. फोन स्पीकर वर होता. त्यामुळे मी ते संभाषण ऐकलं होतं. पण त्यांनी आईला काहीच फरक पडत नव्हता.

आईने हि माहिती कोणालाच कळू दिली नाही. पण बहुदा बाबांना पण तिने काही सांगितलं नाही. आणि सांगितलं जरी असेल तरी त्यांना ते फार सिरिअस वाटलं नाही.

अशा रीतीने नोकरी करायची, मैत्रिणींबरोबर धम्माल करायची स्वप्नं रंगवणारी मी, परीक्षेचा निकाल लागल्यापासून वर्ष भरात कोण्या एका दीपकची बायको होऊन संसाराला लागले. घरात आम्ही ६ माणस! मी, दीपक,त्याचा मोठा भाऊ सुरेश, सुरेशदादाची बायको राधिका आणि त्याचे आई-वडील. जो तो आपापल्या कामात असायचा. कोणी कोणाच्या मधे बोलायचं नाही, असा घरचा नियम होता. जे काही सांगायचं, सुचवायचं ते सासूबाईंना. हे पण ठीक होतं. सासरे आणि सुरेश घरचं दुकान सांभाळायचे. दीपक त्याच्या ऑफिसला जायचा. घरात आम्ही तिघी जणी असायचो. पहिले जवळ जवळ ८ महिने मजेत गेले. माझी आणि राधिकाची पण बर्यापैकी दोस्ती झाली होती. एक दिवस असंच दुपारी दोघी गप्पा मारत असताना, का कोणास ठाऊक, मी तिला विचारलं, “राधिका, सुरेश दादाची पहिली फारकत झाली हे खरं आहे का? आमच्या लग्ना आधी कोणीतरी हि माहिती आम्हाला दिली होती. ते आठवलं म्हणून सहज विचारलं.” राधीकानी होकारार्थी मान हलवली. सहाजिकच माझा पुढचा प्रश्न ‘का’ होता. तिने क्षणभर माझ्या कडे बघितलं. बहुतेक स्वतःच्या मनाशी मला हे सांगावं की नाही हे ठरवत असावी. तिने माझा हात हातात घेतला आणि दबक्या आवाजात म्हणाली, “कविता मी जे तुला सांगणार आहे ते कोणाला सांगू नकोस. तुम्ही ऐकलत ते खरं आहे. तुझ्या सुरेश दादांची पहिली फारकत झाली आणि घाईघाईने माझ्याशी लग्न केलं. का ते नीटसं समजलं नाही. पण लोक म्हणत होते की त्यांना मुल बाळ होत नव्हतं, लग्नाला २ वर्षं उलटून गेली तरी! म्हणून फारकत घेतली. माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे, इकडची माणस चांगली आहेत, शिवाय ह्यांची देण्या घेण्याची काही पण अपेक्षा नव्हती. म्हणून आई-बाबांनी मला ह्या घरात दिली. आमच्या वयात जरा जास्त अंतर आहे, पण माणस चांगली आहेत. माझं लग्न झाल्यामुळे आई-बाबांच्या डोक्यावरचा थोडा बोजा कमी झाला. ह्यातच सगळं आल.” राधिकाच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत, विषय बदलत ती म्हणाली, “चला, आजचा दुपारचा चहा मी करते.” आणि ती उठून गेली.

मी विचार करत होते, ‘पण आमच्या लग्नात तर ह्या लोकांनी खूप मागितलं-सोनं, रोख पैसे, थाटामाटात लग्न आणि लग्नाचा सर्व खर्च.’ बहुतेक मोठ्या मुलाच्या लग्नातील सर्व कसर आमच्या लग्नात भरून काढली असेल.

राधिका आणि सुरेशच्या लग्नाला दोन वर्ष होत आली पण अजून चांगली बातमी येईना, म्हणून सासूबाई जरा अस्वस्थ होत होत्या. एक दिवस राधिकाला डॉक्टर कडे नेऊन तपासून आणलं. तिच्यात काही दोष नाही असं डॉक्टरने सांगितल्यावर वाट बघणं आल. तरी सासूबाईंना बर वाटावं म्हणून राधिका डॉक्टरकडे नियमित पणे तपासायला जात होती.

सणासुदीला दुकानात काम वाढल्या मुळे सुरेश दादा आणि सासरे यांना घरी यायला उशीर होऊ लागला. सुरेशदादाला कधी कधी रात्रीचे बारा वाजून जायला लागले. सणाचं निमित्त करून माझ्या आईनी, ‘कविताला चार दिवस माहेरी पाठवाल का?’ अशी विनंती केली. त्या रात्री दोन्ही मुलं आणि त्यांची आई ह्यांच्यात, मला माहेरी पाठविण्यावरून  बरीच चर्चा झाली. झोपायच्या आधी दिपकनी मला सांगितलं, ‘तू आठ दहा दिवस माहेरी गेलीस तरी चालेल, असं आईने सांगितले आहे.’

ठरल्याप्रमाणे मी माहेरी आले. आई-बाबा, मैत्रिणी सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. ८ दिवस कधी संपले कळलच नाही. उद्या परवा जावं लागणार. आणि जायची तर अजिबात इत्छा नव्हती. ‘ये दिल मांगे मोअर’ अशी माझी अवस्था होती. आणि काय आश्चर्य! रात्री १० च्या सुमारास दिपाकनी फोन करून कळवलं, “कविता, मला १५ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी बाहेरगावी जावं लागणार आहे. तर आई म्हणाली, तुला हवं असेल तर रहा अजून ८-१५ दिवस माहेरी. मी परत आलो की तुला घ्यायला येईन.” हे तर मला हवं होतं त्यापेक्षा पण भारी झालं. मी भराभर मैत्रीणीना फोन केले आणि पुढच्या १५ दिवसाचं टकाटक प्लानिंग केलं.

माहेरी येऊन दीड महिना होत आला. दीपक घ्यायला येईल म्हणून वाट बघत बसले. पण त्याचा काही निरोप आला नाही. अशी किती दिवस वाट बघायची? मला पण आता माझ्या घराची, माझ्या माणसांची आठवण येऊ लागली. एक दिवस आई-बाबांना सांगून, मी सासरी एकटीने जायचं ठरवलं. मीच ‘कळवू नका’ असं आई-बाबांना बजावलं होतं. मला घरी सगळ्यांना surprise द्यायचं होतं.

मी सासरी पोहोचले आणि बेल वाजवल्यावर दिपकनी दार उघडलं. मला अचानक आलेली बघून तो चांगलाच गोंधळला. आणि त्याला घरात बघून त्याच्या पेक्षा जास्त मी! घरात येऊन चपला काढत मी त्याला विचारलं, “अरे दीपक तू गावाला गेला होतास ना? ट्रेनिंगसाठी? आणि तिथून तू मला न्यायला येणार होतास? मग अचानक प्लान का बदललास? घरात सगळे ठीक आहेत ना? आणि हे काय? घरात कोणीच दिसत नाहीये. कुठे गेलेत सगळे?”

“अग कविता, किती प्रश्न विचारतेस? इथे सर्व मजेत आहोत. आई आणि राधिका बाहेर गेल्यात. येतीलच एवढ्यात. बाबा आणि सुरेश, दुकानात. आणि मी तुझ्या समोर उभा आहे. दिसतोय ना?” त्यांनी चेष्टेनी विचारलं.

माझ्या पाठोपाठच राधिका आणि सासूबाई आल्या. घरात येता येता त्या दीपकला उद्देशून म्हणाल्या, ‘काम झालं असं वाटतंय. लवकरच सगळं ठीक होईल.’

मी आश्चर्यानी विचारलं, “कसलं काम? आणि काय ठीक होईल?”

“वारसाच”. आणि मग सावरत म्हणाल्या, “अग, दुकान, घर ह्याला वारस. प्रोपर्तीला नाव लावायचं!”

तो विषय तिथेच राहिला. आमचं रुटीन सुरु झालं. मधेच राधिकाला खूप त्रास व्हायला लागला. डॉक्टर कडे जाऊन आल्यावर असं समजलं, राधीका प्रेग्नंट आहे. ह्या बातमीने घरात सगळ्यांना खूप आनंद झाला, जास्त करून सासूबाईंना! राधीकाचे डोहाळे, तिची काळजी, ह्या सगळ्यामुळे माझ घरातील काम खूप वाढलं. ह्या सगळ्या गोंधळात दीपक जास्त वेळ घरा बाहेर रहातोय हे माझ्या लक्षात आल नाही. हळू हळू त्याचं उशिरा येणं, मित्रांबरोबर बाहेर जाणं, पार्ट्या वाढत गेलं. मी घरातल्या कामानी इतकी दमून जात होते की कधी एकदा दिवस संपतोय असं व्हायचं.

असंच एक दिवस दीपक बाहेर गेला आणि त्याचा फोन वाजला. तो कधीच फोन विसरत नाही. कोणाचा तरी महत्वाचा असेल, असं वाटून मी तो घेतला. मी काही बोलणार त्याच्या आधी समोरून एका महिलेचा लाडिक आवाज आला, “दिपू डार्लिंग! तू असं का करतोस? दोन दिवस झाले, ना तू भेटलास ना तुझा फोन आला.....

फोन चालू होता. ती व्यक्ती समोरून काहीतरी लाडिक आवाजात बोलत होती. मी फोन कडे वेड्यासारखी बघत होते. समोर स्क्रीनवर मोना असं नाव दिसत होतं. कोण ही मोना? तिचा दीपकशी काय संबंध? दिपाकनी कधीच कोणा मैत्रिणीचा त्याच्या बोलण्यात उल्लेख केला नव्हता. पंकज आणि सागरच्या (जे त्याचे दूरचे नातेवाईक आहेत) व्यतिरिक्त मला त्याचे कोणी मित्र माहिती नव्हते. तर मैत्रिणींचा तर प्रश्नच नाही. त्यांच्यात मैत्रीचं नातं होतं का अजून काही? मला हे कधीच कसं जाणवलं नाही? हे असं केंव्हा पासून चालू असेल? एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालत होते. दीपकच्या प्रती राग, अविश्वास, अपमानित झाल्याची, फसवणूक झाल्याची भावना ह्या सर्वांचा मनात इतका गोंधळ होता की दीपक खोलीत आलेला मला समजलंच नाही. त्यांनी रागानेच माझ्या हातातून फोन घेत विचारलं, “तू माझ्या फोनला हात का लावलास? तुला एवढ पण समजत नाही की कोणाच्या पर्सनल गोष्टीना हात लाऊ नये. नोंसेन्स.”

तो गुश्यातच निघाला. मी त्याला विचारलं, “दीपक, हि मोना कोण? तिचा आणि तुझा काय संबंध?”

ह्यावर मला काही समजायच्या आत त्यांनी माझ मनगट घट्ट पकडलं आणि दरडावत म्हणाला, “कविता, बायको आहेस बायकोच्या मर्यादेत रहा. मालकीण व्हायचा विचार पण करू नकोस. हे प्रश्न आम्हाला आमच्या आईनी कधी विचारले नाहीत. तर तू कोण? लायकीत राहायचं.” आणि तो तरातरा निघून गेला.

माझ्यासाठी हे सगळं इतकं अनपेक्षित होतं की घरातील सर्व माणस आमच्या खोलीत उभी आहेत हे हि मला जाणवलं नाही. “कविता, पुरुषांशी बरोबरी करू नकोस. तो तुला काही कमी पडू देत नाहीयेना, तेवढ बघ. बाकी तो कुठे जातो, कुणाला भेटतो ह्याच्याशी तुझा काही संबंध नाही. झोप आता.” सासूबाईंच्या शब्दांनी मी भानावर आले. त्या रात्री मी खूप रडले.

आधी वाटलं आईला सांगावं. पण काय आणि कसं? तिचा विश्वास बसेल का? जवळ जवळ वर्ष झालय आमच्या लग्नाला. इतके दिवसात कशाची तक्रार नाही आणि आज अचानक मी हे असं सांगितलं तर? आणि मी हे सगळं सिद्ध तरी कसं करणार होते. दीपकने एव्हाना त्याच्या फोन बुक मधून तिचं नाव डिलीट केलं असेल किंवा मोनाच्या जागी अजून काही लिहिलं असेल. ह्या विचाराने मी गोंधळून गेले आणि सध्या काही न करण्याचा निर्णय घेतला. मी पुन्हा ह्याची वाच्यता कोणाशी केली नाही पण माझ्या पद्धतीने माहिती मिळवत होते. जी माहिती मिळत होती ती फार काही चांगली नव्हती. मोना डार्लिंग एकटी नव्हती. हे कळल्यावर दीपकच्या आणि माझ्या नात्यात अंतर पडू लागलं.

एक दिवस राधिका सोबत रुटीन चेकउप साठी मी गेले. लेडी डॉक्टरनी, “सर्व नॉर्मल आहे. तब्येतीची काळजी घ्या. पहिलीच वेळ आहे...”वगैरे नेहेमीचा सल्ला दिला.

मी सहज, उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं, “डॉक्टर, एखाद्या कपलला मुल होत नसेल तर त्यासाठी काही वेगळी treatment घ्यावी लागते का? तुमच्या कडे ती मिळू शकते का?”

माझ्या ह्या प्रश्नानी राधिकाचा चेहेरा पडला. डॉक्टर काही म्हणणार त्या आधी ती घाईघाईने उठली, “कविता, घरी खूप काम आहे. आपल्याला निघायला हवं” म्हणत केबिन च्या बाहेर गेली.

दिवस जात होते. कविताच्या delivary ची तारीख जवळ येत होती. मी माझी रोजची कामं करत होते. पण त्या दिवसाच्या फोनच्या प्रसंगानंतर सगळ्याची घडी जणू विस्कटल्या सारखी झाली होती. राधिकाला मुलगा झाला. पण मला त्याचा फारसा आनंद झाला नाही. घरातील सर्व नात्यांमधे एक अंतर येत चाललं होतं. बाळाच बारसं ठरलं. बारश्याला खूप लोक आणि नातेवाईक आले. भेटायला, बघायला, कौतुक करायला! त्यात खूप जणांची पहिली रिअक्श्न होती, ‘किती दीपक सारखा दिसतोय’. एका काकुनी तर चेष्टेनी विचारलं पण, “मंदाताई, मुलगा सुरेशचा की दिपकचा?” ह्यावर सासूबाई पटकन म्हणाल्या, “सरोजताई, तुमचा स्वभाव काही बदलत नाही. मनात आल की बाई बोलून मोकळी. अहो माझा नातू आहे तो! सुरेश आणि राधिकाचा मुलगा!”

हे सगळं ऐकून माझं मन बधीर झालं. मनात येत होतं, सणाचं निमित्त करून मला माहेरी १० दिवसांसाठी पाठवलं. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ दिपकनी साधा फोन केला नाही की माझी चौकशी केली नाही. त्या दिवशी घरात शिरतानाचं सासूबाईनी उच्चारलेलं वाक्य. हे सगळं काय आहे? मला काही समजत नव्हतं. सर्व पाहुणे गेल्यावर मी सासूबाई आणि राधिकाला उद्देशून विचारलं, “हे खरं आहे का?” राधिका खाली मान घालून उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. सुरेशदादा गप्प उभे होते. सासूबाईनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी मला एक थोबाडीत मारली आणि हाताला धरून घराबाहेर काढलं. दीपक आणि सासरे बघत होते, पण काही बोलले नाही. आणि त्या दिवशी मी माहेरी आले. आई-बाबांना सर्व सांगितलं आणि ते तुमच्या कडे घेऊन आले. आता ताई तुम्हीच सांगा मी ह्या माणसा सोबत कशी राहू?”

मागील एका वर्षात, कविता ४-५ वेळा तरी सासरी जाऊन आली. हि माहिती आम्हाला तिच्या बोलण्यातून समजली होती. ह्या पलीकडे अजून किती वेळा ती गेली होती ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही तिला खूप वेळा समजावून सांगितलं, ‘तुमचं भांडण, तुमच्यातील गैरसमज मिटला असेल तर आम्हाला तसं सांग म्हणजे आम्ही केस बंद करतो. आणि केसपेपरवर लिहितो- दोघांमध्ये परस्पर समझोता झाला आहे.’ ह्याला ती तयार नव्हती. तिला सगळं लेखी करून हवं होतं.

दर खेपेला जाऊन आली की तिची सासरच्या लोकांबद्दल एक वेगळी तक्रार असायची. कधी म्हणायची सासरे जीवे मारण्याची धमकी देतात, तर कधी तक्रार करायची घरातले सगळे तिला ‘निघ’ म्हणतात, घरा बाहेर काढतात. कधी म्हणायची माझ्या नवर्याला माझी गरज आहे. पण तिचा असाही आग्रह होता की सुयश हा दिपाकचा मुलगा नाहीये हे त्यांनी सिद्ध करावं. तिला नेमकं काय हवं होतं? तिची अपेक्षा काय होती? ह्याचा आम्हाला पण अंदाज येत नव्हता.

त्या दिवशी दिपकचा फोन आला. पण बोलणं नीट कळत नव्हतं. कविता थांबायला तयार नव्हती. “ताई मी जाऊन येते. दीपकला समक्ष भेटल्याशिवाय, बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही.” पुढे २०-२५ दिवस कविताची काही खबरबात नाही. आम्हाला पण ह्याची सवय व्हायला लागली होती.

नंतर एक दिवस दीपक आला. अचानक. ना फोन. ना येण्याची खबर. तोंडावर मास्क होता. चेहेरा थकलेला. आवाज खोल गेलेला. त्याच्या हालचालीतून असं जाणवत होतं की त्याला बर वाटत नसावं. समोरच्या खुर्चीत बसत त्यांनी धापा टाकत बोलायला सुरुवात केली.

“ताई मी दीपक. कवितानी माझ्या बद्दल काय सांगितलाय मला ठाऊक नाही. पण मला तिची गरज आहे. मला तिने परत यायला हवं आहे. ती मनात येईल तेंव्हा येते आणि तिच्या मनाला वाटेल तितके दिवस रहाते. आली की ती बरी आणि आमची रूम बरी. सारखा हातात मोबाईल. त्या मोबाईल वर काहीतरी उपलोड करत असते. स्वतापुरता  स्वैपाक करते. कधी तिचा मूड असेल तर माझा पण नंबर लावते. घरातील सगळे तिच्या वागण्याला कंटाळले आहेत. तिला नेमकं काय हवय तेच समजत नाहीये. ती अशी का वागते? आता महिन्याभरापूर्वी मला बर वाटत नाहीये कळवायला फोन केला तर दुसर्या दिवशी madam हजर. ‘येऊ नकोस’ असं बजावलं होतं, तरी आली. ती आली की तिचा माझ्या आई-वडिलांशी वाद होतो. ती काहीतरी असं बोलते की माझे बाबा चिडतात. राग अनावर झाला की ते हात उचलतात. मुळात त्यांचा स्वभाव तापट आहे.” बोलता-बोलता त्याला (ढास लागली) खोकला येत होता.

तो पुढे काही सांगणार तेवढ्यात “दीपक तू कधी आलास आणि कसा आलास? मोटर-सायकलवरून? असा तू बेजबाबदारपणे कसं वागू शकतोस. मी उद्या तिकडे येणार आहे असं सांगितलं होतं ना?” असं विचारात कविता ऑफिसमधे आली.

कविताला बघून आमच्या सर्वांच्याच चेहेर्यावर आश्चर्य बघून ती पटकन म्हणाली, “ताई, दीपक इकडे आलाय असा मला फोन आला होता?” कोणी केला हे विचारणं व्यर्थ होतं. आम्ही तिला बाहेर थांबायला सांगून दीपक कडून पुढील माहिती घेण्यास सुरुवात केली.

“दीपक, कविताच वागणं पहिल्यापासून असंच आहे का तुमच्या आयुष्यात असं काही घडलं ज्या मुळे ती अशी , म्हणजे तुम्ही म्हणालात तशी वागू लागली आहे? कविताच असं म्हणणं आहे की तुमची अफेअर्स आहेत. आणि तिला हे जेंव्हा समजलं आणि तिने तुम्हाला त्याबद्दल विचारलं तेंव्हा तुम्ही सर्व फार विचित्र पणे रीअक्त  झालात. हे खरं आहे का? आणि बाय द वे हि ‘मोना’ कोण आहे?”

“हे पहा ताई, माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचा कोणालाच अधिकार नाहीये. तुम्हाला नाही आणि तिला तर नाहीच नाही.”

तेवढ्यात दीपकला कोणाचा तरी फोन आला आणि तो घाईघाईने बाहेर गेला. तो बाहेर गेलेला बघून कवितानी आत येऊन सांगितलं, “ताई मी आज पण समझोता करून नांदायला जायला तयार आहे. त्याच्या आई-वडिलांना इथे बोलवून घ्या आणि त्यांना मान्य करायला लावा की त्यांचा मुलगा आणि त्याचं वागणं चुकलं. आणि दिपकनी दोनच गोष्टी लिहून द्याव्यात, ‘इथून पुढे तो इतर बायकांशी संबंध ठेवणार नाही आणि राधिकाच्या मुलाशी त्याच काही नातं नाही.’

दीपक आत आला. त्याचा चेहेरा दमल्यासारखा दिसत होता. त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतून घोटभर पाणी प्यायल आणि डोळे मिटून बसून राहिला. ‘दीपक, बर वाटतंय का? तुम्हाला इतकं बर वाटत नव्हतं तर आज इथे कशाला आलात? इतके दिवस तुमची बाजू ऐकायला थांबलो तर अजून काही दिवस थांबलो असतो.’ त्यांनी हातानेच ठीक आहे असं सांगितलं.

बँकेतील काम उरकून तेवढ्यात ऑफिस मधील संगीता आली. दीपकची अवस्था बघून ती पटकन म्हणाली,” ह्यांना काय झालाय? आता तर बाहेर कोणाशीतरी हसून बोलत होते आणि सांगत होते, “तू काही टेन्शन घेऊ नको. मी इथे सर्व बरोबर मेनेज करतो.”

हे ऐकून दिपकचा चेहेरा बघण्यासारखा झाला. तो तावातावाने उठला आणि बाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ कविता पण गेली. त्याला खरंच बर वाटत नाहीये का तो नाटक करतोय. का तो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळतोय, हे ठरवणं अवघड होतं.

थोड्यावेळानी बाहेरून जोरजोरात भांडण्याचा आवाज आला. बाहेर दीपकच्या मागे बाइकवर बसून जायचा प्रयत्न कविता करत होती. आणि दीपक हे होऊ देत नव्हता. कविताला ढकलून दीपक निघून गेला. कविता आत आली. तिच्या मागे तिचे आई-वडील आले. ती शांतपणे समोर बसत म्हणाली, “ताई, माझ्या लक्षात आलाय, हि माणस सुधरणार नाहीत, बदलणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात एका बाईची, तिच्या भावनांची काही किंमत नाही. तिला दोन वेळा गिळायला मिळालं, चार दागिने दिले, गरजेपेक्षा जास्त कपडा दिला की आणखीन तिच्यासाठी काही करण्याची गरज नाही. तिने ह्याच उपकारांच्या ओझ्याखाली आयुष्यभर त्यांची सेवा करावी, त्यांची नाटकं बघत,सहन करावीत हि त्यांची आणि समाजाची अपेक्षा आहे. मला कळून चुकलाय हा माझा प्रोब्लेम आहे. मी तो माझ्या पद्धतीने सोडविन. ताई, तुम्ही मला हिम्मत दिलीत. वेळोवेळी माझं म्हणणं ऐकून घेतलत, त्याबद्दल मी तुमची ऋणी राहीन. इथून पुढे कधी मदत लागली तर कराल ना? माझी केस बंद नका करू. कधी काय होईल हे मला पण माहित नाहीये.”

असं सांगून ती आमच्या ऑफिसमधून गेली. पुढे महिन्याभरानी तिच्या आईकडून समजलं की कविता, त्या दिवशी दीपकच्या पाठोपाठ सासरी गेली. १५ दिवस राहिली. कालपरवा ती बेग घेऊन पुन्हा कुठे तरी गेली आहे. आम्ही तिला ‘कुठे जातेस? कधी येणार? असं विचारणं बंद केलं आहे. तुम्हाला तिची खुशाली समजली तर प्लीज कळवाल का? अशी विनंती केली.

ह्यानंतर साधारण तीन महिन्यानी एक दिवस दिपकचा अचानक फोन आला, “ताई, मला तुमची मदत हवी आहे. मला कविताच वागणं समजत नाहीये. तक्रार करावी असं ती वागत नाहीये पण ती जे वागते आहे त्याचा मला त्रास होतोय. तीन महिने छान मजेत राहिली. कसला तरी हिशोब करत होती. काल अचानक कपाटातील तिचे दागिने आणि काही रोख घेऊन ती गेली. कुठे माहिती नाही. पोलीस स्टेशनला खबर करायला गेलो तर समजलं की ती जातानाच पोलीस स्टेशनमधे, सोबत घेतलेल्या वस्तूंची नोंद करून, माहेरी जात आहे असं सांगून गेली आहे. पोलिसांनी सांगितलं, ‘अहो ती तिच्या वस्तू घेऊन गेली आहे. त्याची नोंद घेता येईल. तक्रार नाही.’

काल तिचा फोन आला होता. म्हणाली, “काळजी करू नकोस. मी ८ दिवसात परत येईन. आई-वडिलांनी मला घातलेलं सोनं आणि लग्नात केलेला खर्च परत करायला हवा, असं मला वाटतं. आपल्या सुखी संसाराची स्वप्न बघत त्यांनी, त्यांना न परवडणारा हा खर्च केला होता. आपल्या लग्नाचं काय झालाय आणि चाललाय हे तुला चांगलच माहित आहे.”  मी तिला विचारलं, “कविता, तू असं का वागतेस? तू कुठे जातेस?”

तर म्हणाली, “माझ्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करायची कोणालाच परवानगी नाही. अगदी तुला पण नाही. काळजी करू नकोस. मी माझी वेळ झाली की परत येईन.”

दिपक फोन ठेवण्यापूर्वी एक वाक्य म्हणाला, ‘ताई, कविता अशी नव्हती. ती अशी का वागते आहे मला काही समजत नाहीये. तिचा बाहेर कोणी मित्र नाही ह्याची मला खात्री आहे. कधी कधी तिचं वागणं बघून मनात वाटतं, ती कशाचा तरी बदला तर घेत नसेल ना? पण कशाचा आणि का?’

‘जसं पेराल तसं उगवेल’ हे दीपकच्या बाबतीत घडत होतं!

Thursday, 23 March 2023

माझ्या घरी मी पाहुणी

 

मनीषा, एक ३६-३७ वयाची महिला! साधारण सहा महिन्यापूर्वी आमच्या कार्यालयात आली. कष्ट करून आयुष्य जगणारी. बेताची परिस्थिती असावी. अंगावर नेसलेली साडी जुनी, वापरून जुनी झालेली होती, पण तिच्या कडे जे काही होतं त्यात ती व्यवस्थित रहाण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की एरवी ताठ मानेनी जगणारी, जगाला टक्कर देण्याची हिम्मत असलेली आज कशानी तरी खचल्यासारखी, गोंधळल्यासारखी झाली आहे की काय? ती ऑफिसमधे आली ती थेट आमच्या समोर येऊन बसत म्हणाली, “ताई, मी मनीषा. माझे वडील मला माझ्या घराबाहेर निघ म्हणतात. मी काय करू? कुठे जाऊ? ताई, मी माझ्या मुलांना सोडून कशी जगू? तुम्ही प्लीज मला मदत करा.”

“मनीषा, तू आधी शांत हो. काय आणि कस घडलं ते शांतपणे, सविस्तर सांग. तुला तुझे वडील घराबाहेर निघ म्हणतायत, तर तू मुलांना घेऊन माहेरी, त्यांच्या घरात राहातीयेस का? तुझा नवरा कुठे आहे? त्याचं ह्या बद्दल काय म्हणणं आहे? नीट सगळं सांग.”

“ताई, माझे आई-वडील कामाच्या शोधात नाशिकला आले आणि इथेच राहिले. वडील कंपनीत नोकरी करायचे. आई चार घरची धुणी-भांडी करायची. दोघं दिवसभर कामानिमित्त बाहेर रहायचे. माझं १०वि पर्यंतच शिक्षण वस्तीतल्या शाळेत झालं. मला पुढे शिकायचं होतं. माझा हट्ट होता म्हणून वडिलांनी त्यांना परवडत नसताना माझी कॉलेजमध्ये अडमिशन केली. ११वि च शिक्षण मजेत झाल. माझं वय वाढत होतं. वस्तीतल्या मुलांच्या नजरा, त्याचं वागणं बदलत होत. हे आई-वडिलांना कळल तर काय होईल? ते माझं शिक्षण बंद करतील का? ह्या भीतीने मी आई-वडिलांकडे ह्या संदर्भात काहीच बोलले नाही. पण त्यांच्या कानावर गोष्टी येत होत्या. त्यांच्या मनात भीती होती, ‘त्यांना माझ्या बद्दल खात्री होती पण एकाच गोष्टीची काळजी वाटत होती की, आपल्या अपरोक्ष आपली मुलगी सुरक्षित राहील का?’

दोघांनी बराच विचार केला. दोघांपैकी कोणीही काम सोडून घरी बसणं परवडणार नव्हतं. मग काय? त्यांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला. २५ वर्षांचा महेश, वडिलांच्या कंपनीत नोकरी करत होता. तो अनाथ होता, निर्व्यसनी होता, कष्टाळू होता! कुणाशी कधी वाद नाही की भांडण नाही. तो बरा आणि त्याचं आयुष्य बर! मागील ५-७ वर्ष वडिलांच्या बरोबर काम करत होता, परिचयाचा होता. ह्यापेक्षा स्थळाकडून जास्त, माझ्या आई-वडिलांच्या, अपेक्षा पण नव्हत्या. एक दिवस वडिलांनी महेशला घरी जेवायला बोलावलं. (तसं वडील त्याला अधून-मधून सणासुदीला जेवायला घरी बोलवत असत.) जेवणं झाल्यावर वडिलांनी सरळच मनातला विषय मांडला. महेश साठी ते थोडं अनपेक्षित होतं. तो थोडा गोंधळला पण स्वतःला सावरत म्हणाला, “दादा, मनीषा बरोबर लग्न करून तुमच्याशी इतकं जवळचं नातं जोडलं गेलं तर मला आनंदच होईल. पण माझी एक अडचण आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मी अनाथ आहे. माझ्या बाजूनी लग्नाची बोलणी करायला, लग्नानंतर मनीषाच कौतुक करायला कोणी नाही. शिवाय लग्नाचा खर्च मला झेपेल का? हा पण एक प्रश्नच आहे.”

मोहनचा लग्नाला होकार आहे हे समजल्यावर मनीषाच्या वडिलांना पण बर वाटलं. लग्न घरच्या-घरी, साधेपणानी करायचं ठरलं. सर्वांच्या सोईचा दिवस मुहूर्त म्हणून निश्चित केला. वडिलांच्या कंपनीतील ७-८ जण आणि आम्ही घरातील व शेजारी मिळून ८-१० जण. असं २० एक लोकांच्या साक्षीने माझं लग्न झालं. एका महिन्यापूर्वी १२वि नंतर काय शिकायचं ह्याची स्वप्नं बघणारी मी, अचानक मोहनची बायको झाले, त्याच्या घरी आले आणि संसाराला लागले.

मोहनचा स्वभाव चांगला होता. निर्व्यसनी, समजूतदार. कामात व इतर गोष्टीत मदत करायला तैयार! त्याचं जे उत्पन्न होतं त्यात जमेल तशी माझी हौस भागवायचा. सुरवातीला वडिलांनी, ‘मनीषा आमची एकुलती एक मुलगी. आम्ही इकडे दोघंच असतो व तुम्ही पण दोघंच. त्यात मनीषाला घरकामाची फारशी सवय नाही. तुम्हाला सोयीचं असेल आणि तुमची हरकत नसेल तर तुम्ही दोघं आमच्या घरात शिफ्ट व्हा’, असं सुचवून पाहिलं.

पण मोहनला हे मान्य नव्हतं. त्यांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही तो रहात होता त्याच खोलीत रहायला लागलो. दिवस मजेत चालले होते. काटकसर आणि कष्ट माझ्यासाठी काय आणि महेश साठी पण काही नवे नव्हते. स्वतःच, दोन खोल्यांचं का होईना पण आपलं हक्काच एक घर असावं, असं त्याचं आयुष्याचं स्वप्नं होतं. त्यांनी पैसे साठवायला सुरुवात केलीच होती. दोघांनी त्यासाठी मेहेनत करायची ठरवली. लग्नाला २-४ महिने झाले आणि मी पण चार घरची काम करायला लागले. चार पैसे बाजूला पडू लागले. लहान मुलं गुल्लक मधील जमा जशी शंभर वेळा मोजतात, तसं आम्ही पण दर १५ दिवसांनी पैसे मोजायला लागलो.

लग्ना नंतर दीड एक वर्षात माधवचा जन्म झाला आणि त्यानंतर साधारण वर्षाभरांनी माधुरीचा! माधवच्या पाचव्या वाढदिवसाला आम्ही, काही साठवलेले पैसे भरून व बाकीचं बँकेकडून कर्ज घेऊन, एक रो-हाउस बूक केलं. ३-३.५ वर्षात आम्हाला त्याचा ताबा मिळाल्यावर आम्ही तिथे शिफ्ट झालो. अखेरीस स्वतःच घर झालं. खूप आनंद झाला. आमचं कौतुक करायला आई-वडील भेटायला व आठ दिवस रहायला आले.

आमच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली बहुतेक. पुढे वर्षभरात माझ्या आईचं निधन झालं. आई गेल्याने माझे वडील अगदी पार खचून गेले. त्यांनी कामावर जाण बंद केलं. दिवसच्या दिवस एकटे घरात बसून रहायला लागले. रोज त्यांना जेवणाचा डबा पाठवणं आणि त्यांची विचारपूस करणं जिकिरीच होत होतं. आम्ही त्यांना, ‘तिकडे एकटे राहू नका’ असं म्हणायचाच अवकाश होता. ते लगेचच आमच्या कडे रहायला आले. सर्व सुरळीत चाललं होतं. मोहनच्या नोकरीतून आणि माझ्या कामातून आमचं जेमतेम भागत होतं. मुलांचं शिक्षण, पाहुणे, रोजचा पाच जणांचा खर्च, बँकेचे हप्ते, सगळं मिळून ओढाताण होत होती. मुलानापण ते बहुदा समजत असाव. त्यांनी कधी कशासाठी हट्ट केला नाही. किंवा कधी वायफळ खर्च केला नाही. जमा-खर्चाचा ताळमेळ बसावा म्हणून मोहनने कारखान्यातील असेम्ब्ली च काम घरी आणायला सुरुवात केली. पुढे वर्ष-दोन वर्ष बरी गेली. एक दिवस मोहनला झोपेतच attack आला!

मोहनच्या निधनानंतर मात्र मी पार खचून, गोंधळून गेले. सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकटीवर आली होती. हि मी कशी पेलणार होते? मुलाचं शिक्षण व त्यावरील वाढता खर्च, आमच्या जगण्यावर, जेवण्या खाण्यावर होणारा खर्च मी कशातून भागवणार होते? हे घर, हा डोलारा मी एकटी, माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात कसा सांभाळणार होते? घरात दुखः करत, रडत बसून भागणार नव्हतं. मी माझी सर्व दुखः बाजूला सारून कंपनीतील साहेबाना जाऊन भेटले आणि ‘मला काहीतरी काम द्या’ अशी विनंती केली. त्यांचा ८ दिवसात होकारार्थी निरोप आला. मोहनला जाऊन दोन महिने पूर्ण होण्या आधीच मी कंपनीत कामाला लागले. चार घरची काम करून महिन्याला मिळणार्या पगारापेक्षा कंपनीत मिळणारा पगार खूप जास्त होता. त्यानी आमची आर्थिक गणितं सुटायला लागली. हे जरी खरं असलं तरी माझी खूप धावपळ होऊ लागली. घरकामाला वेळेची मर्यादा नसते. १० मिनिटं उशीर झाला म्हणून कामवाल्या बायकांनी कधी कटकट केली नाही. किंवा पगार कापला नाही. कंपनीत तसं नव्हतं. एक मिनिट पण उशीर झालेला चालत नसे. घरातील काम, स्वैपाक, बसचा प्रवास व त्यासाठी बस-स्टोप पर्यंत करावी लागणारी पायपीट, आणि कंपनीतील कष्टाची काम! सगळ्यांनी जीव दमून जायचा.

त्या काळात संजय मला देवासारखा भेटला. एक दिवस मी बसची वाट बघत उभी होते तेंव्हा तो मोटर-सायकल वरून आला आणि म्हणाला, “म्याडम, तुम्हाला घरी सोडू का? मी तुमच्या घरापाशीच रहातो. तुमच्या पुढच्या कंपनीत कामाला आहे. मी तुम्हाला रोज बघतो.”

हो-नाही म्हणत मी त्याच्या मागे त्याच्या गाडीवर बसून घरी आले. त्यांनी मला घराच्या कोपर्यावर सोडलं. रोजच्या पेक्षा अर्धा तास मी लवकर घरी पोहोचले. घरात शिरतानाच वडिलांनी विचारलं,” काय ग मनीषा, बस लवकर मिळाली वाटतं?” मी होकारार्थी मान हलवली आणि कामाला लागले.

हे असं वरचेवर घडू लागलं. मला पण संजयच्या येण्याची, त्याला भेटण्याची, त्याच्याशी चार गोष्टी बोलण्याची सवय व्हायला लागली. बर वाटत होतं. समवयस्क पुरुषाशी बोलण्याचा, काही गोष्टीत त्याचा सल्ला घेण्याचा अनुभव नवीन होता, पण सुखद पण होता. आपली जबाबदारी कोणीतरी वाटून घेताय असं वाटायला लागलं. माझं हे असं रुटीन बर चालल होतं. एक दिवस माधव घरी आला आणि मला जाब विचारल्याच्या आवाजात म्हणाला, “आई तू रोज कामावरून घरी कोणा बरोबर येतेस? कोण आहे तो माणूस? आणि आता नाही म्हणून खोटं बोलू नकोस. माझ्या मित्रांनी तुला पाहिलं आहे, त्या माणसाच्या गाडीवरून उतरताना!”

माधवनी अचानक विचारलेल्या प्रश्नानी मी थोडी गोंधळून गेले. मी पहिलं जे मनात आल ते सांगितलं. “त्याचं नाव संजय आहे. तो माझ्या कंपनीतल्या मैत्रिणीचा भाऊ आहे. आणि आजच मला सोडायला आला होता. रोज काही येत नाही.” “आणि काय रे माधव, तू आईला जाब विचारण्या इतका मोठा कधी झालास?”

इतका वेळ शांत बसलेले वडील माधवची बाजू घेत म्हणाले, “हे बघ मनीषा, माधवनी विचारलेला प्रश्न चुकीचा नाहीये. मागच्याच आठवड्यात कोपर्यावरचा वाणी मला देखील विचारत होता, ‘काका तुमच्या मनीषाला हल्ली खूप वेळा कोणाच्यातरी गाडीवर बसून येताना बघितलं. आता ह्या वयात तिचं दुसरं लग्न लाऊन द्यायचा विचार-बिचार नाही ना? मी आपलं सहज विचारलं. असलाच विचार तर आम्हाला बोलवायला विसरू नका.’ असं म्हणत तो कुचेष्टेनी हसला.”

माधव लगेच म्हणाला, “आई, म्हणजे माझे मित्र म्हणत होते ते खरं आहे तर. माझे मित्र मला त्यावरून हसतात. आजपासून तू त्या माणसा बरोबर यायचं नाही. आणि यायचं असेल तर ह्या घरात राहायचं नाही. तुझं हे असं वागणं चालणार नाही.”

त्या दिवशी सगळेच खूप चिडलेले होते, म्हणून मी काहीच बोलले नाही. पण हे अलीकडे वरचेवर होतंय. आज तर माधवनी सगळ्याची परिसीमाच गाठली, “त्यांनी मला जवळ जवळ हाताला धरून घराच्या बाहेर काढलं.”

मनीषा बोलायची थांबली. थोडं पाणी प्यायली आणि म्हणाली, “ताई, मी काय करू? कुठे जाऊ? कशी राहू? मला काही समजत नाहीये. मला प्लीज मदत करा.”

तिच्याशी बोलताना असं समजलं की ते रहात असलेलं घर तिच्या आणि मोहनच्या नावावर होतं. ह्याचा अर्थ तिचा त्या घरावर मालकी हक्क आहे. मोहनच्या निधनानंतर मुलांचा पण त्या घरावर हक्क आहे. तिने आमच्याकडे लेखी तक्रार दिली. त्याच्या आधारे आम्ही तिच्या वडिलांना आणि माधवला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं, आणि त्यांना कल्पना दिली की, “मनीषाला घराबाहेर काढायचा त्यांना अधिकार नाही. त्या दोघांनी तसं करू नये.”

ठरल्याप्रमाणे ८ दिवसांनी माधव त्याच्या आजोबाना घेऊन आला. मनीषा थोडी उशिरा आली. ती कंपनीतून परस्पर आली होती. तिच्या बरोबर संजय पण होता, पण तो बाहेर थांबला होता. माधवनी बोलायला सुरुवात केली,”म्याडम, मला, माझ्या आई-वडिलांनी आमच्या साठी काय केलाय, किती कष्ट उपसले आहेत, ह्याची चांगलीच कल्पना आहे. मी माझ्या आईला देवा समान मानतो. पण तिने ह्या माणसा बरोबर गाडीवर बसून घरी येणं थांबवावं. गल्लीतले लोक तिच्या बद्दल खूप विचित्र बोलतात. ते ऐकवत नाही. माझे मित्र माझी चेष्टा करतात. माधुरीला काय ऐकावं लागत असेल, तिचं तिलाच ठाऊक. तिने ह्याबद्दल कधी एक अवाक्षर पण काढल नाही. पण तिच्या समोर काहीतरी बोललं जातच असेल. ताई आम्हाला ह्या गोष्टींचा त्रास होतो. आमचं बाकी काही म्हणणं नाही. आईनी बाहेर जावं, नोकरी करावी, चार पैसे कमवावेत आणि तिचं आयुष्य सुखात जगावं. पण हि व्यक्ती तिच्या आयुष्यातून जायला हवी. त्याचं नाव आमच्या आईशी जोडलेलं चालणार नाही. त्या व्यक्तीला सोडून आई यायला तयार असेल तर तिला आम्ही आज पण घरात घ्यायला तयार आहोत.”

“माधव, तुझा थोडा गैरसमज होतो आहे. तू तुझ्या आईला त्या घरात राहण्याची परवानगी देणारा कोण? घर आईच्या आणि तुझ्या वडिलांच्या नावावर आहे. मनीषाने त्या व्यक्तीसोबत यावं की नाही, तिच्या अश्या वागण्याने तुम्हाला होणारा मानसिक त्रास, तुमची होणारी बदनामी हे मी समजू शकते. ह्याबद्दल चर्चा करायलाच तुम्हाला बोलावलं आहे. मला सांग, तुझ्या आईनी काम करून चार पैसे कमवण्याची तुमची गरज आहे. घरातली सगळी काम, प्रवासाची दगदग, कंपनीत करावं लागणारं कष्टाचं काम, ह्या सगळ्यांनी ती दमून जाते. ह्या सगळ्यात तू तिची काय व कशी मदत करू शकशील? असा विचार करूया. घर कामात मदत करशील का? घरातील स्वच्छता, कपडे धुवायचे, भांडी घासायची, अशी मदत? तू आणि तुझी बहिण, दोघं मिळून घर सांभाळा आणि ती नोकरी करेल. चालेल का? गाडीवर बसून येणं हि तिची चैन नसून, लफडं नसून, एक गरज असू शकेल का? वेळ आणि दगदग वाचवण्यासाठी?”

ह्यावर माधव पटकन म्हणाला,”ताई, माधुरी यंदा १२ वीत आहे. तिने अभ्यासच करायला हवा. तुम्ही म्हणता तशी मी जर घरातील काम केली तर माझे मित्र माझ्यावर हसतील. माझी चेष्टा करतील. खिल्ली उडवतील. मला जगू देणार नाहीत. मी घरात काम करायचा काही संबंधच नाही. मी पण नोकरी शोधतोय. मिळाली की लावीन घरखर्चात हातभार! आम्ही काम केलं किंवा नाही केलं तरी तिला असं जगायचा काय अधिकार? आणि हा तिला कोणी दिला? महत्वाचं म्हणजे तिने त्याच्या सोबत येणं बंद करावं.”

इतका वेळ सगळं शांतपणे मनीषा ऐकत होती. ती म्हणाली, “ठीक आहे. आज पासून मी नाही येणार त्याच्या सोबत. पण घरातील काम मला जेवढ आणि जसं जमेल तसं मी करीन. मलाही हे एकटीने रेटण बास झालाय.”

त्यानंतर जवळ जवळ ३-४ महिने सगळं शांत होतं. एक दिवस अचानक माधवचा फोन आला,” ताई, माझ्या आईला काहीतरी समजावून सांगा ना. ती अजून त्या माणसा बरोबर फिरते. त्याचा माझ्या आईशी काय संबंध? त्या दोघांनी ह्याचा खुलासा करावा. त्या दिवसानंतर तिचं घरातील वागणंच बदललाय. घरात फारसं लक्ष देत नाही. घरी वेळेवर येत नाही. आणि फारसं कोणाशी बोलत देखील नाही.”

आम्ही फोन करून मनीषा आणि संजयला भेटायला बोलावलं. कंपनीतून ते दुसर्या दिवशी आले. मनीषाच्या बोलण्यातून हे जाणवत होतं की ‘संजय सोबत लग्न करायची तिची तयारी आहे. तयारी पेक्षा इत्छा आहे. ह्यावर संजय उडवा-उडवीची उत्तरं द्यायला लागला. त्याच्या मते मनीषा सोबत लग्न करण्याचा त्याने कधी विचार पण केला नव्हता. तो तिला कंपनीत जाताना-येताना लिफ्ट द्यायचा, तिला फिरायला घेऊन जायचा, हे सर्व तिला बर वाटत होतं, तिला आवडत होतं म्हणून. “एकट्या बाईसाठी आपली थोडी समाजसेवा.”

ह्यावर मनीषानी त्याला आठवण करून दिली की आठच दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी लग्न करायच वचन दिलं होतं. मग ते काय होतं?

संजय स्पष्ट काहीच बोलत नव्हता. तो लग्नाला नकार पण देत नव्हता किंवा मोकळ्या मनाने मनीषा बद्दलच्या त्याच्या भावना मान्य पण करत नव्हता.

त्या दिवशी काहीच ठरलं नाही. १ महिन्यानी पुन्हा भेटायचं ठरलं. ह्या वेळेस मात्र संजयने त्याचं म्हणणं स्पष्टच मांडल. तो म्हणाला, “माझी लग्न करायची तयारी आहे, पण लग्न करून आपण रहाणार कुठे? रस्त्यावर? माझ्या खोलीचं आधीच दोन महिन्याचं भाडं थकलाय. ते मी देऊ शकलो नाही तर ह्या महिना अखेरीस मला माझी रूम खाली करावी लागेल. मी तुला आधीच सांगितलं होतं की लग्नानंतर तुझ्या घरात राहू. खरं तर घर तुझ्या नावावर आहे. तुझे वडील आणि मुलं तिथे अजून किती दिवस रहाणार आहेत? एक तर त्यांनी बाहेर जावं नाहीतर आपण सगळे तिथेच एकत्र राहू.”

 

“हे कसं शक्य आहे? माधवला तर तू माझ्याशी बोललेपण आवडत नाही. माझे वडील तुला घरात राहू देणार नाहीत. वडिलांची तब्येत आज-काल ठीक नसते. त्यांच्या अश्या अवस्थेत मी त्यांना घरातून जा नाही म्हणू शकणार. माधुरीचं शिक्षण पूर्ण व्हायला ६ महिने शिल्लक आहेत. ते झालं की तिचं लग्न लाऊन तिची सासरी पाठवणी केली की मग आपण माधवशी हे बोलूया. आपण तुझ्या खोलीचं भाडं भरून तिथे राहू शकतो ना? तू तसा विचार करून बघ ना?” असं मनीषाने बारीक आवाजात सुचवून पाहिलं.

“हे बघ मनीषा, आपण लग्न केलं तर तुझ्याच घरात राहू. ते कसं मेनेज करायचं ते तू बघ. त्या घरावर तुझाच तर हक्क आहे. मग प्रोब्लेम कुठे आहे?” असं म्हणत संजय जायला उठला.

त्या दिवशी त्याला आम्ही सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला की त्या घरावर मनीषाचा जितका हक्क आहे तितकाच तिच्या मुलांचा पण आहे. आणि वडिलांना संभाळण तिची जबाबदारी आहे. तेंव्हा ती त्यांना घराबाहेर काढू शकत नाही.

“म्याडम, मनीषा नी काय करायचं हे तिने ठरवावं. मी माझी अडचण सांगितली. अजून एक मार्ग निघू शकतो, घर विकून आपापल्या हिश्याचे पैसे घेऊन मोकळे होऊ दे.”

पुन्हा काही निर्णय होऊ शकला नाही. पण ह्या वेळेस मात्र मनीषा म्हणाली, “ताई मलाच ह्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, हे माझ्या लक्षात येतंय. मी सगळ्यांशी मोकळी चर्चा करते आणि काय ठरतंय ते ८ दिवसात कळवते.

८ दिवसाचा महिना होऊन गेला तरी मनीषा चा काही निरोप आला नाही म्हणून चौकशी केली तर समजलं की तिच्या वडिलांचं १५ दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

पुढे एका महिन्यानी मनीषा आणि माधव ऑफिस मधे आले. मनीषा संजय सोबत लग्न करणार हे माधवला समजलं होतं. आता प्रश्न घराचा होता. तो कसा सोडवायचा ह्यासाठी दोघं ऑफिसमधे आले होते. दोघं आपापल्या मतांवर, मुद्द्यांवर ठाम होते. माधवच स्पष्ट म्हणणं होतं की, हे त्याच्या आईचं आयुष्य आहे. तिला कसं जगायचं ते तिचं तिने ठरवावं. पण संजयशी लग्न केल्यावर तिने त्यांच्या बरोबर रहाता काम नये. संजय त्या घरात आलेला चालणार नाही. आणि दुसरं, संजयशी लग्न केलं तर तिचा आमच्याशी काहीही संबंध रहाणार नाही. माधुरीचं लग्न लावायची जबाबदारी एक भाऊ ह्या नात्याने तो, माधव घेणार. सर्वात महत्वाचं, कुठल्याच परिस्थितीत घर विकायचं नाही. ह्यावर मनीषा म्हणाली, “मी आणि संजय लग्न करणार आहोत. माधुरीची जबाबदारी तिचे पालक ह्या नात्याने आम्ही घेऊ. घर विकून आपापला हिस्सा घेणं माधवला मान्य नसेल तर नाईलाजाने आम्हाला त्या घरात राहावं लागेल. त्या संदर्भात जे काही लिहून घ्यायचं ते लिहून घ्या.”

हि सगळी चर्चा संजय ऑफिसच्या दारात उभा राहून ऐकत होता.

  ऑफिसमधील चर्चा जसजशी तापायला लागली तसा तो ऑफिसमधे आला आणि म्हणाला, “मला काय वाटतं म्याडम, एवढा वाद घालण्यापेक्षा, दोघांना सांगा, घर विकून मोकळं व्हा आणि आपापली आयुष्य सुखानी जगा.  त्याला बघितल्यावर माधव आईला उद्देशून चिडून म्हणाला, “हा माणूस इथे काय करतोय? आई, हा तुझा यार असेल, लफडं असेल. तुमच्या दोघांमधलं नातं काय आहे हे समजून घेण्याची माझी इत्छा नाही. तो तुला पुढे करून, तुझ्या भावनांशी खेळून स्वतःचा फायदा करून घेतोय. हे तुला समजत कसं नाहीये? पण जाऊ दे. ते बोलायची वेळ निघून गेली आहे. घर विकायचं नाही आणि हि व्यक्ती आमच्या घरात नको, हे फायनल!”

“घर विकायचं नसेल तर लग्नानंतर मी आणि संजय त्याच घरात रहाणार हे माझं पण ठरलाय.”

दोघांना समजवायचा खूप प्रयत्न केला. पण फारसा उपयोग झाला नाही. हा प्रश्न सोडवण्याचे दोनच मार्ग आहेत. समजुतीने एकत्र रहा. किंवा समजुतीने घराची वाटणी करा. नाहीतर कोर्टात जाऊन केस दाखल करून आपला हाच हक्क कायद्याच्या मदतीने मिळवा.

त्या दिवशी सगळे निघून गेले. त्यानंतर मनीषा आणि संजयनी, ठरल्या प्रमाणे लग्न केलं आणि ते मनीषाच्या घरी रहायला गेले. अपेक्षेप्रमाणे माधव आणि संजय मधे खूप बाचाबाची आणि मारामारी झाली. दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशन मधे तक्रार केली. पोलिसांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही दिला तोच सल्ला दिला. त्यांना तो मान्य नव्हता. माधव आणि संजय मधे भांडणं होतंच राहिली. कालांतरानी पोलिसांनी पण दखल घेणं सोडून दिलं. आज दोघांनी कोर्टात दावा दाखल केला आहे. कोर्टातल्या चकरा आणि वकिलाचा खर्च ह्या पलीकडे त्यांच्या आयुष्यात काहीच फरक  पडला नाहीये.

आजच्या घडीला एकच सुधारणा झाली आहे की आई आणि मुलगा यांच्यात ते घर विकून येणारे पैसे वाटून घ्यावेत असं ठरलंय.आता पुढचा वादाचा मुद्दा आहे कोणाला किती हिस्सा मिळणार हा!

एकूण काय मोहननी कष्टानी घर बांधलं खरं, पण ना त्याला त्याचा फार काळ उपभोग घेता आला नाही. ना त्याच्या कुटुंबाला ते सांभाळता आल ना उपभोगता! मनिषाने स्वतः कष्ट करून बांधलेल्या घराचं काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी तिच्या आयुष्यातले दोन पुरुष एकमेकांशी भांडत होते. कारण बाईला कमावण्याचा अधिकार जरी मिळालेला असला तरी खर्च करण्याचा अधिकार मात्र अजूनही फार दूर आहे.